Thursday 18 March 2021

सुखी सहजीवनाचा सुवर्ण महोत्सव...

 

आसावरी काकडे

सेतू, डी-१/३, स्टेटबँकनगर, कर्वेनगर, पुणे ४११०५२

९४२१६७८४८०, ९७६२२०९०२८

asavarikakade@gmail.com

 


माई-दादा यांच्या लग्नाला पन्नास वर्षं पूर्ण झाली...! असा कोणताही ‘प्रवास’ फक्त ‘आपला’ एकट्याचा कधी असत नाही. आपल्या प्रत्येक वाढदिवसाबरोबर आपल्या असण्याला बिलगलेलं सगळंच एक वर्ष चालून पुढं आलेलं असतं. एका अर्थी माई-दादांच्या लग्नाचा सुवर्णमहोत्सवी वाढदिवस आपल्या सगळ्यांचाच ‘वाढदिवस’ आहे. तो कसा साजरा करावा याचा विचार करताना ‘माई-दादांविषयीच्या आठवणी जागवत, त्यांच्याविषयीच्या भावना लिहून व्यक्त कराव्यात...’ अशी कल्पना सुचली.

त्या दृष्टीनं लिहायला सुरुवात करताना मन पन्नास वर्षं मागं गेलं... माईच्या लग्नाच्या दोन छोट्याशा आठवणी मनात ताज्या आहेत. एक माईचा राणीकलरचा सुंदर शालू. माईनं तो शालु नेसलाय, मोजक्याच दागिन्यांनी नटलीय आणि दादा सुटाबुटात.. असा त्यांचा एक फोटो आहे. दोघं राजा-राणीच वाटतायत त्यात..! आणि दुसरी आठवण- प्रेझेंट म्हणून मी माईला साडीपीन आणि दादांना टायपीन दिली होती...

विचार करताना आणखी काही आठवणी डोळ्यांपुढून सरकत राहिल्या.. बँकेतल्या नोकरीमुळं दादांच्या बदल्या व्हायच्या. बार्शी, लोणंद, नंदुरबार, अंमळनेर, तळेगाव ढमढेरे, सातारा रोड... अशा बर्‍याच ठिकाणी त्यांचं बिर्‍हाड फिरलं. प्रत्येक गावच्या त्यांच्या विशेष आठवणी असतील. तशा आमच्याही आहेत. काही काही निमित्तांनी एकत्र जमल्यावर निवांत गप्पा, हास्य-विनोद चालायचे. त्यात त्या आठवणींचे किस्से सांगून माई सगळ्यांना हसवायची आणि स्वतःही पोट धरून हसायची. तळेगाव ढमढेरे इथल्या घराच्या दारात ट्रक उभा करतात म्हणून माई रागवायची आणि दादा शांतपणे तिला समजवायचे. मग ती आणखी चिडायची, म्हणायची मग बाहेर जाताना आम्ही काय ट्रकमधून जायचं?.. हा किस्सा ऐकताना, मुलांना घेऊन माई ट्रकच्या एका दारातून आत शिरून दुसर्‍या दारातून बाहेर पडतीय असं दृश्य डोळ्यासमोर उभं राहायचं आणि आम्ही खो खो हसायचो... प्रत्येक गप्पांमधे या किश्शाची फर्माईश व्हायची आणि प्रत्येक वेळा हशा पिकायचा..! डोळ्यात पाणी येईपर्यंत पोट धरून हसता येणं हा माईच्या व्यक्तीमत्वाचा एक सुंदर आणि निरगस पैलू आहे.

माईच्या लग्नाला एक-दोन वर्षं झाली असतील. दरम्यान माझंही लग्न झालेलं. मी बॅंकेत नोकरी करत होते. तेव्हा दादा आणि माई एकदा पुण्यात आलेले असताना मला भेटायला बँकेत आले होते. बँकेच्या दारातच आम्ही थोडा वेळ बोललो आणि ते गेले. ‘कुणीतरी आलंय असं समजल्यावर उत्सुकतेनं बाहेर आलेली मी आणि समोर माई-दादा...’ असं दृश्य अजून स्पष्ट आहे डोळ्यांसमोर. काही मिनिटांच्या त्या भेटीत फार काही न बोलता एकमेकींची ‘खुशाली’ आम्हाला समजली आणि ती भेट संस्मरणीय झाली.

एकदा आम्ही कुठल्यातरी गावाला जाणार होतो. सामान भरून ठेवेलेलं. पहाटे निघायचं होतं. आणि अचानक लहानग्या योगेशला घेऊन माई घरी आली. त्याला बरं नव्हतं आणि डॉक्टर आमच्या घराजवळ होते म्हणून ती आमच्याकडे आली होती. आम्ही ठरल्याप्रमाणे गावाला गेलो. योगेशला बरं वाटेपर्यंत काही दिवस ती आमच्या घरी राहिली. जानेवारी महिना असावा... तिनं हळदीकुंकु समारंभही केला. आता आठवताना मनात आलं, योगेशला बरं नसताना, आम्ही घरी नसताना तिनं सगळं कसं निभावलं असेल? तेही इतक्या आनंदानं... आता असंही वाटलं की ती आलेली असताना आम्ही गेलोच कसे?... आता अवघड वाटणार्‍या कितीतरी गोष्टी तरूण वयात सहज केल्या जातात..!

वेगवेगळ्या बदल्यांच्या गावी फिरताना परत परत नव्यानं संसाराची मांडणी करावी लागायची. पण माईला ही सुसंधी वाटायची. ‘नवे गाव नवी मांडणी’ यातला आनंद घेतल्यामुळं माई-दादांचा पन्नास वर्षांचा संसारही नवीन वाटतो. माईकडं कधीही गेलं तरी घरातल्या वस्तूंपासून त्यांच्या मांडणीपर्यंत सगळं नवं, फ्रेश दिसण्यातलं रहस्यही तिच्या या मानसिकतेतच आहे अस मला वाटतं. इतकंच नाही, प्रत्येक गावात माई काहीतरी नवीन शिकत राहिली. लेदरच्या पर्सेस, कागदाची फुलं, पठण, भजन.. असं काय काय केलं तिनं. स्वतः शिकून भोवतीच्या बायकांना शिकवलंही. निर्मलाताई पुरंदरे यांनी सुरू केलेला अंगणवाडीचा कोर्सही तिनं मनापासून केला. ती निर्मलाताईंच्या मर्जीतली विद्यार्थिनी होती. तिच्याकडून आत्ता मीही भजनं म्हणायला शिकतेय. श्वासाचा व्यायाम म्हणून गाणी म्हणून आम्ही एकमेकींना पाठवत असतो... कधी कधी दादांचंही गाणं, बासरी ऐकायला मिळते. खूप छान वाटतं. या विरंगुळ्यामुळं आताचा निवृत्तीनंतरचा काळ आम्ही एन्जॉय करू शकतोय.

दादांचा स्वभाव शांत, काहिसा अबोल, तरी मिस्किल आहे. त्यांनी माईच्या नवनवीन गोष्टी शिकण्याला प्रोत्साहन, सहकार्य दिलं असणार. त्यामुळेच ती सर्व करू शकली. तिनं बनवलेल्या वस्तू आम्हाला भेट म्हणून मिळायच्या. माझ्या कवितांचं तिला कौतुक आहे. त्यामुळे मला तिच्याकडून बरीच बक्षिसं मिळालेली आहेत. आमच्या दोघीत दीडच वर्षाचं अंतर आहे. पण तिच्या मोठं असण्याचा मला नेहमी आदर वाटत राहिला. माईनं केलेला आंगणवाडीचा कोर्स ही कौतुकाची गोष्ट होती तर तिनं केलेली नर्मदा परिक्रमा हा एक वंदनीय चमत्कार होता..! तसं पाहिलं तर आपण जगत असलेला प्रत्येक क्षण चमत्कारच असतो. पण त्यातले काही अधोरेखित करावे असे असतात.

माई-दादांच्या लग्नाला पन्नास वर्षे पूर्ण झाली म्हणून त्यांना शुभेच्छा देताना असं काय काय आठवलं... त्यांचा सातारला आमराईत टुमदार बंगला आहे आणि पुण्यात टेरेस फ्लॅट आहे.. मुलं-सुना-नातवंडं यांच्या समवेत आणि नातलगांच्या गोतावळ्यात दोघं जगण्याचा उत्सव रोजच साजरा करत असतात. त्याच्या सुखी सहजीवनाला अभिवादन..!

माईची भारती

१५.२.२०२१

 

 

 

 

No comments:

Post a Comment