Monday 28 September 2020

एक चांगलं माणूस होण्यासाठी...


माझी एक मैत्रिण एकदा मला म्हणाली, ‘तुझं बरं आहे.. नशीबवान आहेस तू. सगळं तुला घराजवळ, तुला हवं तसं मिळत जातं.. काही त्रास नाही...’ माझ्याविषयीची अशी प्रतिमा मला ओळखणार्‍या अनेकांच्या मनात असेल. काही प्रमाणात ते खरंही आहे. पण पूर्ण खरं नाही. सगळं मला घराजवळ मिळतं म्हणजे जेघराजवळ मिळतं ते मी चालवून घेते. लांब, गर्दीत जाऊन चिकित्सा करत खरेदी करण्यात वेळ घालवणं मला आवडत नाही.व्यावहारिक पातळीवर जगताना बर्‍याच बाबतीत असा त्रास मी करूनच घेत नाही. आपल्या सर्व क्षमताकशासाठी वापरायच्या, कशासाठी कष्ट घ्यायचे याविषयीची प्रत्येकाची भूमिका वेगळी असते...

माझ्याविषयीची ही ‘स्वस्थ, सुखी’ वाटणारी प्रतिमाबाहेरून दिसणारी आहे. आणि दैनंदिन जगण्याच्या पातळीवर ती खरीही आहे. अपेक्षेपेक्षा बरंच काही मला मिळालंय. पण एक माणूस म्हणून मला हवी तशी मी अजून घडायचीय. एका दीर्घ आंतरिक संघर्षातून ही घडण अजूनही चालू आहे. व्यवहारी जगण्यात अनेक गोष्टी चालवून घेणारी, शक्यतो संघर्ष टाळणारी मी,दुर्लक्ष करून चालण्यासारख्या बर्‍याच गोष्टींचा त्रास करून घेत असते.आयुष्याची पहिली पस्तीसहून अधिक वर्षे वेगवेगळ्या पातळ्यांवरच्या व्यावहारिक संघर्षांना सामोरं जावं लागलंतेव्हा माझ्या प्रतिक्रिया काय होत्या हे आठवताना लक्षात येतंय की त्यावेळीही माझी हीच वृत्ती होती... ती माझ्यात कुठून, कशी आली? माझ्या आयुष्यात संघर्षाचे प्रसंग किती आले? मी त्यांना कशी सामोरी गेले? त्यातून मी काय मिळवलं?... विचार करता करता लहानपणापासूनचे बरेच प्रसंग डोळ्यासमोर चलचित्रासारखे सरकू लागले...

वडील खूप तापट आणि विक्षिप्त वाटण्याइतके एककल्ली होते. त्यामुळे घरचं वातावरण बरेचदा तंग असायचं. जन्मापासून तेच अनुभवल्यामुळे लहानपणी तरी घरात आरडा-ओरडा, फेकाफेकी.. असं झालं की घाबरून गुपचुप बसायचं आणि वातावरण निवळलं की हसा-खेळायला लागायचं...अशी प्रतिक्रिया असायची.आमच्या घरी सणवार, व्रतं, उत्सव, पूजा असं काही व्हायचं नाही. कुणी आपल्याकडे यायचं नाही. आपण कुणाकडे जायचं नाही. अशी आमच्याकडली दहशत वाटावी अशी रीत होती. पण अगदी लहानपणीसुद्धा याविषयी मला कधी राग आला नाही. त्याबद्दल कधी हट्ट केला नाही. उलट तेच मला आवडायचं. आताइतकी वैचारिक स्पष्टता त्यावेळी नव्हती तरी लोक सणवार इ. सर्व करतात त्याचीच चीड यायची... घरच्या एकूण वातावरणामुळे लहानपणखरंतर कोमेजत होतं. पण त्याची तशी जाणीव कधी झाली नाही. इतरांना मिळतं ते आपल्याला नाही मिळत याचं वाईटही कधी वाटलं नाही.

खूप काळ अस्वस्थ करणारी अगदी लहानपणाची एक आठवण,काही न मिळाल्याची नव्हती तर ‘मिळाल्या’ची होती... तेव्हा मी तिसरीत होते. काही तरी स्पर्धा होती. बक्षीस म्हणून रिबिनी वाटल्या गेल्या. सगळ्या मुलींबरोबर मीही एक रिबीन घेतली. पण मला आनंद झाला नाही. उलट आपण मागून घेतली याचंच अपराधीपण सलत राहिलं कित्येक वर्षे...आपण चूक केली, आपण वाईट आहोत...असं मनावर कोरलं गेलं. अजूनही मनाला लावून घेतलेली तिसरीतली मी मला चांगली आठवतेय...

माझ्या मोठ्या बहिणीपेक्षा मला जास्त मार्क्स मिळायचे नेहमी. पण त्याचा आनंद व्हायच्या ऐवजी नकोत तिच्याहून जास्त मिळायला असं वाटायचं. एकदा तर मला का जास्त मार्क्स मिळतात म्हणून रडल्याचं आठवतंय.. गोष्टी तशा साध्याच. पण त्यामुळे होणारा मनस्ताप... आंतरिक संघर्ष खूप जास्ती होता... ज्या गोष्टींचा त्रास होणं स्वाभाविक झालं असतं त्या गोष्टी मी बिनबोभाट स्वीकारत होते. मला त्रास देणार्‍या गोष्टी वेगळ्याच होत्या... आई सांगते की अजून बोलायला लागले नव्हते त्या लहान वयात मी बरेचदा खूप रडत राहायची... ‘भूक लागलीय का? काही दुखतंय का?’... असे रडू येण्याच्या शक्यता असलेले सर्व प्रश्न आई विचारायची. त्या सगळ्याला नको, नाही अशी माझी मान हलायची. मग सुखानं रड असं म्हणत आई माझा नाद सोडून द्यायची...वडलांचा अतितापट स्वभाव माझ्यात उतरला होता म्हणे. जरा काही मनाविरुद्ध झालं की माझी आदळआपट, चिडाचिड, रडारड सुरू व्हायची...हे पाहून आजी मला म्हणायची ‘चुकून मुलीच्या जातीला जन्माला आलीय... बापाच्या पावलावर पाऊल आहे अगदी...’वयाच्या सहाव्या-सातव्या वर्षी बर्‍याचदा कानावर आलेली ही वाक्यं माझ्यात अपराधी भाव पेरत राहिली... तिसरीतली सलणारी आठवण यामुळंच गडद झाली होती.

घरातील वातावरण दिवसेंदिवस बिघडतच होतं...हे वातावरण मला न मागता मिळालेलं होतं. ते स्वीकारायचं की नाही असा पर्याय माझ्या समोर नव्हता... पण त्याविषयी माझी काही दृश्य स्वरूपाची तक्रार नव्हती. आपल्याच वाट्याला असं का? असा प्रश्नही मला कधी पडला नाही. थोडी मोठी झाल्यावरही याचं कारण काय? कुणाचं चुकतंय? यावर उपाय काय? असा विचार मनात आला नाही... पण या निमुट वाटणार्‍या स्वीकारामागे मुळारंभाशी नेणारा अस्फुट आक्रोश होता.त्यातूनच बहुधान कळत्या लहान वयातच मला आपण जन्मालाच का आलो आहोत आणि आलोच आहे तर त्याचं काय करायचं आहे? असे प्रश्न व्याकुळ करण्याइतक्या तीव्रतेनं पडू लागले.नुसता विचार करण्याखेरीज कोणताच मार्ग समोर नव्हता... मग त्या विचारांचं ओझं पेलवेनासं व्हायचं.. जगायला पुरेसं सबळ कारण नसेल तर मग कशाला जगायचं? नकोच जगायला... इथपर्यंत विचार पोचायचे.. मनात यायचं की अशी दिनचर्या असावी की विचार करायला वेळच मिळू नये...

समज येत गेली तसं भोवतीचं सगळं चुकीचं, अपुरं आहे असं जाणवायला लागलं. आपलं आयुष्य भोवतीच्या या माणसांसारखं नको असायला असं वाटायचं. पण तसं नको तर कसं हवं? त्यासाठी काय करायला हवं? हे कळत नव्हतं... बहुतेक वेळा तंग असणार्‍या घरातल्या  वातावरणाचं कारण वडीलांचा तापट, विक्षिप्त स्वभाव हे आहे हे लक्षात येत होतं. पण त्यावर मला काही उपाय करता येण्यासारखा नव्हता.

माझे वडील बुद्धीमान होते. त्यांच्यात बरेच कलागुण होते. व्यायामानं कमावलेलं शरीर होतं. चारचौघात उठून दिसेल असं व्यक्तिमत्व होतं. जमीन-जुमला, शेतीवाडी, चौसोपी वाडा, भरपूर सोनं-चांदी अशी इस्टेट त्यांच्या नावावर होती... पण यांपैकी कशाहीमुळेमाझ्या आईला सुख मिळालं नाही. ती आला दिवस सहन करत राहिली... आम्ही अगदी सामान्य आर्थिक स्थितीत वाढलो.आमच्यावर जाणीवपूर्वक कोणतेही संस्कारझाले नाहीत... घरात सतत तंग आणि अस्थिर वातावरण, आणि बाहेरच्या जगात मोकळेपणानं वावरण्याला बंदी.. घरात अभ्यासाखेरीज वाचायला फक्त आध्यात्मिक ग्रंथ यामुळे लहानपण नको एवढं गंभीर झालं. व्यवहारी जगात व्यवहारी अर्थानं चांगलं जगायला लागतं ते सर्व मुबलक प्रमाणात असूनही केवळ वडिलांच्या ‘स्वभावा’मुळे आम्ही सर्व सामान्य, अस्थिर आणि क्लेषकारक स्थितीत जगत होतो. आणि तोच ‘स्वभाव’ माझ्या वाट्याला आला होता म्हणे!वेगवेगळ्या तर्‍हेनं मनावर हे बिंबत राहण्यामुळे मी सतत स्वतःला कुरतडत राहायची. या अपराधी भावनेच्या पोटात असलेली आंतरिक परिवर्तनाची अत्यंतिक निकड मला सतत अस्वस्थ ठेवत होती. प्रश्नांचं मोहोळ उठवत होती...!

आमची आई आणि आम्ही पाच भावंडं वाट्याला आलेलं भोगत होतोच पण वडील स्वतः सुद्धा ‘स्वस्थ’ नव्हते. उलट कुणालाच कधी न कळालेल्या आंतरिक झंजावातात ते हेलपाटत राहिले. त्यांनाही बहुधा स्वतःच्या मर्यादांमधून बाहेर पडायचं होतं पण ते त्यांना जमत नव्हतं. मग अपुर्‍या तयारीनिशी, अतिरेकी मार्गानं आध्यात्माच्या नादी लागून अधिकाधिक गर्तेत जात त्यांनी स्वतःचा सर्वनाश ओढवून घेतला. वयाच्या अवघ्या बावनाव्या वर्षीच ते आम्हाला सोडून गेले...! शेवटी ते ज्या अवस्थेत होते त्यातून त्यांची सुटका झाली आणि आमचीही... तो प्रसंग फार विदारक होता... त्यांच्या आठवणीनं दुःखापेक्षा भीतीच अधिक वाटायची... तसंच होतं त्यांचं शेवटचं दर्शन! या दुःखद भीतीचं सावट बराच काळ आमच्यावर होतं.

या सगळ्याचा मी प्रचंड धसका घेतला होता. ‘वडीलांच्या पावलावर पाऊल टाकून चालणार्‍या’ माझं आयुष्य मला तातडीनं सावरायला हवं होतं...मला माझा असा शेवट होऊ द्यायचा नव्हता.त्यासाठी स्वतःत अमुलाग्र आंतरिक परिवर्तन घडवण्याची गरज मला तीव्रतेनं जाणवली. शिक्षण, बुद्धिमत्ता, सांपत्तिक स्थिती, कलागुण, जात... या कशाहीपेक्षा स्वभाव, रोजच्या जगण्यातलं वर्तन हे अधिक महत्त्वाचं आहे हे मी आमच्या कुटुंबजीवनातून शिकले होते. सर्व गोष्टी प्रयत्नांनी मिळवता येतील पण ‘स्वभाव’ कमावणं दुरापास्त आहे हेही घरातल्या उदाहरणानं चांगलंच दाखवून दिलं होतं...

लहानपणापासून वाट्याला आलेलं वरकरणी मी निमुट स्वीकारत होते तरी त्याचा निषेध नकळत आतल्याआत होत राहिला असेल काय? तोपर्यंत कधीही व्यक्त न झालेलंपरिस्थिती बदलण्याचं बळ,पुढे मला जे हवंच होतं ते मिळवण्यासाठी माझ्या कामी आलं. माझं आयुष्य मला हवं तसं घडवता येईल असा जोडीदार निवडताना मी पहिला दृश्य स्वरूपाचा संघर्ष केला... या बाबतीतलानिर्णय घेताना मला ज्याचं अप्रुप होतं असा ‘स्वभाव’ असणं ही एकमेव अपेक्षा ठेऊन मी व्यावहारिक पातळीवरच्या इतर सर्व गोष्टी नजरेआड केल्या. माझी पसंती व्यावहारिक, परंपरागत रूढ विचारात बसणारी नव्हती.काळजीपोटी आईचा ‘मी तुला मेले...’ असा निकराचा विरोध होता. त्यामुळे संघर्ष अटळ होता... परिस्थितीशी आणि स्वतःशीही!पण आंतरिक निकडीशी प्रामाणिक राहत, पडेल ती किंमत मोजत मला हवं ते मी मिळवलं!जाणीवपूर्वक हे सर्व केल्यामुळे लग्नानंतर अनेक अभावांशी कराव्या लागलेल्या संघर्षांबद्दल मुळातच स्वीकाराची भावना होती.

आता राहत असलेल्या दोन बेडरुम्सच्या फ्लॅटमधे येण्यापूर्वी पोटभाडेकरु म्हणून मिळालेली एक खोली... बंगल्याच्या बाजूची एक खोली... गावठाण भागातली दीड खोली... हौसिंग बोर्डाच्या दोन खोल्या अशा घरांमधे आम्ही १७-१८ वर्षे राहिलो... अनेक उणीवा गृहीत होत्या. त्याबद्दल तक्रारीचा प्रश्नच नव्हता. पण अधिक हवं याची घाईही नव्हती...पण लग्नानंतर पहिल्याच वर्षी आजारी झाले. ब्रेन ट्युमर हे निदान झालं. नोकरी, घर दोन्ही बाबतीत स्थैर्य नव्हतं. दोघांच्या घरातल्यांच्या सहकार्याची अपेक्षा करता येण्यासारखी नव्हती. पुण्यात नवीन होतो. काही माहीती नव्हती. ओळखी नव्हत्या. आणि पैसे तर नव्हतेच... पण अशा काही घटना घडत गेल्या की पुण्यातल्या कमांड हॉस्पिटल मधे आजाराचं निदान झाल्यापासून चार दिवसात ऑपरेशन झालं. आईला नुसतं कळवलं होतं. ये म्हटलं नव्हतं तरी ती आली. महिनाभर हॉस्पिटलमधे होते... मुंबईच्या लोकलमधे चढणं-उतरणं गर्दीच्या रेट्यामुळे कळायच्या आत होऊन जातं तसंअचानक आलेल्या या प्रसंगातून आम्ही बाहेर पडलो..!

पण बरी होऊन घरी येतानासांगण्यात आलं की ‘ट्युमर’ कापून काढणं धोक्याचं असतं म्हणून तो काढलेला नाहीय. तो वाढू नये यासाठी आत एक ट्यूब बसवलीय आणि ती आत तशीच राहणार..! हे ऐकून बरं वाटायला लागलं होतं तरी नव्यानं पुन्हा धडकी भरली... पण असंही समजलं की मला त्या वेळी- ७२ साली उपलब्ध असलेल्यातली जगातली सर्वोत्तम ट्रीटमेंट मिळालेली आहे...!तेव्हाजाणवलं की किती धोकादायक संकटातून आम्ही किती सुखरूप बाहेर पडलोय! तरी शारीरिक आणि मानसिक पातळीवरील या धक्क्यातून सावरण्यात आणि संसार, नोकरी यात स्थिरावून नॉर्मल होण्यात जवळ जवळ दहा वर्षे गेली. वडीलांचा विदारक अंत आणि त्यांच्या शेवटच्या काळात आमच्या कुटुंबात घडलेल्या क्लेषकारक घटनांच्या आठवणी यातूनही ते सावरणं होतं. याच काळात आम्हाला मूल न होण्याचा प्रश्नही येऊन गेला. त्याचा आम्ही फारसा बाऊ केला नाही. सुरुवातीला तर ही इष्टापत्तीच वाटली. मला पारंपरिक रीतीनं संसार करण्याची आवड नव्हतीच. तरी हे सत्य स्वीकारणं आनंददायी अर्थातच नव्हतं.त्यानं क्लेष देण्याचं आपलं काम बराच काळपर्यंत निभावलं!

या सगळ्यातून दोन गोष्टींमुळे मी खर्‍या अर्थानं सावरले. एक- मी लुना चालवायला शिकले आणि पर्वती जवळच्या घरापासून ससून हॉस्पिटल जवळच्या बॅंकेपर्यंत लुनानं जाऊ लागले. शारीरिक पातळीवर मी अगदी नॉर्मल झाल्याचा विश्वास यातून मिळाला. आणि दुसरी- मी कविता लिहू शकते याचा शोध मला लागला..!मग मी लिहितच गेले... या लेखनामुळे वैचारिक, भावनिक पातळीवर घुसमटवणार्‍या आंतरिक संघर्षाला व्यक्त होण्याचा मार्ग मिळाला.मी मोकळी होऊ लागले...

सर्व संघर्षांना व्यावहारिक पातळीवर स्वीकाराच्या मानसिकतेतून सामोरी जात होते, एक प्रकारे शांत होते. तरी त्याचा व्यत्यास असल्यासारखी बिनचेहर्‍याची अस्वस्थता आतल्या आत घुमत राहायची.. वैयक्तिक जगण्यातले प्रश्न, मी आहे ते आहे तसं स्वीकारून किंवा जे मिळणं शक्य नाही ते नकोच आपल्याला असं म्हणून सोडवून टाकले. आजुबाजूच्या घटना, माणसं, त्यांचं जगणं पाहून हे सगळं काय चाललंय? का चाललंय? असे प्रश्न विचलित करायचे. त्यावर विचार व्हायचा खूप. पण विचारांचा प्रवास उपाय शोधण्याच्या दिशेनं होण्याऐवजी कारणं शोधण्याच्या दिशेनं व्हायचा. अमूर्त पातळीवरचा हा प्रवास मनाच्या वेगानं अनेक टप्पे ओलांडत मुळारंभाशी असलेल्या‘आपण मुळात जन्मालाच का आलो आहोत?’ या सतत अनुत्तरित राहणार्‍या, असंख्य उपप्रश्न पोटात बाळगणार्‍या आणि एका अर्थी बिनकामाच्याप्रश्नाशी येऊन धडकायचा. हा प्रश्न म्हणजे जिवंत ठेवणारी धग होती. पण  तिनं मला कितीतरी  काळ तिथल्या तिथेच घुमवत ठेवलं. पार दमछाक केली माझी... यातून सुटका करणारी,विचार करायला उसंत न देणारी, एके काळीमला हवी होती तशी,नोकरी आणि संसाराची दिनचर्या मला मिळाली होती. वैचारिक स्तरावर निष्क्रिय करणार्‍या अस्वस्थतेचा तो काळ होता...तेव्हा कवितेनं आतून धक्के देत मला सक्रीय करायला सुरुवात केली.

लेखनाबरोबर हळूहळू वाचनालाही गती आणि दिशा मिळत गेली. तिथल्या तिथेच हेलपाटणारे विचार मोकळे, सजग आणि ‘कृतिशील’ होऊ लागले...आत्मपरीक्षणानं विचारलं की माझं मूलभूत प्रश्नांच्या नादी लागणं म्हणजे वर्तमानापासून पळणं तर नाही? समोरची परिस्थिती सुधारण्याचा कृतीशील प्रयत्न करण्याऐवजी या सगळ्याच्या मुळाशी काय असेल असा ‘निरुपयोगी’ विचार मी का करत असते?... उत्तर आलं कीकोणत्याही गोष्टीच्या मुळाशी जाण्याची ही प्रवृत्ती मी जाणीवपूर्वक कमावलेली नव्हती. माझा तसा स्वाभाविक कल होता. कॉलेजात गणितं सोडवताना ती सोडवण्यासाठी दिलेली सूत्र पाठ करण्यापेक्षा ती कशी बनली असतील ते समजून घेण्यात मला रस वाटायचा.मला गणित कसं सोडवायचं असा प्रश्न पडायचा नाही. ते मी बहुतेक वेळा सोडवू शकायची. एखादं नाही सुटलं तरी ते ओलांडून पुढे जाणं फारसं जड नाही जायचं. पण त्यामागचं सूत्र समजण्याची जिज्ञासा मला बराच काळ अस्वस्थ ठेवायची...

माझ्या क्षमतांच्या मर्यादेत मूलभूत गोष्टी जाणून घेण्यातली अस्वस्थ ठेवणारी जिज्ञासा आणि लहान वयात वेळोवेळी मनात पेरला गेलेला अपराधी भाव, त्यातून निर्माण झालेली आंतरिक परिवर्तनाची निकड या दोन प्रेरणा मला वैचारिक संघर्षाला सामोरं जायला भाग पाडत राहिल्या... सर्व क्षमता ज्यासाठी खर्ची घालाव्य़ात अशा या दोन गोष्टींपुढे मला बाकी सर्व कमी महत्त्वाचं वाटत होतं...

अशा काळात आमच्या घरी नियमित येणारं स्त्री मासिक आणि साधना साप्ताहिक.. इ.मी वाचत होते. त्यातून विचारांना पोषक खाद्य मिळत होतं. ते वाचताना अधिकाधिक अंतर्मुख होऊ लागले. उलघाल वाढली. त्यातून वाट काढण्यासाठी पत्र-संवाद सुरू झाला. स्त्री मासिकातून स्त्री सखी मंडळाची ओळख झाली. मी त्याची सभासद झाले. दर महिन्याच्या कार्यक्रमांना जायला लागले. विद्या बाळ यांचा परिचय झाला... यांतून सामाजिक प्रश्नांची, स्त्री-प्रश्नांची धग जाणवू लागली. माझ्या विचारांच्या परीघात या जाणिवांचा समावेश होऊ लागला. माझ्या प्राधान्याच्या प्रश्नांमुळे दूर राहिलेले हे प्रश्न अधिक निकडीचे आहेत हे लक्षात येऊ लागलं.पण या संदर्भात आपण काही करत नाही, करू शकत नाही ही बोच आपराधीपणाच्या जाणिवेत भरच घालत राहिली...

पण आता व्यक्त होण्याचं साधन हाती आलं होतं.असह्य, उत्कट भावनाना बाहेर पडायची फट सापडली होती. त्यामुळे,पीळ बसेल तसतसा कापसाच्या पेळूतून सुताचा धागा सुटत जातो तशा आतून कविता येऊ लागल्या. पस्तीस वर्षांचं मौन बोलू लागलं...कवितेमुळे आतल्या घुसमटीतून बाहेर पडता येत होतं. ते केवळ बाहेर पडणं नव्हतं. त्याच वेळी उघडल्या गेलेल्या दारातून बरंच काही आत येत होतं..! शब्दांतून व्यक्त होता होता कविता या माध्यमाची ओळख होऊ लागली. कविताविषयक कार्यक्रमातून इतरांच्या कवितांची आणि समीक्षा या नव्या विषयाचीही ओळख होत होती... विचारांचा परीघ विस्तारत होता. समीक्षेच्या स्वरूपाविषयीचे प्रश्न मला सतत  सतावणार्‍या प्रश्नांमधे सामिल झाले...

स्वतःतून बाहेर पडायला लागल्यावर माझा वैचारिक संघर्ष चतुर्भुज झाला. आधीचे प्रश्न थोडे मागे सरले. सामाजिक प्रश्नांचं वैविध्य आणि व्याप्ती जाणवत होती. हळूहळू लक्षात येत गेलं की समाजिक कार्यात प्रत्यक्ष सहभागी नाही होता आलं तरी त्या संदर्भातली संवेदनशील सजगता आणि त्याविषयीची योग्य जाण असेल तर आपण अप्रत्यक्षपणे बरंच काही करू शकतो. ‘विचार’ ही पण एक कृती आहे. लेखनाच्या माध्यमातून प्रभावीपणे समाजापर्यंत विचार पोचवणं हाही समाजकार्याचा एक भाग होऊ शकतो...हे मला जमण्यासारखं होतं. ते मी माझ्या परीनं करू लागले... हे करता करता हेही जाणवत गेलं की लेखनातून ‘घडण्या’साठी केवळ अंतर्मुख विचार पुरेसा नाही. बाह्य जगाच्या सजग भानात असणं तितकंच आवश्यक आहे...!

कविता, साहित्य, समीक्षा.. या बाबतीतही संवादाला बर्‍याच जागा होत्या. नव्या-जुन्या कवितांबरोबर इतर साहित्यप्रकार-आत्मचरित्र, कथा, कादंबर्‍या... यांचं वाचन व्हायला लागलं तसे जिज्ञासू मनालानवे प्रश्न पडायला लागले. गौरी देशपांडे यांच्या कथा-कादंबर्‍यांमधल्या विचारांनी आमच्या समजूतदार सहजीवनातील समाधान प्रश्नांकित केलं. एकमेकांसाठी केलेल्या तडजोडी आठवून आपलं चुकतंय की काय असं आत्मपरीक्षण होत राहिलं...स्वसामर्थ्याची जाणीव होत गेली तसतसा अतिरिक्त ‘जपलंजाण्या’चा त्रास होऊ लागला. पण यापेक्षा अधिकअस्वस्थ करत मला अंतर्मुख केलं ते अजून लक्षात राहिलेलं वाक्य असं- ‘ज्यांची आयुष्याकडून अपेक्षाच पराभवाची ते पराभवाचंही तत्त्वज्ञान बनवतात..!’ व्यवहारी जगण्यात कसलीही महत्वाकांक्षा न बाळगणारी, शक्यतो संघर्ष टाळत आहे ते स्वीकारणारी माझी वृत्ती या वाक्यानं कितीतरी काळ परीक्षा-नळीत घालून ठेवली होती.... दलित आत्मचरित्रांनी घडवलेल्या ‘विश्वदर्शना’नं माझ्या संवेदनशीलतेच्या मर्यादांचं स्वतःची लाज वाटावी असं भान मला दिलं आणि वैचारिक संघर्षाला आणखी एक क्लेष वाढवणारा विषय पुरवला..अधिक वाचन, संवाद आणि स्व-विचार करत अशा प्रत्येक वैचारिक संघर्षातून मी स्वतःविषयीची, जगण्याविषयीची समजूत कमावत होते...

सजग मनाला पडणारे प्रश्न, त्यातून निर्माण होणारी जिज्ञासा यांच्या प्रेरणेतून मी १९९९ साली मराठी विषय घेऊन आणि २००४ साली तत्त्वज्ञान विषय घेऊन एम.ए. केलं. या निमित्तानं झालेल्या अभ्यासातून, अनुषंगिक वाचनातूननवी अंतर्दृष्टी मिळत होती... पण त्यामुळे प्रश्न सुटण्याऐवजी त्यातील व्यामिश्रताच अधिकाधिक जाणवत होती... ते मला आणखी खोलात नेत होते. हा वैचारिक प्रवास टप्प्याटप्प्यानं ईशावास्य उपनिषदाच्या अभ्यासापर्यंत घेऊन गेला... मधल्या काळातमराठी कवितांबरोबर हिन्दी कविता, बालकविता, कवितांचे अनुवाद, अनुषंगिक विषयांवर लेख लिहिणं...हे सातत्यानं होत राहिलं...

ही सर्व लेखन-वाचन प्रक्रिया मी आतून अनुभवत होते. घडत होते.पण एक नजर सतत स्वतःवर रोखलेली असायची. रोजच्या जगण्यात कधी साध्याशाच गोष्टीनं मी चिडले, रागावले तर तो मला माझा पराभव वाटायचा. खूप मनाला लावून घेतलं जायचं. अधिक वाचन, विचारामुळे समज जितकी वाढत होती तितकी अशा पराभवाची वेदना तीव्र असायची.वाटायचं समज नुसती बौद्धीकपातळीवर वाढून काय उपयोग? मला साध्या गोष्टी निभावता येत नाहीत...या पराभवापुढे मला माझ्या नव्यानं मिळवलेल्या पदव्या, माझं प्रगल्भ करणारं वाचन, माझे कवितासंग्रह.. त्याना मिळालेले पुरस्कार.. त्यामुळं होणारं कौतुक.. माझी नोकरी.. या सगळ्या जमेच्या गोष्टी निरुपयोगी वाटायच्या. खरं तर मनाविरुद्ध काही घडलं तर चिडणं ही स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. त्यासाठी इतका मनस्ताप करून घेणं अपेक्षित नाही. पण माझं चिडणं वाजवी पेक्षा जास्त आणि रागावण्याचं कारण त्यामानानं किरकोळ असायचं... आणि मुख्य म्हणजे या अपराधी वाटण्यामागे ‘बापाच्या पावलावर पाऊल आहे अगदी’ ही लहानपणी करून दिलेली जाणीव आणि अशा स्वभावापायीझालेल्या वडीलांच्या कासावीस करणार्‍या शेवटाची आठवण दहशत बनून उभी असायची..!त्यामुळे माझी अशी प्रत्येक ‘चूक’ मला लाल निशाण दाखवून सावध करायची.

 लेखनातून सुटकेचा मार्ग सापडल्यावर कवितेत न मावणारे असे सर्व छोटे-मोठे स्व-संघर्ष मी डायरीत नोंदवू लागले. स्वतःशी संवाद करणार्‍या या दैनंदिनीत वेगवेगळ्या मार्गानं माझ्या परिघात येणारे नवे विचार आत्मसात करताना होणारा संघर्षही नोंदवला जायचा. माझ्या ‘पराभवा’च्या- एका पातळीवरील मृत्युच्याच-अशा नोंदींबरोबर स्व-संवादातून कमावलेलं उन्नत करणारं... एका पातळीवर पुनर्जन्म घडवणारं आकलनही या दैनंदिनींमधे समाविष्ट व्हायचं... (यातील निवडक लेखनाचंएक संकलन ‘माझ्या डायरीतील पुनर्जन्मांच्या नोंदी’ या नावानं पुस्तक रूपात आणावं असं बरेचदा मनात येतं असतं...)

कवितालेखन, अभ्यास, इतर वाचन... हे सर्व आपल्या जागी चालू होतं तरी आंतरिक परिवर्तनाचा मुद्दा कायम अग्रक्रमावर होता. त्यासाठी कमवत असलेली बौद्धिक प्रगल्भता पुरेशी नाही हे अनुभवत होते. हे इतकं अवघड का जातंय याची कारणं आणि उपाय शोधणं हा माझा ध्यासविषय बनला होता... एकदा संजीवनी मराठे यांना फोन करून, वेळ ठरवून त्यांना भेटायला गेले होते. बराच वेळ बसले होते. त्यांच्याशी बोलताना कवितेपेक्षा माझ्या मनातल्या या उलघालीविषयीच मी अधिक बोलले. तेव्हा त्या म्हणाल्या ‘स्वतःला इतकं धारेवर धरू नये गं..’धीर देणारं त्यांचं हे वाक्य माझ्या कायम स्मरणात राहिलं.. स्वतःलाही माफ करता यायला हवं हे त्यांनी माझ्या लक्षात आणून दिलं होतं...

स्वतःत बदल घडवण्याची इच्छा इतकी तीव्र होती की त्यासाठीचा मार्ग म्हणून मनाला फारसं पटत नसतानाही ‘रेकी’चा कोर्स, ध्यानधारणेचं शिबिर अशा गोष्टी करून पाहिल्या. तीन दिवसांच्या ध्यान-शिबिरातील चांगल्या अनुभवानंतरही वडीलांच्या ‘आठवणी’नं सावध केल्यामुळे ध्यानधारणा हा आपला मार्ग नाही हे मी ठरवून टाकलं... ‘रेकी’चा कोर्स झाल्यावर त्यात सांगितल्यानुसार एकवीस दिवस कोणत्याही शंका मनात न घेता सर्व करून पाहायचं, अनुभवायचं ठरवलं. अनुभवात काही सकारात्मक गोष्टी जाणवल्या. पण त्या श्रद्धेनं स्वीकारता येईनात. कारण त्या बुद्धीनं खोडून काढता येण्यासरख्या होत्या. मग रेकी हे काय तंत्र आहे? त्याचा माणसावर अपेक्षित परिणाम कसा होत असेल? काय प्रक्रिया घडत असेल? असे प्रश्न पडू लागले. मग त्या संदर्भातली पुस्तकं मिळवून वाचली. विचार केला. माझ्यापुरता निष्कर्ष काढला की तीव्र इच्छाशक्ती असेल तर अपेक्षित गोष्टी घडवून आणण्याचं बळ आपल्याला मिळतं. पण अशी इच्छाशक्ती आपल्यात निर्माण कशी करायची? याचं उत्तर मिळालं नाही...

कोणत्याही अनाकलनीय, अनुत्तरित राहणार्‍या प्रश्नांची सांगड ईश्वराशी घातली जाते. लहानपणापासून कळत नकळत मनावर ठसलं गेलं होतं की कर्ता करविता तो आहे. त्याच्या इच्छेशिवाय झाडाचं पानही हलत नाही... हे फारसं बरोबर वाटत नव्हतं. पण ते न मानण्याला पर्यायही दिसत नव्हता... अनेक अनाकलनीय प्रश्नांची उत्तरं असू शकणार्‍या ईश्वराचं स्वरूप समजून घेणं हा जिज्ञासेचा विषय सतत मझ्या सोबत होता. याच जिज्ञासेनं मला ‘ईशावास्य’च्या अभ्यासापर्यंत पोचवलं...मराठीतील गीता-गीताई, ज्ञानेश्वरी... असे ग्रंथ वाचायचा प्रयत्न करत होते. त्यातून काही मिळत होतं. संत तुकारांमांची गाथा वाचायला लागल्यावर मात्र प्रथम अडखळायला झालं. अपुर्‍या आणि एकांगी वाचनामुळे,संसाराकडे दुर्लक्ष करून केलेल्या भक्तीविषयी मनात गैरसमज होते. त्यामुळेगाथा वाचण्यात रस वाटेना. पण ‘आकांताचे देणे’ हा कवी ग्रेस यांचा ‘चर्चबेल’ या पुस्तकातला छोटासा लेख वाचल्यावर माझे गैरसमज दूर झाले. पुन्हा गाथा वाचावीशी वाटू लागली. आवडो न आवडो, कळो न कळो ... एकदा तरी गाथा वाचायचीच असा निश्चय केला. अशा ग्रंथांची पारायणं करण्यातल्या निर्बुद्ध श्रद्धेला मी नावं ठेवत होते... स्वतःला आव्हान देत बुद्धीनं ठरवून मी गाथा वाचायला घेतली.हळूहळू त्यात गुंतत गेले. यात काहीतरी जवळचं आहे असं जाणवत होतं. तरी अभंगांमधून व्यक्त होणाराईश्वरभेटीचा आकांत समजू शकत नव्हता.ईश्वराची- निर्गुण निराकाराची भेट म्हणजे नक्की काय साधायचं?.. स्वतःला धारेवर धरत, स्वतःशी वाद घालत, स्वतःची कसोटी पाहत अखंड आत्मपरिक्षण करणारा तुकोबांचा ईश्वरभेटीचा ध्यास- म्हणजे आंतरिक परिवर्तनाचाच ध्यास होता काय?  दिलीप चित्रे यांच्या ‘पुन्हा तुकाराम’ या पुस्तकात मला माझ्या या विचारांना पुष्टी मिळाली. तुकोबा ते विठोबा हा प्रवास गाथेतील अभंगांमधून उलगडत जातो.., विठोबा हे तुकोबांचं महत्तम रूप आणि तुकोबा हे विठोबाचं लघुत्तम रूप आहे... अशा विचारांनी मला तुकोबांच्या ईश्वरभेटीच्या आकांताचा मला समजेल असा अर्थ सांगितला...‘लाहो’ या शब्दाची, त्यात अनुस्युत असलेल्या आकांताची ओळख इथेच झाली. हाच लाहो माझ्यासाठी आदर्श बनला..!

‘आंतरिक परिवर्तनाचा लाहो’ या स्वरूपाच्या, माझ्या क्षमतांच्या मर्यादेतल्या आत्मसंघर्षातून मी काय मिळवलं? माझा चांगलं माणूस होण्याचा छोटासा ध्यास इतक्या संघर्षानंतर सफल झालाय का?...या मनोगताच्या निमित्तानं विचार करताना जाणवतंय की अजूनही पुरेसं परिवर्तन झालेलं नाहीय. पण मी आता थोडं स्वतःला माफ कारायला शिकलेय.. हेही जाणून घेतलंय की सतत घडत राहणं हाच आपल्यातल्या ‘स्व’चा धर्म आहे... या आंतरिक घुसळणीनं जिज्ञासा निर्माण करत वाचन, अभ्यास, विचार, आणि लेखन करायला भाग पाडलं. कमावलेल्या प्रत्येक शहाणपणाची सांगड आंतरिक परिवर्तनाशी घातली. केवळ बौद्धिक कमाईच्या निरुपयोगीपणाची जाणीव सतत जागी ठेवली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे “ I will not allow the History to repeat ” यावडीलांच्या तोंडून बरेचदा ऐकलेल्या वाक्याचा, तेव्हा कधीच न समजलेला अर्थ प्रत्यक्षात उतरवला...  त्यांचाचहरलेला आंतरिक संघर्ष वाटाड्या बनून माझ्या संघर्षात सामील झालेला होता काय?...

आजघडीला विचार करताना मनात येतंय की अजूनही न संपलेला हा सगळा संघर्ष आत्मकेंद्री आहे का? हे छोटंसं यश माझ्यापुरतंच आहे का? की माझ्या जवळच्या, भोवतीच्या, माझ्या कवितेनं जोडल्या गेलेल्या अनेकांपर्यंत पोचतेय माझी कमाई?

आसावरी काकडे

१८-११-११

लेखन-प्रक्रियेतून स्व-शोध

 वुमेन्स नेटवर्क आयोजित पुरस्कार-वितरण सोहळ्याच्या अध्यक्ष आदरणीय विद्या बाळ, प्रमुख पाहुण्या डॉ. प्रतिमा इंगोले, संस्थेच्या अध्यक्ष मंगला सामंत उपाध्यक्ष, आणि मिळून सार्‍याजणीच्या संपादक डॉ. गीताली वि.मं. आणि जाणकार श्रोते, सुरुवातीला मी आजच्या पुरस्कार विजेत्या लेखिकांचे हार्दिक अभिनंदन करते आणि त्यांना पुढील लेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देते. मौलिक विचारांचा प्रसार करणं ही मुख्य भूमिकाअसल्याचा निर्देश वुमेन्स नेटवर्क या संस्थेच्या लेटरहेडवर केलेला आहे. आजच्या कार्यक्रमात वक्ता या नात्याने संस्थेच्या या कामात अंशतः सहभागी होण्याची संधी मला मिळाली याबद्दलचं समाधानही सुरुवातीला व्यक्त करते.

‘लेखन-प्रक्रियेतून स्व-शोध’ हा माझ्या आजच्या भाषणाचा विषय आहे. स्वशोध, आत्मशोध असे शब्द बरेचदा सहज वापरले जातात. त्याविषयीची आपली समजूत काहीशी मोघम स्वरूपाची असते. पण स्व म्हणजे नक्की काय? त्याचा शोध कसा घ्यायचा? मुख्य म्हणजे कुणी घ्यायचा? हरवलेल्या वस्तूचा शोध, फरार गुन्हेगाराचा शोध, किंवा वेगवेगळे वैज्ञानिक शोध या सगळ्याहून स्व-शोधाचं स्वरूप पूर्णतः वेगळं आहे. ‘स्व-शोध’मधे हा शोध स्वतःच घेणं अभिप्रेत आहे. ‘स्व’चा शोध ‘स्व’नेच घ्यायचा हे गोंधळवणारं आहे. पण सूक्ष्मपणानं काही समजून घ्यायचं असेल तर असे सूक्ष्मात नेणारे प्रश्न पडणं, गोंधळून जाणं, त्या प्रश्नांनी अस्वस्थ होणं गरजेचं असतं...

सुरुवातीला अगदी स्वगत असं स्वतःपुरतं मी काहीतरी लिहित होते. लिहिता लिहिता मला हळूहळू उमगत गेलं की लेखन हे स्व-शोधाचं एक प्रभावी माध्यम होऊ शकतं. आजच्या भाषणासाठी विषय मीच निवडावा असं सांगितल्यावर माझं हे उमगणं या निमित्तानं सर्वांबरोबर शेअर करावं असं मला वाटलं...

‘स्व’विषयीचे प्रश्न तर सुटलेले नाहीत पण स्व-शोधाची असोशी अधीर करतेय अशा काहिशा गोंधळलेल्या मनःस्थितितली माझी एक कविता आहे-

“मी स्वतः साक्षी आहे / पण कळत नाहीय / ही तडफड कसली!/ काही उगवते आहे नव्याने / जमिनीचे निबर कवच फोडून / की विस्कटते आहे सारे आतून? / कळत नाही / धुवाधार कोसळणारा हा पाऊस / हलवून, जागी करून / शांतविणार आहे तृष्णा?/ की वाहून नेणार आहे जमविलेले सारे?/ कळत नाहीय / व्हावे सन्मुख वेदनेला / अपार करूणेचे बाहू पसरून / की मौनच बरे?”

ही कविता लिहिली त्या दरम्यान मी संत तुकारामांची गाथा वाचत होते. त्यातील ईश्वरभेटीचा आकांत केवळ बुद्धीला पटत नाही म्हणून नाकारता येत नव्हता.  मग मनाला प्रश्न पडू लागले. ईश्वरभेटीची म्हणजे नेमकी कशाची तहान व्यक्त होत होती अभंगांमधून? या व्याकुळ भक्तीला नेमकं काय हवं होतं? ही जिज्ञासा मला अस्वस्थ करत राहिली... त्यातून झालेल्या पाठपुराव्यातून हे लक्षात आलं की आंतरिक परिवर्तनासाठीचा अत्यंत सच्चा ध्यास- लाहो (गाथेतला शब्द) असं त्या तहानेचं स्वरूप होतं. ‘स्व-शोध’ ही त्याची स्वाभाविक सुरुवात होती. ईश्वरप्राप्तीची प्रचीती ही सांगता आणि अभंग-लेखन हे त्याचं साधन होतं..! माझ्या जिज्ञासेला मिळालेलं हे उत्तर मला मार्गदर्शक ठरलं. पण स्व-शोधातली उत्कटता आणि आवश्यकता जाणवणं पुरेसं नव्हतं. ‘स्व’ म्हणजे नेमकं काय? हा महत्त्वाचा प्रश्न अधिक अभ्यासाची मागणी करणारा होता...

‘स्व’ म्हणजे काय?

     या प्रश्नाच्या अस्वस्थ करणार्‍या तगाद्यातून यथाशक्ती होत राहिलेल्या अभ्यासातून हे लक्षात आलं की अनेकांनी अनेक तर्‍हांनी या प्रश्नाचा छडा लावायचा प्रयत्न केला आहे. सर्वमान्य एकच एक अशी ‘स्व’ची व्याख्या नाही. स्व म्हणजे साध्या भाषेत मी. आपल्याला हे सहज समजू शकतं की माझं नाव म्हणजे ‘मी’ नव्हे. हात-पाय ही कर्मेंद्रियं म्हणजे ‘मी’ नव्हे. किंवा कान नाक.. ही ज्ञानेंद्रियं म्हणजे ‘मी’ नव्हे... आपलं पूर्ण शरीर, आपलं दिसणं म्हणजेही ‘मी’ नव्हे... फुलाची एकेक पाकळी बाजूला करत फूल शोधत गेलं तर फूल म्हणून हातात काहीच उरत नाही. ‘स्व’च्या बाबतीत अभ्यासकांचं तसंच झालं...

     मग ‘स्व’ असं काही नाहीच अशी काहींनी भूमिका घेतली तर दृश्य अशा आपल्या रूपापलिकडे काहीतरी असलं पाहिजे त्याशिवाय आपल्या असण्याची पुरेशी संगती लावता येणार नाही अशी काहींनी भूमिका घेतली. ते काहीतरी म्हणजे आत्मा. आपल्याला हा शब्द ऐकून परिचयाचा झालेला आहे. पण आत्मा म्हणून दाखवता येईल असं काही नाही. खरं तर काही नसण्याला दिलेलं ते एक नाव आहे. ती एक संकल्पना आहे. ती सूक्ष्मात जाऊन समजून घेणं महत्त्वाचं आणि रंजक/interesting आहे. विनोबा भावे यांनी त्यांच्या ‘ईशावास्य-वृत्ति’ या पुस्तकात आत्मा शब्दाची निर्मिती कशी झाली ते लिहिलं आहे. त्याचा सारांश असा- अस्तित्वाच्या तीन पातळ्या आहेत. एक- केवल असणं- (to be., Being.) दोन- घडणं, होणं- (to become., becoming)  आणि तीन- घडलेलं असणं- दृश्य विश्व. (आपल्याला दुसर्‍या दोन पातळ्या समजून घेता येतात. पण केवल असणे ही पातळी समजून घेणं अवघड आहे. हे पुस्तक आहे, ते इथे आहे, ते निळं आहे, त्याला कोरा वास आहे.. असण्याच्या अशा कोणत्याही मितींखेरीजचं नुसतं असणं आपल्याला कळत नाही. ज्ञानेंद्रियांच्या आधारे जाणून घेण्याच्या त्या मर्यादा आहेत.) आत्मा म्हणजे केवल असणं आणि होणं- (Being आणि Becoming) या पहिल्या दोन पातळ्यांचं मिश्रण..! होऊ शकणारं असणं, घडण्याची क्षमता असलेलं असणं...

अस्तित्ववादी विचारवंतांनी माणसाच्या स्वरूपाच्या अभ्यासाला प्राधान्य दिलं. Authentic- खरंखुरं जगण्याचा आग्रह धरला. सार्त्र हे त्यापैकी एक महत्त्वाचं नाव. ‘Being and Nothingness’ या आपल्या जाडजूड ग्रंथात त्यानी माणसाच्या स्वरूपाचा सांगोपांग विचार केला आहे. त्यात म्हटलंय त्यानुसार संपूर्ण अस्तित्वाचे दोन स्तर आहेत- एक जाणीव (consciousness) असलेल्या माणसांचा आणि दुसरा जाणीव नसलेल्यांचा. जाणीव नसलेल्या वस्तूंसारखं माणसाचं साररूप ठरलेलं नाही. Instead of essential core they have Nothing’. माणसाचं ‘स्व’रूप ठरलेलं नाही. माणूस ही एक अखंड प्रक्रिया आहे. ‘Making of a self’ आहे. माणसाला शरीर असतं आणि जाणीवही असते. शारीर पातळीवर तो Being-रूपात- म्हणजे भौतिक स्वरूपाचा असतो आणि जाणीवेच्या पातळीवर Nothingness-रूपात असतो. माणसाला जाणीव असल्यामुळे तो वेगळेपणानं भोवताल जाणू शकतो. वेगवेगळे अनुभव घेऊ शकतो. विशेष म्हणजे आपण अनुभवतोय हेही जाणू शकतो. अनुभव घेताना होणारी आपल्या असण्याची जाणीव म्हणजे ego-मी. प्रत्येक अनुभव ‘मी आहे’ याचं भान देत असतो. हे अस्तित्वभान म्हणजे ego-मी. माणसाची जाणीव भोवतीच्या जगाप्रमाणे या ‘मी’वरही लक्ष ठेवून असते. भोवताल अनुभवणारा हा मी अस्थिर असतो. सतत बदलत असतो. तो भोवतीच्या घटनांचा अर्थ लावू शकतो. स्वतःला हवं तसं घडवू शकतो...

सार्त्र यांनी म्हटलं आहे- माणसाला स्वतःला घडवण्याचं, हवं ते करण्याचं, पूर्ण स्वातंत्र्य आहे. पण माणसाची गोची अशी की त्याला हे स्वातंत्र्य नाकारण्याचं स्वातंत्र्य मात्र नाही. ते त्याला वापरावंच लागतं. या संदर्भातलं त्यांचं प्रसिद्ध वाक्य आहे- Man is condemned to be free ! हे स्वातंत्र्य नाकारणं म्हणजे माणूसपण नाकारणं. सार्त्र यांनी अशा पलायनाला बॅड फेथ असं म्हटलं आहे.

तत्त्वज्ञानाच्या संकल्पनाकोशात(Oxford Dictionary of Philosophy) self’विषयीची एक टीप आहे. ती अशी- ‘self is the elusive Ithat shows an alarming tendency to disappear when we try to introspect it.’ ‘स्व’ म्हणजे फसवा ‘मी’. अंतर्मुख होऊन त्याविषयी विचार करायला लागावं तर तो नाहीसाच होतो... हे समजून घेताना मला एक उपमा सुचली. दृश्य टिपणारा कॅमेरा दृश्यात कधीच येत नाही. त्याला दृश्यात घ्यायचं तर आणखी एक कॅमेरा लागेल. तो या कॅमेर्‍याला दृश्यात पकडेल पण स्वतः दृश्याबाहेरच राहील... ‘स्व’ला जाणू पाहणारा स्व असाच समजुतीतून निसटत असतो.

मग स्व-शोध म्हणजे काय?

जेव्हा ‘स्व-शोध’ असं आपण म्हणतो तेव्हा ‘स्व’चा शोध घेणारा ‘स्व’च असतो ही गोष्ट आपण नीट समजून घ्यायला हवी… शोधणारा ‘स्व’ कोण? आणि ज्याला शोधायचं तो कोण? रोजच्या जगण्यात बरेचदा ‘कोणा होते ज्ञान? विस्मरे ते कोण? शंका घेते कोण आत माझ्या?..’ अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला अस्वस्थ करत असतात. आपण खूपदा स्वतःला दोष देतो किंवा स्वतःवर खूष होतो. या प्रक्रियेत दोन मी असतात. एक दोषी किंवा बरोबर मी आणि दुसरा दोषी ठरवणारा किंवा खुष होणारा मी... हे दोन ‘मी’ कोण? आपल्या तत्त्वज्ञानात साक्षी मी आणि भोक्ता मी अशी ‘मी’ची दोन रूपं किंवा दोन स्तर सांगितले आहेत. एक जगणं अनुभवणारा, इथे वावरणारा, सतत बदलत असलेला मी आणि दुसरा हे सर्व नुसतं पाहात असलेला जाणीवस्वरूप साक्षी मी. तत्त्वज्ञान या ‘साक्षी मी’चा शोध घेतं आणि अध्यात्म याच ‘मी’च्या प्रचितीची आस धरतं.

आजच्या भाषणात मी माणसातील इथे वावरणार्‍या, प्रक्रियास्वरूप असलेल्या ‘मी’च्या शोधाविषयी म्हणजे पहिल्या, व्यावहारिक टप्प्याविषयी बोलणार आहे.

आपण पाहिलं की या ‘मी’चं स्व-रूप ठरलेलं नाही, स्व-शोध ही एक अखंड प्रक्रिया आहे. स्व-शोध म्हणजे साध्या व्यवहारी भाषेत स्वतःला ओळखणं. माझी बलस्थानं कोणती? मर्यादा कोणत्या? मला काय हवं आहे? मला काय करायचं आहे? काय साधायचं आहे?... स्व-शोध म्हणजे हे सर्व प्रत्यक्ष जगण्यातून जाणून घेत घेत आपण काय होऊ शकतो याचा शोध घेत राहाणं, आपल्यातील वाव न मिळालेल्या सूक्ष्म क्षमतांचा शोध घेणं. या प्रक्रियेत सतत सजग असणं, स्वतःला तपासत राहणं, आत्मपरीक्षण करणं, आपण कुठे चुकलो, का चुकलो, काय काय करता आलं असतं याचा विचार करणं... हे सर्व येतं.

लेखन यासाठी साधनरूप कसं ठरतं?

लेखनाच्या नाना परी आहेत- पत्र, लेख, कथा, कविता, कादंबरी, डायरीलेखन, ललित लेख, समीक्षा, संशोधनपर लेखन.. इत्यादी. स्व-शोधासाठी याहून वेगळं लेखन करावं लागत नाही. पण लेखनामागची भूमिका नक्कीच वेगळी असावी लगते. आपण नेमकं का लिहितो आहे? याविषयी सजगता, लेखनकृतीमधे जाणीवनिष्ठा आणि माणूसपणाशी बांधिलकी हवी. मुळात वाट्याला आलेल्या आयुष्याचं काय करायचं आहे या विषयीची गंभीर आणि ठोस भूमिका घेतलेली असायला हवी. वर्तमानातील कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, जागतिक अशा सर्व आयामांनी बनलेल्या समग्र असण्याचं भान ठेवत स्वतःशी प्रामाणिक राहून लेखन व्हायला हवं. केवळ हौस, वेळ घालवायचं साधन किंवा इतर कुठल्याही सवंग कारणानं लिहिलं जात असेल तर असं लेखन स्व-शोधाचं माध्यम होणं अवघड आहे.

कोणत्याही प्रकारच्या लेखनाचा विषय, मांडणीची तर्‍हा- शैली, शब्दांची निवड... अशा प्रत्येक अभिव्यक्तीतून ‘स्व’च व्यक्त होत असतो. म्हणून तर प्रत्येकाचं लेखन वेगळं असतं. एकाच साहित्यकृतीचा अनुवाद अनेकांनी केला तरी प्रत्येक अनुवादाचा पोत अनुवादकाच्या ‘स्व’शी नातं सांगणारा असतो. कथा-कादंबर्‍यांमधल्या पात्रांमधूनही कोणत्या ना कोणत्या प्रकारे लेखकाचा स्व डोकावत असतो. इतकंच काय संशोधनपर लेखनातही लेखकाच्या व्यक्तित्वाचा ठसा उमटल्याशिवाय राहात नाही. या दृष्टीनं विचार करता कोणतंही लेखन एक प्रकारे लेखकाचं आत्मचरित्रच असतं...

अगदी स्वतःपुरतं केलेलं खाजगी स्वरूपाचं डायरीलेखन थेटपणे स्व-संवाद साधू शकतं. स्वतःची उलट तपासणी घेऊ शकतं. आत्मपरिक्षण करू शकतं. असं लेखन म्हणजे स्व-शोधाकडे जाणारा सर्वात जवळचा मार्ग..! अतिशय प्रामाणिकपणे केलेलं, ‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही’ अशा तळमळीतून झालेलं लेखन मेडिटेशनचा परिणाम साधणारं असतं. ते स्व-समुपदेशन- सेल्फ काउन्सीलींग करणारंही होऊ शकतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे असं लेखन कुणीही करू शकतं ! या लेखन-प्रक्रियेत कापसाच्या पेळूतून सूत निघावं तसं लिहिता लिहिता आपल्या आतील अनाकलनीय व्याकुळता तिच्या भोवतीच्या सूक्ष्म आकलनासह बाहेर पडते. आपल्याला काय जाणवतंय ते स्पष्ट होत जातं. त्यामुळे आतल्या आत होत राहणार्‍या घुसमटीतून सुटका होऊ शकते. अस्वस्थ करणार्‍या प्रश्नांना उत्तरं सापडू शकतात. लिहिता लिहिता मनात उगवणारं जगण्याविषयीचं एखादं नवं आकलन नवा जन्म व्हावा इतका आनंद देऊ शकतं... ही प्रत्यक्ष अनुभवून बघण्यासारखी गोष्ट आहे..!

लेखन-प्रक्रिया काय आहे? या प्रक्रियेत काय घडतं?

जीवनातील विविध अनुभवातून शिकत आपण एक माणूस म्हणून घडत जातो त्यानुसार आपलं लेखन घडत असतं. त्याच वेळी लेखन-प्रक्रियेमुळं आपण घडत असतो. आपलं व्यक्तित्व घडणं, अधिक उन्नत होणं आणि आपलं लेखन अधिक सकस, अधिक सखोल होणं या दोन्ही गोष्टी परस्परपोषक अशा आहेत. हा मुद्दा नेमकेपणानं अधोरेखित करणारी एक अर्थपूर्ण अर्पणपत्रिका ज्येष्ठ कवी प्रा. चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या ‘कवितान्तरण’ या अनुवादित कवितासंग्रहाला लिहिली आहे. ती अशी-‘‘आयुष्यानं कविता आणि कवितेनं आयुष्य समृद्ध करणार्‍या विष्णु खरे यांस-’’

सर्व प्रकारच्या लेखनातूनच फक्त नाहीतर आपल्या प्रत्येक शारीरिक, वैचारिक कृतीतूनही आपला ‘स्व’, आपलं व्यक्तित्वच डोकावत असतं. त्यामुळे अधिक सकस लेखनाची पूर्व अट अधिक चांगलं माणूस होणं ही आहे अशी माझी धारणा आहे. मध्यंतरी मी गोरखपूर येथील ज्येष्ठ कवी विश्वनाथ प्रसाद तिवारी यांच्या कवितांचा अनुवाद केला. त्यांची एक कविता आहे- ‘बेहतर कविता लिखेगा वही / जो बेहतर कवि होगा / जिस समय वह लिख रहा होगा सबसे अच्छी कविता / जरूर होगा उस समय वह / सबसे अच्छा आदमी / जिस दुनिया में लिखी जायेंगी बेहतर कविताएँ / वही होगी बेहतर दुनिया / शब्द और अर्थ नहीं है कविता / सबसे सुंदर सपना है सबसे अच्छे आदमी का !’

अधिक चांगलं माणूस होण्याची आस आणि लेखनाचा रियाज या गोष्टी वर म्हटल्याप्रमाणे हातात हात घालून चालणार्‍या आहेत. हे कसं समजून घेता येईल? त्यासाठी लेखन-प्रक्रिया समजून घ्यावी लागेल... जेव्हा आपण लिहित असतो तेव्हा आपल्या व्यवहारी ‘मी’पासून आपण बाजूला झालेले असतो. जे लिहायचं आहे त्या पातळीवर गेलेलो असतो. एकप्रकारे आपण तेव्हा आत्मभानात असतो. आपल्या जवळ, आतपर्यंत पोचलेले असतो. व्यवहारातली कुठलीही कृती करताना, विचार करून पाहा,  आपण त्या कृतीत पूर्णांशानं उपस्थित नसतो. बर्‍याच गोष्टी सरावाने, प्रतिक्षिप्तपणे होत असतात. आपण एकीकडे आणि मन दुसरीकडेच..! लिहित असताना असं घडत नाही. लेखन-कृतीत आपण पूर्णपणे उतरलेले असतो. त्याशिवाय लेखन होऊच शकणार नाही. ‘उत्तरार्ध’ या माझ्या कवितासंग्रहाच्या मलपृष्ठावर मी लिहिलंय- ‘ही अक्षरं नाहीत / हे शब्द नाहीत / या कविता नाहीत /... मौनातून उसळून / मौनात विसर्जित होण्यापूर्वी / मध्यसीमेवर अस्तित्वभान देत / निमिषभर रेंगाळलेल्या आशयाची / स्मारकं आहेत ही / उभ्या आडव्या रेषा / काही बिंदू, काही वळणं / आणि बरंचसं अवकाश / यांनी घडवलेली..!

कसं असतं हे आपल्या जवळ जाणं? अस्तित्वभान येणं?... ही प्रक्रिया अशी समजून घेता येईल- आपण जे लिहितो ते संदिग्ध आशयाच्या रूपात आधी मनात रेंगाळत असतं. त्या अमूर्त आशयाचं शब्दांकन करताना, एकप्रकारे त्याचा शब्दांत अनुवाद करताना आधी तो आपल्याला उमगतो. त्याशिवाय शब्दांकन करणं शक्यच नाही. हा आशय उमगणं म्हणजेच अस्तित्वभान येणं, काही अंशी स्वतःची ओळख होणं..! उदा. तुम्ही प्रवासवर्णन लिहिताय. प्रवासातला एखादा अनुभव लिहिताय. हा अनुभव तुम्ही घेतलेला आहे. तुमच्या नजरेतून दिसलेलं तुम्ही लेखनातून दुसर्‍यांना सांगू बघताय. प्रत्यक्षात तुम्ही वर्णन करत असता तुम्ही पाहिलेल्या दृश्याचं. पण हे वर्णन म्हणजे त्या दृश्याविषयीचं तुमचं आकलन असतं. त्याचवेळी त्या दृश्याकडे पाहणार्‍या तुमच्या दृष्टिकोनाचंही आकलन तुम्हाला होत असतं. तुम्ही प्रवासवर्णन लिहिता तेव्हा तुम्हाला प्रवासातलं नेमकं काय आवडलं, का आवडलं हे त्या लेखन-प्रक्रियेत तुम्हाला उलगडत जातं. स्वतःची आवड आणि निवड कळते. स्वतःचा स्तर कळतो. त्यामुळे स्व-समीक्षा करता येते. विकसित होण्याची ती सुरुवात असते. एखाद्या घटनेविषयी लिहिताना किंवा कविता लिहितानाही असं सर्व घडत असतं. जाणीवपूर्वक ही प्रक्रिया समजून घेतली नाही तरीही...! कुसुमावती देशपांडे यांनी ‘पासंग’या आपल्या समीक्षाग्रंथात म्हटलं आहे- ‘काव्य लिहिण्यापूर्वी कवीच्या जाणिवेची जी पातळी असते त्यापेक्षा वेगळ्या पातळीवर ते काव्य लिहिल्यानंतर कवी पोचत असतो.’... आपण लिहित असताना त्या लेखन-प्रक्रियेत होणार्‍या स्व-आकलनाकडे सजगपणे पाहिलं तर या विधानाचा अर्थ उमगू शकेल.

लेखन-प्रक्रियेत केवळ मनाला संदिग्धपणे जाणवलेलंच अधिक स्पष्ट होतं असं नाही तर कधी कधी न जाणवलेलं, अनोळखी असंही काही अचानक लिहिलं जातं. आपल्यातली नवीच रूपं आपल्या समोर येतात..! ती आपली नवी ओळख असते. कादंबरीतली पात्रं, लिहिण्याच्या प्रक्रियेत लेखकाचं बोट सोडून स्वतःच साकारत जातात... संशोधनपर लेखनातही लिहिता लिहिता नवे प्रश्न समोर येतात आणि त्यावर विचार करायला लावून संशोधनाला वेगळी दिशा देतात. या सर्व गोष्टी लेखकाला स्वतःची नवी ओळख करून देत उन्नत करणार्‍या ठरतात. लेखन अशाप्रकारे स्व-आकलनाचं, स्व-शोधाचं साधन बनून लिहिणार्‍याचा विकास घडवत असतं.

 गांभिर्यानं केलेलं वाचनही स्व-विकासाचं साधन बनू शकतं. कारण वाचन ही प्रक्रिया नाण्याच्या दुसर्‍या बाजूसारखी लेखन-प्रक्रियेशी अविभाज्यपणे जोडलेली असते. लेखन म्हणजे encoding तर वाचन म्हणजे decoding! आणि असं म्हटलं गेलंय की every decoding is another encoding!  चांगल्या, प्रामाणिक लेखनातून किंवा वाचनातून आनंद मिळतो तो त्या प्रक्रियेत कणभर का होईना विकसित झाल्याचा आनंद असतो. म्हणून लेखन-वाचनाकडे केवळ छंद, हौस यापेक्षा अधिक गांभिर्यानं पाहायला हवं..

त्यासाठी भाषेचं स्वरूप जाणून घेणं गरजेचं आणि रंजकही..

लेखन-वाचन या दोन महत्त्वाच्या कृतींचं माध्यम असलेली आपली भाषा ही मुळात केवळ एक चिन्ह-व्यवस्था आहे... बोलीभाषेचं द्रव्य ध्वनी तर लिखित भाषेचं द्रव्य आकार हे असतं. आपल्याला माहिती आहे की ध्वनी घर्षणातून निर्माण होतो. ओठ आणि जीभ यांच्या हालचालींमुळे श्वासाबरोबर आत-बाहेर होणारी हवा घासली जाते आणि त्यातून ध्वनी निर्माण होतो. या ध्वनी-रचनेतून शब्द तयार होतो. विशिष्ट ध्वनी-रचनेचा अमुक एक अर्थ असं काही संकेतांनी ठरत गेलं. पण हा अर्थ एका समूहापुरता मर्यादित राहिला. दुसर्‍या समूहाने तशाच ध्वनी-रचनेचा वेगळा अर्थ ठरवला. त्यामुळे प्रत्येक समूहाची भाषा वेगळी झाली. म्हणजे शब्द आणि अर्थ यांचं नातं केवळ सांकेतिक आहे. काळ आणि भौगोलिक सीमांनुसार बदलणारं... शब्दांना स्वतःचा स्वयंभू अर्थ नसतो. ते रिकामे असतात. ध्वनी-रचना हे केवळ एक चिन्ह आहे. म्हणूनच बहुधा मर्ढेकरांनी म्हटलं आहे- ‘शब्द बापुडे केवळ वारा..’ आपल्या पाच ज्ञानेंद्रियांचे जे पाच विषय आहेत त्यातला एक विषय शब्द- ध्वनी हा आहे आणि त्याची सांगड आकाशतत्त्वाशी म्हणजे एकप्रकारे निराकाराशी घातलेली आहे. भाषेचं हे मूळ सूक्ष्म स्वरूप समजून घेतलं तर कुठल्याही भाषावादातील पोकळपणा लक्षात येऊ शकेल...

लिखित भाषेत प्रत्येक ध्वनीरचनेला एकेक आकार ठरवला गेला. अमुक आकार म्हणजे अमुक ध्वनी हेही संकेतांनी ठरलं. त्यामुळे प्रत्येक समूहाची लिपीही वेगळी झाली. ध्वनी-रचना या एका स्तरावरील चिन्हांसाठी ठरलेले आकार ही लिखित भाषेतली चिन्ह-व्यवस्था. लिपी. लेखनम्हणजे encoding आणि वाचन म्हणजे decoding असं वर म्हटलंय त्याचा अर्थ भाषेचं हे मूळ स्वरूप समजून घेतल्यावर अधिक चांगला कळू शकेल...

भाषेच्या वापराविषयीचं आकलन लेखन-वाचनासाठी आवश्यक आहे. शब्दांचा वापर तीन स्तरांवरकेला जातो- १) अभिधा- म्हणजे ठरलेला, कोशातला अर्थ, वाच्यार्थ. २) लक्षणा- म्हणजे वाच्यार्थ पुसला जाऊन संदर्भावरून ठरणारा अर्थ आणि ३) व्यंजना- म्हणजे सूचित होणारा, किंवा सूचित केलेला अर्थ. कवितेतली शब्दयोजना बर्‍याचदा या स्तरावरील अर्थाने होते. तिथे शब्दाचा वाच्यार्थ लक्षात घेतला तर तो हास्यास्पद ठरतो. वाचताना लिखित संहितेचा खोल सूक्ष्म अर्थ समजण्यासाठी आणि लिहिताना नेमकी, संपृक्त शब्दयोजना करता यावी यासाठी शब्दांच्या या त्रिविध सामर्थ्याची आणि भाषेच्या स्वरूपाची जाण असावी लागते.

इतर साहित्य-प्रकारांच्या मानानं कवितेसाठी शब्दयोजना करताना भाषेच्या या स्वरूपाचं भान असणं विशेष गरजेचं आहे. चांगली, उत्स्फूर्त कविता स्वतःचे शब्द घेऊनच व्यक्त होते. हे खरं असलं तरी व्यक्तीच्या कमावलेल्या पूर्वसंचितातूनच ते उगवत असतात. हे संचित आपण करत असलेल्या साधनेमुळे समृद्ध होत असतं. अभ्यास, साधना, किंवा जन्मजात प्रतिभेचं देणं नसेल तर उत्स्फूर्ततेच्या नावाखाली सहज हाताशी असलेले शब्द आपण वापरून टाकतो. कविता लिहून झाल्यावर पुन्हा वाचताना वापरलेल्या शब्दांवर त्रयस्थपणे विचार केला तर ते तितकेसे समर्पक नाहीत असं लक्षात येऊ शकेल. शब्दयोजना कशी असावी?... या संदर्भातली माझी एक कविता आहे.- ‘किती सहज वापरतो आपण शब्द / आपल्या भाषेतले / झोपेतही प्रतिक्षिप्तपणे घेतला जावा श्वास / तितक्या सहज ! तहानेनं व्याकुळ होऊन / बुडी मारत नाही / जगण्याच्या तळ्यात / शब्द वेचण्यासाठी / जिवाच्या आकांतानं उत्खनन करत नाही / अस्तित्वांच्या ढिगार्‍यांचं / शब्द शोधण्यासाठी / किंवा तपश्चर्या करून / जिंकून घेत नाही हवे ते शब्द / आकाशतत्त्वाकडून / तयार भाषेतून शब्द अलगद पडतात ओंजळीत / गळणार्‍या पानांसारखे / वाळलेले.. निस्तेज.. / किती सहज वापरतो आपण / असे आयते, स्वतः न कमावलेले / पिढ्यानढ्यांचे उष्टे शब्द / आपले म्हणून..!!

कवितेसाठी आयते, स्वतः न कमावलेले शब्द न स्वीकारता इतक्या परोपरीनं, स्वतःचाच आशय नेमकेपणानं व्यक्त करणारा शब्द शोधणं ही स्वतःच्या अनावरणाचीच प्रक्रिया असते. कारण असा शब्द शोधणं म्हणजे स्वतःला नेमकं काय अभिप्रेत आहे ते शोधणं असतं..! उदा. समजा कावितेतून अस्वस्थता व्यक्त करायची आहे.. त्यासाठी शब्दयोजना करतांना त्या अस्वस्थतेची प्रत काय आहे, तिची तीव्रता किती आहे, तिच्या मागे कोणती कारणपरंपरा आहे या सगळ्याचा नकळत विचार होतो आणि तिचं नेमकं स्वरूप व्यक्त करणारा शब्द योजला जातो. शब्द-निवडीची ही प्रक्रिया आपल्याला आपली ओळख करून देते... कवितेत बर्‍याचदा व्याकरणाची, शब्दांची मोडतोड केली जाते किंवा भाषेत नसलेले नवेच शब्द योजले जातात, नवी शैली निर्माण केली जाते ते आपलं स्वतःचं वेगळं वाटणं वेगळेपणानं व्यक्त करण्यासाठीच..! अर्थात हे खर्‍या, जाणीवनिष्ठ निर्मितीतच फक्त शक्य आहे. लेखन-प्रक्रियेतली ही निस्सिम जाणीवपूर्वकता ‘स्व’च्या अधिकाधिक जवळ नेणारी असते...

थोडा स्वानुभव आणि थोडं निरीक्षण, अभ्यास याच्या आधारे ‘स्व’ म्हणजे काय? स्व-शोध म्हणजे काय? हे स्पष्ट करत लेखन-प्रक्रिया स्व-शोधाचं साधन कशी होऊ शकते हे सांगण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे...

माझे विचार मांडण्याची संधी आयोजकांनी मला दिली आणि आपण सर्वांनी ते ऐकून घेतलेत या बद्दल सर्वांचे आभार मानते आणि थांबते.

आसावरी काकडे

१७ जून २०१२