Wednesday 7 September 2016

स्त्री-पुरुष समानता : हक्क की कर्तव्य?

स्त्री-पुरुष समानतेचा विचार
काहीसा मागे पडत चालला होता.
‘चौथर्‍याच्या’ निमित्ताने तो आता पुन्हा चर्चेत आला आहे.
त्याविषयी काही मूलभूत विचार
मांडण्याचा एक प्रयत्न-


“प्रत्येक वेळी ते मला हकलत गेले आणि मी मोठी होत गेले” सिंधुताई सकपाळ यांच्या एका मुलाखतीतल्या या वाक्यानं मला अंतर्मुख केलं. वाटलं, किती खरं आहे.. बाहेरचा आधार नाहीसा होतो तेव्हाच आतून बळ मिळण्याचा मार्ग मोकळा होतो...! अंगावर आलेलं प्रत्येक संकट उद्‍ध्वस्तच करेल असं नाही. एकदा या संदर्भात मी लिहिलं होतं- ‘हर तूफान / हमेशा खत्म नहीं करता हमें / कभी कभी वह / पत्तों जैसे / उड़ाकर / पहुँचाता है वहाँ / जहाँ पहुँचने के लिए / शायद हमें / कई साल गुजारने पड़ते..!’

हा झाला जिच्यावर अन्याय केला गेला त्या व्यक्तीच्या बाबतीतला विचार. दुसर्‍या बाजूनं विचार करताना मला सतत जाणवत आलंय की अन्याय.. अत्याचार करणारा क्रूर दिसतो. सहानुभूती शोषितांकडे जाते. पण अत्याचारी मानसिकतेचं दुसरं अदृश्य टोक भेदरलेलं असतं. आक्रमणं भीतीतून जन्म घेतात. आणि विनाश हे त्यांचं भवितव्य असतं. ज्या व्यक्तीवर अन्याय होतो ती प्रत्येक व्यक्ती सिंधुताईंसारखी कर्तृत्ववान होईल असं नाही. बर्‍याच उद्‍ध्वस्त होतात. पण अन्याय करणाराचं भवितव्यही त्याहून वेगळं नसतं. त्यांच्या उद्‍ध्वस्ततेची प्रत वेगळी असते.

इतिहास आणि भूगोलाच्याही प्रत्येक टप्प्यावर स्त्रीवर अन्याय झालाय असं दिसतं. तशा नोंदी आहेत. सबळ पुरावे आहेत. पण ज्यांनी अन्याय, अत्याचार केला त्यांचं पुढं काय झालं हे कुठं नोंदवलेलं दिसत नाही. त्याकडं लक्ष जात नाही. त्यांचा फारसा विचार होत नाही. वरवर पाहता दुरून ते मस्त मजेत आहेत असं वाटतं. दूरच्यांचं माहीत नाही पण त्यांची कशी वाताहत होते याची एक-दोन उदाहरणं मला अगदी आतून जवळून माहीती आहेत... अशा एक दोन उदाहरणांवरून निष्कर्ष काढता येणार नाही. पण तर्कानं कल्पना करता येईल.. आतल्या निरामय स्वस्थतेला काही मोल असेल तर ते त्यांच्या वाट्याला कधीच येत नसेल..! अन्याय-अत्याचार करणार्‍यांचं कोणत्याही तर्‍हेनं समर्थन होऊ शकत नाही, त्यांचा सहानुभूतीनं विचार करावा असंही इथे सुचवायचं नाहीए. फक्त यावर विचार व्हावा म्हणून या बाजूकडं लक्ष वेधायचं आहे. माणूस म्हणून अधःपतन करणारी ही मानसिकता येते कुठून? तिला खतपाणी कोण घालतं? याचा उलगडा कदाचित या विचारातून होऊ शकेल...

मला वाटतं पूर्वापार चालत आलेल्या पुरुषप्रधान प्रथेत याची बीजं आहेत. तिनं पुरुषांचा अहंकार पोसला. टोकदार केला. त्याला सतत ‘पुरुष’ असणं सिद्ध करायला लावून माणूसपणापासून वंचित केलं. आतून पराभूत, घाबरलेल्या पुरुषाला या प्रथेनं मनमोकळं करण्याची, रडण्याची मुभा दिली नाही. उलट व्यसनी होण्याची मर्दुमकी गाजावण्याला प्रवृत्त केलं. स्वतःवरचा ताबा सुटलेल्या अशा बेभान अवस्थेत आक्रमकता प्रवेश करत असेल आणि अमानुष आत्याचार करण्याची मनसिकता यातून जन्म घेत असेल..! अर्थात सगळेच अशा मानसिकतेचे बळी नसतात.

समाजातील टोकाचे दुराचारी पुरुष संख्येनं कमी असतात. आम जनतेतील सामान्य पुरुष सामान्य माणसं असतात. या नजरेनं त्यांच्याकडे पाहिलं तर वेगळं दृश्य दिसेल. सामान्य ‘तो’ आतून कसा असतो त्याचं एक प्रातिनिधिक शब्दचित्र-

तो
नेहमीच नसतो तो
अत्याचारी.. वाईट चालीचा...
बातम्यांमधून दिसतो तसा

तो नसतो बेफिकीर
वाटतो तितका
खरंतर त्याला झेपत नसतं
फिकीर करणं

त्याला असायचं नसतं ‘अहंकारी’
सोपं नसतंच
भोवतीच्या टोकदार हवेत
अहंकाराचे फुगे सांभाळणं..

तो नसतो पझेसिव्ह..
मालकी हक्क गाजवणारा
खरंतर तो गरजवंत असतो
आतल्याआत

तो बलवान असतोच असं नाही
पण तसं त्याला भासवावं लागतं

तो एक माणूस असतो साधा
जन्मजात नसतो ‘पुरुषी’
त्याला तसं घडवलं जातं..!

ती नसली की
तो विस्कटून जातो घरासारखा
त्याला कळत नाही
कोणत्या डब्यात काय ठेवलंय...
त्याला आठवत नाही
आज बीपीची गोळी घेतली की नाही..

ती नसली की
त्याला सुचत नाही काय करावं ते
करण्यासारखं बरंच असूनही
तो रमत नाही टी व्ही पाहण्यात
हवं ते चॅनल लावता येत असूनही
त्याला सापडत नाही
एकही वस्तू वेळेवर..
हरवून जातो तो घरातल्या वस्तूंसारखा..!

त्याला समजू शकतो
जगाचा इतिहास..भूगोल
पण अनाकलनीय वाटतं त्याला
आपलं छोटसं घर
ती नसली की..!
***

एकाकी स्त्री असुरक्षित असते हे खरं आहे पण तिला सहानुभूती मिळते तशी एकाकी पुरुषाला मिळत नाही हेही खरं आहे. तो स्वयंसिद्ध असतो असं गृहीत धरलं जातं. मग त्याला तसं भासवावं लागतं. ही कसरत जीवघेणी असू शकते. पुरुषप्रधानतेनं लादलेल्या या पुरुषपणाच्या जबाबदारीमुळं त्याची कशी आणि किती कुचंबणा होत असेल, स्वतःला सतत सिद्ध करण्याचा त्याच्यावर किती ताण येत असेल हे लक्षात घेतलं जात नाही. स्त्री-पुरुष समतेच्या विचारात ही बाजू आता दुर्लक्षून चालणार नाही. ‘पुरुष उवाच’सारख्या काही अंकामधून ही बाजू लक्षात घेऊन प्रबोधन, अनुभवकथन अशा विविध प्रकारे सातत्यानं हा विचार मांडला जातो आहे.

एका समंजस सहअस्तित्वासाठी स्त्री-पुरुषांच्या भूमिका परस्परपूरक असायला हव्यात. त्यासाठी सुरुवातीला परिस्थितीनुरूप श्रमविभागणी केली गेली. या परिपूर्ण वाटणार्‍या श्रम-विभागणीत काळाच्या ओघात एका वादळाचं बीज पेरलं गेलं. श्रम-विभागणी झाली तेव्हा दोन्हींचं मूल्य समान असेल. दोन्हीला समान दर्जा असेल. पण काळाच्या ओघात पुरुष करत असलेल्या अर्थार्जनाला महत्त्व आलं आणि स्त्रिया करत असलेलं अनुत्पादक घरकाम दुय्यम ठरलं. त्यामुळं पुरुषाला, पुरुषी गुणांना आणि पुरुषप्रधानतेला महत्त्व आलं. तेवढ्यावर थांबलं नाही. अक्कल चुलीपुरती राहिलेली स्त्री दुय्यम झाली, ती करत असलेलं काम दुय्यम ठरलं आणि तिचे अंगभूत गूणही दुय्यम दर्जाचे झाले..!

पुढे काळाची गरज म्हणून अर्थार्जन करू लागलेल्या स्त्रिला स्वसामर्थ्याची जाणीव झाली. घराबाहेर पडल्यावर गरजेनुसार स्वतःतल्या पुरुषीपणाचं संवर्धन ती करू लागली. मात्र पुरुषाची भूमिका त्याप्रमाणात बदलली नाही. तो पुरुषच राहिला. पुरुषप्रधानता तशीच राहिली. स्वतःतल्या स्त्री-पणाचं संवर्धन करायला हवं हे त्याला स्वतःला जाणवलं नाही की पुरुषप्रधानतेनं ते जाणवू दिलं नाही. स्वसामर्थ्याची जाणीव झालेल्या स्त्रिया दुय्यमत्व नाकारून समानतेसाठी आवाज उठवू लागल्या. त्यातून स्त्री-पुरुष समानतेच्या संघर्षाला सुरुवात झाली.  

स्त्रियांना जे हक्क, ज्या सुविधा परंपरेनं नाकारल्या, ज्यामुळं त्यांचा एक व्यक्ती म्हणून विकास होण्यात अडसर निर्माण झाला अशा समानतेसाठी हा संघर्ष होत राहिला. आजपर्यंतच्या अशा संघर्षांतून स्त्रियांना बरेच हक्क मिळत गेले आहेत. त्यामुळे झालेल्या त्यांच्यातील विकासाचा आलेख नव्यानं मांडण्याची गरज नाही. सर्वच स्त्रियांचे सर्वच प्रश्न सुटलेत असं मात्र अजिबात नाही. कायद्यानं मिळालेले अधिकार प्रत्यक्ष जगण्यात मिळतातच असं नाही. त्यामुळं हा संघर्ष अजूनही चालूच आहे. पण ज्या हक्कांमुळे स्त्रियांच्या गुणात्मक जगण्यात काही फरक पडणार नाही उलट त्या काही पावलं मागंच जातील अशा समानतेसाठी संघर्ष करण्यापेक्षा समतेचा विचार वेगळ्या प्रकारे समजून घ्यायला हवा असं मला वाटतं.

स्त्री-हक्कांबरोबर बदललेल्या वर्तमानस्थितीतल्या पुरुष-कर्तव्यांचाही विचार व्हायला हवा. काळाची गरज ओळखून स्त्री-पुरुष समतेचा विचार समजून घेणारे, प्रत्यक्षात तसं वागणारे बरेच पुरुष आहेत. त्यांची संख्या वाढते आहे. पण हा बदल सहज होत नाहीए. त्यासाठी पुरुषांनाही आंतरिक आणि बाह्य संघर्षाला सामोरं जावं लागतं आहे. जे पुरुष करतात ते स्त्रिया करू लागल्या ते पुरुषप्रधानतेला स्वीकार्य झालं. अशा स्त्रियांचा सन्मान होतो तेव्हा तो एका प्रकारे पुरुषीपणाचाच सन्मान असतो. त्यातून पुरुषी कर्तृत्वाचंच महत्त्व नव्यानं अधोरेखित होतं. पण आजपर्यंत स्त्रिया पार पाडत आल्या ती ‘चूल आणि मूल’ ही जबाबदारी पुरूषांनी पार पाडली तर अशा पुरुषांचा सन्मान होत नाही. उलट बायल्या म्हणून हिणवलं जातं. त्याच्या आतही कुठेतरी कमीपणाची भावना असते. या कामाचं अनन्यसाधारण महत्त्व ओळखून याला समान दर्जा मिळणं आवश्यक आहे. स्त्री-पुरुष समतेच्या नव्या विचारात स्त्रीची पारंपरिक कामं गरजेनुसार पुरुषालाही करता यायला हवीत. पुरुषप्रधानतेनं त्यात अडसर निर्माण करू नये. या दिशेनं विचार आणि प्रत्यक्ष कृतीला काही प्रमाणात सुरुवात झाली आहे. पण याचा अधिक प्रसार होऊन हे सार्वत्रिक होणं गरजेचं आहे. 

आणखी एक मुद्दा- आंतरिक पातळीवरील स्त्री-पुरुष समतेसाठी ज्या गुणांमुळे आजवर स्त्रीत्व आणि पुरुषत्व ठरत आलं आहे त्यामधे समतोल असणं गरजेचं आहे. प्रत्येकानं खरंतर एक चांगलं माणूस या पातळीवर असायला हवं. धाडसी, ज्ञानी, कर्तृत्ववान, अहंकारी, आक्रमक, बिनधास्त, मग्रुर.. या गुणांवर आता पुरुषांची मक्तेदारी राहिलेली नाही. मात्र मार्दव, सहनशीलता, नम्रता, शालीनता, हळवेपणा, संवेदनशीलता... या स्त्रीसाठी राखीव गुणांनाही स्त्रीसारखेच दुय्यमत्व येत गेल्यामुळे या गुणांना कोणी वाली नाही अशी अवस्था दिवसेंदिवस येत चालली आहे. बायकी आणि पुरुषी या दोन्ही गुणांची समाजस्वास्थ्यासाठी सारखीच गरज आहे. त्यात समतोल असावा. श्रेष्ठ कनिष्ठ दर्जा न ठरवता एक व्यक्ती म्हणून स्वभावानुसार या गुणांची समान पातळीवर जोपासना व्हावी. स्त्री-पुरुष समतेचा विचार, संघर्ष आता या दिशेला वळायला हवा.

पुरुषालाही भीती वाटू शकते, त्यालाही रडू येऊ शकतं, तोही हळवा होऊ शकतो.. माणूस म्हणून असलेल्या या नैसर्गिक भावना पुरुषालाही व्यक्त करता यायला हव्यात. पुरुषप्रधानता याच्या आड येते. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे यातून होणार्‍या घुसमटीतून मार्ग काढण्यासाठी पुरुष व्यसनाधीन होतो. पुरुषप्रधानतेची याला मान्यता असते. त्यामुळे इतर अनेक क्षेत्रांप्रमाणे आता काही स्त्रियाही पुरुषांच्या पावलावर पाऊल टाकून व्यसनाधीन होऊ लागल्या आहेत... ‘चौथर्‍यावर’ जायला स्त्रियांना परवानगी द्यायला नको म्हणून पुरुषांनाही बंदी केली तशी भूमिका व्यसनांसारख्या अनिष्ट सवयींबाबत घ्यायला हवी. जे अयोग्य आहे ते कोणीच करू नये. जे  माणूस म्हणून विकास होण्यासाठी गरजेचं आहे ते कुवतीनुसार प्रत्येकानं करायला हवं. चिनी तत्त्ववेत्ता लाओ त्सू यानं म्हटलं आहे, A fully realized human being is one who knows the masculine and yet keeps to the feminine- स्व-रूपाची पूर्ण समज आलेली व्यक्ती पुरुषत्व जाणते आणि स्त्रीत्वही जतन करते. स्त्री-पुरुष समतेबाबत असा दृष्टिकोन देणारी माझी एक कविता-

स्त्री असण्याचा अर्थ

स्त्रीचा जन्म मिळाला म्हणून
फक्त तिनंच का पेलावं स्त्रीत्व?
कळायला हवा
पुरुषी होत चाललेल्या समाजाला
स्त्री असण्याचा अर्थ
निभवायला हवं प्रत्येकानंच
आपापल्या परीनं स्त्रीत्व

स्त्रीचा देह असणं
म्हणजे स्त्री असणं नाही
स्त्री असणं म्हणजे
सर्जक आनंदाचा शोध घेत जगणं, जगवणं
अखंड तेवती ठेवणं जिजीविषा
टिकून राहाणं तुफानी वादळातही

स्त्री असणं म्हणजे
जतन करणं अस्तित्वाचे अक्षांश-रेखांश
रोखून धरणं महायुद्धांच्या शक्यता
सर्व मूल्यांचा आधार शाबूत ठेवणं
स्त्री असणं म्हणजे
सहवेदना.. प्रेम.. तितिक्षा!
....
पुरुषही पेलू शकतो असं स्त्रीपण
जशी स्त्री निभावतेय सहज पुरुषपण!!
***
(‘स्त्री असण्याचा अर्थ’ या संग्रहातून)

आसावरी काकडे

9762209028

‘पुणेपोस्ट’ १५-३१ अॉगस्ट २०१६

Friday 22 July 2016

कवितांचा अनुवाद : एक आंतरिक रियाज

कविता हा केंद्रवर्ती विषय असलेल्या यंदाच्या ‘विश्रांती’ या दिवाळी अंकासाठी कवितेचा अनुवाद हा विषय मला दिलेला आहे. सोबत एक प्रश्नावली पण आहे. लेखाचं स्वरूप ठरवणं त्यामुळं सोपं झालंय... पहिला प्रश्न अनुवाद-प्रक्रियेविषयी आहे. त्याविषयी प्रत्यक्ष उदाहरणं घेऊन लिहिताना त्यात इतर प्रश्नांचा विचार आपोआप होत जाईल.

कवितांचा अनुवाद करणं हा कवितेचा, भाषेचा रियाज आहे असा माझा अनुभव आहे. गायक जसा स्वरसाधनेसाठी शब्दांचा आधार घेऊन स्वर आळवतो तसेच काहीसे अनुवादाच्या प्रक्रियेत होते. इथे दुसर्‍या कवीच्या दुसर्‍या भाषेतील शब्दांमधून व्यक्त होऊ पाहणारा भावाशय तुमच्या समोर असतो. शब्दांचा एक चक्रव्युह रचलेला असतो त्या कवीनं. त्यातील प्रत्येक शब्द भाल्यासारखा त्याच्या आशयाच्या समोर उभा असतो. अनुवादकाला सर्व क्षमतेनिशी त्या व्युहात शिरून त्या शब्दांना जिंकून घेऊन त्यामागे दडलेल्या आशयापुढे आपल्या भाषेतला आपला शब्द उभा करायचा असतो...!

या प्रक्रियेत अनुवादकाला कविता या साहित्यप्रकाराचं स्वरूप नीट माहीती असावं लागतं. तसंच दोन्ही भाषांचं सखोल ज्ञान आणि त्या भाषा ज्या संस्कृतीच्या वाहक असतात त्यांचीही पुरेशी माहिती असावी लागते. नसली तर ती माहीती करून घ्यावी लागते... या निमित्तानं त्या कवीशी संवाद होतो. तो खूप ‘घडवणारा’ असू शकतो. भाषेशी, शब्दांशी आतून बाहेरून जवळीक साधली जाते. शब्दांच्या अंतर्बाह्य सामर्थ्याचं भान अनुवाद करताना जेवढं येतं तितकं लिहिता-वाचताना कधीच येत नाही.

अनुवादात शेवटच्या क्षणापर्यंत पुन्हा पुन्हा परिष्करण करावं लागतं. ते करताना एकाच वेळी दोन भाषांतील शब्दांशी निकटचं नातं तयार होतं. नवे शब्द, नव्या प्रतिमा, नवी कथनशैली यांचाही हार्दिक परिचय होतो... ही प्रक्रियाही कवितेविषयक, निर्मिती-प्रक्रियेविषयक समजुतीत भर घालणारी असते... अनुवादित कविता ही एका समांतर कवितेची निर्मिती असतेच पण या प्रक्रियेत भाषिक स्तरावर जी आंतरिक मशागत होते त्यातून नव्या स्वतंत्र निर्मितीच्या शक्यता निर्माण होतात. म्हणूनच कवितांचा अनुवाद करणं हे सृजनाचा पैस वाढवणारं एक सशक्त माध्यम आहे असं मला वाटतं.

ही पूर्ण अनुवाद-प्रक्रिया, त्यात येणार्‍या अडचणी, त्या त्या वेळी घेतलेले निर्णय... इ. प्रत्यक्ष उदाहरणांच्या आधारे उलगडून दाखवता येईल. अलिकडल्या पाच-सहा वर्षांत माझे तीन अनुवादित कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. प्रत्येक अनुवादाच्या वेळी त्या त्या कवितांच्या शैलीनुसार वेगळा अनुभव आला. उदा. हिंदीतील ज्येष्ठ कवी डॉ. दामोदर खडसे यांच्या ‘तुम लिखो कविता’ या संग्रहातील कवितांमधे प्रत्येक कवितेच्या सुरुवातीला, शेवटी आणि मधेमधेही धृवपदासारखी परत परत ‘तुम लिखो कविता’ ही ओळ आलेली आहे. कवितांच्या गाभ्यात शिरायचं तर या ओळीतील ‘तुम’ आणि ‘लिखो’ असं म्हणणारा ‘मैं’ यांच्यातलं नातं समजून घेणं महत्त्वाचं आहे हे प्रकर्षानं जाणवलं. कविता वाचताना हळूहळू हे नातं उलगडत गेलं. जाणवलं की या कविता म्हणजे एक दीर्घ स्वगत आहे. आत्मसंवाद आहे. व्यवहारी जगात व्यग्र असलेला ‘मी’ स्वस्थित ‘मी’शी संवाद करतो आहे... जगण्याचे अनुभव घेणारा ‘मी’ त्या अनुभवावर कवितेतून भाष्य करणार्‍या ‘मी’शी हितगुज करतो आहे. निरखतो आहे त्याचं शब्दांमधे उतरणं आणि प्रकटलेल्या शब्दांमध्ये स्वतःचं प्रतिबिंबित होणं..! या आत्मसंवादात दोन्हीतला एक ‘मी’, ‘तू’ होतो. ही पूर्ण आंतरिक प्रक्रिया... संवादापुरते दोन  झालेले ‘मी’ आपल्या भूमिका बदलत राहतात. त्यांच्यातलं निरखणारं कोण?, अनुभवणारं कोण?, लिही म्हणणारं कोण?, आणि लिहिणारं कोण?... अनुवाद करताना हे हळू हळू उमगत गेलं.

प्रत्यक्ष अनुवाद करताना, परत परत परिष्करण करताना कवितांशी पुरेसं अनुसंधान साधलं गेलं तेव्हा जाणवलं की या कवितांमधल्या ‘मी-तू’च्या नात्याचं परिमाण बदलत गेलं आहे... यातला ‘मी’, ‘तू’सह विशिष्ठतेचा परीघ ओलांडत राहतो... भोवतालाचं उत्कट भान असल्यामुळे त्याचा ‘परीघ’ विस्तारत राहतो.. ‘मी’ केवळ अलिप्त निरीक्षण करत नाहीय.. तो जगतोय असंख्यांमधला एक होऊन. तो अनुभवतोय नात्यांमधली गुंतागुंत, निसर्गाचे विभ्रम, आयुष्याला लगडलेली सर्व स्तरांवरची गर्दी... आणि यातून वाट्याला येणारी सुख-दुःखं..! ‘तू लिही कविता’ असं म्हणत हे सगळं ‘तू’ला सांगता सांगता या सांगण्याचीच कविता होऊन जाते..!! हे ‘कविता-दृश्य’ टिपणार्‍या कॅमेर्‍याच्या भूमिकेतला निवेदक कधी दुरून पाहतोय ही ‘निर्मिती प्रक्रिया’ तर कधी तिचा भाग होऊन जातोय... या कविता म्हणजे दृश्य, द्रष्टा आणि या दोघांना जोडणारी ‘पाहणं’ अनुभवण्याची प्रक्रिया या तिन्ही भूमिकांमधल्या ‘मीं’चा अद्‍भुत खेळ आहे... या खेळात इतक्या मिती सामावलेल्या आहेत की दर मितीनुसार कवितांतील शब्दांचे अर्थ बदलत.. विस्तारत राहू शकतात...
या सार्‍याचा प्रत्यय देणार्‍या कवितांची दोन उदाहरणं-

१)-
‘... तुम लिखो कविता
और मैं देखूँ
तुम्हारी अंगुलियों में  
एक बेचैन कलम
मैं देखूँ
शब्दों में नहाई पुतलियाँ  
आँखों में बहुत गहरे
अर्थों की कतारें
माथे पर उठती  
सागर-सी हिलोरें...
तुम लिखो कविता  
और मैं देखूँ तुम्हें  
कविता में बदलते हुए!’...

अनुवाद-

‘तू लिही कविता
आणि मी पाहीन तुझ्या बोटांमधे  
एक अस्वस्थ लेखणी
पाहीन शब्दांत न्हाऊन निघालेल्या बाहुल्या  
डोळ्यांत खोलवर अर्थांच्या रांगा
कपाळावर उमटणार्‍या रेषा
सागरलाटांसारख्या
तू लिही कविता
आणि मी पाहीन तुला  
कविताच होऊन जाताना...!

२)-
‘कविता खिड़की है यात्रा की
तुम हो जाओ द्रष्टा
और मैं
यात्रा का गुजरा हुआ दृश्य...  
आनेवाला दृश्य भी मैं ही होऊँ  
तुम लिखो कविता..!’

अनुवाद-
कविता खिडकी आहे प्रवासातली  
तू हो द्रष्टा
आणि मी
प्रवासात मागे पडलेलं दृश्य  
पुढे येणारं दृश्यही मीच असेन...  
तू लिही कविता..!

कवितेचा अनुवाद करताना कवितेचं पुरेसं आकलन ही सर्वात महत्त्वाची पहिली पायरी असते. अनुवादकाची आस्वादक्षमता, आकलनक्षमता आणि कवितेकडे, एकूण आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन हे सर्व घटक या आकलनाचा स्तर ठरवणारे असतात. कवितासंग्रहाची प्रस्तावना, मनोगत, अर्पण-पत्रिका.. अशा गोष्टींही कवितेच्या आकलनाला सहाय्य करू शकतात... पण प्रश्न पडतो की कवितांच्या आकलनासाठी अशा गोष्टीतून मिळणार्‍या दिग्दर्शनाचा आधार किती घ्यायचा, घ्यायचा की नाही की थेट कवितांनाच भिडायचं आणि पूर्णतः स्वतःच्या आकलन-क्षमतेवर विसंबायचं?

अनुवाद-प्रक्रियेत निर्माण होणार्‍या अशा प्रश्नांमधून अनुवादाविषयीची समज घडत राहते. हा अनुवाद करताना असाही विचार मनात आला की अनुवादकाच्या ‘आकलना’नुसार अनुवादाचं शब्दांकन बदलू शकेल का? किती प्रमाणात बदलेल? कारण मूळ कवितेनं दिलेल्या शब्दांच्या ढाच्यातच अनुवादित कवितेची इमारत उभी करावी लागते. एका मर्यादेबाहेर अनुवादक स्वतःच्या शब्दांची निवड करू शकत नाही. मग शब्द साधारण तसेच फक्त त्यामागचं आकलन वेगळं वेगळं असं होईल का?

मात्र कवितेतील ‘तू’ आणि ‘मी’ ही सर्वनामं अशी आहेत की त्यासंदर्भातील आकलनानुसारच स्त्रीलिंगी / पुल्लींगी शब्दयोजना करावी लागते. शिवाय हे आकलन अनुवादित कवितेचं परिमाणच बदलून टाकू शकतं... ‘तुम लिखो कविता’ या संग्रहातील कवितांच्या अनुवादासंदर्भात तर हाच कळीचा मुद्दा होता... 
  
 ‘लम्हा लम्हा’ या दीप्ती नवल यांच्या कवितासंग्रहाच्या अनुवादाचा प्रयत्न या कवितांच्या प्रेमात पडून मी वीस वर्षांपूर्वी केला होता. मात्र दोन वर्षांपूर्वी त्याच्या प्रकाशनाचा योग आला तेव्हा त्यावेळी केलेला अनुवाद पुन्हा ‘आज’च्या नजरेनं तपासून पाहणं गरजेचं होतं. हा अनुवाद सुधारून घेताना नव्यानं आलेले अनुभव इथं नोंदवण्यासारखे आहेत.

कवितेची एक व्याख्या आहे- ‘A Poetry is not the thing said, but the way of saying it-  आशय नाही, तो कथन करण्याची शैली म्हणजे कविता... दीप्ती नवल यांच्या कवितांचा नव्यानं अनुवाद करताना कवितेच्या या व्याख्येची प्रकर्षानं आठवण झाली. कारण या कविता आस्वादताना जाणवलं की या कवितांमधून काय सांगितलं गेलंय त्यापेक्षा ते कसं सांगितलंय ते अधिक सुंदर आहे. त्यात खरं काव्य आहे... पण या शैलीचा अनुवाद कसा करणार? कवितांच्या अनुवादात सतत असमाधान देणारा हाच महत्त्वाचा मुद्दा आहे. अशा अडचणींना सामोरं जाताना आपल्या सृजनशीलतेची कसोटी लागते. त्यात यश मिळेल न मिळेल पण ही प्रक्रिया अनुभवणं आनंददायी असतं असा माझा अनुभव आहे. या अनुवादातली काही उदाहरणं-

अनुवाद करताना कवितांमधे वापरल्या गेलेल्या एकाच मूळ शब्दांसाठी अनुवादात वेगवेगळे मराठी शब्द योजताना त्यांच्या कवितेला अभिप्रेत अर्थच्छटा कशा येतील याचा विचार होत राहिला... उदा. या कावितांमधे वापरलेला ‘मैला-सा’ हा शब्द. - ‘मैले-मैले से डिब्बों में वक्त की धूल जमती जाती है’, ‘क्यों अपना आप मैला-सा लगता है जाने’, ‘मैले-से टीले के करीब...’ अशा वेगवेगळ्या संदर्भात आलेल्या या शब्दासाठी मराठी शब्दयोजना करताना या शब्दाभोवतीचा कवितेतला परिसर पुन्हा पुन्हा फिरून अनुभवला. आणि मग कविताशयाशी प्रामाणिक राहात  अनुवाद केला. तो असा- ‘मळकट डब्यांवर क्षणांची पुटं चढत राहतात’, ‘कोणजाणे सारखं मलीन का वाटतं आहे माझं मलाच’, ‘उदास टेकडीजवळ...’

मात्र आपली भाषिक संवेदनशीलता आणि अनुवादाचं कसब कितीही पणाला लावलं तरी कवितांचा अनुवाद कधीही पूर्ण समाधान देत नाही. कारण प्रत्येक भाषेत काही शब्द असे असतात की त्याला समांतर तितका चांगला शब्द अनुवाद करताना सापडतच नाही. अशावेळी तडजोड करावी लागते. स्वतः दीप्ती नवल यांनी स्वतःला हवी तीच अर्थच्छटा कवितेत यावी म्हणून आपल्या हिंदी कवितेत काही पंजाबी शब्द वापरण्याची शैली अनुसरली. काहीसं याचंच अनुकरण करत मीही त्यांच्या मूळ हिंदी कवितेतला मंजिल हा शब्द एक दोन कवितांच्या अनुवादात तसाच ठेवला. कवितांच्या अनुवादात काही तडजोडी अपरिहार्यपणे कराव्या लागतात. मूळ शब्दासाठी तितका चांगला शब्द आपल्या भाषेत नाही मिळाला तर एखादा लंगडा शब्द वापरण्यापेक्षा तोच शब्द वापरण्याची तडजोड मला ‘मंजिल’ शब्दासाठी तरी चांगली वाटली. अर्थात अशी तडजोड हा शेवटचा पर्याय असतो...

वर म्हटल्याप्रमाणे कवितांची शैली म्हणजेच खरंतर कविता! कवितेतल्या प्रतिमा कवितेला कवितापण बहाल करत असतात. अनुवादातही हे कवितापण जपणं ही खरी कसोटीची गोष्ट असते. दीप्तीजींच्या कवितांमधे तर अनेक तरल प्रतिमा आहेत. त्या अनुवादातही आणण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला. फारसं कृत्रिम न वाटता काही ठिकाणी थोडं जमून गेलं. उदा. एका कवितेत म्हटलंय-

‘‘ रात के पहलू से
गुज़रा करते हैं जब  
खामोशियों के काफिले  
वादी के इस कोने में खड़े होकर  
देखा है हर दफ़ा
धुंधला सा इक चेहरा, आशना ”

अनुवाद-

“ रात्रीच्या कडेने नीरव शांततेचे जत्थे
सरकत असतात
तेव्हा डोंगर-घाटातल्या
या कोपर्‍यात उभं राहून  
प्रत्येक वेळा पाहिलाय  
एक अस्पष्ट चेहरा, जिवलग ”

 असाही एक मुद्दा आहे की कविता एकदा लिहून झाली की ती कवीची राहात नाही. शब्द, विशेषतः कवितेतल्या प्रतिमा प्रत्येकाला वेगळा प्रत्यय देतात. अनुवाद करताना मूळ कवीला अभिप्रेत आशय यायला हवा हे खरं आहे. पण त्याच आशयाशी बांधून राहण्यात कवितेतील अनेकार्थांच्या शक्यताना मर्यादा पडतात. आणि अनेकार्थांचं सूचन हे तर कवितांचं बलस्थान आहे. त्यामुळं काही प्रमाणात अनुवादकाला अर्थनिर्णयनाचं स्वातंत्र्य असलेलं कवितांच्या दृष्टिनं योग्यही ठरतं. एका मर्यादेनंतर मूळ कवितेतल्या शब्दांचं बोट सोडून दिलं आणि मी आत्मसात केलेल्या कवितांशी प्रामाणिक राहात अनुवाद पूर्ण केला.

कवितांचा अनुवाद करताना आणखी एक भान ठेवावं लागतं. बर्‍याचदा वाचकांसमोर फक्त अनुवाद असतो. मराठी कविता या स्वरूपातच त्याचा आस्वाद घेतला जातो. त्यामुळं मराठी कविता म्हणूनही त्या वाचनीय व्हायला हव्यात. मात्र हे पथ्य सांभाळताना मूळ कवितेला थोडा धक्का लागणं टाळता येत नाही. मूळ आशय तर फारसा उणावणार नाही आणि अनुवादही कृत्रिम वाटणार नाही अशी कसरत काही वेळा करावी लागते. उदा. एका कवितेतल्या दोन ओळी अशा आहेत-
‘मैंने करवट बदल कर तुम्हें छूना चाहा
मगर अल्लाह ! तुम नहीं थे’

या ओळीतील ‘मगर अल्लाह !’ हा भावोद्गार पूर्ण कवितेतला एकाकीपणा आणि ‘तू’ हवा असण्याची अत्यंतिक ओढ व्यक्त करणारा आहे. पण अनुवादात ‘अल्लाह’च्या जागी ईश्वरा, परमेश्वरा, असं काही घालणं मराठी कवितेच्या स्वभावात बसणारं नाही. मग तसं काही न लिहिताच अनुवाद केला. कवितेचं एक बलस्थान म्हणजे मौन. दुसर्‍या ओळीतल्या ‘पण’नंतर रिकामी जागा सोडून मी मौनाचा आधार घेतला. ‘च’ हे नसण्याची कृती अधोरेखित करणारं अक्षर जोडीला घेतलं आणि त्या जागेतला मूळ भावाशय जाणवून देणारं उद्‍गारचिन्ह शेवटी घातलं. तो अनुवाद असा-  

‘मी कुशीवर वळून तुला स्पर्शू पाहिलं
पण.... तू नव्हतासच तिथे !

‘तू लिही कविता’ आणि ‘लम्हा लम्हा’ या दोन्ही कवितांहून गोरखपूर येथील हिंदीतील ज्येष्ठ कवी डॉ. विश्वनाथ प्रसाद तिवारी यांच्या कवितांचा पोत वेगळा आहे. त्यांच्या निवडक कवितांचा अनुवाद ‘तरीही काही बाकी राहील’ या नावानं मी केला आहे. या कवितांचा अनुवाद करताना काही वेगळे प्रश्न पडले. उदा. यातल्या काही कवितांच्या शीर्षकाखाली ‘संदर्भ : बांगला देश’, ‘संदर्भ : वीयतनाम’ असं काही काही लिहिलेलं आहे. शीर्षकाबरोबर त्याचा अनुवाद करणं अवघड नव्हतं. पण हे संदर्भ नीट कळायला हवेत असं वाटलं. स्वतः तिवारींनाच विचारून ते समजून घेता आले असते. पण मग असंही वाटलं की कविता अशा संदर्भांशी बांधलेली असावी का? खरंतर शीर्षक हेही दिशादर्शक पाटीसारखं कवितेच्या मुक्त आस्वादाच्या आड येत पूर्वग्रह निर्माण करत असतं. परत त्याखाली आणखी काही संदर्भ देणं म्हणजे कविताशय सीमित करण्यासारखं नाही का? डॉ. तिवारी यांच्याशी या संदर्भात चर्चा करून मुळातले असे संदर्भ अनुवादात न देण्याचा निर्णय घेतला.

‘एक पहाड़ी यात्रा’ या कवितेचा अनुवाद करताना पुन्हा वेगळी अडचण आली. या कवितेची सुरुवात आहे-

‘पीछे छूट चुके हैं
हजारो चीड़ वन
उपर बुलाते हैं कुछ और  
कुछ और देवदारू वन..’
इथे वन हा शब्द अनेकवचनी आहे. मराठीत ‘वन’चं अनेकवचन वने किंवा वनं असं आहे. या ओळींचा अनुवाद असा केला-

‘मागे पडलीत  
हजारो चीडवनं  
वर खुणावताहेत आणखी काही  
आणखी काही
देवदारवनं..’

मराठी कविता म्हणून वाचायला हा अनुवाद छान वाटत नाही. इथे प्रश्न पडला की, ‘अनुवाद इतका सफाइदार असावा की तो अनुवाद वाटता कामा नये’ या मताशी प्रामाणिक राहावं की, ‘अनुवाद हा अनुवादच वाटला पाहिजे. सफाइदार अनुवाद म्हणजे रूपांतर’ हे मत लक्षात घ्यावं?.. अशा पेचप्रसंगी त्या त्या वेळी योग्य वाटेल तो निर्णय घेतला जातो. अनुवादकाचा कोणताही निर्णय एका वेळी कोणत्यातरी एकाच मताला न्याय देऊ शकतो आणि त्यामुळं दुसर्‍या मतानुसार तो टीकेला पात्र होतो...

असंही म्हटलं जातं की अनुवादित कवितेतून अनुवादक नाही मूळ कवी डोकवायला हवा. हे लक्षात घेऊन या कवितांचा अनुवाद करताना मी अनुवादातील सफाईपेक्षा मूळ कवितांच्या शैलीशी प्रामाणिक राहण्यावर अधिक भर दिला. प्रश्नचिन्हं, उद्‍गारचिन्ह, विरामचिन्ह आणि ‘पण’ ‘म्हणून’ ‘आणि’ असे आशयातील संबंध दाखवणारे शब्द यांचा कमीतकमी वापर हे या कवितांचं वैशिष्ट्य आहे. अनुवादातही हे वैशिष्ट्य राखण्याचा मी आटोकाट प्रयत्न केला. कवितांमधे दोन ओळींच्या मधल्या अनुच्चारित आशयाला अधिक महत्व आहे. तिवारी यांच्या कवितांत अशा अनुच्चारित जागा बर्‍याच आहेत. अनुवादातही त्या तशाच अनुच्चारित राहायला हव्यात. पण काहीवेळा ते शक्य झालं नाही. उदा. ‘शब्द’ नावाची एक छोटी कविता आहे. शब्दाविषयीची अत्यंत सूक्ष्म आणि खोल समज या कवितेतून व्यक्त झालीय. ती कविता अशी-

“वस्तूंना नावं द्या  
शब्द सृष्टीची किल्ली आहे  
बोलणं ओठांची कसरत नाही  
लिहिणं बोटांचा खेळ नाही
शब्द ‘असण्या’चा पुरावा आहे  
तो एक विराट मौन भंग करतो  
एका निबिड अंधारातून सोडवतो  
(त्याच्याशिवाय)  
कोणतं साधन आहे आपल्याजवळ  
या दिक्कालाशी झुंजण्याचं  
ज्यामधे आपण फेकले गेलोय?”

शेवटच्या तीन ओळींपूर्वी कंसात घातलेला ‘त्याच्याशिवाय’ हा शब्द मूळ कवितेत नाही. पण कविता समजण्याच्या दृष्टीनं तो तिथे असणं मला आवश्यक वाटलं. बराच विचार करून तो कंसात घालण्याचा पर्याय मी निवडला.

अनुवादामधे योग्य शब्दाची निवड करणं हे एक मोठं आव्हान असतं. शब्दाला शब्द ठेवायचा तर शब्दशः अर्थ काही वेळा हास्यास्पद ठरतो. पण सूचितार्थ, भावार्थ दर्शवणारा शब्द घ्यायचा तर कवितेचा अनुवाद म्हणजे कविता समजून सांगण्यासारखं होईल. अनुवादातही आशय सुचकतेनं, मूळ अर्थच्छटेसह यायला हवा... असा शब्द मिळेपर्यंत चांगलाच धीर धरावा लागतो. उदा. ‘गति की आवाज’ या कवितेत ‘सन्नाटा नहीं था वहाँ...’ अशी सुरुवात करून मधे निसर्गाच्या विविध विभ्रमांचं वर्णन करत शेवटी म्हटलंय-

‘सन्नाटा नहीं था वहाँ  
एक खामोश आवाज थी
गति की...’

यातील सन्नाटा या शब्दाला अनेक अर्थच्छटा आहेत. सन्नाटा म्हणजे भकास शांतता असा अर्थ लगेच लक्षात येतो. कविता पुन्हा पुन्हा वाचून तिचा पोत समजून घेतल्यावर भकास शांतता किंवा नीरवता हे शब्द योग्य वाटेनात. आशयाचं आंतरिकीकरण आणि विचारांचा रियाज होत राहिला. त्यानंतर केलेला अनुवाद असा-

‘निःशब्दता नव्हती तिथे
मूक ध्वनी होता
गतीचा..!’

या तीन अनुवादांच्या आधी, काही वर्षांपूर्वी ज्येष्ठ राजस्थानी कवी चंद्रप्रकाश देवल यांच्या ‘बोलो माधवी’ या कवितासंग्रहाचा अनुवाद मी केला होता. ययाती-कन्या माधवीची कथा पार्श्वभूमीवर ठेवून त्या निमित्तानं स्त्री असण्याच्या वास्तवावर प्रखर भाष्य करणारा हा संग्रह वाचून मी प्रभावित झाले होते. त्याचा विषय आणि कवीचा दृष्टिकोन महत्त्वाचा वाटला. या संग्रहात परोपरीनं माधवीला बोलतं करण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून दोन प्रश्न विचारलेत. एक- ‘माधवी, स्त्री कधी बोलणारच नाही काय?’ आणि दुसरा- ‘तुझ्यावर झालेल्या अन्यायाबद्दल पुरुषांचा वंशज मी एक पुरुष या नात्यानं काय प्रायश्चित्त घेऊ?’...

कवी-मनाला अत्यंत खरेपणानं पडलेले हे प्रश्न वाचकाला अंतर्मुख करणारे आहेत. त्यातल्या प्रामाणिक भावनेनं मी अस्वस्थ झाले होते. अनुवाद हातावेगळा झाल्यावरही ते प्रश्न मनात सलत राहिले. बरेच दिवस मनात असलेल्या एका विषयाला त्यामुळं जाग आली. त्यातून सलग काही कविता लिहिल्या गेल्या. दोन वर्षांनंतर ‘स्त्री असण्याचा अर्थ’ या नावानं या कविता संग्रहरूपात प्रकाशित झाल्या. या संग्रहात सामान्य पण विपरित परिस्थितीतही जिद्दीनं उभ्या राहिलेल्या स्त्रियांच्या ‘कहाण्या’ आहेत. पुस्तक प्रकाशित झाल्यावर त्यातल्या कविता त्रयस्थपणे वाचताना जाणवलं की यातील स्त्रियांची ‘बदललेली’ आयुष्यं, ‘स्त्री कधी बोलणारच नाही काय? या प्रश्नाला सकारात्मक कृतीतून उत्तर देणारी आहेत तर या संग्रहाच्या शीर्षक-कवितेच्या शेवटच्या दोन ओळी –

‘पुरूषही पेलू शकतो असं स्त्रीपण
जशी स्त्री निभावतेय सहज पुरुषपण’

हे ‘काय प्रायश्चित्त घेऊ?’ या प्रश्नाला दिलेलं उत्तर आहे..!

अनुवाद करताना आशय आणि अभिव्यक्ती दोन्ही स्तरांवर नकळत आंतरिकीकरण होत राहातं आणि त्यातून स्वतंत्र निर्मितीला प्रेरणा मिळते. हा अनुभव मला फार पूर्वी, १९९२-९३ दरम्यान मी प्रथम ‘लम्हा लम्हा’चा अनुवाद करण्याचा प्रयत्न केला तेव्हाही आला होता. हा अनुवाद तेव्हा प्रकाशित झाला नाही. पण या अनुवादानं मला स्वतंत्र हिंदी कवितांचं दालनच उघडून दिलं..! मी स्वतंत्र हिंदी कविता करू लागले. यथाकाल त्या कविता संग्रहरूपातही प्रकाशित झाल्या.

मात्र अनुवाद आणि स्वतंत्र निर्मिती या मधला हा अनुबंध अगदी थेट असत नाही. प्रत्येक वेळी असं होईल असंही नाही. असा अनुबंध जोडणं हा दूरान्वयही होऊ शकेल. मात्र एक नक्की म्हणता येईल- स्वतंत्र निर्मितीला ज्या अनेक प्रेरणा अनेक प्रकारे कारण ठरत असतात त्यात अनुवादामुळे झालेला आंतरिक रियाज हे एक कारण ठरू शकतं.

कवितांचा अनुवाद हे नवनिर्मितीला प्रेरणा देऊ शकणारं, सृजनाचा पैस वाढवणारं एक सशक्त माध्यम आहेच. पण याशिवाय विविध प्रकारच्या अनुवादांच्या अनुभवांमधून मला अनुवादाच्या सामर्थ्याचं वेगळं दर्शनही घडलं. अनुवादाचं पुन्हा पुन्हा परिष्करण करताना भाषा, आशय आणि रचना या तिन्ही स्तरांवर कवितेशी जवळीक साधता येते. ही आंतरिक प्रक्रिया अनुवादकाची स्वतःची, स्वतंत्र असते. अशा खोल जाण्यातून उमगणारा आशय केवळ त्या कवितेपुरता मर्यादित राहात नाही. ही उमज कवितेच्या सीमा ओलांडून जाते. अनुवादित कवितेसाठी होणारी शब्दाची निवड, रचना, उच्चार-अनुच्चार या बाबतीत घेतले जाणारे निर्णय अनुवादकातल्या ‘मी’चे असतात. ‘मी’ हीच निवड का करतो? ‘मी’ हाच निर्णय का घेतो? या प्रश्नांच्या उत्तरांतून ‘मी’चा स्तर कळतो. ‘मी’ची ओळख होत जाते...

कविता-लेखन असो की कवितांचा अनुवाद असो, ‘स्व’शी प्रामाणिक राहून केलेली प्रत्येक अभिव्यक्ती ही ‘स्व’ची अभिव्यक्ती असते. ती ‘स्व’ची ओळख करून देणारी असते... अशी प्रत्येक समज ही अखेरीस स्व-शोधाचं माध्यम ठरू शकते. ती अनुवादकाला उन्नत करणारी असते.

अशा प्रकारे अनुवाद-प्रक्रियेतून जाताना अनुवाद करणारा समृद्ध होतोच पण मराठी कवितेचं दालनही अनुवादित कवितांमुळे समृद्ध होत राहिलं आहे. कवितांचा अनुवाद कधीच परिपूर्ण असत नाही. पण अनुवादांमुळे दुसर्‍या भाषेतील कविता मराठी कवितांमधे सामिल होतात. मराठीत येताना त्यांनी त्यांचं असं बरंच संचित बरोबर आणलेलं असतं. आपल्याला त्यातून वेगळी दृष्टी मिळू शकते. विषय, शैली, जगण्याच्या नवीन तर्‍हा, विचार.. असं बरंच काही आपण यातून वेचून घेऊ शकतो..!

आसावरी काकडे 
५ जुलै २०१६
asavarikakade@gmail .com
9762209028

(विश्रांती दिवाळीअंकासाठी २०१६)

Friday 15 April 2016

सामान्य अभिरुचीची अभिजात तेढ

आज कुरियरने मला तीन ‘ग्रंथ’ आले. हे ग्रंथ म्हणजे आठ, दहा आणि छत्तीस पानी झेरॉक्स केलेली मनमुक्त लेखनाची तीन हस्तलिखितं आहेत. ‘माझे तीन ग्रंथ तुम्हाला भेट पाठवते आहे’ असा फोन करून ते पाठवणार्‍या पंचाहत्तरीच्या पुढे वय असलेल्या या बाई स्वतः शीघ्र कवयित्री असल्याचं सांगतात. कविता लिहिणे, वाचणे, कवींशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणे, दुसर्‍याचे भरभरून कौतुक करणे व करवून घेणे हा त्यांचा छंद आहे. एकटेपण ‘संपन्न’ करणारा, वृद्धत्वाचा दंश सुसह्य करणारा.. कवितेसंदर्भातली ही समज आणि असा दृष्टिकोन हे एक दृश्य...

एका पुरस्कारासाठी पहिल्या फेरीत पाच कवितासंग्रहांची निवड झाली. त्यांची नावं जाहीर झाली. मग काही दिवसांनी पुरस्कारासाठी त्यातल्या एकाची निवड झाली. मग पुरस्कार वितरण सोहळा. त्यावेळी मनोगत व्यक्त करण्यासाठी पुरस्कार-विजेत्यांना काही प्रश्न दिले होते. त्यात ‘या पुरस्कारासाठी निवडलेल्या इतर कवितासंग्रहांबद्दल तुमचं मत काय?’ असा एक प्रश्न होता. त्याचं उत्तर देताना पुरस्कार-विजेता म्हणाला, ‘इतर संग्रहांतील कवितांना मी कविताच मानत नाही’... पहिल्या फेरीत निवड केलेले कवितासंग्रह काही एका निकषावर समान दर्जाचे असणार. त्यांच्या विषयीचे हे उद्‍गार..! या उद्‍गारामधे अहंकार आहे. इतरांबद्दलची तुच्छाताही त्यातून डोकावतेय... कवितेविषयीची समज आणि दृष्टिकोन या संदर्भातलं हे दुसरं दृश्य.

अशीच दोन टोकांची आणखी दोन दृश्यं- मायाजालावर प्रसारित झालेली-

एका गावात चला हवा येऊ द्याया टी व्ही शोची टीम आली होती. खूप खचाखच गर्दी उसळली होती कार्यक्रम आणि कलाकारांना बघायला. लोकांनी खूप एन्जॉय केला म्हणे तो शो... 

त्याच गावात काही दिवसांनी चला पाणी येऊ द्याअसं नाव देता आलं असतं असा आणखी एक कार्यक्रम झाला. सुप्रसिद्ध जलतज्ञ राजेंद्र सिंह यांच्या भाषणाचा. या कार्यक्रमाला फारशी गर्दी नव्हती. जी होती तीही कर्तव्य म्हणून आल्यासारखी.

एकात केवळ करमणूक. थोडा वेळ मन रिझवणारी. दुसर्‍यात रोजच्या जगण्याचा ज्वलंत प्रश्न.. आणि त्यावरचा उपाय सांगण्यातली कळकळ.. ‘आमजनतेनं थोड्या वेळची करमणूक पसंत केली. इथे आम म्हणजे बहुसंख्य. यात सुशिक्षित-अशिक्षित, गरीब-श्रीमंत, लहान-मोठे, स्त्री-पुरुष.. सर्व आले. या आम जनतेच्या निवडीला काय म्हणायचं? रोजच्या जगण्याशी निगडित ज्वलंत प्रश्न सोडवण्याशी त्यांचा काहीच संबंध नव्हता का? की त्यासाठी आपण काही करायला हवं हे त्यांच्या गावीच नव्हतं? की निव्वळ अविचार? की हतबलता.. मख्ख थकलेपण? की भवितव्याविषयीची अनास्था... निराशा?

महत्त्वाच्या गंभीर विषयांवरची समांतर नाटकं, सिनेमे आणि फुल्ल टू धमाल नाटक-सिनेमे यांना मिळणारा प्रतिसाद असाच असतो.. घरबसल्या टी व्ही वर विनामूल्य बघता येणार्‍या कार्यक्रमांबाबतही हेच. आता तर कुठेही उभ्या उभ्या सुद्धा पाहता येतील असे अनेक पर्याय मोबाइलवर झळकत असतात. केवळ एका क्लिकनं लाइक करता येतं. तिथंही सुमार पोस्ट्सना भरपूर लाइक्स आणि ‘अभिजात’ ‘साहित्या’ला तुरळक.. हेच दृश्य आहे...

अशी अनेक उदाहरणं देता येतील. कोणतंही क्षेत्र याला अपवाद नाही. असं का घडत असेल?

फार पूर्वीपासून आभिजात साहित्य-कलांपासून आम समाजाला दूर ठेवलं गेलं. उच्च अभिरुचि ही ठराविक वर्गाची मक्तेदारी होती. एका समूहानं विचार करायचा. दुसर्‍या समूहानं राबायचं. एकानं सेवा घ्यायची, दुसर्‍यानं द्यायची. अशी व्यवस्था होती. क्रांत्या, चळवळी, प्रबोधन.. अशा मार्गांनी बरीच उलथापालथ केली. समूहांमधे सरमिसळ झाली. शहरी, उच्चभ्रू समाज आणि उच्च अभिरुची यांचं गणित बदललं. आता खेड्यातले, कष्टकरी वर्गातले काहीजण उच्च दर्जाची निर्मिती करू शकतात. उच्च अभिरुचीला प्राधान्य देऊ शकतात. उलट उच्च विद्याविभूषित असलेले काहीजण आपला विषय सोडून इतर बाबतीत सामान्य अभिरुची असणारे असू शकतात. अशी उलथापालथ झाली, विचार करणारे बदलले. तरी संख्येनं थोडेच राहिले. राबणारे बदलले, राबण्याचं स्वरूप बदललं तरी ‘आम’ जनता असा बहुसंख्यांचा समूह आहेच. पूर्वीच्या मानानं आता प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे उच्च अभिरुची जोपासण्याचं. पण त्यासाठी केवळ इच्छा असून भागत नाही. त्यासाठी आवश्यक ती समज घडवण्याची हरप्रकारची क्षमता असावी लागते. ती सगळ्यांजवळ असत नाही. शिवाय प्रत्येकाचे प्राधान्यक्रमही वेगळे असतात...

या बाबतीतला माझा एक अनुभव मला नेहमीसाठी एक समजूत देऊन गेला. बँकेत नोकरी करत होते तेव्हाची गोष्ट. कॉम्प्युटरची माहिती करून न घेता मी शिकवल्यानुसार ओळीनं सर्व कमांड्स एका कागदावर लिहून ठेवल्या. तेवढी बटणं दाबून काम व्हायचं. एक मैत्रिण म्हणाली, ‘असं काय अडाण्यासारखं करतेयस. समजून घे एकदा म्हणजे असा कागद ठेवावा लागणार नाही.’ पण मी समजून घेण्याची तसदी घेतली नाही... माझ्या प्राधान्यक्रमात तसदी घेऊन समजून घ्यावेत असे विषय वेगळे होते. बाकीच्या बाबतीत खोलात न जाता कामचलाऊ समज मला पुरेशी वाटत होती.  मनात आलं की ‘लोक एवढासुद्धा विचार कसा करत नाहीत..?’ असं म्हणून आपण लोकांना नावं ठेवतो तेव्हा हे लक्षात घ्यायला पाहिजे की प्रत्येकाच्या प्राधान्याच्या गोष्टी वेगळ्या असतात. असलेली क्षमता त्यासाठी वापरली की बाकी गोष्टी महत्त्वाच्या असल्या तरी त्या बाबतीत तेही असेच ‘निष्क्रिय’ होत असतील...

समजूत वाढवणारा आणखी एक प्रसंग... एका डॉक्टरानी मला लांबच्या क्लिनिकवर यायला लागू नये म्हणून जवळच्या हॉस्पिटलमधे ऑपरेशनच्या मधल्या काळात भेटायला बोलावलं होतं. काम काही मिनिटांचं होतं. ते झाल्यावर टेबलावरच्या पेशंटचा रिपोर्ट येईपर्यंत ते शब्दकोडं सोडवत बसले. हे दृश्यं पाहून मी चकित झाले... डॉक्टर आणि शब्दकोडं.. तेही अशा वेळी? मी अंतर्मुख झाले. विचार करत राहिले. वाटलं कुणीही सतत तणावाखाली राहू शकत नाही. उच्च अभिरुची जोपासणं ही भूमिका कायम निभावता येईल असं नाही. आतल्या ताणातून काही काळ सुटका करणारं सामान्य अभिरूचीचं हे दृश्य रूप त्या वेळपुरतं असू शकतं.. किंवा शब्दकोडं सोडवणं हे मन स्थिर ठेवण्याचं एक साधन असू शकतं. असाही विचार करता येऊ शकेल की एकाच व्यक्तिमत्वात एकाच वेळी अनेक प्रकारच्या व्यक्ती असतात. समोरासमोर ठेवलेल्या आरशातील प्रतिमांसारख्या वरून समान दिसणार्‍या पण आतून वेगवेगळ्या कार्यात गढलेल्या.. बाहेरच्या जगाला त्यातली एखादी दिसते..!

पण हे एवढ्यापुरतं मर्यादित नाही. प्रश्न असा आहे की आम जनतेच्या वाढत चाललेल्या या सामान्य अभिरुचीचं काय करायचं? त्यामागची कारणं समजून घेऊन तिचं जगण्यातलं स्थान लक्षात घ्यायचं की नावं ठेवण्यात धन्यता मानायची ?

समाजात या आम जनतेकडे पाहणारे तीन मुख्य घटक आहेत. एक बुद्धीवादी... तथाकथित उच्च अभिरुचीवाला, दुसरा उद्योजक आणि तिसरा राजकारणी.. यापैकी पहिला घटक सामान्य अभिरुचीला नामोहरम करण्यात धन्यता मानत असतो. मध्यमवर्गीय अभिरुचीही त्यांना मान्य नसते. प्रचंड गर्दी, तुफान लोकप्रियता असेल ते सर्व त्यांच्या मते दुय्यम तिय्यम दर्जाचं असतं. सुरुवातीला दिलेलं कवीचं उत्तर या संदर्भात पुरेसं बोलकं आहे. या उलट दुसरे दोन घटक या सामान्य अभिरुचीचा भरपूर फायदा करून घेतात. ती बदलण्याऐवजी जोपासण्याचाच प्रयत्न करतात. कारण विचार न करणार्‍यांची त्यांना गरज असते. सोप्या, फुकट गोष्टींमधे गुंतवून विचारांपासून दूर ठेवण्याचं काम त्यांच्याकडून सातत्यानं केलं जातं. आयुष्यातल्या वर्तमान क्षणाचा आनंद भरभरून घेण्याच्या मानसिकतेचं वेगवेगळ्याप्रकारे असं काही ग्लोरिफिकेशन केलं जातं की विचार करू शकणार्‍यांनाही गिल्टी वाटावं...!

दुसरा प्रश्न असा की सामान्य कुवतीच्या निर्मितीचं काय करायचं? सुरुवातीच्या उदाहरणातील ज्येष्ठ बाईंच्या ग्रंथांना मी काय अभिप्राय देऊ? अशी असंख्य गवताची पाती कौतुकाच्या दोन थेंबांसाठी आसुसलेली असतात. त्यांना उमेद द्यायची की समीक्षेचे निकष लावून त्यांच्या हातातलं त्यांच्यापुरतं असलेलं आनंदनिधान काढून घ्यायचं? ‘निर्मिती’च्या कलागुणाला महत्त्व द्यायचं की त्यातून मिळणार्‍या एकाकीपणातल्या ‘सोबती’ला जिवंत ठेवायचं? अशा वेळी ज्ञानेश्वरांच्या
‘राजहंसाचे चालणे । भूतळी जालिया शाहाणे । आणिके काय कोणे । चालावेचिना ॥१७१३/१८’
या ओवीचा आधार वाटतो. श्रेष्ठ साहित्याची निर्मिती करण्याची कुवत सगळ्यांमधे नसते. पण म्हणून त्यांनी आपल्या कुवतीनुसार काही लिहूच नये का? अवश्य लिहावं... अर्थात योग्य वेळी केलेली टीका एखाद्याला अधिक चांगल्या निर्मितीचा मार्ग दाखवू शकते. प्रतिसाद देताना हे तारतम्य ठेवायला हवंच..

एका बाजूला सामान्य अभिरुचीचा असा पेच तर दुसर्‍या बाजूला उच्च अभिरुचीचा न सुटणारा तिढा.
 
सामान्य अभिरुचीच्या बहुसंख्येच्या गराड्यात लोकमानसात रुजलेल्या शैलीपेक्षा वेगळं, वेगळा विचार देणारं काही लिहू-करू पाहणार्‍याच्या वाट्याला काहीशी उपेक्षा येत असते. ‘समांतर’ नाटक, सिनेमांकडे ‘आम’ रसिक प्रेक्षक वळत नाहीत. कोणतीही कला आस्वादायची तर ती मुळात समजावी लागते. नव्या शैलीतील नवी निर्मिती पचनी पडायाला वेळ लागतो. कालांतरानं त्याचं स्वागत होतं. पण ते त्याच्या हयातीतच होईल याची शाश्वती नाही. कित्येक जगद्विख्यात कलाकारांच्या कलेची दखल त्यांच्या मृत्युनंतर घेतली गेली... अभिरुचीबाबतची ही तेढ आजची नाही. अभिजात साहित्याच्या काळापासूनची आहे...

शृंगार, हास्य, वीररसप्रधान नाटकांच्या परंपरेत करुण रसहाच प्रधान रस आहे असं प्रतिपादन करून लिहिणारा भवभूती हा त्या काळातला एकमेव नाटककार होता. ‘मालती माधवया नाटकात त्यानं म्हटलंय-

ये नाम केचिदेह नः प्रथयंन्त्यवज्ञा
जान्तुते किमपि तान्प्रति यत्नः ॥
उत्पत्स्येsस्ति मम कोsपि समान धर्मा                    
कालोह्ययं निरवधिर्विपुलाच पृथ्वी ॥
 भवभूती (मालती माधव)

(माझ्याविषयी जे कोणी अनादर पसरवत असतील त्यांनी हे लक्षात घ्यावे की माझे लेखन त्यांच्यासाठी नाहीच. ‘समानधर्माकोणी आज नसेल तर तो पुढे जन्माला येईल. काळ अनंत आहे आणि पथ्वी विस्तीर्ण आहे.) कदर करणारा समानधर्मी न भेटल्यामुळे भवभूतीलाही असे उद्‍गार काढावे लागले..!
 
जगण्याकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन देणार्‍या, नव्या, अपारंपरिक शैलीतील कलाकृतीचं स्वागत व्हायला हवं, तिला रसिकवर्ग मिळायला हवा. त्याच बरोबर सामान्य निर्मितीचे अंकुरही उगवू द्यायला हवेत. एखाद्या अंकुरात महावृक्ष होण्याची शक्यता असते. हे तर आहेच पण सामान्य क्षमतेच्या निर्मितीतही समाजाचं स्वास्थ्य टिकवण्याची क्षमता असते हे समजून घेत तिला तिच्या क्षमतेत जगू द्यावे. श्रेष्ठ कलाकृतीची उपेक्षा नको आणि सामान्य निर्मितीच्या वाट्याला तुच्छता नको..!

बहुस्तरीय समाजात श्रेष्ठ आणि सामान्य यांची सांगड घालणं महत्त्वाचं असतं. सर्वसामान्य प्रेक्षकाची समज आणि अभिरुची लक्षात घेणं ही काही आजची गरज नाही. वेगवेगळ्या प्रकारे हे पूर्वापार चालत आलं आहे. सर्व थरातल्या लोकांना नाटक, सिनेमा आवडावा म्हणून पूर्वीही एखादं विनोदी पात्र आणि त्या भोवतीचं कथानक घातलं जायचं.. आता फरक एवढाच झालाय की विनोदाच्या वेष्टनातून एखादा गंभीर विचार देण्याची प्रथा पडू लागलीय..!

आसावरी काकडे
9762209028

‘पुणेपोस्ट’ १४ एप्रिल २०१६ अंकात प्रकाशित