Wednesday 17 November 2021

‘हराकी’ एक लक्षवेधी कादंबरी-


श्री मनोहर भोसले यांची ‘हराकी’ ही कादंबरी नुकतीच वाचनात आली. ओघवती शैलीतील कादंबरीचे कथानक एकातून एक वळसे घेत पुढे सरकत राहाते. त्यात गुंतायला होतं... वाचून पुस्तक मिटले तरी त्यातील पात्रे, घटना मनात रेंगाळत राहतात. शीर्षकापासूनच ही कादंबरी लक्ष वेधून घेते... हराकी म्हणजे अंत्यसंस्कारातील एक विधी. कादंबरीत हा विषय वेगवेगळ्या तर्‍हेनं समोर येतो. कथानक उलगडत जाते तेव्हा प्रत्यक्ष विधी काय असतो, ही परंपरा सुरू कशी झाली, त्याचा मूळ उद्देश काय.. हे सर्व समजत जाते.  

या कादंबरीचा नायक यमणप्पा हा दलीत समाजातला आहे. यमणप्पाचं व्यक्तिचित्र  इतकं सुरेख रेखाटलं आहे की त्यावरून एखादा चित्रकार त्याचं पोर्ट्रेट तयार करू शकेल. यमणप्पा गावातील सफाई करणारा एक सामान्य माणूस. पण पूर्ण कादंबरीभर तो एखाद्या कुटुंबातील वडीलधार्‍या व्यक्तीसारखा वावरताना दिसतो. कादंबरीचं कथानक एका छोट्या गावात घडणार्‍या घटनांमधून पुढं सरकत राहातं.  

छकुलीचा विहिरीत पडून मृत्यू, अण्णा पैलवानाचा घरातील वादातून आजारी पडून मृत्यु, खुळ्या आत्माचा गाडीखाली सापडून मृत्यु... अशा घटनांच्या तपशीलवार वर्णनातून छकुली, अण्णा पैलवान, खुळा आत्मा या व्यक्तिरेखा साकारतात आणि त्यांच्याशी आलेल्या संबंधातून यमणप्पाचं व्यक्तिचित्रही स्पष्ट होत जातं. यमणप्पा प्रामाणिक आहे. संवेदनशील आहे. त्याला आपल्या मर्यादा महिती आहेत. गावात कुणाकडे लग्न असो, कोणते कार्य असो की मृत्यु... प्रत्येकाला प्रत्येक प्रसंगात यमणप्पाची गरज लागायची. तो या ना त्या कारणानं पूर्ण गावाशी जोडला गेला होता. त्याचं गावावर मनापासून प्रेम होतं. त्यानं जुन्या परंपरा पाहिल्या, आनुभवल्या आहेत. त्यामागची कथा, परंपरा सुरू होण्यामागचा मूळ हेतू हे सर्व त्याला माहिती आहे. कॅप्टन साहेबांच्या कुटुंबानं त्याच्या कुटुंबाला आधार दिला. पण त्यानी त्याचा गैरफायदा घेतला नाही.

गावसभा भरली तो प्रसंग किंवा आंदासाठी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम... अशा प्रसंगांच्या चित्रणातून गावातील माणसांचे एकेक इरसाल नमुने डोळ्यापुढे साकारतात. अशा अनेक प्रसंगांमधून गावाचं बदलत चाललेलं स्वरूप आणि त्यामुळं यमणप्पाचं व्यथित होणं याचं प्रत्ययकारी वर्णन लेखकानं केलं आहे.   

उपसरपंचाच्या घरच्या जत्रेनंतरच्या कार्यक्रमात जेवण झाल्यावर यमणप्पा जुन्या आठवणीत रमून जातो. उपसरपंचाची बायको आणि मुलगी ते उत्सुकतेनं ऐकत राहतात. श्रियाळ षष्टीचा उत्सव, मरगुबाईची जत्रा, या परंपरांच्या मागचा इतिहास तो विस्तारानं, रंगवून सांगत राहतो. पण वर्तमान वास्तवात त्या परंपरांमागचा मूळ हेतू बाजूला पडून त्यात अपप्रवृत्ती शिरल्या आहेत, गावात आता कोणाला एकमेकांविषयी आपुलकी राहिलेली नाही, कोणी कुणाला विचारत नाही... या विषयी यमणप्पा व्यथित होऊन बोलत राहतो. ते सारं दोघी समरसून ऐकत राहतात... बोलणं झाल्यावर आपली पत्रावळ उचलून यमणप्पा उठून जातो तेव्हा त्यांच्या मनाची जी भावुक अवस्था होते त्याचं वर्णन करताना लेखकानं म्हटलं आहे- 

‘घरात म्हार येऊन गेल्यानंतर अनेक महिला गोमुत्र शिंपडून झाडून काढतात. आपल्या घरातल्या ज्या जागेवर बसून यमणप्पानं आपुलकी शिकवली त्या जागेवर रांगोळी घालून दोन फुलं ठेवावीत, पाया पडावं असं उपसरपंचाच्या पोरीला वाटत होतं..’

अशा वर्णनांमधून यमणप्पाबरोबर गावाचंही चित्र लेखकानं अतिशय आत्मीयतेनं रेखाटलं आहे. लेखकातील निरीक्षक काहीशा तटस्थ भूमिकेतून सर्व कथन करत राहतो. जे जसं घडलं तसं. त्यावर वेगळं काही भाष्य करत नाही, भावुक होत नाही. यात गावाचं पूर्ण वास्तव चित्रण केलेलं आहे. कुठेही झाकापाक नाही. ग्रामिण भाषेचा सहज वापर. त्यात गावातल्या लोकांच्या तोंडी येणार्‍या शिव्याही येतात. विषय ‘हराकी’ असल्यामुळे मृत्यु, स्मशान, सरण रचणे, अंत्यसंस्कार याची वर्णनं तपशीलवार येतात. पण ती अंगावर येत नाहीत.

कादंबरीत शेवटी यमणप्पाचाच मृत्यु होतो. तेव्हा प्रथमच यमणप्पाशिवाय अंत्यसंस्कार पार पडतात आणि जमलेले सगळे लोक मनातल्या मनात त्याची क्षमा मागून त्याच्यासाठी ‘हराकी’ म्हणतात..! हा प्रसंग अतिशय भावपूर्ण झाला आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्तीने सर्व कर्तव्ये पार पाडून जगाचा कृतकृत्य निरोप घ्यावा तसा वाटतो यमणप्पाचा मृत्यु... कादंबरी वाचून बाजूला ठेवल्यावरही गावातील एकेक घटना यमणप्पाची स्मृती जागवत मनात तरळत राहतात. त्या गावातून बाहेर पडायला वेळ लागतो..!

अतिशय प्रत्ययकारी झालेली मनोहर भोसले यांची ‘हराकी’ ही कादंबरी लोकप्रिय होत आहे. वाचक तिचे छान स्वागत करत आहेत. त्यांच्या पुढील लेखनाला हार्दिक शुभेच्छा.

आसावरी काकडे

१५.११.२०२१

 

ज्याचा त्याचा चाफा...

 

एका शांत संध्याकाळी निवांत बसले होते. कुठेतरी लागलेलं ‘चाफा बोलेना चाफा चालेना...’ हे गाणं कानावर पडलं. तसं अनेकदा ऐकलेलं आहे ते. पण काल ऐकताना त्यातल्या ‘चाफा खंत करी काही केल्या फुलेना...’ या ओळीनं मला धरून ठेवलं. विचारात पाडलं. मग पुढच्या प्रत्येकच ओळीनं लक्ष वेधलं. त्यावर विचार करता करता माझं मन चाफामय झालं..! मग खंत करणार्‍या, काही केल्या न फुलणार्‍या त्या चाफ्याचं बोट धरून ओळीओळीतून फिरू लागले. या कवितेविषयी बरंच काही वाचनात आलेलं होतं. कुणाला यात कवी आणि प्रतिभा यातील नातं जाणवलं तर कुणी यातून आध्यात्मिक आशय शोधला. सदानंद रेगे यांनी तर या चाफ्याची मुलाखत घेणारी एक कविताच लिहिलीय..!

चाफ्याचं बोट धरून ओळीओळीतून फिरताना मी हा सर्व कल्पनाविलास बाजूला ठेवला. अर्थ लावण्याचा नाद सोडून दिला. शब्दांना ‘अभिधा’चा उंबरठा ओलांडू न देता, ते आतून सांगत होते तेवढंच समजून घेत मुक्त मनानं गाणं अनुभवू लागले... स्वरांबरोबर ‘आंब्याच्या बनी’ गेले. प्रत्येक झाडावरच्या मोहरानं धुंद झालेल्या वातावरणात रमून गेले. ‘चाफ्याच्या गळ्यात गळा मिळवून’ निरामय आनंद घेत बागडणार्‍या ‘मैनांसवे गाणी म्हटली’.. तिथं मन भरल्यावर मग ‘केतकीच्या बनात गेले’, दरवळलेल्या गंधानं भान हरपू दिलं. बेभान झिम्मा फुगड्या रंगल्या.. संकूचित भोवतालाचं भान सुटल्यावर मुक्ततेला अवघ्या विश्वाचंच अंगण आंदण मिळालं. खंत विसरून चाफा आंगोपांगी फुलून आला. ‘दिशा आटून गेलेल्या’ त्या अथांगात शुद्ध आनंदाच्या अनुभूतीखेरीज काहीच उरलं नाही...!

पण ही अनुभूती अगदी क्षणिक. अवरोहाच्या गतीबरोबर खाली धृवपदापाशी आलं मन आणि परत ‘चाफा खंत करी काही केल्या फुलेना...’ या ओळीनं मनाचा ताबा घेतला. गाणं संपलं होतं. फोन वाजला म्हणून उठले. मग दिनचर्येत गुरफटले. बाकी सगळे संदर्भ सुटून गेलेल्या त्या ओळीचा विचार सोबत होता. वाटलं कधी कधी किती उत्फुल्ल वाटतं. आनंदी आनंद गडे असं म्हणत नाचावंसं वाटतं. पण बरेचदा मख्ख थकवा येतो उमेदीला. काही केल्या फुलतच नाही मन. सदानंद रेगे यांनी त्यांच्या ‘बी’चा चाफा : एक मुलाखत’ या कवितेत म्हटलंय, ‘मूडमधे आहेस ना? / -कधीमधी फुलं फुली येतात / बाकी फुल्याफुल्यांचाच फुलोर..’

 ‘फुल्याफुल्यांचाच फुलोर.’ हा अनुभव जवळपास प्रत्येकाचाच असेल. त्यामुळे ‘चाफा बोलेना’ या कवितेतील पुढच्या ओळींशी नातं असो नसो पहिल्या ओळी आपल्याला जवळच्या वाटतात.

चाफ्याच्या फुलात असं काय वैशिष्ट्य आहे की कवींना त्या प्रतिमेचा मोह पडावा? विचार करता करता चाफ्याची प्रतिमा असलेलं ‘लपवलास तू हिरवा चाफा सुगंध त्याचा छपेल का प्रीत लपवुनी लपेल का?’ हे ग.दि.मां.चं जुनं गाणं आठवलं. चाफा लपवून ठेवला, सुकला तरी त्याचा सुंगंध लपत नाही. भोवतीच्या वातावरणात दरवळत राहून लक्ष वेधत राहतो. चाफ्याच्या सुगंधाचं हेच वैशिष्ट्य टिपून गदिमांनी आपल्या गीतात ही प्रतिमा वापरली आहे. चाफ्याला आपला सुगंध लपवता येत नाही तशीच मनातली प्रीतभावना प्रेमिकेला लपवता येत नाही. ती नजर चुकवेल, दूर राहायचा प्रयत्न करेल पण गालावरची लाली लपेल का? उन्हात पाऊस पडावा तसे क्षणात हसणे, क्षणात रुसणे चालू असते. हे सगळे आतील प्रणयभावनेचेच खेळ आहेत. ते कळल्यावाचून राहील का? आणि शेवटी म्हटलंय, प्रीतभावना लपवण्याचे वेगवेगळे बहाणे आता पुरे झाले.. चोराच्या मनातच चांदणं असतं. त्याला आपली चोरी लपवता कशी येईल? या गीतात ध्रुवपदातच चाफ्याच्या सुंगधाची प्रतिमा असल्यामुळे ती प्रत्येक अंतर्‍यानंतर समोर येते. आणि चाफ्याचा सुगंध नकळत मनात रिमझिमत राहतो.

काही केल्या न फुलणारा, न बोलणारा कवी बी यांचा चाफा बोट सोडून गेल्यावर चाफ्याची वेगवेगळी रूपं समोर यायला लागली. रमण रणदिवे यांनी त्याच्या ‘चाफा’ या गझलेत वापरलेली चाफा ही प्रतिमा वैशिष्ट्यपूर्ण आहे. या गझलेचा मतला असा आहे- ‘कळेना लाजताना हा कसा रागावला चाफा / पुन्हा रागावतानाही जरा भांबावला चाफा’. पुढे म्हटलंय, मी रात्री सुगंधाशी तुझ्याविषयी चर्चा केली तर सकाळी माझ्या मनात चाफा डोकावला.... पारिजात, गुलाब ही पण सुगंध देणारीच फुलं आहेत.. पण गझलेत शेवटी ‘अता देहात या माझ्या तुझा सामावला चाफा’ असं म्हणून कवीनं प्रियेला इतर कुठल्याही फुलाऐवजी ‘चाफा’ म्हणणंच पसंत केलंय.!

पद्माताईंनी तर चाफ्याच्या झाडाशीच मैत्र जोडलंय. त्याच्याशी मनातलं बोलून मन मोकळं करतायत त्या. तो काव्यात्म आणि भावपूर्ण संवाद पूर्ण सलग ऐकण्यासारखा आहे. सुनीता देशपांडे यांनी ही कविता आतिशय समरस होऊन सादर केली आहे. त्याचे व्हिडीओ पाहायला मिळतात. पण इथं, आपण शब्दांनाच कान लावू. ते आपल्याला काय सांगतात पाहू... ऐकताना शब्दांना लपेटलेला भाव आपल्या मनात निथळत राहील. उमगेल की एखादं स्वगत असावं तसा एकरूप झालेल्या दोघांचा संवाद आहे हा..! या दोघातलं एक आहे कवीमन आणि दुसरं चाफ्याचं झाड..! या दोघांचं पूर्वीच ठरलंय, आहे ते सानंद स्विकारून टाकायचं. दुःख उगाळत बसायचं नाही. स्मृतींनी घायाळ व्हायचं नाही... तरी कुणाचं स्वप्नात येणं कसं रोखणार? स्वप्न पडतंच त्याला हवं तेव्हा. स्वप्नाला न दारं ना खिडक्या.. त्याला मुक्त असतात दाही दिशा. मग काहीतरी गमावलेलं, विसरायचं ठरवलेलं सगळं घरंगळत येतं परत. ‘पानात, मनात खुपतंय.. काहीतरी चुकतंय, कुठेतरी दुखतंय’ हे ताजेपणानं कळतं. ते नाकारता येत नाही. खोलवर आत झाकापाक केलेलं सारं असं अचानक समोर आलेलं पाहून मन हेलावतं क्षणभर. पण जरा स्थिरावल्यावर दोघं पुन्हा जगणं हसून साजरं करायाचा करार करतात. स्वप्नात जे घडलं ते सगळं मनातच ठेवायचं, आपलंतुपलं गुपित म्हणून. कुणाशी काही बोलायचं नाही. फुलांनी ओंजळ भरलीय तीच मजेत मिरवायची.. जगणं साजरं करायचं..! चाफ्याच्या झाडाशी झालेला हा पूर्ण संवाद पद्माताईंच्याच शब्दांत-  

‘‘चाफ्याच्या झाडा ….
का बरे आलास आज स्वप्नात?
तेव्हाच तर आपलं नव्हतं का ठरलं?
दु:ख नाही उरलं आता मनात
फुलांचा पांढरा, पानांचा हिरवा
रंग तुझा रंगतोय माझ्या मनात
केसात राखडी पण पायात फुगडी
मी वेडी भाबडी तुझ्या मनात
चाफ्याच्या झाडा ….
नको ना रे पाणी डोळ्यात आणू
ओळख़ीच्या सुरात, ओळखीच्या तालात
हादग्याची गाणी नको म्हणू
तुझ्या चाळ्यात एक पाय तळ्यात
एक पाय मळ्यात खेळलोय ना
जसं काही घोड्यावर
तुझ्याच फांद्यांवर बसून
आभाळात हिंडलोय ना
चाफ्याच्या झाडा …. चाफ्याच्या झाडा ….
पानात, मनात खुपतंय ना
काहीतरी चुकतंय, कुठेतरी दुखतंय
तुलाही कळतंय…. कळतंय ना….
चाफ्याच्या झाडा…. चाफ्याच्या झाडा
हसून सजवायचं ठरलंय ना
कुठं नाही बोलायचं, मनातच ठेवायचं
फुलांनी ओंजळ भरलीये ना”

***

पद्मा गोळे

 

किती गोड आहे ना हा काव्यात्म संवाद? सुनीताबाईंनी सादर करून तो मनामनात जिवंत ठेवलाय...!

कवीमनाला अशा वेगवेगळ्या विभ्रमांनी आकर्षित करत चाफा त्याच्या कवितेत प्रतिमा बनून येतो. कोणती प्रतिमा कशाचं प्रतिक हे कोणत्याही निकषानं ठरलेलं नसतं. ती कशाचं प्रतिक हे प्रत्येक कवीच्या कल्पकतेनुसार ठरतं. इतकंच नाही तर प्रत्येक वाचकाच्या त्या त्यावेळच्या आकलनानुसार ठरतं. कॅलिडोस्कोपमधली नक्षी जशी प्रत्येक हेलकाव्याबरोबर बदलत राहते तसे काव्य प्रतिमांचे अर्थ बदलत राहतात.

वर उल्लेख केलेल्या चारी कवितांमधे चाफा वेगवेगळी रूपं घेऊन आलेला आहे. ज्याचा त्याचा चाफा वेगळा आहे. कवी बी यांचा चाफा बहुआयामी आहे. वाचकाच्या आकलन-क्षमतेनुसार या चाफ्याचं रूप बदलतं. आशयाचं एक टोक धरून ओळींमधल्या रिकाम्या जागांमधे गवसलेला अर्थ भरायला लागावं तर पुढची ओळ भलत्याच दिशेला घेऊन जाते. अंब्याचे वन, मैना, केतकीचे बन, नाग.. विश्वाचे आंगण, जन विषयाचे किडे.. शुद्ध रसपान.. आणि शेवेटी ‘कोठे दोघेजण रे?’ हा उद्‍गार... या सर्व शब्दसमूहांचे नेपथ्य बर्‍यापैकी चकवणारे आहे. गाण्यातून समोर येत राहिलेल्या या कवितेचा आकलन-प्रवास प्रत्येकाला नव्या मुक्कामी पोचवेल. पण हा प्रवासच असा आहे की इथं पोचण्यापेक्षा प्रवास अनुभवणंच महत्त्वाचं आहे. गदिमांच्या हिरव्या चाफ्याचा सुगंध सरळ सरळ, लपून राहू शकत नसलेल्या प्रेमभावनेशी नातं सांगणारा आहे. तर रमण रणदिवे यांचा चाफा प्रेमाचे विभ्रम व्यक्त करत शेवटी प्रेमाच्या उत्कटतेशी नेऊन पोचवणारा आहे. पद्माताईंच्या कवितेत चाफा नाही, चाफ्याचं झाडंच जिवलग बनून आलंय. त्यानं मनमोकळ्या संवादातून ओंजळ फुलांनी भरून टाकलीय...!

 कवीमनांमधली चाफ्याची ही विविध रूपं आपल्याला वेगवेगळ्या प्रतीचा आनंद देतात. त्याचा आस्वाद घेता घेता ती आपली होऊन जातात. आणि रसिक-मनात आपापल्या चाफ्याचा सुगंध दरवळू लागतो...!

आसावरी काकडे

४.९.२०२१