Wednesday 17 November 2021

‘हराकी’ एक लक्षवेधी कादंबरी-


श्री मनोहर भोसले यांची ‘हराकी’ ही कादंबरी नुकतीच वाचनात आली. ओघवती शैलीतील कादंबरीचे कथानक एकातून एक वळसे घेत पुढे सरकत राहाते. त्यात गुंतायला होतं... वाचून पुस्तक मिटले तरी त्यातील पात्रे, घटना मनात रेंगाळत राहतात. शीर्षकापासूनच ही कादंबरी लक्ष वेधून घेते... हराकी म्हणजे अंत्यसंस्कारातील एक विधी. कादंबरीत हा विषय वेगवेगळ्या तर्‍हेनं समोर येतो. कथानक उलगडत जाते तेव्हा प्रत्यक्ष विधी काय असतो, ही परंपरा सुरू कशी झाली, त्याचा मूळ उद्देश काय.. हे सर्व समजत जाते.  

या कादंबरीचा नायक यमणप्पा हा दलीत समाजातला आहे. यमणप्पाचं व्यक्तिचित्र  इतकं सुरेख रेखाटलं आहे की त्यावरून एखादा चित्रकार त्याचं पोर्ट्रेट तयार करू शकेल. यमणप्पा गावातील सफाई करणारा एक सामान्य माणूस. पण पूर्ण कादंबरीभर तो एखाद्या कुटुंबातील वडीलधार्‍या व्यक्तीसारखा वावरताना दिसतो. कादंबरीचं कथानक एका छोट्या गावात घडणार्‍या घटनांमधून पुढं सरकत राहातं.  

छकुलीचा विहिरीत पडून मृत्यू, अण्णा पैलवानाचा घरातील वादातून आजारी पडून मृत्यु, खुळ्या आत्माचा गाडीखाली सापडून मृत्यु... अशा घटनांच्या तपशीलवार वर्णनातून छकुली, अण्णा पैलवान, खुळा आत्मा या व्यक्तिरेखा साकारतात आणि त्यांच्याशी आलेल्या संबंधातून यमणप्पाचं व्यक्तिचित्रही स्पष्ट होत जातं. यमणप्पा प्रामाणिक आहे. संवेदनशील आहे. त्याला आपल्या मर्यादा महिती आहेत. गावात कुणाकडे लग्न असो, कोणते कार्य असो की मृत्यु... प्रत्येकाला प्रत्येक प्रसंगात यमणप्पाची गरज लागायची. तो या ना त्या कारणानं पूर्ण गावाशी जोडला गेला होता. त्याचं गावावर मनापासून प्रेम होतं. त्यानं जुन्या परंपरा पाहिल्या, आनुभवल्या आहेत. त्यामागची कथा, परंपरा सुरू होण्यामागचा मूळ हेतू हे सर्व त्याला माहिती आहे. कॅप्टन साहेबांच्या कुटुंबानं त्याच्या कुटुंबाला आधार दिला. पण त्यानी त्याचा गैरफायदा घेतला नाही.

गावसभा भरली तो प्रसंग किंवा आंदासाठी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम... अशा प्रसंगांच्या चित्रणातून गावातील माणसांचे एकेक इरसाल नमुने डोळ्यापुढे साकारतात. अशा अनेक प्रसंगांमधून गावाचं बदलत चाललेलं स्वरूप आणि त्यामुळं यमणप्पाचं व्यथित होणं याचं प्रत्ययकारी वर्णन लेखकानं केलं आहे.   

उपसरपंचाच्या घरच्या जत्रेनंतरच्या कार्यक्रमात जेवण झाल्यावर यमणप्पा जुन्या आठवणीत रमून जातो. उपसरपंचाची बायको आणि मुलगी ते उत्सुकतेनं ऐकत राहतात. श्रियाळ षष्टीचा उत्सव, मरगुबाईची जत्रा, या परंपरांच्या मागचा इतिहास तो विस्तारानं, रंगवून सांगत राहतो. पण वर्तमान वास्तवात त्या परंपरांमागचा मूळ हेतू बाजूला पडून त्यात अपप्रवृत्ती शिरल्या आहेत, गावात आता कोणाला एकमेकांविषयी आपुलकी राहिलेली नाही, कोणी कुणाला विचारत नाही... या विषयी यमणप्पा व्यथित होऊन बोलत राहतो. ते सारं दोघी समरसून ऐकत राहतात... बोलणं झाल्यावर आपली पत्रावळ उचलून यमणप्पा उठून जातो तेव्हा त्यांच्या मनाची जी भावुक अवस्था होते त्याचं वर्णन करताना लेखकानं म्हटलं आहे- 

‘घरात म्हार येऊन गेल्यानंतर अनेक महिला गोमुत्र शिंपडून झाडून काढतात. आपल्या घरातल्या ज्या जागेवर बसून यमणप्पानं आपुलकी शिकवली त्या जागेवर रांगोळी घालून दोन फुलं ठेवावीत, पाया पडावं असं उपसरपंचाच्या पोरीला वाटत होतं..’

अशा वर्णनांमधून यमणप्पाबरोबर गावाचंही चित्र लेखकानं अतिशय आत्मीयतेनं रेखाटलं आहे. लेखकातील निरीक्षक काहीशा तटस्थ भूमिकेतून सर्व कथन करत राहतो. जे जसं घडलं तसं. त्यावर वेगळं काही भाष्य करत नाही, भावुक होत नाही. यात गावाचं पूर्ण वास्तव चित्रण केलेलं आहे. कुठेही झाकापाक नाही. ग्रामिण भाषेचा सहज वापर. त्यात गावातल्या लोकांच्या तोंडी येणार्‍या शिव्याही येतात. विषय ‘हराकी’ असल्यामुळे मृत्यु, स्मशान, सरण रचणे, अंत्यसंस्कार याची वर्णनं तपशीलवार येतात. पण ती अंगावर येत नाहीत.

कादंबरीत शेवटी यमणप्पाचाच मृत्यु होतो. तेव्हा प्रथमच यमणप्पाशिवाय अंत्यसंस्कार पार पडतात आणि जमलेले सगळे लोक मनातल्या मनात त्याची क्षमा मागून त्याच्यासाठी ‘हराकी’ म्हणतात..! हा प्रसंग अतिशय भावपूर्ण झाला आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्तीने सर्व कर्तव्ये पार पाडून जगाचा कृतकृत्य निरोप घ्यावा तसा वाटतो यमणप्पाचा मृत्यु... कादंबरी वाचून बाजूला ठेवल्यावरही गावातील एकेक घटना यमणप्पाची स्मृती जागवत मनात तरळत राहतात. त्या गावातून बाहेर पडायला वेळ लागतो..!

अतिशय प्रत्ययकारी झालेली मनोहर भोसले यांची ‘हराकी’ ही कादंबरी लोकप्रिय होत आहे. वाचक तिचे छान स्वागत करत आहेत. त्यांच्या पुढील लेखनाला हार्दिक शुभेच्छा.

आसावरी काकडे

१५.११.२०२१

 

No comments:

Post a Comment