Tuesday 16 January 2024

भीती सर्वव्यापी नसतेच तर...

अनेक भावभावनांचा गुंता असलेलं मानवी मन हे एक न सुटलेलं कोडं आहे. कोणतीही एक भावना स्व-स्वरूपात एकटी नसते. कारण आणि परिणाम रूपात  प्रत्येक भावना इतर भावनांच्या आगेमागे रेंगाळत असते. भीती या भावनेचा विचार करायचा तर रोजच्या जगण्यात वैयक्तिक आणि सामाजिक स्तरावर प्रत्येक प्रसंगी ती काळजी.. तणाव.. अस्वस्थतेच्या रूपात सोबत असते. मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे भीती. ‘भय इथले संपत नाही..’ हे पटतं बरेचदा..

भीतीची आणि माझी फार जुनी मैत्री आहे. मी तिला दूर करायचा कितीही प्रयत्न केला तरी ती मला सोडत नाही. ‘नेमेची येतो मग पावसाळा’ सारखं वादळ-वारा, वीजा, गडगडाट, धुवांधार पाऊस... हे सर्व नेहमी अनुभवाला येणारं... तरी या वातावरणात भीतीही नेमानं मनाचं दार ठोठावत येते. भीतीला माझ्या मनाचा रस्ता इतका सवयीचा झालाय की अशी कुठली चिन्हं जरी दिसली तरी ही सरळ येते मनात. एकदा अशीच आली पावसाच्या पाठोपाठ आणि मला मिठी मारून बसली. तेव्हा घाबरलेल्या मला माझ्यातल्या निरीक्षक ‘मी’ नं समजावलं, ‘तू ती नाहीस धडधडत आत बसलेली... बाहेर कोसळतेय, गडगडतेय, चमकतेय ती तू आहेस..!’ पण कवितेनं घातलेली अशी उंची समजूत उंच उडीसारखी क्षणार्धात जमिनीवर आणणारी असते. ती कायम सोबतीला राहात नाही.

 

भीतीची एक संस्मरणीय आठवण असंच एक शहाणपण हातात ठेवणारी आहे... एकदा आम्ही तिघी मैत्रिणी वेताळ टेकडीच्या पुढे दगडाच्या खाणी आहेत तो परिसर बघायला गेलो होतो. संध्याकाळचे सहा वाजून गेलेले... आकाशात काळ्या ढगांनी गर्दी करायला सुरुवात केली होती. वादळ.. वावटळ दबा धरून बसल्याच्या खुणा वातावरणात स्पष्ट दिसत होत्या.. आणि आम्ही तिघी निघालो होतो. दुतर्फा पसरलेली झाडी पूर्णतः झडून नग्न झालेली. आमच्या मागे पुढे कोणी दिसत नव्हतं. क्वचित कोणी दिसत होतं ते परत येतानाच. आणि आम्ही आता चाललो होतो. गप्पा तत्त्वज्ञानाच्या, शहाणपणाच्या, उभारी धरण्याच्या युक्त्यांच्या... आणि मनात भीतीनं पंख पसरलेले. त्या पंखांनी अंतराकाश झाकोळून टाकलेल. डोळ्यांनी सौंदर्य टिपण्याचं आणि मेंदूपर्यंत पोचवण्याचं आपलं काम केलेलं. पण भीतीनं आगोदरच संवेदनांच्या दारावर नजर ठेवलेली.

गप्पा मारत आम्ही पुढं पुढं चाललो होतो. परत जाऊया असं वाटणं मी आत दडवून ठेवलं होतं. माझं लक्ष गप्पा, आतली भीती आणि बाहेरचा भिववणारा भव्य निसर्ग या तिघात विभागलं गेलं होतं. चालता चालता अखेर दगडाच्या खाणींचा तो स्पॉट आला. इतक्या दूरवर माणसांची रहदारी बेताची, तरी आधार वाटेल इतपत होती. तिथं जरा निवांत बसलो. छान वाटत होतं. पण तिकडे पुरेसं लक्ष जात नव्हतं. ते भीतीनं वेधून घेतलं होतं... आता उठूया असं मी म्हणायच्या आत मैत्रिण म्हणाली आणि आम्ही परतायला लागलो. हायसं वाटलं. भीती घाबरवून मनासमोर चित्र उभं करत होती तसं काही झालं नाही. वादळ वारा विजा पाऊस... काहीच आलं नाही. अंधारही अजून बाहेर पडला नव्हता. आम्ही सुखरूप घरी पोचलो..!

भीतीचा हा अनुभव डायरीत नोंदवून ठेवावा असा झाला. लिहिताना लक्षात आलं की भीती फक्त सोबत करत होती. तिनं मला रोखून धरलं नव्हतं. डायरीत लिहिताना मला फक्त भीती नाही, सर्व परिसर भव्य सौंदर्यासह आठवत होता. म्हणजे भीती सर्वव्यापी नव्हतीच तर..! तिच्या शिवाय इतर बरंच काही अनुभवता आलेलं होतं. ‘सगळं अंग दुखतंय’ असं आपण म्हणतो तेव्हा दुखून लक्ष वेधणारा अवयव एखाद-दुसराच असतो. बाकी सगळे अवयव मजेत असतात. तसंच काहीसं..

असंही लक्षात आलं की भीती फक्त ‘असं झालं तर..’ अशा कल्पनांचं बोट धरून मनात शिरत असते आणि आपल्याला सावध करत असते. भीती ही एक आवश्यक भावना आहे खरंतर. आपण लहान मुलांना ‘पडशील..’ ‘लागेल..’ ‘भाजेल..’, ‘कापेल..’ असं म्हणतो तेव्हा नकळत भ्यायला शिकवत असतो. मुलांच्या मनात धावण्याची पडण्याशी, सुरी.. कात्रीची कापण्याशी.. अशी सांगड घातली जाते. यातून मुलं त्या त्या संदर्भात काळजी घ्यायला शिकतात. पण कधी कधी एखाद्या गोष्टीची मानात कायमची भीती बसू शकते. मग ‘डर के आगे जीत है..’ असं समजवावं लागतं. साहस करायला प्रोत्साहन द्यावं लागतं. मुलांना घडवण्याच्या या दोन पातळ्यांवरच्या दोन प्रक्रिया आहेत.

घरातील संस्कार, जीन्समधून आलेले पूर्वसंचित आणि जगताना येणार्‍या अनुभवातून आपण घडतो. व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणतात. कुणाला पाण्याची भीती वाटते, कुणाला अंधाराची, कुणाला लोक काय म्हणतील याची.... धीट माणसालाही कसली ना कसली भीती वाटत असते. तो गर्दीत शिरून भांडण सोडवेल, अपघातग्रस्ताला अशक्य वाटणारी मदत करेल.. पण त्याला स्टेजवर उभं राहून बोलायची भीती वाटेल.. मी तशी घाबरट आहे. बर्‍याच गोष्टींची मला भीती वाटते. पण लोक काय म्हणतील याची मला भीती वाटत नाही...

आपल्याला बरेचदा अकारणच भीती वाटते. अस्वस्थ करते. ती रिकामेपणाची भीती असते. माणसाला जाणीव असते आणि जाणीव आहे याचंही भान असतं.. या विश्वातील इतर सर्व घटक विश्वाचा अविभाज्य भाग असतात. पण जाणीव असल्यामुळे माणूस एकूण अस्तित्वाचा अविभाज्य भाग होऊ शकत नाही. तो वेगळेपणानं विश्वाकडे आणि स्वतःकडेही पाहू शकतो. या जाणिवेला सतत काहीतरी विषय लागतो. तो मिळाला नाही की माणूस अस्वस्थ होतो. त्याला त्या रिक्ततेची भीती वाटते. माणसाच्या स्वरूपाचा शोध घेणार्‍या अस्तित्ववादी लेखनात या अवस्थेला anguish म्हटलं आहे. अस्तित्ववादी कादंबर्‍यांमधील नायक अशी अस्वस्थता अनुभवत जगण्याचा अर्थ शोधत असतो. मी इथं का आहे? असा निरुत्तर करणारा मूलभूत प्रश्न त्याला पुन्हा पुन्हा निरर्थकतेच्या गर्तेत ढकलत राहातो..! विचार करणार्‍या सर्जक मनाला अशी भीती व्याकुळ करते. त्यातून कधी कधी श्रेष्ठ कलाकृती जन्माला येते. सर्वसामान्य माणूसही व्याकुळ करणारी अशी भीती अनुभवत असतो. पण बहुतांश माणसं तिला सामोरं न जाता तिच्यापासून पळ काढतात.

जगताना भेडसावणार्‍या अशा सगळ्या निरुत्तर करणार्‍या प्रश्नांना ईश्वर हे तयार उत्तर पळ काढण्यासाठी सहज उपलब्ध असतं. वेगवेगळ्या प्रकारच्या भीतींमधूनच आधार देणार्‍या ईश्वराची निर्मिती झाली. कुणीतरी विश्वनियंता आहे ही भावना दिलासा देणारी असते. भवितव्याबद्दलच्या काळजीतून भीती निर्माण होते. ती अस्वस्थ करते. मानवी प्रयत्न थिटे पडतात. कित्येकदा परिस्थिती हाताबाहेर जाते. अशा कोणत्याही वेळेस शरण जावं, आधार घ्यायला धाव घ्यावी असं समर्थ ठिकाण ईश्वर-रूपात आपल्या हाताशी असतं.

असे आधार गृहीत धरून बहुतांश माणसं स्वतःला सावरत, कुणाच्या वट्याला न जाता जगत असतात. काही दादागिरी करत असतात. त्यांचे वागणे घाबरवणारे असते. पण खरंतर ती स्वतःच आतून घाबरलेली असतात. त्यांचा अहंकार त्यांना ते मान्य करू देत नाही. वरवर दिसणार्‍या त्यांच्या मग्रुरीच्या मुळाशी भीती असते. मोठमोठ्या लढाया.. महायुद्धे, स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी होत असतात. अशी आक्रमणं, अत्याचार करणार्‍या क्रूर वृत्तींच्या मुळाशीही भीतीच असते. आपल्याला कोणी शह देऊ नये, आपल्या स्थानाला धक्का लागू नये म्हणून अशी दहशत पसरवली जाते की कुणी मान वर करून बघू नये, विरोधी बोलू नये, लिहू नये...

आक्रमकता..हिंसा-भीती, प्रेम-व्देष..राग... अशा मानवी भावना एकमेकीत गुंतलेल्या असतात. माणसं, घटना-प्रसंग समजून घेताना ही गुंतागुंत समजून घ्यावी लागते. त्यासाठी इमोशनल इंटेलीजन्सची गरज असते. बरेचदा माणसाची ‘तो भयाने फांदिला बिलगून बसला / पंख होते लाभले नाही कळाले..!’ अशी अवस्था असते. त्याला त्याच्या क्षमतांच्या पंखाची जाणीव करून द्यावी लागते.

कधीकधी काही प्रेरणा भीतीपेक्षा वरचढ ठरतात आणि बेभान होऊन माणसं कृती करून जातात.. महापूर आलेल्या यमूनेतून नवजात बालकाला घेऊन निघालेल्या वसुदेवाची गोष्ट किंवा ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ ही ऐतिहासिक घटना सर्वश्रुत आहे. सामान्य माणसंही अशा कृती करत असतात. गिर्यारोहणासाख्या वेगवेगळ्या साहसी मोहिमा यशस्वी करणारी कितीतरी माणसं असतात.

नैसर्गिक आपत्तींची टांगती तलवार, जुलुमी राजवट, दहशती हल्ले, वेगवेगळ्या साथी... अशा गोष्टींची भीती समाजमनात सतत असते. संपूर्ण जगाने करोनाच्या दहशतीचा अनुभव नुकताच घेतलेला आहे. जगभरातील न परतीच्या वाटेवरच्या विकासाच्या सर्व गोष्टींचे साइड इफेक्ट्स आपल्याला भोगावे लागत आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वेगवेगळ्या कारणांनी होणारी पर्यावरणाची हानी. माणूस संपूर्ण पृथ्वीला कुठल्या गर्तेत घेऊन चालला आहे याची जाणीव जाणकार अभ्यासक सतत करून देत असतात. पण अशा सामूहिक भीतीनं कोणी फारसं अस्वस्थ होत नाही. Everybody’s work is nobody’s work अशी अवस्था झाली आहे.

हल्लीच्या इंटरनेटच्या जगात भीतीने वेगळेच रूप धारण केले आहे. अनेक फायदे असलेली पण ‘अटी लागू’ असलेली Apps आपण डाउनलोड करतो तेव्हा वेळोवेळी केलेल्या ‘allow’ मधून सांगून सवरून, कबूल करून घेत आपला सर्व डाटा गोळा केला जातो. आपण काय करतो, कुठे जातो, काय पाहतो, काय खातो.. या सर्वावर नजर ठेवली जाते. आपण आपली प्रायव्हसी गमावलेली आहे. वेगवेगळ्या धोक्यांवर उपाय म्हणून कडेकोट सुरक्षाव्यवस्था केली जाते. पण सोशल मीडीयामुळे आपण उघडे पडत चाललो आहोत... या विषयीची मीहिती करून घेऊ तेवढी भीती गडद होत जाते. पण आता याला पर्याय राहिलेला नाही. जगताना काळाच्या ओघात वाट्याला येणारी प्रत्येक परिस्थिती म्हणजे सुविधांची किंमत वसूल करणारे एक पॅकेज डील असते. आणि ते आपण जन्मतःच स्वीकारलेले असते.

पण माणसाची जिजीविषा इतकी प्रबळ असते की कुठूनही, केव्हाही हल्ला करणार्‍या भीतीने कितीही घाबरवले तरी तिला मनातळात दाबून ठेवत माणूस आयुष्य उपभोगत असतो. सर्व प्रकारचे सणवार, लग्न-समारंभ, पार्ट्या, मेळावे, शिबीरं, वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम सर्वकाही सुखेनैव चाललेले असते..! जगताना ठायीठायी भेटणारी भीती सर्वसाक्षी असली तरी सर्वव्यापी नसतेच तर..!

आसावरी काकडे

(लोकसत्ता चतुरंग पुरवणीसाठी)

१८.१२.२०२३