Thursday 12 August 2021

‘पळसबंध’चे अंतरंग..


विविध वृत्तपत्रातील सदर लेखन हे लेखकांसाठी एक सुखद आव्हान असते. रोज किंवा दर आठवड्याला ठराविक शब्दमर्यादेत एक लेख लिहायचा असतो. त्यासाठी एखादा विषय किंवा एखादे विषय-सूत्र दिलेले असते. वेळेच्या मर्यादेत हमखास काही सुचणं आणि सुचलेलं शब्दांच्या मर्यादेत बसवणं हे दोन्ही कौशल्याचं असतं. असे लेख सहसा ललित स्वरूपाचे असतात.

ललित लेखनात वैचारिक, प्रासंगिक, ऐतिहासिक, तत्त्वचिंतनात्मक असं काहीही सामावू शकतं. ललित लेख म्हणजे एक काव्यात्म कथन असतं. उत्स्फूर्तपणे सुचून कथा कविता लिहिली जाते. असे लेखन मौलिक मानले जाते. एक प्रकारे मेड टू ऑर्डर केलेले सदर-लेखनासारखे लेखन दुय्यम ठरू शकते. पण मला तेही महत्त्वाचे वाटते. कारण असे लेख लिहिताना मनातल्या सूप्त विचारांना जाग येते. विस्मृतीत गेलेल्या गोष्टी एकदम समोर येतात आणि लेखनाला विषय पुरवतात. अव्यक्त रूपात मनात पडून राहिलेलं काय काय या निमित्तानं व्यक्त होऊ लागतं. एकप्रकारे हे स्वतःचं अनावरण असतं. लेखकांसाठी एक घडवणारा रियाज असतो. अनेक नामवंत लेखकांचे सदरलेखनही पुस्तकरूपात येऊन संस्मरणीय ठरले आहे.

डॉ. मोना चिमोटे यांच्या ‘पळसबंध’ या लेखसंग्रहात महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रातील ‘सगुण निर्गुण’ या सदरासाठी त्यांनी लिहिलेले तीस लेख संकलित केलेले आहेत. दर आठवड्याला एक याप्रमाणे सहा महिने विविध विषयांच्या माध्यमातून मानवी जीवनाचा धांडोळा घेत त्यांनी हे लेख लिहिलेले आहेत. त्यातील ‘पळसबंध’ या लेखात निसर्गातील बदल आणि शारिरीक बदल यांची मानसिक पातळीवरील सांगड काव्यात्म शैलीत व्यक्त झाली आहे. या जमून गेलेल्या लेखाचे ‘पळसबंध’ हे शीर्षक पुस्तकाचेही शीर्षक झाले आहे. हा लेख वाचल्यावर हे शीर्षक किती समर्पक आहे ते लक्षात येते.

रोजच्या जगण्यात आपण एखादे सुंदर दृश्य पाहून हळवे होतो, रस्त्यावरचा प्राजक्ताचा सडा ओलांडताना फुलं पायाखाली न येतील याची काळजी घेतो. पण रस्त्याकडेला पडलेला माणूस दारू पिऊनच पडला असेल असं गृहीत धरून तिकडे दुर्लक्ष करून पुढे जातो... आपण एका मर्यादेत संवेदनशील असतो पण झळ बसेल अशा बाबतीत निर्विकार असतो. ‘संवेदना आणि निर्विकारता’ या लेखात अधिक व्यापक घटनांसंदर्भात विचार करून मोनाताईंनी हाच मुद्दा लक्षात आणून दिलाय. त्या म्हणतात, आपल्या भोवती घडणारे अत्याचार, गावात, देशात, जगात घडणार्‍या अनेक भयंकर विध्वंसक घटना याबाबतीत आपण निर्विकार असतो. पण हे चुकीचं आहे. गुन्हा करण्याइतकंच ते अश्लाघ्य आहे. आपण आपल्या संवेदनांचा पैस विस्तारून घ्यायला हवा. आपल्याला घेरू पाहणारं दगडी निर्विकारपण भेदायला हवं आणि योग्य भूमिका घेऊन कृतीशील व्हायला हवं.

तरूण पिढीबद्दल सरसकट नाराजीचा सूर ऐकू येतो. पण मोनाताई स्वतः प्राध्यापक आहेत. त्यांनी ‘सल्ला नको विश्वास हवा’ या लेखात झाशी येथील बुंदेलखंड विद्यापीठात आंतरविद्यापीठ युवा महोत्सव संपन्न झाला त्यावेळची आपली निरीक्षणं नोंदवली आहेत. कार्यक्रम अनुभवताना त्यांना जाणवलं की हे विद्यार्थी बेजबाबदार नाहीत. उलट समकालीन सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय घडामोडींकडे त्यांचे बारीक लक्ष आहे. या सर्व बाबतीतली संवेदनशीलता त्यांच्या वागण्या-बोलण्यातून, विविध उपक्रमातील सहभागातून व्यक्त होत होती. मोनाताईंचे हे सकारात्मक निरीक्षण सुखावणारे आहे.

देशातील विकासाचे दाखले देऊन आपला देश महासत्ता होईल असे चित्र उभे केले जाते. पण देशाचा उद्याचा आधारस्तंभ असलेल्या तरुणांना बेरोजगारीचा प्रश्न कसा निराशेच्या गर्तेत नेतो आहे हा मुद्दा उदाहरणं देत अधोरेखित करून मोनाताईंनी देशाच्या विकासाचे चित्र अपूर्ण आहे हे ‘अर्धसत्यापलिकडे’ या लेखात लक्षात आणून दिले आहे.

काळाच्या ओघात गरजेनुसार रूढी परंपरा बदलत असतात. या परिवर्तन प्रक्रियेत नवं काही गवसतं पण जुनं काही गमावलेलं असतं.. थाटामाटात चाललेला एक लग्न सोहळा अनुभवताना अंतर्मुख झालेल्या मनात आलेले विचार ‘काय हरवले काय शोधीशी?’ या लेखात वाचायला मिळतात. ‘देहबोली’चे विविध आयाम ‘अबोलपणे बोलणारी देहबोली’ या लेखात चित्रित केले आहेत तर ‘विरेचनाचा प्रश्न’ या लेखात सामाजिक वास्तवातील विरेचनाची गरज शब्दबद्ध केली आहे.

‘एकमेकांना समजून घेताना’ या लेखात कौटुंबिक, सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा मुद्दा चर्चिला आहे. मला कोणी समजूनच घेत नाही असं म्हणताना मी इतरांना समजून घेतो का याचाही विचार व्हायला हवा हा कळीचा मुद्दा समर्पक काव्यपंक्तींच्या आधारे मांडलेला आहे.

‘होरी’ या लेखात एक काव्यानुभव आहे तर ‘नंदभवन’ या लेखात पूर्वीच्या वास्तव्यातल्या आठवणी नंदभवनला पुन्हा भेट दिल्यावर कशा ताज्या झाल्या त्याचं भावपूर्ण शब्दचित्र आहे. ‘ऋतू आवर्तन’, ‘तिचं अस्तित्व’, ‘एक वजह’ ‘मातृत्वाचं ओझं’, ‘पाचवा कोन’ या लेखांमधून मानवी जीवनातील विविध पैलू त्यातील बारकाव्यांसह उलगडून दाखवले आहेत. हिंदी, मराठी कवितांची जोड दिल्यामुळे हे कथन अतिशय हृदयस्पर्शी झालं आहे.

‘समानतेच्या दिशेने’ या लेखात स्त्री समस्यांचा पाढा न वाचता मोनाताईंनी पुरुषांच्या बाजूने विचार करून तरुण पिढीत होणारा सकारात्मक बदल लक्षात आणून दिला आहे.

पुस्तकात शेवटी शेवटी आलेले ‘नशा कशाची?’, ‘संकल्प गुढी’, ‘मर्यादा पुरुषोत्तम’, ‘निर्णयांचे यशापयश’, ‘धर्म गवसताना’, ‘विचारांचे प्रत्यारोपण’, ‘आभासी वास्तव’, ‘नभांगणातील ठेवा’, हे विशेष उल्लेखनीय लेख मुळातून वाचण्यासारखे आहेत.

‘पळसबंध’ या पुस्तकातील अशा विविध विषयांवरील तीस लेखांमधून मोनाताईंनी वेगवेगळ्या पातळ्यांवरील मानवी वर्तनाचं, विविध सामाजिक प्रश्नांचं, परिवर्तनाच्या झंझावातात हरवलेल्या मौल्यवान मूल्यांचं, कुटुंबातील ताण आणि सामंजस्याच्या गरजेचं आणि तरूण पिढीच्या अवघड प्रश्नांचं कॅलिडोस्कोपिक चित्र रेखाटलं आहे. यातील भाष्य वेगवेगळ्या संदर्भातल्या अनुभवांच्या आधारानं आणि प्रत्येक विषयाचे अनेक पैलू लक्षात घेत केलेलं आहे. एखादा विचार मांडताना उद्‍धृत केलेल्या कवितांच्या समर्पक ओळींमुळे आणि उदाहरणांमुळे तो विचार थेट मनात पोचतो. एकूण लेखन अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारे झाले आहे. लेखांची समर्पक शीर्षके लक्षवेधी आहेत. सदरलेखन किती मर्मग्राही होऊ शकते त्याचे दाखले या पुस्तकात जागोजागी मिळतात. अशा सकस लेखनासाठी मोनाताईंना हार्दिक शुभेच्छा

आसावरी काकडे

मोबा. नं. ९७६२२०९०२८

१०.८.२०२१