Tuesday 16 August 2022

नाबाद नव्वद

‘नाबाद नव्वद’ हे श्री तुकाराम दत्तात्रय जगताप (नाना) यांचं छोटंसं, प्रभावी चरित्र आहे. श्री जगताप यांनी आता नव्वदी ओलांडलेली आहे. त्यांच्याशी बोलण्यातून समजलेलं त्यांचं कार्य-कर्तृत्व भारती जोशी यांनी या चरित्रात शब्दबद्ध केलेलं आहे. वयाच्या या टप्प्यावर आठवलं तसं सांगत असलेलं लिहून घेऊन ते नंतर सुसंगतपणे लिहिणं हे कौशल्याचं काम आहे. भारती जोशी यांना ते चांगलं साधलं आहे. भारती जोशी यांनी यापूर्वी चार पुस्तकं लिहिली आहेत. लिहिता हात असल्यामुळेच त्यांना हे साध्य झालं असणार. हे पुस्तक वाचताना लेखनातली सहजता आणि नेटकेपण जाणवते.

सोनकिरे या छोट्याशा खेड्यात एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या एका मुलाच्या आयुष्याची खडतर वाटचाल कशी झाली त्याचा धावता आढावा या चरित्रात वाचायला मिळतो. आज घडीला हा मुलगा- नव्वदीचा तरूण अनेकांचं प्रेरणास्थान बनून कृतकृत्य आयुष्य जगत आहे. भारती जोशी यांनी या चरित्रात शेवटी त्यांच्या समृद्ध व्यक्तिमत्वाचं ‘भूतकाळाचा दुवा आणि भविष्यकाळाचा दिवा’ असं सार्थ वर्णन केलेलं आहे.

नानांच्या लहानपणच्या काळाचं, त्यांच्या गावाचं चित्रदर्शी वर्णन, त्या वेळच्या प्रथा, एकूण गरीबीची परिस्थिती, ब्रिटीश राजवटीतले वातावरण, पत्री सरकार, गांधी-हत्येनंतर झालेल्या जाळपोळीत वडिलांनी घेतलेली कणखर भूमिका, त्याचा नानांच्या मनावर पडलेला प्रभाव... हे सर्व वाचताना तो काळ डोळ्यासमोर येतो..

जिद्द, सचोटी, कष्ट करण्याची तयारी, तल्लख बुद्धि, वैचारिक स्पष्टता, आणि प्रचंड उत्साह.. याच्या जोरावर श्री जगताप यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं. हे करताना असेल त्या परिस्थितीतून मार्ग काढण्याचं कौशल्य, निश्चयी स्वभाव हे गुण त्यांना उपयोगी पडले. सुरुवातीला शिक्षण घेताना प्रचंड अडचणी आल्या पण बहीण आणि मेहुण्यांनी त्यांना पाच वर्षे सर्व प्रकारचा आधार दिला. सहा मैल चालत, वाटेत येणारी कृष्णा नदी पार करत शाळेला जावं लागायचं. पण त्यांनी शिकण्याची जिद्द सोडली नाही. प्रतिकूल परिस्थितीत शिकणार्‍या विद्यार्थ्यांना नानांचा आदर्श प्रेरणादायी ठरेल असा आहे.

पुढे सिव्हिल इंजिनीयर ही पदवी मिळवून ते PWD या सरकारी खात्यामधे नोकरीला लागले. तिथे कामाचा अनुभव घेत असतानाच त्यांना भारतीय संरक्षण खात्याकडून MES खडकी, पुणे इथं रुजू व्हावे असे पत्र आले. तिथं रुजू झाल्यावर काही दिवसांनी अहमदनगर इथं BF Building and Roads खात्यात त्यांची बदली झाली. तिथून अरुणाचल प्रदेश (नेफा) येथील दुर्गम भागात रणगाडे, मोठी वाहाने जाऊ शकतील इतके भक्कम रस्ते तयार करण्याच्या कामासाठी त्यांची निवड झाली. त्यानंतर १९७१-७५ या काळात त्यांना ‘आय एन एस हमला’ या नौसेनेच्या महत्त्वाच्या संस्थेत काम करण्याची संधी मिळाली. या सर्व संधींचं त्यांनी सोनं केलं. अशा वेगवेगळ्या ठिकाणी अतिशय खडतर वातावरणात त्यांनी त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी निष्ठेनं आणि यशस्वीरित्या पार पाडली. त्यांच्या अशा कामांबद्दल त्यांना वेळोवेळी प्रशस्ती पत्रे मिळाली. त्यांचा सन्मान केला गेला. शाळा-कॉलेजातही त्यांना अनेक बक्षिसं मिळाली होती. इंजिनिअरिंग कॉलेजमधे तर त्यांच्या नावे बक्षिस दिले जात होते..!

कर्तृत्वपूर्ण नोकरीची वीस वर्षे झाल्यावर समाधानाने स्वेच्छानिवृत्ती घेऊन ते बांधकाम व्यवसायात उतरले. त्यांनी निवासी सदनिका बांधण्याच्या छोट्या प्रकल्पापासून सुरुवात केली. त्यांच्या कामाचा दर्जा आणि सचोटी पाहून त्यांना अनेक कामं मिळत गेली. पतंगराव कदम यांच्याकडून तर त्यांना मोठमोठ्या शिक्षण संस्थांचे बांधकाम करण्याची संधी मिळाली... या क्षेत्रातही त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं.

नोकरी लागल्यावर मेहुण्यांनी शिक्षणकाळात केलेली आर्थिक मदत लक्षात ठेवून नानांनी त्यांचे ते ऋण तर फेडलेच पण इतर बाबतीतही ते सतत त्यांच्या सोबत राहिले. निवृत्त झाल्यावर कौटुंबिक जबाबदारीबरोबर आपल्या गावाच्या विकासाकडेही त्यांनी लक्ष दिले. आपल्या अंगच्या गुणांचा, कौशल्यांचा आपल्या भोवतीच्या सर्वांना उपयोग करून देण्याचं औदार्य आणि कर्तव्यबुद्धी त्यांच्याजवळ होती. ज्यांनी वेळोवेळी आधार दिला त्यांच्याविषयीचा कृतज्ञ भाव त्यांनी सतत मनात ठेवला.

स्वकष्टार्जित समृद्धी उपभोगतानाही सदैव कृतज्ञ राहिलेल्या श्री तुकाराम जगताप (नाना) यांच्या या प्रेरणादायी कार्य-कर्तृत्वाचं प्रभावी शब्द-चित्र भारती जोशी यांनी ‘नाबाद नव्वद’ या चरित्रात रेखलं आहे. यातून अनेकांना वेगवेगळ्या स्तरावर मार्गदर्शन होऊ शकेल.

आसावरी काकडे

१६.८.२०२२

asavarikakade@gmail.com

Mob. 9762209028