Saturday 31 December 2022

‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत स्मृति साहित्य पुरस्कार-

 मनोगत-

नमस्कार,

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सिक्किमचे माजी राज्यपाल, खासदार श्रीनिवास पाटील, आजच्या सहपुरस्कारार्थी माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठानच्या डॉ संजीवनी केळकर, ‘उत्तुंग’ या कृष्ण जीवनावरील महा कादंबरीच्या लेखिका मृणालिनी सावंत, त्यांच्या पाठीशी असलेला त्यांचा मुलगा अमिताभ सावंत, आणि लेखक, प्रकाशक संपादक, आयोजक, उत्तम वक्ता असलेले मृत्युंजय प्रतिष्ठानचे डॉ सागर देशपांडे आणि श्रोतेहो,

मनोगताच्या सुरुवातीला ‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिल्या जाणार्‍या साहित्य पुरस्कारासाठी या वर्षी माझी निवड केली याबद्दल मी मृत्युंजय प्रतिष्ठानला हार्दिक धन्यवाद देते. हा पुरस्कार स्वीकारताना मला आनंद होतो आहे. पण हा पुरस्कार ‘स्मृती प्रित्यर्थ’ आहे याची हुरहुर वाटते आहे... पुरस्कार जाहीर झाला तेव्हापासून बर्‍याच आठवणी येत आहेत.

आदरणीय शिवाजी सावंत यांचा प्रथम परिचय त्यांच्या ‘मृत्युंजय’ या कादंबरीतून झाला. तेव्हा मी कॉलेजात शिकत होते. वडलांनी हे पुस्तक घरी आणलं होतं आणि वाचून शिवाजी सावंत यांना एक पत्र पाठवलं होतं. पत्र छोटंसच, पोस्टकार्डावर लिहिलेलं होतं. ते पत्र घेऊन वडलांना भेटायला शिवाजीराव आमच्या घरी आले होते. नंतरही त्यांच्या भेटी होत राहिल्या असाव्यात. कारण बरेच वर्षांनी एकदा आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो तेव्हा गप्पांच्या ओघात त्यांनी मला आमच्या वडलांच्या एका कवितेची आठवण दिली. त्यातला सूक्ष्म आशय उलगडून सांगितला होता. वडलांच्या अध्यात्मिक अभ्यासाचा वारसा मला मिळाला आहे हे त्यांनीच माझ्या लक्षात आणून दिलेलं होतं...

मी कविता लिहू शकते हे मला बर्‍याच उशीरा समजलं. पण लिहायला लागल्यावर लिहीतच राहिले आहे.

‘आरसा’ या पहिल्या कवितासंग्रहाची निर्मिती हा माझ्या आयुष्यातला सुंदर टर्निंग पॉईंट होता.. या निर्मितीतली सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे संग्रहाला लाभलेली आदरणीय शिवाजी सावंत यांची प्रस्तावना.. ही प्रस्तावना म्हणजे केवळ माझ्या कवितांना दिलेलं प्रोत्साहन नव्हतं. ते शुभाशीर्वाद होते. आता विचार करताना हे अधिक जाणवतं आहे. वाटतं आहे की अगदी संकोचत आम्ही स्वतःच काढलेल्या या पहिल्याच कवितासंग्रहाचं सर्व प्रकारे कौतुक झालं ते प्रस्तावनेच्या रूपात मिळालेल्या शिवाजीराव सावंत यांच्या आशीर्वादामुळेच. प्रतिष्ठेचे चार पुरस्कार, वाचकांचा भरघोस प्रतिसाद, वृत्तपत्रं, मासिकं, रेडिओ, दूरदर्शन यांनी घेतलेली दखल... हे सर्व खूपच आनंददायी आणि प्रोत्साहित करणारं होतं. आरसा कवितासंग्रह १९९० साली प्रकाशित झाला. एकदा ठरवल्यावर कवितासंग्रह प्रकाशित करणं अवघड नव्हतं. पण वितरण हा महत्त्वाचा आणि आम्हाला न जमणारा भाग होता. पण काँन्टिनेन्टल प्रकाशनाच्या सहाय्यानं तेही सुकर झालं. शिवाजी सावंत यांच्या मार्गदर्शनातूनच हे झालं असणार... त्या वेळी झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे वृत्तान्त पेपरला येत होते. ग्रंथ विक्री संदर्भातल्या एका बातमीत म्हटले होते, ‘शिवाजी सावंत यांची मृत्युंजय ही कादंबरी, ‘विशाखा’ हा कुसुमाग्रजांचा कवितासंग्रह आणि ‘आरसा’ हा आसावरी काकडे यांचा कवितासंग्रह या पुस्तकांची प्रदर्शनात जास्त विक्री झाली अशी माहिती काँन्टिनेन्टल प्रकाशनाच्या देवयानी अभ्यंकर यांनी दिली...’ ही बातमी मी एखाद्या पुरस्कारासारखी जतन करून ठेवली आहे. ‘शब्द शिवार’ या आज प्रकाशित झालेल्या पुस्तकात ‘आरसा’च्या प्रस्तावनेचा समावेश केलेला आहे.

सर्व पातळ्यांवरच्या अशा प्रोत्साहनामुळे ‘आकाश’ हा कवितासंग्रह लगेच १९९१ साली प्रकाशित केला. त्याची पहिली प्रत कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांना नाशिकला त्यांच्या घरी जाऊन द्यावी असं शिवाजी सावंत यांनी सुचवलं. त्यानुसार आम्ही नाशिकला गेलो. कुसुमाग्रज यांना प्रत्यक्ष भेटून आकाश संग्रहाची पहिली प्रत देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. आमच्यासाठी ते संग्रहाचं प्रकाशन होतं. या संग्रहाचंही चांगलं स्वागत झालं.    

‘लाहो’ हा कवितासंग्रह १९९५ साली काँन्टिनेन्टल प्रकाशनाने प्रकाशित केला. त्याची एक प्रत आम्ही शिवाजी सावंत यांना भेट दिली होती. त्यातील काविता मनःपूर्वक वाचून पुस्तकातच त्यांनी कवितांवर प्रतिक्रिया लिहिल्या. शेवटी स्वाक्षरीही केली.. ते पाहून ती प्रत मी परत मागून घेतली आणि त्यांना दुसरी प्रत दिली. त्यांच्या प्रतिक्रिया असलेली ती प्रत मी जपून ठेवली आहे.

२००० साली श्री शिवाजी सावंत यांच्या घरी रामकृष्ण मिशन हरिद्वारचे स्वामी अकामानंद येणार होते. त्या वेळी त्यांनी आम्हालाही घरी बोलावलं होतं. तेव्हा माझा ‘मी एक दर्शनबिदू’ हा कवितासंग्रह प्रकाशित झाला होता. तो स्वामींना भेट द्यावा असं शिवाजी सावंत यांनी आम्हाला सुचवलं होतं. त्यानुसार आम्ही तो त्यांना भेट दिला. आध्यात्मिक क्षेत्रातली इतकी थोर व्यक्ती आलेली असताना आम्हाला बोलावणं, कवितासंग्रह भेट द्या असं सुचवणं हे दोन्ही आश्चर्य वाटावं असं होतं. कवितासंग्रह ते वाचतील की नाही असंही वाटून गेलं. पण थोड्याच दिवसात संग्रह वाचून त्यांचं सविस्तर पत्र आलं. ते वाचल्यावर संग्रह त्यांना देण्याचं महत्त्व लक्षात आलं. स्वामींनी पत्रात म्हटलं आहे, ‘एका दृष्टिने पाहता हे एक अत्यंत गूढ असे आत्मचरित्रच वाटते. कवयित्रिच्या भूमिकेतून तुम्ही स्वतःचेच आत्मविलोकन केले आहे. अध्यात्मिक वाटचालीच्या दृष्टीने मी याला महत्त्व देतो..’ त्यांचे आशीर्वाद असलेलं हे पत्र या संग्रहाला मिळालेल्या महाराष्ट्र राज्य पुरस्काराइतकं मला महत्त्वाचं वाटतं.

त्यानंतर झालेला लेखन-प्रवास ईशावास्य उपनिषदाच्या अभ्यासापर्यंत चढत्या क्रमानं चालू राहिला.. जगण्याविषयीच्या मूलभूत प्रश्नांसंदर्भातली माझी जिज्ञासा ईशावास्यच्या अभ्यासातून काही प्रमाणात शमली. अर्थात माझी जिज्ञासा आणि अभ्यास दोन्हीला माझ्या कुवतीच्या मर्यादा होत्या. या अभ्यासातून ‘ईशावास्यम्‍ इदं सर्वम्‍ : एक आकलन-प्रवास’ हे पुस्तक २०१२ साली प्रकाशित झालं. राजहंस प्रकाशनानं याची दर्जेदार निर्मिती केली आहे. हे पुस्तक प्रकाशित झाल्यावर मला शिवाजीराव सावंत यांची प्रकर्षानं आठवण झाली. त्यांना माझं हे पुस्तक नक्कीच आवडलं असतं... आजचा पुरस्कार माझ्या एकूण लेखनासाठी आहे पण का कोणजाणे तो या पुस्तकासाठीच आहे अशी माझी भावना आहे.

माझ्या एकूण साहित्यिक वाटचालीत मला अनेकांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळाले. श्री शिवाजी सावंत, डॉ. व. दि. कुलकर्णी यांच्यासारखे श्रेष्ठ साहित्यिक, समीक्षक, साहित्य परिषद, काव्यशिल्प, साहित्य प्रेमी भागिनी मंडळ यांसारख्या साहित्यिक संस्था, समकालिन साहित्यिक, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, राजहंस प्रकाशन, सुखायन प्रकाशन, पद्मगंधा प्रकाशन, दिलीपराज प्रकाशन, सेतू प्रकाशन, डिंपल पब्लिकेशन, साहित्य आकदमी प्रकाशन, ईपुस्तके प्रकाशित करणारे ई साहित्य प्रतिष्ठान या प्रकाशन संस्था आणि अनेक सुहृद, नातेवाईक... आज पुरस्कार स्वीकारताना या सर्वांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करून सर्वांचे मनापासून आभार मानते.

डॉ. संजीवनी केळकर यांचे मनोगत आणि साहित्याचे रसिक जाणकार आणि उत्तम वक्ता असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार श्रीनिवास पाटील यांचं भाषण ऐकायला आपण उत्सुक आहोत...

शेवटी सर्वांना मनापासून धन्यवाद देते आणि थांबते.

आसावरी काकडे