Friday 8 May 2020

आता गळाभेट व्हायला हवी...



     भगवद्‍गीतेची आणि माझी प्रथम दुरूनच डोळाभेट झाली. माझे वडील सतत काहीतरी वाचत असायचे. त्यांच्या हातात बरेचदा भगवद्‍गीता दिसायची. लहानपणी पाहिलेली ती छप्पन पैशांची हार्ड बाउंड प्रत त्यांनी मला कधी दिली ते आठवत नाही. पण सुंदर अक्षरात त्यांचं नाव असलेली ती प्रत अजून माझ्या संग्रही आहे. संस्कृत भाषेकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे तिची थेट गळाभेट अजून होऊ शकलेली नसली तरी त्यातील महत्त्वाचा तत्त्वविचार लहानपणापासून कानावर पडत होता. गीतेमधले, ‘स्थितप्रज्ञ कसा असतो’ त्याचे वर्णन आणि ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ हे वचन तेव्हाही विशेष लक्षवेधी वाटले होते. कधी कधी त्यासंदर्भात वडिलांशी संवाद होत असे. अभ्यासाच्या पुस्तकांखेरीज या विषयातले स्वतःचे स्वतंत्र वाचन होत नव्हते. पण त्यावर नकळत विचार व्हायचा. प्रश्न पडायचे आणि विरून जायचे. त्यांचा फारसा पाठपुरावा केला गेला नाही.

     पुढे विनोबांची गीताई हातात आली. संपूर्ण गीता मराठीत वाचता आल्यामुळे गीता-विषय अधिक ओळखीचा होऊ लागला. केवळ कानावर पडलेले गीतेतले त्रोटक विचार गीताईमधून सविस्तर वाचता आले. त्यातून समजुत घडत राहिली. मार्गदर्शन मिळत राहिलं. दैनंदिन जगण्यातल्या लहान-मोठ्या समस्यांमुळे येणारी अस्वस्थता त्यावेळपुरती का होईना दूर होऊ लागली. गीताई सतत हाताशी असायची. वडील गीता वाचायचे तशी मी गीताई वाचायची. ‘गीताई माउली माझी तिचा मी बाळ नेणता / पडता रडता घेई उचलूनी कडेवरी’- गीताईच्या पहिल्या पानावर लिहिलेल्या या ओळी म्हणजे आपलंच मनोगत आहे असं वाटायचं. भावनिक आधार देणारं गीतेचं हे मराठी रूप जिवलग होऊन बसलं. यथाकाल गीतेविषयीची विविध पुस्तके हाती येत गेली. लोकमान्य टिळकांपासून ते अगदी आताच्या काळातील जिज्ञासू अभ्यासकांपर्यंत अनेकांनी गीतेवर आपापल्यापरीनं विवेचन केलेलं आहे. उत्सुकतेनं यातली काही पुस्तकं मी बारकाईनं वाचत होते. 

     या प्रवासात अधिक उत्कटपणे गीता भेटली ती ज्ञानेश्वरीच्या रूपात.. परोपरीनं तिनं आपली वेगवेगळी रूपं विस्तारून दाखवली. त्यातला तत्त्वविचार ओवी-ओवीतून बरसत राहिला. मनात मुरत राहिला. माझा होऊन कवितेतून उगवत राहिला. ज्ञानेश्वरीमार्फत गीतेशी जवळीक साधली गेली. पहिल्या वाचनात त्यातल्या तत्त्वज्ञानाकडे लक्ष गेलं. काव्यात्म शैलीत वर्णन केलेली स्थितप्रज्ञ-लक्षणे अधिक मोहक वाटली. त्यातले बारकावे लक्षात आले. लहानपणी स्थितप्रज्ञ म्हणजे ‘कशाचाही आनंद वाटून घ्यायचा नाही की कशाचं दुःख करायचं नाही..’ असं काहीसं ढोबळमानानं समजलं होतं. त्यामुळे माणसानं इतकं रुक्ष का व्हावं? दुःख करू नये हे ठीक. पण आनंदही वाटून घ्यायचा नाही म्हणजे काय? असं मनात यायचं. ज्ञानेश्वरीतून झालेलं स्थितप्रज्ञ-दर्शन विलोभनीय होतं. इथे रुक्षतेला जागा नाही. गीतेतील मूळ संस्कृत श्लोकांवर काव्यात्म भाष्य करणार्‍या ओव्यांमधून उमगलेला स्थितप्रज्ञ छोट्या भौतिक आनंदांच्या पलिकडे पोचलेला आहे. ज्ञानेश्वरीत आलेलं ‘स्थितप्रज्ञ कसा असतो’ याचं वर्णन वाचून वाटलं, स्थितप्रज्ञ असा असतो तर..! हा आदर्श रुक्ष नाही. त्याच्या प्रेमात पडावं.. त्याच्या मागं लागावं असा आहे. उदाहरण म्हणून त्या वर्णनातल्या शेवटच्या दोन ओव्या पाहा- ‘ऐसा आत्मबोधे तोषला । जो परमानंदे पोखला । तोचि स्थितप्रज्ञु भला । वोळख तू ॥ तो अहंकाराते दंडुनी । सकळ कामु सांडोनी । विचरे विश्व होऊनि । विश्वाचि माजीं ॥ २/३६६-६७

     गीतेतलं ‘विश्वरूप दर्शन’ हे वर्णनही ज्ञानेश्वरीत फार सुंदर शब्दांत आलेलं आहे. युद्धासाठी रणभूमीवर जमलेले आपलेच सारे वंदनीय कुटुंबीय पाहून गलीतगात्र झालेल्या अर्जुनाला कृष्ण परोपरीनं समजावतोय. कर्तव्य म्हणून युद्ध करण्यात कोणतंही पाप नाही हे सांगताना अर्जुनाची जाणीव विस्तारावी, विचारांचा पैस वाढावा म्हणून अर्जुनाला विश्वरूप दर्शन घडवलेलं आहे. हे सर्व इतकं प्रासादिक आणि भावपूर्ण आहे की त्यातल्या भव्य आशयानं भारावून जावं की ते सांगण्यातील काव्य अनुभवावं हे समजेनासं होतं. कोणताही विषय परोपरीनं समजावताना ज्ञानेश्वरीत आलेल्या असंख्य उपमा हा स्वतंत्र अभ्यासाचा आणि आस्वादाचा विषय आहे. ज्ञानेश्वरीचं दुसरं वाचन करताना या उपमांनी लक्ष वेधलं. जाणवलं की उपमांच्या माध्यमातून गीतेतील तत्त्वविचार सुंदर आणि भावपूर्ण होऊन आपल्यापर्यंत पोचतो आहे. त्यामुळं गीता-विचारांशी सलगी करणं, त्यावर चिंतन-मनन करणं सहज घडू लागलं. ‘विश्वरूप दर्शन’ हा भाग वाचताना कृष्णार्जून संवादाचं जे चित्र डोळ्यासमोर साकारलं त्यावर एक कविता लिहिली गेली. ती अशी-

कृष्णार्जून संवाद-

अर्जुन-

विश्वरूप दाव हट्ट केला कृष्णा
लगोलग तृष्णा शमविली

पाहिला अपार विभूती-विस्तार
आश्चर्या ओसर पडेचना

आकळाया सारे दिलेस माधवा
ज्ञानचक्षू तुवा पामराला

भयकारी रूप तरी पाहवेना
मना साहवेना प्रलय हा

जणू झाड झाली दीन लोकसृष्टी
कालिंदीच्या तटी वाटतसे

त्याच झाडाचे मी इवलेसे पान
तरी मला ज्ञान दिलेस तू

दुःखकालिंदीचा दावलास थांग
आता हे अथांग माघारी ने
***
कृष्ण-
तुझ्यासाठी पार्था विश्वरूप ल्यालो
आणि आता, ‘भ्यालो’ म्हणतोस
पुन्हा तुझ्यासाठी होईन सारांश
विराटाचा दंश निववीन
पण असो चित्ती सदा ‘ते’च रूप
अनंत स्वरूप दावणारे
कृष्णरूप तर एकाच युगाचे
विराट ग्रंथाचे मुखपृषठ..!
***

        कर्मयोग हा गीतेचा मुख्य प्रतिपाद्य विषय आहे. तो समजावताना ज्ञानेश्वरीत सविस्तर कर्मविचार, त्रिगुणात्मक विभूतीविस्तार, ज्ञानी पुरुषाची लक्षणे, भक्तीचं स्वरूप असे सर्व विषय येतात. हे सर्व समजून घेतल्यावर त्या संदर्भात ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन...’ २/४७ या म्हणण्यामागील खोलार्थ उमगला. ‘कर्म करीत राहा.. फळाची अपेक्षा करू नका’ हा याचा पूर्वी समजलेला ढोबळ अर्थ. तेव्हा प्रश्न पडायचा की काही अपेक्षाच ठेवायची नसेल तर मग कोणतंही काम करण्याला प्रेरणा काय?

     कर्मयोगाची विस्ताराने ओळख झाल्यावर लक्षात आले की माणसाला कर्म करावीच लागतात. ती करणं एवढंच माणसाच्या हातात आहे. त्याचा परिणाम काय होईल, काय व्हावा हे माणसाच्या हातात असत नाही. त्याला इतर अनेक बाह्य गोष्टी कारणीभूत असतात. म्हणून आपल्या नियंत्रणात नसलेल्या परिणामांचा विचार न करता ज्यावर आधिकार आहे, जे करणं आपल्या हातात आहे ते कर्म करत राहाव. परिणामांचा, फळाचा विचार करू नये. अशा निःस्पृह भावनेने केलेले कर्म माणसाला बंधनात घालत नाही. बंधनाचा संबंध मुक्ती या परमोच्च अध्यात्मिक ध्येयाशी आहे.    
     या नंतर गीता भेटली ती तिच्या बीजरूपात असलेल्या ईशावास्य उपनिषदाच्या रूपात. या उपनिषदाचे केवळ अठरा मंत्र आहेत. विश्वाचे स्वरूप, कर्मयोग, ज्ञानी पुरुषाची लक्षणे, दैनंदिन जीवन आणि अध्यात्म साधना यांची सांगड घालण्याचं महत्त्व, ज्ञानप्राप्तीसाठीची आर्त प्रार्थना, आणि सोsहमस्मि प्रचितीचे वर्णन.. इतकं सारं या अठरा मंत्रात सामावलेलं आहे. गीतेचे अठरा अध्याय म्हणजे या संपृक्त आणि सूत्रबद्ध मांडणीचाच विस्तार आहे असं मला वाटलं.

     ईशावास्य उपनिषदाचा तपशिलात जाऊन सखोल अभ्यास करताना गीताई आणि ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून उमगत राहिलेल्या गीता-विचारांचा पार्श्वभूमीसारखा उपयोग झाला. आणि ईशावास्य उपनिषदाचा सूक्ष्म विचार समजून घेताना गीतेतील तत्त्व-विचारांचा अधिक उलगडा होत राहिला. उदाहरणार्थ या उपनिषदातील दुसरा मंत्र असा आहे-

‘कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेत्‍ शतं समाः ।
     एवं त्वयी नान्यथेतोsस्ति न कर्म लिप्यते नरे ॥२॥’

मराठी रूपांतर-

‘कर्मे करीतच व्हावे शतायुषी । इच्छा ही मनाशी धरायची
     पर्याय ना काही हाच मार्ग तुला । कर्म माणसाला बांधते ना..!’

या मंत्रात आलेली कर्म ही संकल्पना काय आहे?, कर्मे करीतच शतायुषी व्हावे अशी इच्छा का धरायची?, याहून वेगळा पर्याय नाही असं का म्हटलंय?, कर्म बांधत नाही म्हणजे काय?... असे प्रश्न हा मंत्र बारकाईनं समजून घेताना पडू लागल्यावर अधिक अभ्यास झाला. स्वतंत्र विचार झाला. त्यामुळे कर्मयोग म्हणजे काय याचा सविस्तर उलगडा झाला. ‘ईशावास्यम्‍ इदं सर्वम्‍... एक आकलन-प्रवास’ या माझ्या पुस्तकात यातल्या प्रत्येक संकल्पनेवर विस्ताराने भाष्य केलेले आहे. ईशावास्य उपनिषदाचे मंत्र केवळ त्यावर इतरांनी केलेली भाष्ये वाचून नाही तर थेट संस्कृतमधून समजून घेतल्यामुळेच मी हे करू शकले.

हा अनुभव जमेस असल्यामुळे ‘भगवद्गीता आणि मी’ या विषयावर लिहिताना जाणवलं की गीताई, गीतेविषयीची पुस्तके, ज्ञानेश्वरी, ईशावास्य उपनिषद या विविध माध्यमातून मला गीता विविध रूपात भेटत राहिलीय, त्यातून गीता-विषयाची सविस्तर ओळखही झालीय पण भगवद्‍गीतेची आणि माझी थेट गळाभेट अद्याप झालेलीच नाही. ती व्हावी असं वाटत असेल तर गीतेतील संस्कृत श्लोकही मी मुळातून स्वतः वाचून समजून घ्यायला हवेत..!  
    
आसावरी काकडे

(आनंदघन दिवाळीअंक २०१९)

Wednesday 6 May 2020

वाचन-मंदिर



‘आपटे वाचन मंदिर..’ या इचलकरंजी येथील सांस्कृतिक चळवळीचे केंद्र असलेल्या ग्रंथालयाशी माझा फार जुना संबंध आहे. या ग्रंथालयाला १५० वर्षे पूर्ण होत आहेत. या दीर्घ कालावधीतल्या ग्रंथालयाच्या कारकीर्दीचा इतिहास समजून घेण्यासारखा असणार. या निमित्ताने प्रकाशित होत असलेल्या स्मरणिकेत तो वाचायला मिळेल. वाचन संस्कार शिबीर, ग्रंथप्रदर्शन, साहित्यिक गप्पा, व्याख्यानमाला... असे अनेक पूरक उपक्रम या ग्रंथालयाद्वारे राबवले जातात. त्यापैकी मी अनुभवलेला एक उपक्रम म्हणजे ग्रंथालयाची साहित्यपुरस्कार योजना. या योजनेअंतर्गत २००० साली माझ्या ‘मी एक दर्शनबिंदू’ या कवितासंग्रहाला पुरस्कार मिळाला होता. तो घेण्यासाठी मी ग्रंथालयाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित होते. तेव्हा ग्रंथालयाचा आणि त्यात कार्यरत असणार्‍यांचा परिचय झाला होता. आता स्मरणिकेसंदर्भात ग्रंथालयाचे पत्र आले ते वाचताना ही आठवण जागी झाली...

या स्मरणिकेसाठी लेख लिहिणाच्या निमित्ताने या ग्रंथालयाविषयी विचार करताना प्रथम लक्ष वेधून घेतलं ते ग्रंथालयाच्या नावानं. एखाद्या ग्रंथालयाला मंदिर म्हणणं यात पुस्तकं आणि वाचन याविषयीची खोल जाण आणि आत्मीयता दिसून येते. ..! हे नावच ग्रंथालयाचा उदात्त हेतू अधोरेखित करणारं आहे. पुस्तकं आणि वाचन हे साहित्य क्षेत्राचे दोन महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. कोणतेही ग्रंथालय या आधारस्तंभांची जोपासना करत असते. पुस्तकं लेखक आणि वाचक यांना मनानं जवळ आणतात. जवळ येण्याची ही प्रक्रिया वाचनातून प्रत्यक्षात उतरते. त्यातून लेखक-वाचक नातं अधिक दृढ होत जातं. त्यांच्यात संवाद सुरू होतो. तो लेखक वाचक दोघांना घडवणारा असतो. लेखक वाचक घडवण्याचं फार महत्त्वाचं कार्य ग्रंथालयं करत असतात. एका अर्थी माणूस घडवण्याचंच कार्य आहे ते.

या लेखात मी पुस्तकं आणि वाचन या दोन आधारस्तंभांविषयी लिहिणार आहे. ‘पुस्तकं’ नावाची एक अतिशय आशयघन कविता आहे. पुस्तकांविषयी लिहायचं तर नीलिमा पालवणकर यांची ही एकच कविता पुरेशी आहे. या कवितेत त्यांनी पुस्तकांचं अंतरंगच उलगडून दाखवलं आहे. पुस्तकं आपल्यासाठी काय काय करतात आणि ते दान आपल्या ओंजळीत घेता येण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागतं ते अगदी सूक्ष्मपणे शब्दांकीत केलेलं आहे. ती कविता अशी-

पुस्तकं

पुस्तकं गच्च भरलेलं आभाळ असतात
तेव्हा आपण जमीन व्हावं लागतं
आणि मुरवावं लागतं त्यांना
आपल्या आत.
कधी ती झाडे होतात धनदाट तेव्हा आपण
पांथस्थ होऊन,
बसायचं असतं, त्यांच्या सावलीला
निवांत.

कधी कधी तर ती पक्षी होतात
तेव्हा पंखात बळ घेऊन उडावं लागतं
आपल्याला त्यांच्या बरोबरीनं.

पुस्तकातून कधी शिशिरही भेटतो,
तेव्हा आपण उजाड माळ होतो,
तेव्हा तीच वसंताची चाहूल होतात
आपल्यासाठी.

पुस्तकांना स्पर्श असतो, वास असतो
पण त्यासाठी मनाला
फुटाव्या लागतात,
संवेदनांच्या लक्ष पाकळ्या.
मग पुस्तके उधळून टाकतात,
वसंतातले सगळे रंग.

पुस्तकांना कळते सगळे सगळे
आपल्याला कळते का?
पुस्तकांचे आभाळमन?
***
नीलिमा पालवणकर

पुस्तकं गच्च भरलेलं आभाळ असतात खरी... पण त्या आभाळाच्या धुवांधार वर्षावात चिंब भिजून सुजलाम सुफलाम व्हायचं असेल तर आपल्याला जमीन व्हावं लागतं आणि मुरवून घ्यावं लागतं त्याचं स्वर्गीय दान आपल्या आत..! कवितेच्या सुरुवातीला कवयित्रीनं जणू पुस्तकवाचनाची प्रक्रियाच सांगितलीय. मग पुस्तकं कशी, काय काय असतात ते सांगितलंय. आणि जाता जाता हेही लक्षात आणून दिलंय की पुस्तकांना स्पर्श असतो, वास असतो पण त्यांच्या आस्वादासाठी मनाला संवेदनांच्या लक्ष लक्ष पाकळ्या फुटाव्या लागतात..!

अशी ‘पुस्तकं’ आपटे वाचन मंदिरासारख्या ग्रंथालयात निगुतीनं सांभाळून ठेवलेली असतात. त्यांच्यातली अक्षरबद्ध ज्ञानसंपदा आत्मसात करायची तर त्यांचं वाचनही तितक्याच आत्मीयतेनं व्हायला हवं. पुस्तकांशी एकरूप होत केलेलं वाचन किमया करू शकतं. ते शब्दात अडकलेलं ज्ञान आपल्या ओंजळीत घालतं आणि आपल्याला शहाणं, प्रगल्भ करतं.. वाचता वाचता नकळत मनात प्रश्न पेरले जातात. त्यांच्या उत्तरांसाठी मन अस्वस्थ होतं. अशा सैरभैर अवस्थेत त्या संदर्भातल्या योग्य अशा दुसर्‍या पुस्तकांची साद ऐकू येते. ती मिळवून वाचली जातात. वाचताना मन अंतर्मुख होतं तेव्हा आतला अपूर्णतेचा आंधार जाणवतो. अस्वस्थता वाढते. पण पुस्तकांनी एकदा धरलेलं बोट सुटत नाही. वाचन-प्रक्रिया चालूच राहते. ही प्रक्रिया मनाची मशागत करणारी असते. ती खोदत राहाते खोल... आतला पैस वाढवते. या विस्तारलेल्या आवारात मग सामावू शकतात दुरस्थ अनुभवांचे काफिले, जे शिकवून जातात स्वतः न जगलेल्या कैक आयुष्यांचे धडे. समजूत विस्तारत जाते. तिला नवनवीन दिशा कळतात...

जगताना समोर आलेल्या समस्या कधी कधी आपल्याला निराशेच्या कड्यावर नेऊन ठेवतात. तेव्हा कोसळत्या क्षणी आत रुजलेलं, वाचनातून कमावलेलं शहाणपण आधार देतं. वाचन सतत आत्मसंवादाला वेगवेगळे विषय पुरवतं आणि आंतरिक परिवर्तनाच्या प्रक्रियेला गती देतं. माणूस म्हणून जिवंत ठेवतं आपल्याला..! पण हे सगळं कायम हाताशी राहात नाही. जगताना पुन्हा नव्या प्रश्नाची ठेच लागते. घायाळ व्हायला होतं. आतील शहाणपणाला साद घालावी तर ते मलूल होऊन पडलेलं असतं.. अशावेळी वाचनच विझू विझू झालेल्या आतल्या शहाणपणात पुन्हा प्राण फुंकतं आणि धीर देतं..! 

‘पुस्तकं’ आणि ‘वाचन’ माणसाला कसं घडवत असतात ते लिहिण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. ७०००० इतकी भव्य ग्रंथसंपदा असलेल्या आणि दीडशे वर्षांची मोठी परंपरा असलेल्या आपटे वाचन मंदिरासारख्या ग्रंथालयाने अशी कितीतरी माणसं घडवली असतील. त्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करून ग्रंथालयाच्या कार्याला हार्दिक शुभेच्छा देते आहे. 

आसावरी काकडे
२७.४.२०२०
asavarikakade@gmail.com

(आपटे वाचन मंदिर स्मरणिकेसाठी)