Showing posts with label पुणेपोस्ट-लेख. Show all posts
Showing posts with label पुणेपोस्ट-लेख. Show all posts

Wednesday, 7 September 2016

स्त्री-पुरुष समानता : हक्क की कर्तव्य?

स्त्री-पुरुष समानतेचा विचार
काहीसा मागे पडत चालला होता.
‘चौथर्‍याच्या’ निमित्ताने तो आता पुन्हा चर्चेत आला आहे.
त्याविषयी काही मूलभूत विचार
मांडण्याचा एक प्रयत्न-


“प्रत्येक वेळी ते मला हकलत गेले आणि मी मोठी होत गेले” सिंधुताई सकपाळ यांच्या एका मुलाखतीतल्या या वाक्यानं मला अंतर्मुख केलं. वाटलं, किती खरं आहे.. बाहेरचा आधार नाहीसा होतो तेव्हाच आतून बळ मिळण्याचा मार्ग मोकळा होतो...! अंगावर आलेलं प्रत्येक संकट उद्‍ध्वस्तच करेल असं नाही. एकदा या संदर्भात मी लिहिलं होतं- ‘हर तूफान / हमेशा खत्म नहीं करता हमें / कभी कभी वह / पत्तों जैसे / उड़ाकर / पहुँचाता है वहाँ / जहाँ पहुँचने के लिए / शायद हमें / कई साल गुजारने पड़ते..!’

हा झाला जिच्यावर अन्याय केला गेला त्या व्यक्तीच्या बाबतीतला विचार. दुसर्‍या बाजूनं विचार करताना मला सतत जाणवत आलंय की अन्याय.. अत्याचार करणारा क्रूर दिसतो. सहानुभूती शोषितांकडे जाते. पण अत्याचारी मानसिकतेचं दुसरं अदृश्य टोक भेदरलेलं असतं. आक्रमणं भीतीतून जन्म घेतात. आणि विनाश हे त्यांचं भवितव्य असतं. ज्या व्यक्तीवर अन्याय होतो ती प्रत्येक व्यक्ती सिंधुताईंसारखी कर्तृत्ववान होईल असं नाही. बर्‍याच उद्‍ध्वस्त होतात. पण अन्याय करणाराचं भवितव्यही त्याहून वेगळं नसतं. त्यांच्या उद्‍ध्वस्ततेची प्रत वेगळी असते.

इतिहास आणि भूगोलाच्याही प्रत्येक टप्प्यावर स्त्रीवर अन्याय झालाय असं दिसतं. तशा नोंदी आहेत. सबळ पुरावे आहेत. पण ज्यांनी अन्याय, अत्याचार केला त्यांचं पुढं काय झालं हे कुठं नोंदवलेलं दिसत नाही. त्याकडं लक्ष जात नाही. त्यांचा फारसा विचार होत नाही. वरवर पाहता दुरून ते मस्त मजेत आहेत असं वाटतं. दूरच्यांचं माहीत नाही पण त्यांची कशी वाताहत होते याची एक-दोन उदाहरणं मला अगदी आतून जवळून माहीती आहेत... अशा एक दोन उदाहरणांवरून निष्कर्ष काढता येणार नाही. पण तर्कानं कल्पना करता येईल.. आतल्या निरामय स्वस्थतेला काही मोल असेल तर ते त्यांच्या वाट्याला कधीच येत नसेल..! अन्याय-अत्याचार करणार्‍यांचं कोणत्याही तर्‍हेनं समर्थन होऊ शकत नाही, त्यांचा सहानुभूतीनं विचार करावा असंही इथे सुचवायचं नाहीए. फक्त यावर विचार व्हावा म्हणून या बाजूकडं लक्ष वेधायचं आहे. माणूस म्हणून अधःपतन करणारी ही मानसिकता येते कुठून? तिला खतपाणी कोण घालतं? याचा उलगडा कदाचित या विचारातून होऊ शकेल...

मला वाटतं पूर्वापार चालत आलेल्या पुरुषप्रधान प्रथेत याची बीजं आहेत. तिनं पुरुषांचा अहंकार पोसला. टोकदार केला. त्याला सतत ‘पुरुष’ असणं सिद्ध करायला लावून माणूसपणापासून वंचित केलं. आतून पराभूत, घाबरलेल्या पुरुषाला या प्रथेनं मनमोकळं करण्याची, रडण्याची मुभा दिली नाही. उलट व्यसनी होण्याची मर्दुमकी गाजावण्याला प्रवृत्त केलं. स्वतःवरचा ताबा सुटलेल्या अशा बेभान अवस्थेत आक्रमकता प्रवेश करत असेल आणि अमानुष आत्याचार करण्याची मनसिकता यातून जन्म घेत असेल..! अर्थात सगळेच अशा मानसिकतेचे बळी नसतात.

समाजातील टोकाचे दुराचारी पुरुष संख्येनं कमी असतात. आम जनतेतील सामान्य पुरुष सामान्य माणसं असतात. या नजरेनं त्यांच्याकडे पाहिलं तर वेगळं दृश्य दिसेल. सामान्य ‘तो’ आतून कसा असतो त्याचं एक प्रातिनिधिक शब्दचित्र-

तो
नेहमीच नसतो तो
अत्याचारी.. वाईट चालीचा...
बातम्यांमधून दिसतो तसा

तो नसतो बेफिकीर
वाटतो तितका
खरंतर त्याला झेपत नसतं
फिकीर करणं

त्याला असायचं नसतं ‘अहंकारी’
सोपं नसतंच
भोवतीच्या टोकदार हवेत
अहंकाराचे फुगे सांभाळणं..

तो नसतो पझेसिव्ह..
मालकी हक्क गाजवणारा
खरंतर तो गरजवंत असतो
आतल्याआत

तो बलवान असतोच असं नाही
पण तसं त्याला भासवावं लागतं

तो एक माणूस असतो साधा
जन्मजात नसतो ‘पुरुषी’
त्याला तसं घडवलं जातं..!

ती नसली की
तो विस्कटून जातो घरासारखा
त्याला कळत नाही
कोणत्या डब्यात काय ठेवलंय...
त्याला आठवत नाही
आज बीपीची गोळी घेतली की नाही..

ती नसली की
त्याला सुचत नाही काय करावं ते
करण्यासारखं बरंच असूनही
तो रमत नाही टी व्ही पाहण्यात
हवं ते चॅनल लावता येत असूनही
त्याला सापडत नाही
एकही वस्तू वेळेवर..
हरवून जातो तो घरातल्या वस्तूंसारखा..!

त्याला समजू शकतो
जगाचा इतिहास..भूगोल
पण अनाकलनीय वाटतं त्याला
आपलं छोटसं घर
ती नसली की..!
***

एकाकी स्त्री असुरक्षित असते हे खरं आहे पण तिला सहानुभूती मिळते तशी एकाकी पुरुषाला मिळत नाही हेही खरं आहे. तो स्वयंसिद्ध असतो असं गृहीत धरलं जातं. मग त्याला तसं भासवावं लागतं. ही कसरत जीवघेणी असू शकते. पुरुषप्रधानतेनं लादलेल्या या पुरुषपणाच्या जबाबदारीमुळं त्याची कशी आणि किती कुचंबणा होत असेल, स्वतःला सतत सिद्ध करण्याचा त्याच्यावर किती ताण येत असेल हे लक्षात घेतलं जात नाही. स्त्री-पुरुष समतेच्या विचारात ही बाजू आता दुर्लक्षून चालणार नाही. ‘पुरुष उवाच’सारख्या काही अंकामधून ही बाजू लक्षात घेऊन प्रबोधन, अनुभवकथन अशा विविध प्रकारे सातत्यानं हा विचार मांडला जातो आहे.

एका समंजस सहअस्तित्वासाठी स्त्री-पुरुषांच्या भूमिका परस्परपूरक असायला हव्यात. त्यासाठी सुरुवातीला परिस्थितीनुरूप श्रमविभागणी केली गेली. या परिपूर्ण वाटणार्‍या श्रम-विभागणीत काळाच्या ओघात एका वादळाचं बीज पेरलं गेलं. श्रम-विभागणी झाली तेव्हा दोन्हींचं मूल्य समान असेल. दोन्हीला समान दर्जा असेल. पण काळाच्या ओघात पुरुष करत असलेल्या अर्थार्जनाला महत्त्व आलं आणि स्त्रिया करत असलेलं अनुत्पादक घरकाम दुय्यम ठरलं. त्यामुळं पुरुषाला, पुरुषी गुणांना आणि पुरुषप्रधानतेला महत्त्व आलं. तेवढ्यावर थांबलं नाही. अक्कल चुलीपुरती राहिलेली स्त्री दुय्यम झाली, ती करत असलेलं काम दुय्यम ठरलं आणि तिचे अंगभूत गूणही दुय्यम दर्जाचे झाले..!

पुढे काळाची गरज म्हणून अर्थार्जन करू लागलेल्या स्त्रिला स्वसामर्थ्याची जाणीव झाली. घराबाहेर पडल्यावर गरजेनुसार स्वतःतल्या पुरुषीपणाचं संवर्धन ती करू लागली. मात्र पुरुषाची भूमिका त्याप्रमाणात बदलली नाही. तो पुरुषच राहिला. पुरुषप्रधानता तशीच राहिली. स्वतःतल्या स्त्री-पणाचं संवर्धन करायला हवं हे त्याला स्वतःला जाणवलं नाही की पुरुषप्रधानतेनं ते जाणवू दिलं नाही. स्वसामर्थ्याची जाणीव झालेल्या स्त्रिया दुय्यमत्व नाकारून समानतेसाठी आवाज उठवू लागल्या. त्यातून स्त्री-पुरुष समानतेच्या संघर्षाला सुरुवात झाली.  

स्त्रियांना जे हक्क, ज्या सुविधा परंपरेनं नाकारल्या, ज्यामुळं त्यांचा एक व्यक्ती म्हणून विकास होण्यात अडसर निर्माण झाला अशा समानतेसाठी हा संघर्ष होत राहिला. आजपर्यंतच्या अशा संघर्षांतून स्त्रियांना बरेच हक्क मिळत गेले आहेत. त्यामुळे झालेल्या त्यांच्यातील विकासाचा आलेख नव्यानं मांडण्याची गरज नाही. सर्वच स्त्रियांचे सर्वच प्रश्न सुटलेत असं मात्र अजिबात नाही. कायद्यानं मिळालेले अधिकार प्रत्यक्ष जगण्यात मिळतातच असं नाही. त्यामुळं हा संघर्ष अजूनही चालूच आहे. पण ज्या हक्कांमुळे स्त्रियांच्या गुणात्मक जगण्यात काही फरक पडणार नाही उलट त्या काही पावलं मागंच जातील अशा समानतेसाठी संघर्ष करण्यापेक्षा समतेचा विचार वेगळ्या प्रकारे समजून घ्यायला हवा असं मला वाटतं.

स्त्री-हक्कांबरोबर बदललेल्या वर्तमानस्थितीतल्या पुरुष-कर्तव्यांचाही विचार व्हायला हवा. काळाची गरज ओळखून स्त्री-पुरुष समतेचा विचार समजून घेणारे, प्रत्यक्षात तसं वागणारे बरेच पुरुष आहेत. त्यांची संख्या वाढते आहे. पण हा बदल सहज होत नाहीए. त्यासाठी पुरुषांनाही आंतरिक आणि बाह्य संघर्षाला सामोरं जावं लागतं आहे. जे पुरुष करतात ते स्त्रिया करू लागल्या ते पुरुषप्रधानतेला स्वीकार्य झालं. अशा स्त्रियांचा सन्मान होतो तेव्हा तो एका प्रकारे पुरुषीपणाचाच सन्मान असतो. त्यातून पुरुषी कर्तृत्वाचंच महत्त्व नव्यानं अधोरेखित होतं. पण आजपर्यंत स्त्रिया पार पाडत आल्या ती ‘चूल आणि मूल’ ही जबाबदारी पुरूषांनी पार पाडली तर अशा पुरुषांचा सन्मान होत नाही. उलट बायल्या म्हणून हिणवलं जातं. त्याच्या आतही कुठेतरी कमीपणाची भावना असते. या कामाचं अनन्यसाधारण महत्त्व ओळखून याला समान दर्जा मिळणं आवश्यक आहे. स्त्री-पुरुष समतेच्या नव्या विचारात स्त्रीची पारंपरिक कामं गरजेनुसार पुरुषालाही करता यायला हवीत. पुरुषप्रधानतेनं त्यात अडसर निर्माण करू नये. या दिशेनं विचार आणि प्रत्यक्ष कृतीला काही प्रमाणात सुरुवात झाली आहे. पण याचा अधिक प्रसार होऊन हे सार्वत्रिक होणं गरजेचं आहे. 

आणखी एक मुद्दा- आंतरिक पातळीवरील स्त्री-पुरुष समतेसाठी ज्या गुणांमुळे आजवर स्त्रीत्व आणि पुरुषत्व ठरत आलं आहे त्यामधे समतोल असणं गरजेचं आहे. प्रत्येकानं खरंतर एक चांगलं माणूस या पातळीवर असायला हवं. धाडसी, ज्ञानी, कर्तृत्ववान, अहंकारी, आक्रमक, बिनधास्त, मग्रुर.. या गुणांवर आता पुरुषांची मक्तेदारी राहिलेली नाही. मात्र मार्दव, सहनशीलता, नम्रता, शालीनता, हळवेपणा, संवेदनशीलता... या स्त्रीसाठी राखीव गुणांनाही स्त्रीसारखेच दुय्यमत्व येत गेल्यामुळे या गुणांना कोणी वाली नाही अशी अवस्था दिवसेंदिवस येत चालली आहे. बायकी आणि पुरुषी या दोन्ही गुणांची समाजस्वास्थ्यासाठी सारखीच गरज आहे. त्यात समतोल असावा. श्रेष्ठ कनिष्ठ दर्जा न ठरवता एक व्यक्ती म्हणून स्वभावानुसार या गुणांची समान पातळीवर जोपासना व्हावी. स्त्री-पुरुष समतेचा विचार, संघर्ष आता या दिशेला वळायला हवा.

पुरुषालाही भीती वाटू शकते, त्यालाही रडू येऊ शकतं, तोही हळवा होऊ शकतो.. माणूस म्हणून असलेल्या या नैसर्गिक भावना पुरुषालाही व्यक्त करता यायला हव्यात. पुरुषप्रधानता याच्या आड येते. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे यातून होणार्‍या घुसमटीतून मार्ग काढण्यासाठी पुरुष व्यसनाधीन होतो. पुरुषप्रधानतेची याला मान्यता असते. त्यामुळे इतर अनेक क्षेत्रांप्रमाणे आता काही स्त्रियाही पुरुषांच्या पावलावर पाऊल टाकून व्यसनाधीन होऊ लागल्या आहेत... ‘चौथर्‍यावर’ जायला स्त्रियांना परवानगी द्यायला नको म्हणून पुरुषांनाही बंदी केली तशी भूमिका व्यसनांसारख्या अनिष्ट सवयींबाबत घ्यायला हवी. जे अयोग्य आहे ते कोणीच करू नये. जे  माणूस म्हणून विकास होण्यासाठी गरजेचं आहे ते कुवतीनुसार प्रत्येकानं करायला हवं. चिनी तत्त्ववेत्ता लाओ त्सू यानं म्हटलं आहे, A fully realized human being is one who knows the masculine and yet keeps to the feminine- स्व-रूपाची पूर्ण समज आलेली व्यक्ती पुरुषत्व जाणते आणि स्त्रीत्वही जतन करते. स्त्री-पुरुष समतेबाबत असा दृष्टिकोन देणारी माझी एक कविता-

स्त्री असण्याचा अर्थ

स्त्रीचा जन्म मिळाला म्हणून
फक्त तिनंच का पेलावं स्त्रीत्व?
कळायला हवा
पुरुषी होत चाललेल्या समाजाला
स्त्री असण्याचा अर्थ
निभवायला हवं प्रत्येकानंच
आपापल्या परीनं स्त्रीत्व

स्त्रीचा देह असणं
म्हणजे स्त्री असणं नाही
स्त्री असणं म्हणजे
सर्जक आनंदाचा शोध घेत जगणं, जगवणं
अखंड तेवती ठेवणं जिजीविषा
टिकून राहाणं तुफानी वादळातही

स्त्री असणं म्हणजे
जतन करणं अस्तित्वाचे अक्षांश-रेखांश
रोखून धरणं महायुद्धांच्या शक्यता
सर्व मूल्यांचा आधार शाबूत ठेवणं
स्त्री असणं म्हणजे
सहवेदना.. प्रेम.. तितिक्षा!
....
पुरुषही पेलू शकतो असं स्त्रीपण
जशी स्त्री निभावतेय सहज पुरुषपण!!
***
(‘स्त्री असण्याचा अर्थ’ या संग्रहातून)

आसावरी काकडे

9762209028

‘पुणेपोस्ट’ १५-३१ अॉगस्ट २०१६

Friday, 15 April 2016

सामान्य अभिरुचीची अभिजात तेढ

आज कुरियरने मला तीन ‘ग्रंथ’ आले. हे ग्रंथ म्हणजे आठ, दहा आणि छत्तीस पानी झेरॉक्स केलेली मनमुक्त लेखनाची तीन हस्तलिखितं आहेत. ‘माझे तीन ग्रंथ तुम्हाला भेट पाठवते आहे’ असा फोन करून ते पाठवणार्‍या पंचाहत्तरीच्या पुढे वय असलेल्या या बाई स्वतः शीघ्र कवयित्री असल्याचं सांगतात. कविता लिहिणे, वाचणे, कवींशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणे, दुसर्‍याचे भरभरून कौतुक करणे व करवून घेणे हा त्यांचा छंद आहे. एकटेपण ‘संपन्न’ करणारा, वृद्धत्वाचा दंश सुसह्य करणारा.. कवितेसंदर्भातली ही समज आणि असा दृष्टिकोन हे एक दृश्य...

एका पुरस्कारासाठी पहिल्या फेरीत पाच कवितासंग्रहांची निवड झाली. त्यांची नावं जाहीर झाली. मग काही दिवसांनी पुरस्कारासाठी त्यातल्या एकाची निवड झाली. मग पुरस्कार वितरण सोहळा. त्यावेळी मनोगत व्यक्त करण्यासाठी पुरस्कार-विजेत्यांना काही प्रश्न दिले होते. त्यात ‘या पुरस्कारासाठी निवडलेल्या इतर कवितासंग्रहांबद्दल तुमचं मत काय?’ असा एक प्रश्न होता. त्याचं उत्तर देताना पुरस्कार-विजेता म्हणाला, ‘इतर संग्रहांतील कवितांना मी कविताच मानत नाही’... पहिल्या फेरीत निवड केलेले कवितासंग्रह काही एका निकषावर समान दर्जाचे असणार. त्यांच्या विषयीचे हे उद्‍गार..! या उद्‍गारामधे अहंकार आहे. इतरांबद्दलची तुच्छाताही त्यातून डोकावतेय... कवितेविषयीची समज आणि दृष्टिकोन या संदर्भातलं हे दुसरं दृश्य.

अशीच दोन टोकांची आणखी दोन दृश्यं- मायाजालावर प्रसारित झालेली-

एका गावात चला हवा येऊ द्याया टी व्ही शोची टीम आली होती. खूप खचाखच गर्दी उसळली होती कार्यक्रम आणि कलाकारांना बघायला. लोकांनी खूप एन्जॉय केला म्हणे तो शो... 

त्याच गावात काही दिवसांनी चला पाणी येऊ द्याअसं नाव देता आलं असतं असा आणखी एक कार्यक्रम झाला. सुप्रसिद्ध जलतज्ञ राजेंद्र सिंह यांच्या भाषणाचा. या कार्यक्रमाला फारशी गर्दी नव्हती. जी होती तीही कर्तव्य म्हणून आल्यासारखी.

एकात केवळ करमणूक. थोडा वेळ मन रिझवणारी. दुसर्‍यात रोजच्या जगण्याचा ज्वलंत प्रश्न.. आणि त्यावरचा उपाय सांगण्यातली कळकळ.. ‘आमजनतेनं थोड्या वेळची करमणूक पसंत केली. इथे आम म्हणजे बहुसंख्य. यात सुशिक्षित-अशिक्षित, गरीब-श्रीमंत, लहान-मोठे, स्त्री-पुरुष.. सर्व आले. या आम जनतेच्या निवडीला काय म्हणायचं? रोजच्या जगण्याशी निगडित ज्वलंत प्रश्न सोडवण्याशी त्यांचा काहीच संबंध नव्हता का? की त्यासाठी आपण काही करायला हवं हे त्यांच्या गावीच नव्हतं? की निव्वळ अविचार? की हतबलता.. मख्ख थकलेपण? की भवितव्याविषयीची अनास्था... निराशा?

महत्त्वाच्या गंभीर विषयांवरची समांतर नाटकं, सिनेमे आणि फुल्ल टू धमाल नाटक-सिनेमे यांना मिळणारा प्रतिसाद असाच असतो.. घरबसल्या टी व्ही वर विनामूल्य बघता येणार्‍या कार्यक्रमांबाबतही हेच. आता तर कुठेही उभ्या उभ्या सुद्धा पाहता येतील असे अनेक पर्याय मोबाइलवर झळकत असतात. केवळ एका क्लिकनं लाइक करता येतं. तिथंही सुमार पोस्ट्सना भरपूर लाइक्स आणि ‘अभिजात’ ‘साहित्या’ला तुरळक.. हेच दृश्य आहे...

अशी अनेक उदाहरणं देता येतील. कोणतंही क्षेत्र याला अपवाद नाही. असं का घडत असेल?

फार पूर्वीपासून आभिजात साहित्य-कलांपासून आम समाजाला दूर ठेवलं गेलं. उच्च अभिरुचि ही ठराविक वर्गाची मक्तेदारी होती. एका समूहानं विचार करायचा. दुसर्‍या समूहानं राबायचं. एकानं सेवा घ्यायची, दुसर्‍यानं द्यायची. अशी व्यवस्था होती. क्रांत्या, चळवळी, प्रबोधन.. अशा मार्गांनी बरीच उलथापालथ केली. समूहांमधे सरमिसळ झाली. शहरी, उच्चभ्रू समाज आणि उच्च अभिरुची यांचं गणित बदललं. आता खेड्यातले, कष्टकरी वर्गातले काहीजण उच्च दर्जाची निर्मिती करू शकतात. उच्च अभिरुचीला प्राधान्य देऊ शकतात. उलट उच्च विद्याविभूषित असलेले काहीजण आपला विषय सोडून इतर बाबतीत सामान्य अभिरुची असणारे असू शकतात. अशी उलथापालथ झाली, विचार करणारे बदलले. तरी संख्येनं थोडेच राहिले. राबणारे बदलले, राबण्याचं स्वरूप बदललं तरी ‘आम’ जनता असा बहुसंख्यांचा समूह आहेच. पूर्वीच्या मानानं आता प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे उच्च अभिरुची जोपासण्याचं. पण त्यासाठी केवळ इच्छा असून भागत नाही. त्यासाठी आवश्यक ती समज घडवण्याची हरप्रकारची क्षमता असावी लागते. ती सगळ्यांजवळ असत नाही. शिवाय प्रत्येकाचे प्राधान्यक्रमही वेगळे असतात...

या बाबतीतला माझा एक अनुभव मला नेहमीसाठी एक समजूत देऊन गेला. बँकेत नोकरी करत होते तेव्हाची गोष्ट. कॉम्प्युटरची माहिती करून न घेता मी शिकवल्यानुसार ओळीनं सर्व कमांड्स एका कागदावर लिहून ठेवल्या. तेवढी बटणं दाबून काम व्हायचं. एक मैत्रिण म्हणाली, ‘असं काय अडाण्यासारखं करतेयस. समजून घे एकदा म्हणजे असा कागद ठेवावा लागणार नाही.’ पण मी समजून घेण्याची तसदी घेतली नाही... माझ्या प्राधान्यक्रमात तसदी घेऊन समजून घ्यावेत असे विषय वेगळे होते. बाकीच्या बाबतीत खोलात न जाता कामचलाऊ समज मला पुरेशी वाटत होती.  मनात आलं की ‘लोक एवढासुद्धा विचार कसा करत नाहीत..?’ असं म्हणून आपण लोकांना नावं ठेवतो तेव्हा हे लक्षात घ्यायला पाहिजे की प्रत्येकाच्या प्राधान्याच्या गोष्टी वेगळ्या असतात. असलेली क्षमता त्यासाठी वापरली की बाकी गोष्टी महत्त्वाच्या असल्या तरी त्या बाबतीत तेही असेच ‘निष्क्रिय’ होत असतील...

समजूत वाढवणारा आणखी एक प्रसंग... एका डॉक्टरानी मला लांबच्या क्लिनिकवर यायला लागू नये म्हणून जवळच्या हॉस्पिटलमधे ऑपरेशनच्या मधल्या काळात भेटायला बोलावलं होतं. काम काही मिनिटांचं होतं. ते झाल्यावर टेबलावरच्या पेशंटचा रिपोर्ट येईपर्यंत ते शब्दकोडं सोडवत बसले. हे दृश्यं पाहून मी चकित झाले... डॉक्टर आणि शब्दकोडं.. तेही अशा वेळी? मी अंतर्मुख झाले. विचार करत राहिले. वाटलं कुणीही सतत तणावाखाली राहू शकत नाही. उच्च अभिरुची जोपासणं ही भूमिका कायम निभावता येईल असं नाही. आतल्या ताणातून काही काळ सुटका करणारं सामान्य अभिरूचीचं हे दृश्य रूप त्या वेळपुरतं असू शकतं.. किंवा शब्दकोडं सोडवणं हे मन स्थिर ठेवण्याचं एक साधन असू शकतं. असाही विचार करता येऊ शकेल की एकाच व्यक्तिमत्वात एकाच वेळी अनेक प्रकारच्या व्यक्ती असतात. समोरासमोर ठेवलेल्या आरशातील प्रतिमांसारख्या वरून समान दिसणार्‍या पण आतून वेगवेगळ्या कार्यात गढलेल्या.. बाहेरच्या जगाला त्यातली एखादी दिसते..!

पण हे एवढ्यापुरतं मर्यादित नाही. प्रश्न असा आहे की आम जनतेच्या वाढत चाललेल्या या सामान्य अभिरुचीचं काय करायचं? त्यामागची कारणं समजून घेऊन तिचं जगण्यातलं स्थान लक्षात घ्यायचं की नावं ठेवण्यात धन्यता मानायची ?

समाजात या आम जनतेकडे पाहणारे तीन मुख्य घटक आहेत. एक बुद्धीवादी... तथाकथित उच्च अभिरुचीवाला, दुसरा उद्योजक आणि तिसरा राजकारणी.. यापैकी पहिला घटक सामान्य अभिरुचीला नामोहरम करण्यात धन्यता मानत असतो. मध्यमवर्गीय अभिरुचीही त्यांना मान्य नसते. प्रचंड गर्दी, तुफान लोकप्रियता असेल ते सर्व त्यांच्या मते दुय्यम तिय्यम दर्जाचं असतं. सुरुवातीला दिलेलं कवीचं उत्तर या संदर्भात पुरेसं बोलकं आहे. या उलट दुसरे दोन घटक या सामान्य अभिरुचीचा भरपूर फायदा करून घेतात. ती बदलण्याऐवजी जोपासण्याचाच प्रयत्न करतात. कारण विचार न करणार्‍यांची त्यांना गरज असते. सोप्या, फुकट गोष्टींमधे गुंतवून विचारांपासून दूर ठेवण्याचं काम त्यांच्याकडून सातत्यानं केलं जातं. आयुष्यातल्या वर्तमान क्षणाचा आनंद भरभरून घेण्याच्या मानसिकतेचं वेगवेगळ्याप्रकारे असं काही ग्लोरिफिकेशन केलं जातं की विचार करू शकणार्‍यांनाही गिल्टी वाटावं...!

दुसरा प्रश्न असा की सामान्य कुवतीच्या निर्मितीचं काय करायचं? सुरुवातीच्या उदाहरणातील ज्येष्ठ बाईंच्या ग्रंथांना मी काय अभिप्राय देऊ? अशी असंख्य गवताची पाती कौतुकाच्या दोन थेंबांसाठी आसुसलेली असतात. त्यांना उमेद द्यायची की समीक्षेचे निकष लावून त्यांच्या हातातलं त्यांच्यापुरतं असलेलं आनंदनिधान काढून घ्यायचं? ‘निर्मिती’च्या कलागुणाला महत्त्व द्यायचं की त्यातून मिळणार्‍या एकाकीपणातल्या ‘सोबती’ला जिवंत ठेवायचं? अशा वेळी ज्ञानेश्वरांच्या
‘राजहंसाचे चालणे । भूतळी जालिया शाहाणे । आणिके काय कोणे । चालावेचिना ॥१७१३/१८’
या ओवीचा आधार वाटतो. श्रेष्ठ साहित्याची निर्मिती करण्याची कुवत सगळ्यांमधे नसते. पण म्हणून त्यांनी आपल्या कुवतीनुसार काही लिहूच नये का? अवश्य लिहावं... अर्थात योग्य वेळी केलेली टीका एखाद्याला अधिक चांगल्या निर्मितीचा मार्ग दाखवू शकते. प्रतिसाद देताना हे तारतम्य ठेवायला हवंच..

एका बाजूला सामान्य अभिरुचीचा असा पेच तर दुसर्‍या बाजूला उच्च अभिरुचीचा न सुटणारा तिढा.
 
सामान्य अभिरुचीच्या बहुसंख्येच्या गराड्यात लोकमानसात रुजलेल्या शैलीपेक्षा वेगळं, वेगळा विचार देणारं काही लिहू-करू पाहणार्‍याच्या वाट्याला काहीशी उपेक्षा येत असते. ‘समांतर’ नाटक, सिनेमांकडे ‘आम’ रसिक प्रेक्षक वळत नाहीत. कोणतीही कला आस्वादायची तर ती मुळात समजावी लागते. नव्या शैलीतील नवी निर्मिती पचनी पडायाला वेळ लागतो. कालांतरानं त्याचं स्वागत होतं. पण ते त्याच्या हयातीतच होईल याची शाश्वती नाही. कित्येक जगद्विख्यात कलाकारांच्या कलेची दखल त्यांच्या मृत्युनंतर घेतली गेली... अभिरुचीबाबतची ही तेढ आजची नाही. अभिजात साहित्याच्या काळापासूनची आहे...

शृंगार, हास्य, वीररसप्रधान नाटकांच्या परंपरेत करुण रसहाच प्रधान रस आहे असं प्रतिपादन करून लिहिणारा भवभूती हा त्या काळातला एकमेव नाटककार होता. ‘मालती माधवया नाटकात त्यानं म्हटलंय-

ये नाम केचिदेह नः प्रथयंन्त्यवज्ञा
जान्तुते किमपि तान्प्रति यत्नः ॥
उत्पत्स्येsस्ति मम कोsपि समान धर्मा                    
कालोह्ययं निरवधिर्विपुलाच पृथ्वी ॥
 भवभूती (मालती माधव)

(माझ्याविषयी जे कोणी अनादर पसरवत असतील त्यांनी हे लक्षात घ्यावे की माझे लेखन त्यांच्यासाठी नाहीच. ‘समानधर्माकोणी आज नसेल तर तो पुढे जन्माला येईल. काळ अनंत आहे आणि पथ्वी विस्तीर्ण आहे.) कदर करणारा समानधर्मी न भेटल्यामुळे भवभूतीलाही असे उद्‍गार काढावे लागले..!
 
जगण्याकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन देणार्‍या, नव्या, अपारंपरिक शैलीतील कलाकृतीचं स्वागत व्हायला हवं, तिला रसिकवर्ग मिळायला हवा. त्याच बरोबर सामान्य निर्मितीचे अंकुरही उगवू द्यायला हवेत. एखाद्या अंकुरात महावृक्ष होण्याची शक्यता असते. हे तर आहेच पण सामान्य क्षमतेच्या निर्मितीतही समाजाचं स्वास्थ्य टिकवण्याची क्षमता असते हे समजून घेत तिला तिच्या क्षमतेत जगू द्यावे. श्रेष्ठ कलाकृतीची उपेक्षा नको आणि सामान्य निर्मितीच्या वाट्याला तुच्छता नको..!

बहुस्तरीय समाजात श्रेष्ठ आणि सामान्य यांची सांगड घालणं महत्त्वाचं असतं. सर्वसामान्य प्रेक्षकाची समज आणि अभिरुची लक्षात घेणं ही काही आजची गरज नाही. वेगवेगळ्या प्रकारे हे पूर्वापार चालत आलं आहे. सर्व थरातल्या लोकांना नाटक, सिनेमा आवडावा म्हणून पूर्वीही एखादं विनोदी पात्र आणि त्या भोवतीचं कथानक घातलं जायचं.. आता फरक एवढाच झालाय की विनोदाच्या वेष्टनातून एखादा गंभीर विचार देण्याची प्रथा पडू लागलीय..!

आसावरी काकडे
9762209028

‘पुणेपोस्ट’ १४ एप्रिल २०१६ अंकात प्रकाशित

Tuesday, 1 March 2016

ये पबलिक है...!

‘कुठून तरी कुठे तरी एकसारखी
निमूट धावतेय ही गर्दी...
केव्हाही काहीही होईल
अशी मनाची तयारी असलेली
स्वस्थता आहे तिच्या गतीला
एक लय आहे अनाकलनीय झिंग असलेली
प्रत्येक माणूस, इमारती, दुकानं, रस्ते.. सगळंच
वापरून वापरून
जुनं मोडकळीला आल्यासारखं
तरी मेकअप करून चालू पडलेलं...

जागोजाग मोठमोठी होर्डींग्ज
राज्यकर्त्यांच्या हसर्‍या चेहर्‍यांची
कुठेही कशीही सांडलेली.. वाहणारी त्यांची जनता..
तिनं काय करावं या चेहर्‍यांचं?
त्यांनी काय करावं
या बेढब वाढलेल्या जनतेचं?

प्रत्येक प्रश्नापुढे हतबलतेचा पूर्णविराम !
अशा जगण्याची लाज वाटायलाही
उसंत नाही कोणाला !
माहीत नसलेली वेळ फीड केलेल्या
टाईमबॉम्बसच्या रस्त्यावरून
धावतायत सगळी...
त्याची टिक् टिक् ऐकू येऊ नये म्हणून
ढोल वाजवतायत जीव खाऊन
फटाक्यांच्या माळा फोडतायत
लाऊडस्पीकर्सच्या भिंती उभ्या करून
बेसूर गाणी आदळवतायत
केविलवाण्या छात्यांवर
कुणाला काही दिसू नये
म्हणून रोषणाई करतायत जागोजाग
बधीर होत चाललेल्या मनांवर
प्रदूषणांचा वज्रलेप लावतायत..!

क्षितिजाला तडा जाईल
असा आक्रोश करावा म्हणून
बेंबीच्या देठापासून उसळलेला आवेश ओसरतोय
कपाळावर आठी उमटवून जेमतेम..!
अशा आठ्यांचे खांब दुभंगून
कधी प्रकटतील माणसामाणसातले नरसींह?

बर्‍याच वेळा अशी हतबल उद्विग्न अवस्था आपण अनुभवतो. विचार करत राहतो. प्रश्न निरुत्तर करणारे असले तरी उपाय शोधत राहतो. पण डेड एंड लागला की उलट वळावंच लागतं.. अशावेळी कुठे कुठे वाचलेले विचार वेगळी दिशा दाखवतात. पाश्चात्य तत्त्वज्ञ डेरिडा यांनी केंद्र आणि परीघ ही विचार करण्याची साचेबद्ध पद्धती बदलून ‘Deconstruction’ या नव्या विचारसरणीची मांडणी केली. त्यानुसार खरं आकलन व्हायला हवं असेल तर केवळ केंद्रबिंदूतूनच नाही तर परीघावरच्या प्रत्येक बिंदूतून आपण वास्तवाकडं पाहायला हवं. बिंदू बदलला की चित्र बदलतं, अन्वयार्थ बदलतो. आकलन बदलतं आणि मग आपली प्रतिक्रियाही बदलते. पूर्वी केव्हातरी वाचलेल्या या शहाणपणाचा आधार घेत उलट दिशेनं विचार करत पांढरपेशी मनांचा हा आक्रोश तपासून पाहायला सुरुवात केली तशी रोजच्या जगण्यातल्या साध्याशाच अनुभवांतून सामान्य जनतेकडे पाहण्याची एक नवी अंतर्दृष्टी मिळू लागली. त्यातले दोन-तीन अनुभव असे-

रात्री साडेदहा-अकराचा सुमार. रिक्षातून एकटी घरी येत होते. मनात धाकधुक होती. पण नवरात्रीचे दिवस होते. रस्ते गजबजलेले. जागोजागी रोषणाई. जोगवा... आरत्या, ‘आईची’ गाणी लागलेली.. नकळत या माहौलची सोबत वाटली. घरात बसून महत्त्वाचं काही वाचत असताना ज्याचा त्रास वाटतो, चिडचिड होते तेच आता माझी सोबत करत होतं. मी वेगळी, दूर नव्हते. त्या गर्दीचा एक भाग झाले होते. ‘आईचा जोगवा.. जोगवा मागेन..’ची लय आवडत होती. त्यातला आशयही लक्ष वेधत होता. समजून घ्यावासा वाटत होता... घर कधी आलं कळलंही नाही. गर्दीनं बोट धरून सुखरूप घरी आणून सोडलंय असं वाटलं...

चार घरी धुणं-भांडी करून संसार चालवणार्‍या बाईंनी साठी ओलांडलीय. चांगली साडी, मॅचिंग ब्लाऊज, पांढर्‍या छटा डायने झाकलेले लांबसडक केस, पायात साखळ्या, कानात तीन ठिकाणी काय काय घातलेलं, मोठी टिकली, हातात गळ्यात सर्व जागच्या जागी... अशा त्या रोज येतात कामावर. आग्रहपूर्वक घरी बोलावलं म्हणून एकदा गेले हळदीकुंकवाला. जातानाचा कमालीचा अरुंद रस्ता.. त्यावरून वाहणारा ओला-सुका कचरा सहन करत, लागून लागून असलेल्या घरांमधून वाट काढत, मनात अस्वस्थ होत त्यांच्या घरी पोचले. या बकाल भवतालात बाईंचं एका खोलीचं गजबजलेलं घर. चार ठिकाणहून उसने पैसे घेऊन नुकतंच रिनोव्हेट करून घेतलेलं. चकाचक टाईल्स, ओटा.. लखलखित घासून आरास करावी तशी मांडलेली भांडी.. आणि अर्धे घर भरून गौरीची आरास. सुंदर मुखवटे.. भरपूर दागिने.. फराळाचे भरपूर पदार्थ.. मोठा तेलाचा दिवा.. स्वतः बाई सजलेल्या..! नऊ दिवसांचे उपास, भरपूर कष्ट आणि खर्च करून उत्सव साजरा करत होत्या. थकलेल्या.. सुकलेल्या चेहर्‍यावरच्या दाटीवाटीत समाधानही ओसंडत असल्याचं जाणवलं. जगण्यातले सर्व प्राधान्य क्रम बाजूला ठेवून हे सर्व करण्यातली निष्ठा अनाकलनीय वाटली... घर लहान पण जगण्याची उमेद त्याहून कितीतरी मोठी..! त्यांच्या मानानं मोठ्या असलेल्या घरी परतताना यावर विचार होत राहिला...

दूरदर्शनवरचं एक दृश्य- टीम इंडियाची विजययात्रा चाललीय. त्यांना राजतिलक केलाय. चक दे इंडियाच्या तालावर नाचतायत सगळी. पाऊस कोसळतोय. आणि हजारो सामान्य लोक जल्लोष करतायत. विजयरथाच्या बाजूनं धावत.. फूटपाथवर, इमारतींवर उभं राहून.. खेळाडूंवर फुलांचा वर्षाव होतोय.. स्तुतीचा आणि बक्षिसांचाही...! टीम इंडियानं पहिला T 20 World Cup जिंकला तेव्हाचं दूरदर्शनवरचं हे दृश्य... पाहताना मनात आलं, या प्रचंड गर्दीतल्या, विजयरथाच्या दोन्ही बाजूनं धावणार्‍या सामान्य माणसाचं मन या क्षणी किती निर्मळ असेल.. ‘स्व’तून उठून देशाला विजय मिळवून देणार्‍यांचं निखळ, उत्स्फूर्त कौतुक करण्याइतकं मोठं झालं असेल..!

पण ‘या क्षणात’ जगणारी हीच जनता याविरुद्ध स्थितीत एखाद्या व्यक्तीची प्रेतयात्रा काढते.. पुतळ्याचं दहन करते.. तोंडाला काळं फासते.. घरं, दुकानं फोडते..!.. रोजच्या जगण्यातही सहज जातायेता रस्त्यावर थुंकणारी.. रहदारीचे नियम मोडणारी.. सहज शिव्या देणारी.. क्षुल्लक कारणानं हमरीतुमरीवर येणारी, कोणत्याही कारणास्तव रस्त्यावर उतरणारी ही जनता..! आपण स्वतःला यांच्यापासून वेगळं न काढता त्यांच्यात मिसळून गेलं तर रागराग न करता या लोकांच्या असण्याकडं आपण सकारत्मक नजरेनं पाहू शकतो... हे वरच्या काही अनुभवांतून आणि विचारांतून जाणवत गेलं. वेड्यावाकड्या तर्‍हेनं का होईना पण जगण्याचा उत्सव साजरा करत राहतात हे लोक. हल्ली बरेचदा मनात येतं, यांच्याशिवाय सगळं वातावरण कसं सुनं सुनं होऊन जाईल..! माझ्या एका हिंदी कवितेत हा भाव व्यक्त झालाय. त्यातल्या शेवटच्या ओळी अशा-

‘...आतंकी हमला हो / बाढ़ का कहर हो / सूखे का संकट हो / या / किसी बीमारी की / दहशत फैली हो.. / वे रुकते नहीं हैं घरों में / कैसी भी हो / उसी जिंदगी का / हाथ थामे / चलते ही रहते हैं / गाते.. नाचते.. चिल्लाते../ किसी न किसी प्रकार / शोर मचाते रहते हैं.. / कभी सन्नाटा छाने नहीं देते !/ जिन्दगी को / वीरान होने नहीं देते..! / वे सोचते नहीं हैं कुछ / इसीलिए शायद..!

या जनतेकडे वेगवेगळ्या तर्‍हेनं हळूहळू सर्वांचंच लक्ष वेधतं आहे. राजकारणी लोक तर मतांसाठी यांना नेहमी गोंजारत असतातच. आता चॅनल्सवालेही टीआरपीसाठी यांना सामावून घेणारे कार्यक्रम करत असतात तर व्यापारी-उद्योजक यांना ग्राहक बनवण्यासाठी धडपडत असतात. जाहिरातींमधे सेलिब्रेटी चेहर्‍यांच्या जोडीला आता आम चेहरे येऊ लागले आहेत. ‘सर, हे माझे बाबा आहेत’ असं सांगत आय.टी.मधल्या नोकरीसाठी आलेली कडक कपड्यातली रिक्षावाल्याची मुलगी आठवून पाहा... या सगळ्यामधे अर्थातच स्वार्थ आहे. त्यांची दखल त्यांना समजून घेण्यासाठी घेतली जात नाहीय...

उदात्त हेतूनं समाजकार्य करणार्‍या महनीय व्यक्ती त्यांचे व्यवहारी प्रश्न जाणून त्यांना माणूस म्हणून जगता यावं, मुख्य प्रवाहात सामावता यावं म्हणून प्रयत्नशील असतात.. पण या सगळ्याच्या पलिकडे जाऊन एकूण समाजातील असंख्यांच्या असण्याचा विचार करता येण्यासारखा आहे. ही असंख्य माणसं म्हणजे एक रेटा असतो सत्‍प्रवृत्ती किंवा दुष्प्रवृत्तीला बळ पुरवणारा. ‘प्रॉफेट’ या पुस्तकात खलील जिब्रान यांनी असं म्हटलं आहे की समाजातल्या प्रत्येकात जे उच्चतम असतं त्याहून अधिक उंच ‘महात्मा’ही जाऊ शकत नाही आणि प्रत्येकात जे हीन असतं त्याहून हीन क्रूरकर्माही होऊ शकत नाही. ‘And as a single leaf turns not yellow but with the silent knowledge of the whole tree.. So the wrong-doer cannot do wrong without the hidden will of you all..’ एखाद्या मिरवणूकीसारखे आपण सर्व एकत्रच जात असतो. एका खोल अर्थानं चांगल्या-वाईटाचं श्रेय-अपश्रेय सगळ्यांना जातं.

एकूणएक असण्याचा एकत्रित विचार केला तर असंही लक्षात येतं की वेगळं काढून पाहिल्यावर बेढब, विस्कटलेलं दिसणारं चित्र मोठ्या चित्राचा तोल सावरणारा महत्त्वाचा भाग असू शकतं. जीवो जीवस्य जीवनम् हा न्याय इथेही लागू होण्यासारखा आहे. I am because we are. फक्त व्यावहारिक गरजांपुरतं नाही तर तत्त्वतःच आपण एकटे अर्थपूर्ण असू शकत नाही.

अर्थपूर्ण जगण्याचा बडेजाव माजवत ‘अन्न वस्त्र निवारा’चा परीघ ओलांडून उन्नत जगण्याचा प्रयत्न करणारे तथाकथित बुद्धिवादी पांढरपेशे लोक एकप्रकारे कृत्रिम, वरवरचं जगत असतात..! चर्चा करत राहतात. व्याख्या करतात. ‘रेसिपी’ लिहित राहतात. सामान्य गरीब जनता विचार करत नाही. पण थेट जगण्याच्या जवळ असते. दयामरणासारखे प्रश्न त्यांना पडत नाहीत कारण जगवण्याचे कृत्रिम उपाय त्यांना परवडतच नाहीत. कित्येक भुका ते बिनबोभाट भागवून घेतात. सामाजिक मान्यतेची वाट पाहत नाहीत...

वृत्तपत्र आणि दूरदर्शनवरच्या बातम्यांमधून समोर येणारं वास्तव इतकं भयानक असूनही अजून त्यातल्या त्यात बरं दृश्य दिसतं आहे ते या जनतेमुळं. यांच्यातल्या जिजीविषेमुळं. आपल्याला रोज भेटणारी यांच्यातलीच राबणारी मुलं माझ्या एका कवितेचा विषय झालीयत-

‘ही पेपर टाकणारी
दूध घालणारी
गाड्या पुसणारी मुलं...
भिरभिरत असतात पहाटेपासून
त्यांच्या पायांना असतात भिंगर्‍या
आणि हात सुकाणूंसारखे
वळवत राहतात त्यांचा दिवस

त्यांच्या डोळ्यांत
नसतात अश्रू अगतिक
नसते आग विद्वेषाची
नसतो लाचार स्वाभिमान
त्यांचा रक्तदाब
होत नाही वर-खाली
निमुट धडधडत राहतं त्यांचं हृदय
जगण्याच्या अरूंद रस्त्यांवरून चालताना

दुतर्फा पसरलेले
यच्चयावत् अन्याय... भ्रष्टाचार
दंगली... तोडफोड...
वेगवेगळ्या रंगांच्या दहशती
किंवा रिअॅलिटी शोजचे अनावर उन्माद
त्यांना बिथरवत नाहीत(?)

आपली सकाळ सुरु करून देणारी
ही प्रातःस्मरणीय मुलं...!

ही पृथ्वी
केवळ गुरुत्वाकर्षणाच्या
आधारावर नाही
यांच्या अविचल जिजीविषेवर
उभी आहे तोल सावरत !
***

आसावरी काकडे
9762209028

‘पुणेपोस्ट’ फेब्रुवारी-मार्च २०१६ अंकात प्रकाशित