Thursday 18 March 2021

एक निस्पृह समर्पण..

 

कालौघात प्रत्येक कालखंडाचा चेहरामोहरा, स्वभाव बदलत असतो. आताची पीढी बहुतांशी करीअरचा विचार करणारी आहे. आताच्या एकूण वातावरणाचा पगडाच असा की किमान राहाणीमानही फार खर्चिक झाले आहे. जुन्या काळात ज्या गोष्टी अनावश्यक, चैनीच्या किंवा हवं असण्याच्या कक्षेतही येत नव्हत्या त्या आता गरजेच्या होऊन बसल्या आहेत. त्यामुळे दोघांनी कमावणं ही आवश्यक बाब झाली आहे. तीस चाळीस वर्षांपूर्वीही दोघांनी नोकरी करण्याची प्रथा होती. पण त्यावेळी तरुण पीढीवर आदर्शवादी विचारसरणीचा पगडा टिकून होता. ‘साधी राहाणी उच्च विचारसरणी’ अशी वाक्यं मोडीत निघालेली नव्हती. पण तेव्हाही विरळा असणारा एक निर्णय घेऊन तो आजपर्यंत निभावणार्‍या मंजुश्री आणि अरविंद पित्रे या जोडप्याची कहाणी समजून घेण्यासारखी आहे.

विशेष म्हणजे मंजुश्री आणि अरविंद पित्रे आमचे अनेक वर्षांपासूनचे सख्खे शेजारी. यांच्या विषयी विचार करताना मला नाट्यछटाकार दिवाकर यांच्या ‘जिवंत जोडपी’ या संवादाची आठवण झाली. दिवाकर यांच्या समग्र साहित्यात ‘मी माझ्याशी’ असा आत्मसंवाद असलेला एक साहित्यप्रकार आहे. त्यात हा स्व-संवाद आहे. आयुष्याबाबत सजग असणं, स्वतःचं असं काही ध्येय असणं, भोवतीच्या समाजाचा विचार करणं, त्यासाठी काही करणं... म्हणजे माणूस म्हणून जिवंत असणं. पूर्वीच्या काळी या अर्थानं फक्त पुरुषांनाच जिवंत राहता येत असे. दिवाकरांच्या कल्पनेतलं जिवंत जोडपं म्हणजे पती-पत्नी दोघं ‘जिवंत’ असणं. पित्रे पती-पत्नी हे असं ‘जिवंत जोडपं’ आहे.

१९७९ साली आंतरजातीय विवाह करून दोघं प्रत्यक्षात एकत्र आले. त्या आधी जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि विचार जुळण्यातून ते एकत्र आलेलेच होते. श्री पित्रे यांची बहीण मूक-बधीर आहे. घरातल्या एका उदाहरणातून त्यांना कामाची प्रेरणा मिळाली. पार्ले येथील सिरुर बालकाश्रमात मुलांना शिकवण्याच्या छोट्या कामापासून ‘स्व’पलिकडले विचार कृतीत आणण्याला सुरुवात झाली. प्रत्येक काम पुढची गरज लक्षात आणून देणारे होते. अपंगांना सन्मानानं जगता येण्यासाठी रोजगार उपलब्ध हवेत. त्यासाठी त्यांनी सक्षम व्हावं म्हणून प्रशिक्षणाची गरज लक्षात आली. हे सर्व अपेक्षेनुसार सरकारी पातळीवर होण्याला मर्यादा होत्या. त्यातून स्वतःची संस्था स्थापन करण्याची गरज पुढे आली. पण दोघांनी नोकरी करून संस्थात्मक काम करणं अशक्य आहे हे लक्षात आल्यावर मंजूश्रीनं एक जबाबदारीचा धाडसी निर्णय घेतला, तो म्हणजे तिनं नोकरी करून घर सांभाळायचं आणि पित्रे यांनी पूर्ण वेळ संस्थेचं काम करायचं. एका मध्यमवर्गीय कुटुंबासाठी हा निर्णय सोपा नव्हता. पण अनेक समस्या आणि आंतरिक संघर्षाला तोंड देत त्यांनी तो आजपर्यंत निभावला आहे. या संदर्भात १९५३ साली सी. डी. देशमुख आणि दुर्गाबाई देशमुख या सन्माननीय दांपत्यानं दिल्ली इथं मोठ्या पदांवर कार्यरत असताना दोघांपैकी एकानं पूर्णवेळ राष्ट्रकार्य करायचं आणि एकानंच उदरनिर्वाहासाठी वेतन घायचं असा निर्णय घेऊन तो अनेक वर्षे आमलात आणला होता याची आठवण झाली. 

चाळीस वर्षांपूर्वीच्या त्या कालखंडात अनेक ध्येयवादी तरूण बाबा आमटे यांच्या आनंदवनाकडे आकर्षिले जायचे. तिथल्या कामाच्या दर्शनानं भारावून जायचे. समाजकार्याच्या ओढीनं पित्रे पती-पत्नी पण आनंदवनात दाखल झाले. बाबांचं कार्य आणि बोलणं दोन्ही प्रेरणादायी असायचं. कार्यकर्त्यांसमोर बोलताना बाबा एकदा म्हणाले, ‘सर्वांनी इथं आनंदवनातच येऊन काम केलं पाहिजे असं नाही. आनंदवन ही एक प्रवृत्ती आहे. इथं येऊन ती घेऊन जावी आणि प्रत्येकानं आपापल्या कार्यक्षेत्रात आनंदवनं तयार करावित.’ हे वाक्य त्यांच्या मनावर कोरलं गेलं. आणि ‘हिमालयाची लहानशी प्रतिकृती’ होण्याच्या ध्यासानं ते कामाला लागले.

रूढ कौटुंबिक चौकट मोडणार्‍यांना पदोपदी समाजाच्या टीकेला तोंड द्यावंच लागतं. वेगळं काही करू पाहणार्‍याला प्रोत्साहन देण्याऐवजी भोवतीचा समाज कधी टोमणे मारून, कधी थेट तोंडावर बोलून, कधी दुर्लक्ष करून नामोहरम करण्याचा प्रयत्न करत असतो. श्री पित्रे यांच्यापेक्षाही मंजुश्रीला घरातल्या, बाहेरच्या अशा टीकेला तोंड द्यावं लागलं. आम्ही १९८९ पासून शेजारी राहातो आहे. एक प्रसंग आठवतो. पित्रे यांच्या आईचे निधन झाले. त्यावेळी ते किल्लारी येथील भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या कामानिमित्त तिकडे गेले होते. जमलेल्या नातेवाईकांनी त्यांच्या अनुपस्थितीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यावेळी एकटीवर पडलेल्या सगळ्या कामांपेक्षा प्रत्येकाच्या प्रश्नांना, टीकेला तोंड देणं मंजूसाठी अधिक क्लेषकारक झालं असणार. आम्ही दोघी एकाच बँकेत असल्यामुळे बँकेत जाता येता बोलणं होत राहिलं. पण २००२ साली मंजूची बदली गोव्यात झाली. त्यानंतर निवृत्त होईपर्यंत, म्हणजे वीस वर्षे पित्रे कुटुंबाचं वास्तव्य तिथंच होतं. त्यामुळं तिथल्या त्यांच्या रोजच्या जीवन-शैलीविषयी फारसं समजेनासं झालं. आता तिच्याविषयी लिहिताना जाणवतंय की स्वतःच्या कामाविषयी, त्यातील संघर्षांविषयी ती कधीच काही बोललेली नाहीए. जे थोडंफार समजलं ते पित्रे यांच्याकडूनच.

नवर्‍यानं नोकरी करणं आणि बायकोनं घर सांभाळणं ही पारंपरिक रूढ पद्धत. गरज म्हणून दोघं नोकरी करायला लागल्यावर अशा जोडीला डबल इंजिन असा आहेर मिळायचा. पण फक्त बायकोनं कमवायचं, घराची जबाबदारी सांभाळायची आणि नवर्‍यानं ‘समाजकार्य’ म्हणजे लोकांच्या मते लष्करच्या भाकर्‍या भाजायच्या... हे पचायला जरा कठीणच. मग त्यांना ‘तुम्ही हुंडा घेतला नाही म्हणून शेखी मिरवता पण बायकोकडून दर महा पगाररूपी हुंडा मिळतोच आहे की’ अशा प्रकारचे आहेर मिळायचे. पण त्यांनी आपणहोऊन ठरवून ही जीवनशैली स्विकारलेली होती त्यामुळे कितीही टीका झाली तरी ते मागे हटले नाहीत.

मंजुश्रीच्या वेगळेपणाविषयी लिहायचं तर तिची मुलाखत घेणं हा थेट आणि चांगला मार्ग आहे. पण याविषयी तिला बोलतं करणं अवघड आहे. त्यामुळं हे लिहिण्यासाठी पूर्वी इतरत्र झालेल्या एका मुलाखतीत तिनं दिलेल्या त्रोटक उत्तरांचा आधार घ्यावा लागला. तरूण वयात प्रत्येकालाच वेगळं काही करायची उमेद असते. पण त्यासाठी लागणारी जिद्द, निष्ठा आणि कष्ट करण्याची सगळ्यांची तयारी नसते. मंजूकडे हे गुण होते. समविचारी जोडीदार मिळाल्यामुळं वेगळं काही करण्याची उमेद टिकून राहिली. सुरुवातीला अर्थातच कामाचं स्वरूप, दिशा असं काही ठरलेलं नव्हतं. पण सुरुवातीला उल्लेख केला त्यानुसार एकातून एक काम पुढे उभं राहिलं, नवी दिशा मिळत गेली. कामांच्या गरजेतून त्यांनी ‘अरुण मंगल सेवा विकास योजना’ ही संस्था सुरू केली. या संस्थेमार्फत वेगवेगळ्या पातळ्यांवर कार्य उभे राहात गेले... दादर अंधशाळेत साकारलेले विविध प्रकल्प, अंध, मूकबधीर, गतीमंद मुलांसाठी शाळा चालवणे, कर्नाटक हेल्थ इन्स्टीट्यूट व अन्य केंद्रांमधे जयपूर फूट योजना राबवणे, अनेक उपक्रमांमधे अपंगांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण देणे, कोणतंही पद न स्विकारता, काही अपेक्षा न ठेवता वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करणार्‍या संस्थांना आर्थिक आणि कृतीशील सहकार्य करणे अशी बरीच कामं श्री पित्रे यांनी त्यांच्या संस्थेमार्फत केली. ही कामं करताना भेटलेल्या महनीय व्यक्ती आणि कार्यकर्ते यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करणारे ‘सेवार्थ’ हे छोटेसे पुस्तक त्यांनी अलिकडेच लिहिले आहे. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत प्रा डॉ. दया भोर-जेठ यांनी पित्रे यांच्या कामाबद्दल म्हटले आहे, ‘अरविंद यांचे कार्य अपंग आणि दिव्यांग पुनर्वसनाच्या क्षेत्रातले आहे. दिव्यांगांमधील रोजगार कौशल्य आणि उद्योजकता विकास हा त्यांच्या कार्याचा आत्मा आहे. भारतातील अपंगांचा स्व-मालकीचा पहिला कारखाना उभारण्याचे श्रेय त्यांच्या अरुण मंगल सेवा विकास योजना या संस्थेला जाते.’

बाबा आमटे यांच्या प्रेरणेतून सुरू झालेले गेल्या चार दशकांचे आपल्या  संस्थेच्या कामांचा प्रवाह श्री पित्रे यांनी अहमदनगर येथील गिरिश कुलकर्णी यांच्या स्नेहालयातील अनामप्रेम संस्थेच्या विशाल प्रवाहाशी अलिकडेच विचारपूर्वक एकरूप करून टाकला आहे. निस्पृहपणे असं ‘नामा’निराळं होत आजवरच्या धावपळीतून ‘निवृत्त’ होण्याची ही कृती कौतुकास्पद आहे.

दीर्घ कालावधीतील या सर्व कामात आणि वेळोवेळीच्या अशा महत्त्वाच्या निर्णयात मंजूचा सहभाग अदृश्य स्वरूपाचा पण महत्त्वाचा होता. अर्थार्जन करून घराची पूर्ण जबाबदारी सांभाळून श्री पित्रे यांना कामासाठी पूर्ण मोकळीक देणं आणि त्यांच्या कामात कशालाही विरोध न करणं अशी तिची भूमिका होती. सासू सासरे यांची वृद्धापकाळी सेवा, मूकबधीर नणंदेची जबाबदारी, दोन मुलांचे पूर्ण संगोपन, सासर-माहेरचे नातेवाईक, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांचा घरातला राबता.. अशा अनेक अघाड्या सांभाळण्याची कसरत मंजूनं केली. ती करताना आर्थिक जबाबदारी, शारिरीक कष्ट यापेक्षा अवघड काम होतं ते म्हणजे आपला वेगळा विचार सगळ्यांना पटवून देणं. यामधे तिची मानसिक शक्ती पणाला लागली असेल. श्री पित्रे कामानिमित्त सतत बाहेर असल्यामुळे वेळोवेळी या सगळ्यांकडून विचारल्या जाणार्‍या अडचणीच्या प्रश्नांना मंजूला तोंड द्यावं लागलं. त्यापेक्षा अवघड होतं वाढत्या वयातील मुलांच्या समस्या सोडवणं. आई-वडलांच्या रूढ चौकटीपेक्षा वेगळ्या जीवन-शैलीविषयी मुलांना त्यांचे मित्र-मैत्रिणी विचारत असतील त्याबद्दल मुलांनी व्यक्त केलेल्या नाराजीला तोंड देणं, त्यांना समजावून सांगणं.. हे तसं किरकोळ वाटणारं पण मानसिक क्लेष वाढवणारं काम होतं. अशा वेळी पती-पत्नी नात्यातले ताणही वाढू शकतात. हे सर्व नेटानं आणि जिद्दीनं निभावणं सोपं नाही. पण आपण काही विशेष केलं असं ती कधीच बोलून दाखवत नाही. उलट नोकरी आणि घर या दोन आघाड्या सांभाळताना पित्रे यांच्या कामांमधे तिला प्रत्यक्ष सहभाग फार देता आला नाही, संसाराच्या चाकोरीतच अडकावं लागलं अशी खंतच कधी कधी तिला वाटते. श्री पित्रे मात्र आपल्या प्रत्येक मनोगतात मंजुश्रीविषयीच्या कृतज्ञतेची भावना ‘मंजुश्रीची साथ नसती तर या अग्नीपथावर मी टिकलो नसतो..’ अशा शब्दात व्यक्त करत असतात.

‘अरुण मंगल सेवा विकास योजना’ या त्यांच्या संस्थेचं काम काय काय वळणं घेत चालू राहिलं, त्यातून काय काय साध्य झालं, संस्थात्मक कार्याचे, भेटलेल्या लहान-थोर माणसांचे बहुविध अनुभव कसे आले, कोणत्या आर्थिक, सामाजिक, नात्यातल्या संघर्षांना तोंड द्यावं लागलं... या संदर्भात श्री पित्रे यांनी सहाशे पानी कादंबरीच्या स्वरूपात ‘अजून चालतोची वाट’ नावानं एक पुस्तक लिहिलं आहे. तो त्यांचा जीवन-प्रवास आहे. या लेखात प्रामुख्यानं मंजुश्रीच्या योगदानाचं स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थार्जन करून घराची जबाबदारी निभावणं ही दोन पूर्ण वेळाची कामं करूनही वेळ मिळेल तेव्हा मंजू प्रत्यक्ष कामही करत राहिली.

दादर अंधशाळेत त्यांच्या अरुण मंगल सेवा विकास संस्थेनं विविध प्रकल्प साकारले. त्यात मंजूचा प्रत्यक्ष सहभाग होता. नोकरी सांभाळून दर शनिवार रविवारी तिथं जाऊन ती काम करत असे. ते प्रकल्प असे-

१- ब्रेल पुस्तकांचे ग्रंथालय:- ‘श्यामची आई’ पूर्ण पुस्तक ब्रेलमधे रूपांतरित.

२- लिसनिंग टु टॉकिंग बुक :- कॅसेट लायब्ररी व साउंडप्रुफ लिसनींग रूम तसेच लँग्वेज लॅबोरेटरी अशा प्रकल्पात सहभाग

३- उद्योग-व्यवसाय प्रशिक्षण (मुलींसाठी):- पॉटरीमेकिंग, डेकोरेटिव्हज आणि केटरिंग व्यवसाय (अन्नप्रक्रिया उद्योग)

४- विद्यर्थिनींना शिष्यवृत्ती, पारितोषिके देऊन प्रोत्साहित करणे.

५- दिवाकर देशपांडे लिखित कारगिलच्या शौर्यकथांचे ब्रेल रूपांतर व त्याचे प्रकाशन

याशिवाय तिथल्या वसतीगृहातील मुलींना पुस्तकं वाचून दाखवणे, गरजेनुसार लिहून देणे, त्यांचा अभ्यास घेणे, समुपदेशन करणे अशी कामंही ती करत असे. गोव्यात स्थलांतरित झाल्यावर २००२-२०१० या कालावधीत तिनं महिला स्वयंसहायता बचतगटांना मार्गदर्शन केलं.

कोणतंही सामाजिक काम, घरातलं काम, पै पाहुण्यांचे स्वागत, बँकेतली नोकरी.. हे सर्व मंजू पूर्ण समरसून करायची. तिची ही समर्पण वृत्ती विरळा आहे. पित्रे यांच्या कामाचं स्वरूपही कोणतंही पद न घेता सहकार्य करणे, काम झालं की बाजूला होणे अशा प्रकारचं असल्यामुळे गेली चाळीस वर्षे सातत्यानं कार्यरत राहूनही त्यांच्या संस्थेचं कार्यही काहीसं पडद्यामागंच राहिलं. त्यांच्या मागे राहून मंजूनं केलेलं काम तर आणखीच अदृश्य राहिलं. जवळची मैत्रीण असूनही तिच्या या वेगळेपणाचा तपशील मला फारसा उमगला नाही. ती घरासाठी किती जिवापाड कष्ट घेत होती ते मला दिसत होतं. स्वतःकडेही लक्ष दे असं तेव्हा मी तिला सांगत असे. पण तिच्या खर्‍या आंतरिक संघर्षाचा थांग मला कधी लागलाच नाही. हा लेख लिहिण्याच्या निमित्तानं विचार करताना दोघांनी मिळून उभ्या केलेल्या कामातील तिचं मूक योगदान लक्षात येतं आहे. तिच्या या निस्पृह समर्पणाला एक मैत्रीण म्हणून माझा सलाम...!

आसावरी काकडे

‘मिळून सार्‍याजणी’ मासिकासाठी

No comments:

Post a Comment