Thursday 18 March 2021

विद्याताईंचा संवाद-साकव

 

‘विद्याताई : त्यांच्या पुस्तकातून’ - २९ जानेवारी २०२१

नमस्कार,

‘विद्या स्मृती संवाद मालेत’ बारा जानेवारी या विद्याताईंच्या जन्मदिवसापासून आपण वेगवेगळ्याप्रकारे त्यांच्या आठवणी जागवतोय. आज होत असलेल्या ‘विद्याताई : त्यांच्या पुस्तकातून’ या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमात आपण विद्याताईंच्या पुस्तकांविषयी बोलणार आहोत. विद्याताईंचं मैत्र ज्यांना ज्यांना लाभलं त्यांना त्या आत्मीय नात्याविषयी भरभरून बोलावसं वाटेल. त्यापैकी मीही एक आहे. या मैत्रीचं वेगळेपण हे होतं की ‘विद्याताई माझ्या अगदी जवळची मैत्रीण आहेत...’ असं प्रत्येकालाच वाटायचं.

पण आज आपण अशा वैयक्तिक मैत्रीविषयी न बोलता त्यांनी लेखनातून सतत सार्‍याजणींशी आणि सार्‍याजणांशीही संवाद साधत आपले विचार, आपला विवेकपूर्ण दृष्टिकोन सर्वांपर्यंत पोचवत जो मैत्रभाव जोपासला त्याविषयी बोलायचं आहे. मी आजच्या कार्यक्रमात त्यांच्या ‘साकव’ या पुस्तकाविषयी बोलणार आहे.

विद्याताईंनी ‘साकव’च्या अर्पणपत्रिकेत म्हटलंय, ‘आजवर ज्या घटना-प्रसंगांनी, अनुभवांनी आणि माणसांनी माझी माणसाच्या जगण्यासंबंधीची जाण वाढवली त्या सार्‍यांना कृतज्ञतापूर्वक’. ही अर्पणपत्रिका जितकी नितळ आहे तितकीच पुस्तकाचं मर्म सांगणारी आहे.

या पुस्तकातील मिलिंद बोकील यांची सविस्तर प्रस्तावनाही मर्मग्राही आहे. विद्याताईंच्या लेखनाकडे, त्यातील वैचारिक भूमिकेकडे दुरून पाहात त्यांनी चिकित्सक निरीक्षकाच्या भूमिकेतून लिहिले आहे. त्यांचं निरीक्षण एका समंजस पुरुषाचं, एका प्रगल्भ माणसाचं आहे हे लक्षात घेण्यासारखं आहे. विद्याताईंचं कार्य, त्यांचं लेखन, ‘मिळून सार्‍याजणी’चं संपादन.. या सगळ्यामागची विद्याताईंची भूमिका काय होती आणि या सर्व कृतींमधून त्या, ती कशी प्रामाणिकपणे निभावत होत्या ते त्यांनी ‘साकव’ मधील लेखनाच्या आधारे लिहिलेलं आहे. स्त्रीमुक्ती या संकल्पनेविषयी सर्वसामान्य लोकांची प्रतिक्रिया काय आहे ते प्रथम सांगून त्या पार्श्वभूमीवर विद्याताईंचं कार्य कसं कौशल्याचं आणि जबाबदारीचं आहे ते त्यांनी लक्षात आणून दिलंय. ‘मिळून सार्‍याजणी’ परिवाराच्या बाहेरच्या, त्रयस्थ वाचकाच्या दृष्टीनं ही प्रस्तावना म्हणजे भोजनाआधीच्या एखाद्या पाचकासारखी आहे. कारण ती अशा वाचकांचे पूर्वग्रह दूर करून त्याला विचारसन्मुख करते.

‘साकव’ या पुस्तकात ‘मिळून सार्‍याजणी’ मासिकाच्या सुरुवातीपासून, म्हणजे ऑगस्ट १९८९ पासूनच्या अकरा वर्षातील निवडक संपादकीय लेख समाविष्ट आहेत. यातील विद्याताईंचं मनोगत इतकं पारदर्शी आहे की समोर येऊन त्याच बोलतायत असं वाटावं. आतले सर्व लेखही असे ‘संवाद’च आहेत. ते आता पुन्हा वाचताना या संवादांचे आपण प्रत्यक्ष श्रोते होतो ही भावना सुखावणारी आणि तितकीच हळवं करणारी आहे.

अर्पणपत्रिकेत म्हटल्याप्रमाणे या संवादांचे विषय रोजच्या जगण्यातले आहेत. भोवती घडणार्‍या घटना, अनुभवलेले प्रसंग खूपदा अंतर्मुख करतात, विचारात पाडतात, प्रश्न उभे करतात... विद्याताईंचं संपादकीय लेखन म्हणजे यावरचं प्रकट चिंतन, त्यातून आलेल्या अस्वस्थतेचं शेअरिंग आणि प्रश्न समोर ठेवून विचार-प्रक्रियेत वाचकाला सहभागी करून घेत साधलेला संवाद.. असं आहे ! तात्कालिक प्रसंगांवरचं हे भाष्य अर्थपूर्ण जगण्याशी निगडित असलेलं, स्वातंत्र्य, समता, न्याय... अशा मूलभूत मूल्य-विचारांपर्यंत नेणारं असल्यामुळे तात्कालिक स्वरूपाचं राहिलेलं नाही. दर महिन्याच्या अंकातील हे संवाद सलग वाचले तर त्या कालखंडातला सामाजिक इतिहासच उलगडेल. ‘रिंकू पाटील आणि आपण’, जळगाव वासनाकांड संदर्भातील ‘या मुली बोलल्या का नाहीत’, ‘धर्माचं राजकारण’, ‘नर्मदा घरापासून दूर नाही’... अशा अनेक लेखांमधून, उत्सवांच्या आतषबाजीत दिसेनाशा झालेल्या त्या कालावधीतल्या जीवघेण्या समस्यांकडे त्यांनी तळमळीनं लक्ष वेधलेलं आहे.

 ‘साकव’मधील लेखांमधून विचारार्थ मांडलेल्या विषयांची व्याप्ती खूप मोठी आहे. संसाराच्या सेवेतून गृहीणीला निवृत्ती, परित्यक्ता स्त्रियांचे प्रश्न, स्त्रीच्या जीवनातील मातृत्वाचे स्थान, स्त्रिया आणि सौंदर्यस्पर्धा, बलात्कारांचे वाढते प्रमाण, स्त्रिया आणि अंधश्रद्धा, शनी-शिंगणापूरचा सत्याग्रह, महात्मा फुले, आगरकर यांचे कार्य, भटक्या विमुक्त स्त्रियांची परिषद, लिंगभाव समता... अशा अनेक विषयांवर त्यांनी सातत्यानं लेखन केलं. या संपादकीय संवादात त्यांनी ‘ऋतूंबरोबरचे उत्सव’सारख्या विषयावर सांस्कृतिक उत्सवांतील दोषपूर्ण, कालबाह्य गोष्टी बाजूला करून चांगल्याचा आनंद कसा घेता येईल याविषयी लिहिलं आहे. अशा साध्या विषयापासून ते ‘कारगिल युद्ध आणि ओरिसाचं वादळ’सारख्या देशव्यापी प्रश्नांसंदर्भातही लिहिलेलं आहे. विषय कोणताही असो त्यांच्या एकूण लेखनात सतत विवेकपूर्ण वर्तनाला आवाहन असायचं. प्रत्येकानं ‘एक चांगलं माणूस’ होण्याची गरज त्या आपल्या लेखनातून अधोरेखित करत राहिल्या. त्यांच्या एकूण लेखांमधून  निवडक ६०-६५ संवाद-लेख ‘साकव’मधे समाविष्ट केलेले आहेत.

सामाजिक समस्यांबाबत जनजागृती, विवेकाला आवाहन.. हे सर्व लेखांचं सूत्र असलं तरी हे लेखन रुक्ष झालेलं नाही. त्यात संवेदनशील मनाची अस्वस्थता, तळमळ लालित्यपूर्ण भाषेत व्यक्त झालेली आहे. त्यांच्या स्वभावातलं मार्दव, रसिकता, सौंदर्यदृष्टी अशा वैचारिक विषयांच्या मांडणीतही डोकावते.  मुख्य म्हणजे प्रत्येक लेख ‘प्रिय वाचक’ असं म्हणून वाचकाला संबोधून लिहिलेला आहे. त्यामुळे हे लेख वाचताना आपल्याला आलेलं पत्रच आपण वाचतो आहे असं वाटतं.

विद्याताईंच्या लेखनात आणि बोलण्यातही बरेचदा तेच ते विषय असायचे. पण ते मांडण्यामागची त्यांची तळमळ इतकी खरेपणानं आतून आलेली असायची की प्रत्येक वेळा ऐकताना, वाचताना ते प्रथम ऐकल्यासारखे नव्याने मनाला भिडायचे. तेच ते पुन्हा पहिल्यापासून सांगायचा त्यांना कंटाळा नव्हता. विचारणार्‍या व्यक्तीची ते समजून घेण्याची भूक हीच त्यांची प्रेरणा होती. त्या म्हणायच्या, ‘मला अमूर्त विचार करता येत नाही...’ जे मनात येईल ते त्यांच्या लेखनातून, बोलण्यातून आणि कृतीतूनच व्यक्त होत राहिलं. त्यांच्या या पूर्णवेळ कार्यकर्तेपणाला मनापासून अभिवादन..!

‘विद्याताई : त्यांच्या पुस्तकातून’ या कार्यक्रमात मला सहभागी करून घेतलं त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानते. या निमित्तानं मला विद्याताईंविषयीच्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळाली याचं समाधान व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद.

आसावरी काकडे

२९.१.२०२१

 

 

No comments:

Post a Comment