Saturday, 31 December 2022

‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत स्मृति साहित्य पुरस्कार-

 मनोगत-

नमस्कार,

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सिक्किमचे माजी राज्यपाल, खासदार श्रीनिवास पाटील, आजच्या सहपुरस्कारार्थी माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठानच्या डॉ संजीवनी केळकर, ‘उत्तुंग’ या कृष्ण जीवनावरील महा कादंबरीच्या लेखिका मृणालिनी सावंत, त्यांच्या पाठीशी असलेला त्यांचा मुलगा अमिताभ सावंत, आणि लेखक, प्रकाशक संपादक, आयोजक, उत्तम वक्ता असलेले मृत्युंजय प्रतिष्ठानचे डॉ सागर देशपांडे आणि श्रोतेहो,

मनोगताच्या सुरुवातीला ‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिल्या जाणार्‍या साहित्य पुरस्कारासाठी या वर्षी माझी निवड केली याबद्दल मी मृत्युंजय प्रतिष्ठानला हार्दिक धन्यवाद देते. हा पुरस्कार स्वीकारताना मला आनंद होतो आहे. पण हा पुरस्कार ‘स्मृती प्रित्यर्थ’ आहे याची हुरहुर वाटते आहे... पुरस्कार जाहीर झाला तेव्हापासून बर्‍याच आठवणी येत आहेत.

आदरणीय शिवाजी सावंत यांचा प्रथम परिचय त्यांच्या ‘मृत्युंजय’ या कादंबरीतून झाला. तेव्हा मी कॉलेजात शिकत होते. वडलांनी हे पुस्तक घरी आणलं होतं आणि वाचून शिवाजी सावंत यांना एक पत्र पाठवलं होतं. पत्र छोटंसच, पोस्टकार्डावर लिहिलेलं होतं. ते पत्र घेऊन वडलांना भेटायला शिवाजीराव आमच्या घरी आले होते. नंतरही त्यांच्या भेटी होत राहिल्या असाव्यात. कारण बरेच वर्षांनी एकदा आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो तेव्हा गप्पांच्या ओघात त्यांनी मला आमच्या वडलांच्या एका कवितेची आठवण दिली. त्यातला सूक्ष्म आशय उलगडून सांगितला होता. वडलांच्या अध्यात्मिक अभ्यासाचा वारसा मला मिळाला आहे हे त्यांनीच माझ्या लक्षात आणून दिलेलं होतं...

मी कविता लिहू शकते हे मला बर्‍याच उशीरा समजलं. पण लिहायला लागल्यावर लिहीतच राहिले आहे.

‘आरसा’ या पहिल्या कवितासंग्रहाची निर्मिती हा माझ्या आयुष्यातला सुंदर टर्निंग पॉईंट होता.. या निर्मितीतली सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे संग्रहाला लाभलेली आदरणीय शिवाजी सावंत यांची प्रस्तावना.. ही प्रस्तावना म्हणजे केवळ माझ्या कवितांना दिलेलं प्रोत्साहन नव्हतं. ते शुभाशीर्वाद होते. आता विचार करताना हे अधिक जाणवतं आहे. वाटतं आहे की अगदी संकोचत आम्ही स्वतःच काढलेल्या या पहिल्याच कवितासंग्रहाचं सर्व प्रकारे कौतुक झालं ते प्रस्तावनेच्या रूपात मिळालेल्या शिवाजीराव सावंत यांच्या आशीर्वादामुळेच. प्रतिष्ठेचे चार पुरस्कार, वाचकांचा भरघोस प्रतिसाद, वृत्तपत्रं, मासिकं, रेडिओ, दूरदर्शन यांनी घेतलेली दखल... हे सर्व खूपच आनंददायी आणि प्रोत्साहित करणारं होतं. आरसा कवितासंग्रह १९९० साली प्रकाशित झाला. एकदा ठरवल्यावर कवितासंग्रह प्रकाशित करणं अवघड नव्हतं. पण वितरण हा महत्त्वाचा आणि आम्हाला न जमणारा भाग होता. पण काँन्टिनेन्टल प्रकाशनाच्या सहाय्यानं तेही सुकर झालं. शिवाजी सावंत यांच्या मार्गदर्शनातूनच हे झालं असणार... त्या वेळी झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे वृत्तान्त पेपरला येत होते. ग्रंथ विक्री संदर्भातल्या एका बातमीत म्हटले होते, ‘शिवाजी सावंत यांची मृत्युंजय ही कादंबरी, ‘विशाखा’ हा कुसुमाग्रजांचा कवितासंग्रह आणि ‘आरसा’ हा आसावरी काकडे यांचा कवितासंग्रह या पुस्तकांची प्रदर्शनात जास्त विक्री झाली अशी माहिती काँन्टिनेन्टल प्रकाशनाच्या देवयानी अभ्यंकर यांनी दिली...’ ही बातमी मी एखाद्या पुरस्कारासारखी जतन करून ठेवली आहे. ‘शब्द शिवार’ या आज प्रकाशित झालेल्या पुस्तकात ‘आरसा’च्या प्रस्तावनेचा समावेश केलेला आहे.

सर्व पातळ्यांवरच्या अशा प्रोत्साहनामुळे ‘आकाश’ हा कवितासंग्रह लगेच १९९१ साली प्रकाशित केला. त्याची पहिली प्रत कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांना नाशिकला त्यांच्या घरी जाऊन द्यावी असं शिवाजी सावंत यांनी सुचवलं. त्यानुसार आम्ही नाशिकला गेलो. कुसुमाग्रज यांना प्रत्यक्ष भेटून आकाश संग्रहाची पहिली प्रत देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. आमच्यासाठी ते संग्रहाचं प्रकाशन होतं. या संग्रहाचंही चांगलं स्वागत झालं.    

‘लाहो’ हा कवितासंग्रह १९९५ साली काँन्टिनेन्टल प्रकाशनाने प्रकाशित केला. त्याची एक प्रत आम्ही शिवाजी सावंत यांना भेट दिली होती. त्यातील काविता मनःपूर्वक वाचून पुस्तकातच त्यांनी कवितांवर प्रतिक्रिया लिहिल्या. शेवटी स्वाक्षरीही केली.. ते पाहून ती प्रत मी परत मागून घेतली आणि त्यांना दुसरी प्रत दिली. त्यांच्या प्रतिक्रिया असलेली ती प्रत मी जपून ठेवली आहे.

२००० साली श्री शिवाजी सावंत यांच्या घरी रामकृष्ण मिशन हरिद्वारचे स्वामी अकामानंद येणार होते. त्या वेळी त्यांनी आम्हालाही घरी बोलावलं होतं. तेव्हा माझा ‘मी एक दर्शनबिदू’ हा कवितासंग्रह प्रकाशित झाला होता. तो स्वामींना भेट द्यावा असं शिवाजी सावंत यांनी आम्हाला सुचवलं होतं. त्यानुसार आम्ही तो त्यांना भेट दिला. आध्यात्मिक क्षेत्रातली इतकी थोर व्यक्ती आलेली असताना आम्हाला बोलावणं, कवितासंग्रह भेट द्या असं सुचवणं हे दोन्ही आश्चर्य वाटावं असं होतं. कवितासंग्रह ते वाचतील की नाही असंही वाटून गेलं. पण थोड्याच दिवसात संग्रह वाचून त्यांचं सविस्तर पत्र आलं. ते वाचल्यावर संग्रह त्यांना देण्याचं महत्त्व लक्षात आलं. स्वामींनी पत्रात म्हटलं आहे, ‘एका दृष्टिने पाहता हे एक अत्यंत गूढ असे आत्मचरित्रच वाटते. कवयित्रिच्या भूमिकेतून तुम्ही स्वतःचेच आत्मविलोकन केले आहे. अध्यात्मिक वाटचालीच्या दृष्टीने मी याला महत्त्व देतो..’ त्यांचे आशीर्वाद असलेलं हे पत्र या संग्रहाला मिळालेल्या महाराष्ट्र राज्य पुरस्काराइतकं मला महत्त्वाचं वाटतं.

त्यानंतर झालेला लेखन-प्रवास ईशावास्य उपनिषदाच्या अभ्यासापर्यंत चढत्या क्रमानं चालू राहिला.. जगण्याविषयीच्या मूलभूत प्रश्नांसंदर्भातली माझी जिज्ञासा ईशावास्यच्या अभ्यासातून काही प्रमाणात शमली. अर्थात माझी जिज्ञासा आणि अभ्यास दोन्हीला माझ्या कुवतीच्या मर्यादा होत्या. या अभ्यासातून ‘ईशावास्यम्‍ इदं सर्वम्‍ : एक आकलन-प्रवास’ हे पुस्तक २०१२ साली प्रकाशित झालं. राजहंस प्रकाशनानं याची दर्जेदार निर्मिती केली आहे. हे पुस्तक प्रकाशित झाल्यावर मला शिवाजीराव सावंत यांची प्रकर्षानं आठवण झाली. त्यांना माझं हे पुस्तक नक्कीच आवडलं असतं... आजचा पुरस्कार माझ्या एकूण लेखनासाठी आहे पण का कोणजाणे तो या पुस्तकासाठीच आहे अशी माझी भावना आहे.

माझ्या एकूण साहित्यिक वाटचालीत मला अनेकांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळाले. श्री शिवाजी सावंत, डॉ. व. दि. कुलकर्णी यांच्यासारखे श्रेष्ठ साहित्यिक, समीक्षक, साहित्य परिषद, काव्यशिल्प, साहित्य प्रेमी भागिनी मंडळ यांसारख्या साहित्यिक संस्था, समकालिन साहित्यिक, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, राजहंस प्रकाशन, सुखायन प्रकाशन, पद्मगंधा प्रकाशन, दिलीपराज प्रकाशन, सेतू प्रकाशन, डिंपल पब्लिकेशन, साहित्य आकदमी प्रकाशन, ईपुस्तके प्रकाशित करणारे ई साहित्य प्रतिष्ठान या प्रकाशन संस्था आणि अनेक सुहृद, नातेवाईक... आज पुरस्कार स्वीकारताना या सर्वांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करून सर्वांचे मनापासून आभार मानते.

डॉ. संजीवनी केळकर यांचे मनोगत आणि साहित्याचे रसिक जाणकार आणि उत्तम वक्ता असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार श्रीनिवास पाटील यांचं भाषण ऐकायला आपण उत्सुक आहोत...

शेवटी सर्वांना मनापासून धन्यवाद देते आणि थांबते.

आसावरी काकडे

 

 

Tuesday, 16 August 2022

नाबाद नव्वद

‘नाबाद नव्वद’ हे श्री तुकाराम दत्तात्रय जगताप (नाना) यांचं छोटंसं, प्रभावी चरित्र आहे. श्री जगताप यांनी आता नव्वदी ओलांडलेली आहे. त्यांच्याशी बोलण्यातून समजलेलं त्यांचं कार्य-कर्तृत्व भारती जोशी यांनी या चरित्रात शब्दबद्ध केलेलं आहे. वयाच्या या टप्प्यावर आठवलं तसं सांगत असलेलं लिहून घेऊन ते नंतर सुसंगतपणे लिहिणं हे कौशल्याचं काम आहे. भारती जोशी यांना ते चांगलं साधलं आहे. भारती जोशी यांनी यापूर्वी चार पुस्तकं लिहिली आहेत. लिहिता हात असल्यामुळेच त्यांना हे साध्य झालं असणार. हे पुस्तक वाचताना लेखनातली सहजता आणि नेटकेपण जाणवते.

सोनकिरे या छोट्याशा खेड्यात एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या एका मुलाच्या आयुष्याची खडतर वाटचाल कशी झाली त्याचा धावता आढावा या चरित्रात वाचायला मिळतो. आज घडीला हा मुलगा- नव्वदीचा तरूण अनेकांचं प्रेरणास्थान बनून कृतकृत्य आयुष्य जगत आहे. भारती जोशी यांनी या चरित्रात शेवटी त्यांच्या समृद्ध व्यक्तिमत्वाचं ‘भूतकाळाचा दुवा आणि भविष्यकाळाचा दिवा’ असं सार्थ वर्णन केलेलं आहे.

नानांच्या लहानपणच्या काळाचं, त्यांच्या गावाचं चित्रदर्शी वर्णन, त्या वेळच्या प्रथा, एकूण गरीबीची परिस्थिती, ब्रिटीश राजवटीतले वातावरण, पत्री सरकार, गांधी-हत्येनंतर झालेल्या जाळपोळीत वडिलांनी घेतलेली कणखर भूमिका, त्याचा नानांच्या मनावर पडलेला प्रभाव... हे सर्व वाचताना तो काळ डोळ्यासमोर येतो..

जिद्द, सचोटी, कष्ट करण्याची तयारी, तल्लख बुद्धि, वैचारिक स्पष्टता, आणि प्रचंड उत्साह.. याच्या जोरावर श्री जगताप यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं. हे करताना असेल त्या परिस्थितीतून मार्ग काढण्याचं कौशल्य, निश्चयी स्वभाव हे गुण त्यांना उपयोगी पडले. सुरुवातीला शिक्षण घेताना प्रचंड अडचणी आल्या पण बहीण आणि मेहुण्यांनी त्यांना पाच वर्षे सर्व प्रकारचा आधार दिला. सहा मैल चालत, वाटेत येणारी कृष्णा नदी पार करत शाळेला जावं लागायचं. पण त्यांनी शिकण्याची जिद्द सोडली नाही. प्रतिकूल परिस्थितीत शिकणार्‍या विद्यार्थ्यांना नानांचा आदर्श प्रेरणादायी ठरेल असा आहे.

पुढे सिव्हिल इंजिनीयर ही पदवी मिळवून ते PWD या सरकारी खात्यामधे नोकरीला लागले. तिथे कामाचा अनुभव घेत असतानाच त्यांना भारतीय संरक्षण खात्याकडून MES खडकी, पुणे इथं रुजू व्हावे असे पत्र आले. तिथं रुजू झाल्यावर काही दिवसांनी अहमदनगर इथं BF Building and Roads खात्यात त्यांची बदली झाली. तिथून अरुणाचल प्रदेश (नेफा) येथील दुर्गम भागात रणगाडे, मोठी वाहाने जाऊ शकतील इतके भक्कम रस्ते तयार करण्याच्या कामासाठी त्यांची निवड झाली. त्यानंतर १९७१-७५ या काळात त्यांना ‘आय एन एस हमला’ या नौसेनेच्या महत्त्वाच्या संस्थेत काम करण्याची संधी मिळाली. या सर्व संधींचं त्यांनी सोनं केलं. अशा वेगवेगळ्या ठिकाणी अतिशय खडतर वातावरणात त्यांनी त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी निष्ठेनं आणि यशस्वीरित्या पार पाडली. त्यांच्या अशा कामांबद्दल त्यांना वेळोवेळी प्रशस्ती पत्रे मिळाली. त्यांचा सन्मान केला गेला. शाळा-कॉलेजातही त्यांना अनेक बक्षिसं मिळाली होती. इंजिनिअरिंग कॉलेजमधे तर त्यांच्या नावे बक्षिस दिले जात होते..!

कर्तृत्वपूर्ण नोकरीची वीस वर्षे झाल्यावर समाधानाने स्वेच्छानिवृत्ती घेऊन ते बांधकाम व्यवसायात उतरले. त्यांनी निवासी सदनिका बांधण्याच्या छोट्या प्रकल्पापासून सुरुवात केली. त्यांच्या कामाचा दर्जा आणि सचोटी पाहून त्यांना अनेक कामं मिळत गेली. पतंगराव कदम यांच्याकडून तर त्यांना मोठमोठ्या शिक्षण संस्थांचे बांधकाम करण्याची संधी मिळाली... या क्षेत्रातही त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं.

नोकरी लागल्यावर मेहुण्यांनी शिक्षणकाळात केलेली आर्थिक मदत लक्षात ठेवून नानांनी त्यांचे ते ऋण तर फेडलेच पण इतर बाबतीतही ते सतत त्यांच्या सोबत राहिले. निवृत्त झाल्यावर कौटुंबिक जबाबदारीबरोबर आपल्या गावाच्या विकासाकडेही त्यांनी लक्ष दिले. आपल्या अंगच्या गुणांचा, कौशल्यांचा आपल्या भोवतीच्या सर्वांना उपयोग करून देण्याचं औदार्य आणि कर्तव्यबुद्धी त्यांच्याजवळ होती. ज्यांनी वेळोवेळी आधार दिला त्यांच्याविषयीचा कृतज्ञ भाव त्यांनी सतत मनात ठेवला.

स्वकष्टार्जित समृद्धी उपभोगतानाही सदैव कृतज्ञ राहिलेल्या श्री तुकाराम जगताप (नाना) यांच्या या प्रेरणादायी कार्य-कर्तृत्वाचं प्रभावी शब्द-चित्र भारती जोशी यांनी ‘नाबाद नव्वद’ या चरित्रात रेखलं आहे. यातून अनेकांना वेगवेगळ्या स्तरावर मार्गदर्शन होऊ शकेल.

आसावरी काकडे

१६.८.२०२२

asavarikakade@gmail.com

Mob. 9762209028

 

Wednesday, 17 November 2021

‘हराकी’ एक लक्षवेधी कादंबरी-


श्री मनोहर भोसले यांची ‘हराकी’ ही कादंबरी नुकतीच वाचनात आली. ओघवती शैलीतील कादंबरीचे कथानक एकातून एक वळसे घेत पुढे सरकत राहाते. त्यात गुंतायला होतं... वाचून पुस्तक मिटले तरी त्यातील पात्रे, घटना मनात रेंगाळत राहतात. शीर्षकापासूनच ही कादंबरी लक्ष वेधून घेते... हराकी म्हणजे अंत्यसंस्कारातील एक विधी. कादंबरीत हा विषय वेगवेगळ्या तर्‍हेनं समोर येतो. कथानक उलगडत जाते तेव्हा प्रत्यक्ष विधी काय असतो, ही परंपरा सुरू कशी झाली, त्याचा मूळ उद्देश काय.. हे सर्व समजत जाते.  

या कादंबरीचा नायक यमणप्पा हा दलीत समाजातला आहे. यमणप्पाचं व्यक्तिचित्र  इतकं सुरेख रेखाटलं आहे की त्यावरून एखादा चित्रकार त्याचं पोर्ट्रेट तयार करू शकेल. यमणप्पा गावातील सफाई करणारा एक सामान्य माणूस. पण पूर्ण कादंबरीभर तो एखाद्या कुटुंबातील वडीलधार्‍या व्यक्तीसारखा वावरताना दिसतो. कादंबरीचं कथानक एका छोट्या गावात घडणार्‍या घटनांमधून पुढं सरकत राहातं.  

छकुलीचा विहिरीत पडून मृत्यू, अण्णा पैलवानाचा घरातील वादातून आजारी पडून मृत्यु, खुळ्या आत्माचा गाडीखाली सापडून मृत्यु... अशा घटनांच्या तपशीलवार वर्णनातून छकुली, अण्णा पैलवान, खुळा आत्मा या व्यक्तिरेखा साकारतात आणि त्यांच्याशी आलेल्या संबंधातून यमणप्पाचं व्यक्तिचित्रही स्पष्ट होत जातं. यमणप्पा प्रामाणिक आहे. संवेदनशील आहे. त्याला आपल्या मर्यादा महिती आहेत. गावात कुणाकडे लग्न असो, कोणते कार्य असो की मृत्यु... प्रत्येकाला प्रत्येक प्रसंगात यमणप्पाची गरज लागायची. तो या ना त्या कारणानं पूर्ण गावाशी जोडला गेला होता. त्याचं गावावर मनापासून प्रेम होतं. त्यानं जुन्या परंपरा पाहिल्या, आनुभवल्या आहेत. त्यामागची कथा, परंपरा सुरू होण्यामागचा मूळ हेतू हे सर्व त्याला माहिती आहे. कॅप्टन साहेबांच्या कुटुंबानं त्याच्या कुटुंबाला आधार दिला. पण त्यानी त्याचा गैरफायदा घेतला नाही.

गावसभा भरली तो प्रसंग किंवा आंदासाठी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम... अशा प्रसंगांच्या चित्रणातून गावातील माणसांचे एकेक इरसाल नमुने डोळ्यापुढे साकारतात. अशा अनेक प्रसंगांमधून गावाचं बदलत चाललेलं स्वरूप आणि त्यामुळं यमणप्पाचं व्यथित होणं याचं प्रत्ययकारी वर्णन लेखकानं केलं आहे.   

उपसरपंचाच्या घरच्या जत्रेनंतरच्या कार्यक्रमात जेवण झाल्यावर यमणप्पा जुन्या आठवणीत रमून जातो. उपसरपंचाची बायको आणि मुलगी ते उत्सुकतेनं ऐकत राहतात. श्रियाळ षष्टीचा उत्सव, मरगुबाईची जत्रा, या परंपरांच्या मागचा इतिहास तो विस्तारानं, रंगवून सांगत राहतो. पण वर्तमान वास्तवात त्या परंपरांमागचा मूळ हेतू बाजूला पडून त्यात अपप्रवृत्ती शिरल्या आहेत, गावात आता कोणाला एकमेकांविषयी आपुलकी राहिलेली नाही, कोणी कुणाला विचारत नाही... या विषयी यमणप्पा व्यथित होऊन बोलत राहतो. ते सारं दोघी समरसून ऐकत राहतात... बोलणं झाल्यावर आपली पत्रावळ उचलून यमणप्पा उठून जातो तेव्हा त्यांच्या मनाची जी भावुक अवस्था होते त्याचं वर्णन करताना लेखकानं म्हटलं आहे- 

‘घरात म्हार येऊन गेल्यानंतर अनेक महिला गोमुत्र शिंपडून झाडून काढतात. आपल्या घरातल्या ज्या जागेवर बसून यमणप्पानं आपुलकी शिकवली त्या जागेवर रांगोळी घालून दोन फुलं ठेवावीत, पाया पडावं असं उपसरपंचाच्या पोरीला वाटत होतं..’

अशा वर्णनांमधून यमणप्पाबरोबर गावाचंही चित्र लेखकानं अतिशय आत्मीयतेनं रेखाटलं आहे. लेखकातील निरीक्षक काहीशा तटस्थ भूमिकेतून सर्व कथन करत राहतो. जे जसं घडलं तसं. त्यावर वेगळं काही भाष्य करत नाही, भावुक होत नाही. यात गावाचं पूर्ण वास्तव चित्रण केलेलं आहे. कुठेही झाकापाक नाही. ग्रामिण भाषेचा सहज वापर. त्यात गावातल्या लोकांच्या तोंडी येणार्‍या शिव्याही येतात. विषय ‘हराकी’ असल्यामुळे मृत्यु, स्मशान, सरण रचणे, अंत्यसंस्कार याची वर्णनं तपशीलवार येतात. पण ती अंगावर येत नाहीत.

कादंबरीत शेवटी यमणप्पाचाच मृत्यु होतो. तेव्हा प्रथमच यमणप्पाशिवाय अंत्यसंस्कार पार पडतात आणि जमलेले सगळे लोक मनातल्या मनात त्याची क्षमा मागून त्याच्यासाठी ‘हराकी’ म्हणतात..! हा प्रसंग अतिशय भावपूर्ण झाला आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्तीने सर्व कर्तव्ये पार पाडून जगाचा कृतकृत्य निरोप घ्यावा तसा वाटतो यमणप्पाचा मृत्यु... कादंबरी वाचून बाजूला ठेवल्यावरही गावातील एकेक घटना यमणप्पाची स्मृती जागवत मनात तरळत राहतात. त्या गावातून बाहेर पडायला वेळ लागतो..!

अतिशय प्रत्ययकारी झालेली मनोहर भोसले यांची ‘हराकी’ ही कादंबरी लोकप्रिय होत आहे. वाचक तिचे छान स्वागत करत आहेत. त्यांच्या पुढील लेखनाला हार्दिक शुभेच्छा.

आसावरी काकडे

१५.११.२०२१

 

ज्याचा त्याचा चाफा...

 

एका शांत संध्याकाळी निवांत बसले होते. कुठेतरी लागलेलं ‘चाफा बोलेना चाफा चालेना...’ हे गाणं कानावर पडलं. तसं अनेकदा ऐकलेलं आहे ते. पण काल ऐकताना त्यातल्या ‘चाफा खंत करी काही केल्या फुलेना...’ या ओळीनं मला धरून ठेवलं. विचारात पाडलं. मग पुढच्या प्रत्येकच ओळीनं लक्ष वेधलं. त्यावर विचार करता करता माझं मन चाफामय झालं..! मग खंत करणार्‍या, काही केल्या न फुलणार्‍या त्या चाफ्याचं बोट धरून ओळीओळीतून फिरू लागले. या कवितेविषयी बरंच काही वाचनात आलेलं होतं. कुणाला यात कवी आणि प्रतिभा यातील नातं जाणवलं तर कुणी यातून आध्यात्मिक आशय शोधला. सदानंद रेगे यांनी तर या चाफ्याची मुलाखत घेणारी एक कविताच लिहिलीय..!

चाफ्याचं बोट धरून ओळीओळीतून फिरताना मी हा सर्व कल्पनाविलास बाजूला ठेवला. अर्थ लावण्याचा नाद सोडून दिला. शब्दांना ‘अभिधा’चा उंबरठा ओलांडू न देता, ते आतून सांगत होते तेवढंच समजून घेत मुक्त मनानं गाणं अनुभवू लागले... स्वरांबरोबर ‘आंब्याच्या बनी’ गेले. प्रत्येक झाडावरच्या मोहरानं धुंद झालेल्या वातावरणात रमून गेले. ‘चाफ्याच्या गळ्यात गळा मिळवून’ निरामय आनंद घेत बागडणार्‍या ‘मैनांसवे गाणी म्हटली’.. तिथं मन भरल्यावर मग ‘केतकीच्या बनात गेले’, दरवळलेल्या गंधानं भान हरपू दिलं. बेभान झिम्मा फुगड्या रंगल्या.. संकूचित भोवतालाचं भान सुटल्यावर मुक्ततेला अवघ्या विश्वाचंच अंगण आंदण मिळालं. खंत विसरून चाफा आंगोपांगी फुलून आला. ‘दिशा आटून गेलेल्या’ त्या अथांगात शुद्ध आनंदाच्या अनुभूतीखेरीज काहीच उरलं नाही...!

पण ही अनुभूती अगदी क्षणिक. अवरोहाच्या गतीबरोबर खाली धृवपदापाशी आलं मन आणि परत ‘चाफा खंत करी काही केल्या फुलेना...’ या ओळीनं मनाचा ताबा घेतला. गाणं संपलं होतं. फोन वाजला म्हणून उठले. मग दिनचर्येत गुरफटले. बाकी सगळे संदर्भ सुटून गेलेल्या त्या ओळीचा विचार सोबत होता. वाटलं कधी कधी किती उत्फुल्ल वाटतं. आनंदी आनंद गडे असं म्हणत नाचावंसं वाटतं. पण बरेचदा मख्ख थकवा येतो उमेदीला. काही केल्या फुलतच नाही मन. सदानंद रेगे यांनी त्यांच्या ‘बी’चा चाफा : एक मुलाखत’ या कवितेत म्हटलंय, ‘मूडमधे आहेस ना? / -कधीमधी फुलं फुली येतात / बाकी फुल्याफुल्यांचाच फुलोर..’

 ‘फुल्याफुल्यांचाच फुलोर.’ हा अनुभव जवळपास प्रत्येकाचाच असेल. त्यामुळे ‘चाफा बोलेना’ या कवितेतील पुढच्या ओळींशी नातं असो नसो पहिल्या ओळी आपल्याला जवळच्या वाटतात.

चाफ्याच्या फुलात असं काय वैशिष्ट्य आहे की कवींना त्या प्रतिमेचा मोह पडावा? विचार करता करता चाफ्याची प्रतिमा असलेलं ‘लपवलास तू हिरवा चाफा सुगंध त्याचा छपेल का प्रीत लपवुनी लपेल का?’ हे ग.दि.मां.चं जुनं गाणं आठवलं. चाफा लपवून ठेवला, सुकला तरी त्याचा सुंगंध लपत नाही. भोवतीच्या वातावरणात दरवळत राहून लक्ष वेधत राहतो. चाफ्याच्या सुगंधाचं हेच वैशिष्ट्य टिपून गदिमांनी आपल्या गीतात ही प्रतिमा वापरली आहे. चाफ्याला आपला सुगंध लपवता येत नाही तशीच मनातली प्रीतभावना प्रेमिकेला लपवता येत नाही. ती नजर चुकवेल, दूर राहायचा प्रयत्न करेल पण गालावरची लाली लपेल का? उन्हात पाऊस पडावा तसे क्षणात हसणे, क्षणात रुसणे चालू असते. हे सगळे आतील प्रणयभावनेचेच खेळ आहेत. ते कळल्यावाचून राहील का? आणि शेवटी म्हटलंय, प्रीतभावना लपवण्याचे वेगवेगळे बहाणे आता पुरे झाले.. चोराच्या मनातच चांदणं असतं. त्याला आपली चोरी लपवता कशी येईल? या गीतात ध्रुवपदातच चाफ्याच्या सुंगधाची प्रतिमा असल्यामुळे ती प्रत्येक अंतर्‍यानंतर समोर येते. आणि चाफ्याचा सुगंध नकळत मनात रिमझिमत राहतो.

काही केल्या न फुलणारा, न बोलणारा कवी बी यांचा चाफा बोट सोडून गेल्यावर चाफ्याची वेगवेगळी रूपं समोर यायला लागली. रमण रणदिवे यांनी त्याच्या ‘चाफा’ या गझलेत वापरलेली चाफा ही प्रतिमा वैशिष्ट्यपूर्ण आहे. या गझलेचा मतला असा आहे- ‘कळेना लाजताना हा कसा रागावला चाफा / पुन्हा रागावतानाही जरा भांबावला चाफा’. पुढे म्हटलंय, मी रात्री सुगंधाशी तुझ्याविषयी चर्चा केली तर सकाळी माझ्या मनात चाफा डोकावला.... पारिजात, गुलाब ही पण सुगंध देणारीच फुलं आहेत.. पण गझलेत शेवटी ‘अता देहात या माझ्या तुझा सामावला चाफा’ असं म्हणून कवीनं प्रियेला इतर कुठल्याही फुलाऐवजी ‘चाफा’ म्हणणंच पसंत केलंय.!

पद्माताईंनी तर चाफ्याच्या झाडाशीच मैत्र जोडलंय. त्याच्याशी मनातलं बोलून मन मोकळं करतायत त्या. तो काव्यात्म आणि भावपूर्ण संवाद पूर्ण सलग ऐकण्यासारखा आहे. सुनीता देशपांडे यांनी ही कविता आतिशय समरस होऊन सादर केली आहे. त्याचे व्हिडीओ पाहायला मिळतात. पण इथं, आपण शब्दांनाच कान लावू. ते आपल्याला काय सांगतात पाहू... ऐकताना शब्दांना लपेटलेला भाव आपल्या मनात निथळत राहील. उमगेल की एखादं स्वगत असावं तसा एकरूप झालेल्या दोघांचा संवाद आहे हा..! या दोघातलं एक आहे कवीमन आणि दुसरं चाफ्याचं झाड..! या दोघांचं पूर्वीच ठरलंय, आहे ते सानंद स्विकारून टाकायचं. दुःख उगाळत बसायचं नाही. स्मृतींनी घायाळ व्हायचं नाही... तरी कुणाचं स्वप्नात येणं कसं रोखणार? स्वप्न पडतंच त्याला हवं तेव्हा. स्वप्नाला न दारं ना खिडक्या.. त्याला मुक्त असतात दाही दिशा. मग काहीतरी गमावलेलं, विसरायचं ठरवलेलं सगळं घरंगळत येतं परत. ‘पानात, मनात खुपतंय.. काहीतरी चुकतंय, कुठेतरी दुखतंय’ हे ताजेपणानं कळतं. ते नाकारता येत नाही. खोलवर आत झाकापाक केलेलं सारं असं अचानक समोर आलेलं पाहून मन हेलावतं क्षणभर. पण जरा स्थिरावल्यावर दोघं पुन्हा जगणं हसून साजरं करायाचा करार करतात. स्वप्नात जे घडलं ते सगळं मनातच ठेवायचं, आपलंतुपलं गुपित म्हणून. कुणाशी काही बोलायचं नाही. फुलांनी ओंजळ भरलीय तीच मजेत मिरवायची.. जगणं साजरं करायचं..! चाफ्याच्या झाडाशी झालेला हा पूर्ण संवाद पद्माताईंच्याच शब्दांत-  

‘‘चाफ्याच्या झाडा ….
का बरे आलास आज स्वप्नात?
तेव्हाच तर आपलं नव्हतं का ठरलं?
दु:ख नाही उरलं आता मनात
फुलांचा पांढरा, पानांचा हिरवा
रंग तुझा रंगतोय माझ्या मनात
केसात राखडी पण पायात फुगडी
मी वेडी भाबडी तुझ्या मनात
चाफ्याच्या झाडा ….
नको ना रे पाणी डोळ्यात आणू
ओळख़ीच्या सुरात, ओळखीच्या तालात
हादग्याची गाणी नको म्हणू
तुझ्या चाळ्यात एक पाय तळ्यात
एक पाय मळ्यात खेळलोय ना
जसं काही घोड्यावर
तुझ्याच फांद्यांवर बसून
आभाळात हिंडलोय ना
चाफ्याच्या झाडा …. चाफ्याच्या झाडा ….
पानात, मनात खुपतंय ना
काहीतरी चुकतंय, कुठेतरी दुखतंय
तुलाही कळतंय…. कळतंय ना….
चाफ्याच्या झाडा…. चाफ्याच्या झाडा
हसून सजवायचं ठरलंय ना
कुठं नाही बोलायचं, मनातच ठेवायचं
फुलांनी ओंजळ भरलीये ना”

***

पद्मा गोळे

 

किती गोड आहे ना हा काव्यात्म संवाद? सुनीताबाईंनी सादर करून तो मनामनात जिवंत ठेवलाय...!

कवीमनाला अशा वेगवेगळ्या विभ्रमांनी आकर्षित करत चाफा त्याच्या कवितेत प्रतिमा बनून येतो. कोणती प्रतिमा कशाचं प्रतिक हे कोणत्याही निकषानं ठरलेलं नसतं. ती कशाचं प्रतिक हे प्रत्येक कवीच्या कल्पकतेनुसार ठरतं. इतकंच नाही तर प्रत्येक वाचकाच्या त्या त्यावेळच्या आकलनानुसार ठरतं. कॅलिडोस्कोपमधली नक्षी जशी प्रत्येक हेलकाव्याबरोबर बदलत राहते तसे काव्य प्रतिमांचे अर्थ बदलत राहतात.

वर उल्लेख केलेल्या चारी कवितांमधे चाफा वेगवेगळी रूपं घेऊन आलेला आहे. ज्याचा त्याचा चाफा वेगळा आहे. कवी बी यांचा चाफा बहुआयामी आहे. वाचकाच्या आकलन-क्षमतेनुसार या चाफ्याचं रूप बदलतं. आशयाचं एक टोक धरून ओळींमधल्या रिकाम्या जागांमधे गवसलेला अर्थ भरायला लागावं तर पुढची ओळ भलत्याच दिशेला घेऊन जाते. अंब्याचे वन, मैना, केतकीचे बन, नाग.. विश्वाचे आंगण, जन विषयाचे किडे.. शुद्ध रसपान.. आणि शेवेटी ‘कोठे दोघेजण रे?’ हा उद्‍गार... या सर्व शब्दसमूहांचे नेपथ्य बर्‍यापैकी चकवणारे आहे. गाण्यातून समोर येत राहिलेल्या या कवितेचा आकलन-प्रवास प्रत्येकाला नव्या मुक्कामी पोचवेल. पण हा प्रवासच असा आहे की इथं पोचण्यापेक्षा प्रवास अनुभवणंच महत्त्वाचं आहे. गदिमांच्या हिरव्या चाफ्याचा सुगंध सरळ सरळ, लपून राहू शकत नसलेल्या प्रेमभावनेशी नातं सांगणारा आहे. तर रमण रणदिवे यांचा चाफा प्रेमाचे विभ्रम व्यक्त करत शेवटी प्रेमाच्या उत्कटतेशी नेऊन पोचवणारा आहे. पद्माताईंच्या कवितेत चाफा नाही, चाफ्याचं झाडंच जिवलग बनून आलंय. त्यानं मनमोकळ्या संवादातून ओंजळ फुलांनी भरून टाकलीय...!

 कवीमनांमधली चाफ्याची ही विविध रूपं आपल्याला वेगवेगळ्या प्रतीचा आनंद देतात. त्याचा आस्वाद घेता घेता ती आपली होऊन जातात. आणि रसिक-मनात आपापल्या चाफ्याचा सुगंध दरवळू लागतो...!

आसावरी काकडे

४.९.२०२१

Thursday, 12 August 2021

‘पळसबंध’चे अंतरंग..


विविध वृत्तपत्रातील सदर लेखन हे लेखकांसाठी एक सुखद आव्हान असते. रोज किंवा दर आठवड्याला ठराविक शब्दमर्यादेत एक लेख लिहायचा असतो. त्यासाठी एखादा विषय किंवा एखादे विषय-सूत्र दिलेले असते. वेळेच्या मर्यादेत हमखास काही सुचणं आणि सुचलेलं शब्दांच्या मर्यादेत बसवणं हे दोन्ही कौशल्याचं असतं. असे लेख सहसा ललित स्वरूपाचे असतात.

ललित लेखनात वैचारिक, प्रासंगिक, ऐतिहासिक, तत्त्वचिंतनात्मक असं काहीही सामावू शकतं. ललित लेख म्हणजे एक काव्यात्म कथन असतं. उत्स्फूर्तपणे सुचून कथा कविता लिहिली जाते. असे लेखन मौलिक मानले जाते. एक प्रकारे मेड टू ऑर्डर केलेले सदर-लेखनासारखे लेखन दुय्यम ठरू शकते. पण मला तेही महत्त्वाचे वाटते. कारण असे लेख लिहिताना मनातल्या सूप्त विचारांना जाग येते. विस्मृतीत गेलेल्या गोष्टी एकदम समोर येतात आणि लेखनाला विषय पुरवतात. अव्यक्त रूपात मनात पडून राहिलेलं काय काय या निमित्तानं व्यक्त होऊ लागतं. एकप्रकारे हे स्वतःचं अनावरण असतं. लेखकांसाठी एक घडवणारा रियाज असतो. अनेक नामवंत लेखकांचे सदरलेखनही पुस्तकरूपात येऊन संस्मरणीय ठरले आहे.

डॉ. मोना चिमोटे यांच्या ‘पळसबंध’ या लेखसंग्रहात महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रातील ‘सगुण निर्गुण’ या सदरासाठी त्यांनी लिहिलेले तीस लेख संकलित केलेले आहेत. दर आठवड्याला एक याप्रमाणे सहा महिने विविध विषयांच्या माध्यमातून मानवी जीवनाचा धांडोळा घेत त्यांनी हे लेख लिहिलेले आहेत. त्यातील ‘पळसबंध’ या लेखात निसर्गातील बदल आणि शारिरीक बदल यांची मानसिक पातळीवरील सांगड काव्यात्म शैलीत व्यक्त झाली आहे. या जमून गेलेल्या लेखाचे ‘पळसबंध’ हे शीर्षक पुस्तकाचेही शीर्षक झाले आहे. हा लेख वाचल्यावर हे शीर्षक किती समर्पक आहे ते लक्षात येते.

रोजच्या जगण्यात आपण एखादे सुंदर दृश्य पाहून हळवे होतो, रस्त्यावरचा प्राजक्ताचा सडा ओलांडताना फुलं पायाखाली न येतील याची काळजी घेतो. पण रस्त्याकडेला पडलेला माणूस दारू पिऊनच पडला असेल असं गृहीत धरून तिकडे दुर्लक्ष करून पुढे जातो... आपण एका मर्यादेत संवेदनशील असतो पण झळ बसेल अशा बाबतीत निर्विकार असतो. ‘संवेदना आणि निर्विकारता’ या लेखात अधिक व्यापक घटनांसंदर्भात विचार करून मोनाताईंनी हाच मुद्दा लक्षात आणून दिलाय. त्या म्हणतात, आपल्या भोवती घडणारे अत्याचार, गावात, देशात, जगात घडणार्‍या अनेक भयंकर विध्वंसक घटना याबाबतीत आपण निर्विकार असतो. पण हे चुकीचं आहे. गुन्हा करण्याइतकंच ते अश्लाघ्य आहे. आपण आपल्या संवेदनांचा पैस विस्तारून घ्यायला हवा. आपल्याला घेरू पाहणारं दगडी निर्विकारपण भेदायला हवं आणि योग्य भूमिका घेऊन कृतीशील व्हायला हवं.

तरूण पिढीबद्दल सरसकट नाराजीचा सूर ऐकू येतो. पण मोनाताई स्वतः प्राध्यापक आहेत. त्यांनी ‘सल्ला नको विश्वास हवा’ या लेखात झाशी येथील बुंदेलखंड विद्यापीठात आंतरविद्यापीठ युवा महोत्सव संपन्न झाला त्यावेळची आपली निरीक्षणं नोंदवली आहेत. कार्यक्रम अनुभवताना त्यांना जाणवलं की हे विद्यार्थी बेजबाबदार नाहीत. उलट समकालीन सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय घडामोडींकडे त्यांचे बारीक लक्ष आहे. या सर्व बाबतीतली संवेदनशीलता त्यांच्या वागण्या-बोलण्यातून, विविध उपक्रमातील सहभागातून व्यक्त होत होती. मोनाताईंचे हे सकारात्मक निरीक्षण सुखावणारे आहे.

देशातील विकासाचे दाखले देऊन आपला देश महासत्ता होईल असे चित्र उभे केले जाते. पण देशाचा उद्याचा आधारस्तंभ असलेल्या तरुणांना बेरोजगारीचा प्रश्न कसा निराशेच्या गर्तेत नेतो आहे हा मुद्दा उदाहरणं देत अधोरेखित करून मोनाताईंनी देशाच्या विकासाचे चित्र अपूर्ण आहे हे ‘अर्धसत्यापलिकडे’ या लेखात लक्षात आणून दिले आहे.

काळाच्या ओघात गरजेनुसार रूढी परंपरा बदलत असतात. या परिवर्तन प्रक्रियेत नवं काही गवसतं पण जुनं काही गमावलेलं असतं.. थाटामाटात चाललेला एक लग्न सोहळा अनुभवताना अंतर्मुख झालेल्या मनात आलेले विचार ‘काय हरवले काय शोधीशी?’ या लेखात वाचायला मिळतात. ‘देहबोली’चे विविध आयाम ‘अबोलपणे बोलणारी देहबोली’ या लेखात चित्रित केले आहेत तर ‘विरेचनाचा प्रश्न’ या लेखात सामाजिक वास्तवातील विरेचनाची गरज शब्दबद्ध केली आहे.

‘एकमेकांना समजून घेताना’ या लेखात कौटुंबिक, सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा मुद्दा चर्चिला आहे. मला कोणी समजूनच घेत नाही असं म्हणताना मी इतरांना समजून घेतो का याचाही विचार व्हायला हवा हा कळीचा मुद्दा समर्पक काव्यपंक्तींच्या आधारे मांडलेला आहे.

‘होरी’ या लेखात एक काव्यानुभव आहे तर ‘नंदभवन’ या लेखात पूर्वीच्या वास्तव्यातल्या आठवणी नंदभवनला पुन्हा भेट दिल्यावर कशा ताज्या झाल्या त्याचं भावपूर्ण शब्दचित्र आहे. ‘ऋतू आवर्तन’, ‘तिचं अस्तित्व’, ‘एक वजह’ ‘मातृत्वाचं ओझं’, ‘पाचवा कोन’ या लेखांमधून मानवी जीवनातील विविध पैलू त्यातील बारकाव्यांसह उलगडून दाखवले आहेत. हिंदी, मराठी कवितांची जोड दिल्यामुळे हे कथन अतिशय हृदयस्पर्शी झालं आहे.

‘समानतेच्या दिशेने’ या लेखात स्त्री समस्यांचा पाढा न वाचता मोनाताईंनी पुरुषांच्या बाजूने विचार करून तरुण पिढीत होणारा सकारात्मक बदल लक्षात आणून दिला आहे.

पुस्तकात शेवटी शेवटी आलेले ‘नशा कशाची?’, ‘संकल्प गुढी’, ‘मर्यादा पुरुषोत्तम’, ‘निर्णयांचे यशापयश’, ‘धर्म गवसताना’, ‘विचारांचे प्रत्यारोपण’, ‘आभासी वास्तव’, ‘नभांगणातील ठेवा’, हे विशेष उल्लेखनीय लेख मुळातून वाचण्यासारखे आहेत.

‘पळसबंध’ या पुस्तकातील अशा विविध विषयांवरील तीस लेखांमधून मोनाताईंनी वेगवेगळ्या पातळ्यांवरील मानवी वर्तनाचं, विविध सामाजिक प्रश्नांचं, परिवर्तनाच्या झंझावातात हरवलेल्या मौल्यवान मूल्यांचं, कुटुंबातील ताण आणि सामंजस्याच्या गरजेचं आणि तरूण पिढीच्या अवघड प्रश्नांचं कॅलिडोस्कोपिक चित्र रेखाटलं आहे. यातील भाष्य वेगवेगळ्या संदर्भातल्या अनुभवांच्या आधारानं आणि प्रत्येक विषयाचे अनेक पैलू लक्षात घेत केलेलं आहे. एखादा विचार मांडताना उद्‍धृत केलेल्या कवितांच्या समर्पक ओळींमुळे आणि उदाहरणांमुळे तो विचार थेट मनात पोचतो. एकूण लेखन अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारे झाले आहे. लेखांची समर्पक शीर्षके लक्षवेधी आहेत. सदरलेखन किती मर्मग्राही होऊ शकते त्याचे दाखले या पुस्तकात जागोजागी मिळतात. अशा सकस लेखनासाठी मोनाताईंना हार्दिक शुभेच्छा

आसावरी काकडे

मोबा. नं. ९७६२२०९०२८

१०.८.२०२१

Thursday, 18 March 2021

एक निस्पृह समर्पण..

 

कालौघात प्रत्येक कालखंडाचा चेहरामोहरा, स्वभाव बदलत असतो. आताची पीढी बहुतांशी करीअरचा विचार करणारी आहे. आताच्या एकूण वातावरणाचा पगडाच असा की किमान राहाणीमानही फार खर्चिक झाले आहे. जुन्या काळात ज्या गोष्टी अनावश्यक, चैनीच्या किंवा हवं असण्याच्या कक्षेतही येत नव्हत्या त्या आता गरजेच्या होऊन बसल्या आहेत. त्यामुळे दोघांनी कमावणं ही आवश्यक बाब झाली आहे. तीस चाळीस वर्षांपूर्वीही दोघांनी नोकरी करण्याची प्रथा होती. पण त्यावेळी तरुण पीढीवर आदर्शवादी विचारसरणीचा पगडा टिकून होता. ‘साधी राहाणी उच्च विचारसरणी’ अशी वाक्यं मोडीत निघालेली नव्हती. पण तेव्हाही विरळा असणारा एक निर्णय घेऊन तो आजपर्यंत निभावणार्‍या मंजुश्री आणि अरविंद पित्रे या जोडप्याची कहाणी समजून घेण्यासारखी आहे.

विशेष म्हणजे मंजुश्री आणि अरविंद पित्रे आमचे अनेक वर्षांपासूनचे सख्खे शेजारी. यांच्या विषयी विचार करताना मला नाट्यछटाकार दिवाकर यांच्या ‘जिवंत जोडपी’ या संवादाची आठवण झाली. दिवाकर यांच्या समग्र साहित्यात ‘मी माझ्याशी’ असा आत्मसंवाद असलेला एक साहित्यप्रकार आहे. त्यात हा स्व-संवाद आहे. आयुष्याबाबत सजग असणं, स्वतःचं असं काही ध्येय असणं, भोवतीच्या समाजाचा विचार करणं, त्यासाठी काही करणं... म्हणजे माणूस म्हणून जिवंत असणं. पूर्वीच्या काळी या अर्थानं फक्त पुरुषांनाच जिवंत राहता येत असे. दिवाकरांच्या कल्पनेतलं जिवंत जोडपं म्हणजे पती-पत्नी दोघं ‘जिवंत’ असणं. पित्रे पती-पत्नी हे असं ‘जिवंत जोडपं’ आहे.

१९७९ साली आंतरजातीय विवाह करून दोघं प्रत्यक्षात एकत्र आले. त्या आधी जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि विचार जुळण्यातून ते एकत्र आलेलेच होते. श्री पित्रे यांची बहीण मूक-बधीर आहे. घरातल्या एका उदाहरणातून त्यांना कामाची प्रेरणा मिळाली. पार्ले येथील सिरुर बालकाश्रमात मुलांना शिकवण्याच्या छोट्या कामापासून ‘स्व’पलिकडले विचार कृतीत आणण्याला सुरुवात झाली. प्रत्येक काम पुढची गरज लक्षात आणून देणारे होते. अपंगांना सन्मानानं जगता येण्यासाठी रोजगार उपलब्ध हवेत. त्यासाठी त्यांनी सक्षम व्हावं म्हणून प्रशिक्षणाची गरज लक्षात आली. हे सर्व अपेक्षेनुसार सरकारी पातळीवर होण्याला मर्यादा होत्या. त्यातून स्वतःची संस्था स्थापन करण्याची गरज पुढे आली. पण दोघांनी नोकरी करून संस्थात्मक काम करणं अशक्य आहे हे लक्षात आल्यावर मंजूश्रीनं एक जबाबदारीचा धाडसी निर्णय घेतला, तो म्हणजे तिनं नोकरी करून घर सांभाळायचं आणि पित्रे यांनी पूर्ण वेळ संस्थेचं काम करायचं. एका मध्यमवर्गीय कुटुंबासाठी हा निर्णय सोपा नव्हता. पण अनेक समस्या आणि आंतरिक संघर्षाला तोंड देत त्यांनी तो आजपर्यंत निभावला आहे. या संदर्भात १९५३ साली सी. डी. देशमुख आणि दुर्गाबाई देशमुख या सन्माननीय दांपत्यानं दिल्ली इथं मोठ्या पदांवर कार्यरत असताना दोघांपैकी एकानं पूर्णवेळ राष्ट्रकार्य करायचं आणि एकानंच उदरनिर्वाहासाठी वेतन घायचं असा निर्णय घेऊन तो अनेक वर्षे आमलात आणला होता याची आठवण झाली. 

चाळीस वर्षांपूर्वीच्या त्या कालखंडात अनेक ध्येयवादी तरूण बाबा आमटे यांच्या आनंदवनाकडे आकर्षिले जायचे. तिथल्या कामाच्या दर्शनानं भारावून जायचे. समाजकार्याच्या ओढीनं पित्रे पती-पत्नी पण आनंदवनात दाखल झाले. बाबांचं कार्य आणि बोलणं दोन्ही प्रेरणादायी असायचं. कार्यकर्त्यांसमोर बोलताना बाबा एकदा म्हणाले, ‘सर्वांनी इथं आनंदवनातच येऊन काम केलं पाहिजे असं नाही. आनंदवन ही एक प्रवृत्ती आहे. इथं येऊन ती घेऊन जावी आणि प्रत्येकानं आपापल्या कार्यक्षेत्रात आनंदवनं तयार करावित.’ हे वाक्य त्यांच्या मनावर कोरलं गेलं. आणि ‘हिमालयाची लहानशी प्रतिकृती’ होण्याच्या ध्यासानं ते कामाला लागले.

रूढ कौटुंबिक चौकट मोडणार्‍यांना पदोपदी समाजाच्या टीकेला तोंड द्यावंच लागतं. वेगळं काही करू पाहणार्‍याला प्रोत्साहन देण्याऐवजी भोवतीचा समाज कधी टोमणे मारून, कधी थेट तोंडावर बोलून, कधी दुर्लक्ष करून नामोहरम करण्याचा प्रयत्न करत असतो. श्री पित्रे यांच्यापेक्षाही मंजुश्रीला घरातल्या, बाहेरच्या अशा टीकेला तोंड द्यावं लागलं. आम्ही १९८९ पासून शेजारी राहातो आहे. एक प्रसंग आठवतो. पित्रे यांच्या आईचे निधन झाले. त्यावेळी ते किल्लारी येथील भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या कामानिमित्त तिकडे गेले होते. जमलेल्या नातेवाईकांनी त्यांच्या अनुपस्थितीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यावेळी एकटीवर पडलेल्या सगळ्या कामांपेक्षा प्रत्येकाच्या प्रश्नांना, टीकेला तोंड देणं मंजूसाठी अधिक क्लेषकारक झालं असणार. आम्ही दोघी एकाच बँकेत असल्यामुळे बँकेत जाता येता बोलणं होत राहिलं. पण २००२ साली मंजूची बदली गोव्यात झाली. त्यानंतर निवृत्त होईपर्यंत, म्हणजे वीस वर्षे पित्रे कुटुंबाचं वास्तव्य तिथंच होतं. त्यामुळं तिथल्या त्यांच्या रोजच्या जीवन-शैलीविषयी फारसं समजेनासं झालं. आता तिच्याविषयी लिहिताना जाणवतंय की स्वतःच्या कामाविषयी, त्यातील संघर्षांविषयी ती कधीच काही बोललेली नाहीए. जे थोडंफार समजलं ते पित्रे यांच्याकडूनच.

नवर्‍यानं नोकरी करणं आणि बायकोनं घर सांभाळणं ही पारंपरिक रूढ पद्धत. गरज म्हणून दोघं नोकरी करायला लागल्यावर अशा जोडीला डबल इंजिन असा आहेर मिळायचा. पण फक्त बायकोनं कमवायचं, घराची जबाबदारी सांभाळायची आणि नवर्‍यानं ‘समाजकार्य’ म्हणजे लोकांच्या मते लष्करच्या भाकर्‍या भाजायच्या... हे पचायला जरा कठीणच. मग त्यांना ‘तुम्ही हुंडा घेतला नाही म्हणून शेखी मिरवता पण बायकोकडून दर महा पगाररूपी हुंडा मिळतोच आहे की’ अशा प्रकारचे आहेर मिळायचे. पण त्यांनी आपणहोऊन ठरवून ही जीवनशैली स्विकारलेली होती त्यामुळे कितीही टीका झाली तरी ते मागे हटले नाहीत.

मंजुश्रीच्या वेगळेपणाविषयी लिहायचं तर तिची मुलाखत घेणं हा थेट आणि चांगला मार्ग आहे. पण याविषयी तिला बोलतं करणं अवघड आहे. त्यामुळं हे लिहिण्यासाठी पूर्वी इतरत्र झालेल्या एका मुलाखतीत तिनं दिलेल्या त्रोटक उत्तरांचा आधार घ्यावा लागला. तरूण वयात प्रत्येकालाच वेगळं काही करायची उमेद असते. पण त्यासाठी लागणारी जिद्द, निष्ठा आणि कष्ट करण्याची सगळ्यांची तयारी नसते. मंजूकडे हे गुण होते. समविचारी जोडीदार मिळाल्यामुळं वेगळं काही करण्याची उमेद टिकून राहिली. सुरुवातीला अर्थातच कामाचं स्वरूप, दिशा असं काही ठरलेलं नव्हतं. पण सुरुवातीला उल्लेख केला त्यानुसार एकातून एक काम पुढे उभं राहिलं, नवी दिशा मिळत गेली. कामांच्या गरजेतून त्यांनी ‘अरुण मंगल सेवा विकास योजना’ ही संस्था सुरू केली. या संस्थेमार्फत वेगवेगळ्या पातळ्यांवर कार्य उभे राहात गेले... दादर अंधशाळेत साकारलेले विविध प्रकल्प, अंध, मूकबधीर, गतीमंद मुलांसाठी शाळा चालवणे, कर्नाटक हेल्थ इन्स्टीट्यूट व अन्य केंद्रांमधे जयपूर फूट योजना राबवणे, अनेक उपक्रमांमधे अपंगांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण देणे, कोणतंही पद न स्विकारता, काही अपेक्षा न ठेवता वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करणार्‍या संस्थांना आर्थिक आणि कृतीशील सहकार्य करणे अशी बरीच कामं श्री पित्रे यांनी त्यांच्या संस्थेमार्फत केली. ही कामं करताना भेटलेल्या महनीय व्यक्ती आणि कार्यकर्ते यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करणारे ‘सेवार्थ’ हे छोटेसे पुस्तक त्यांनी अलिकडेच लिहिले आहे. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत प्रा डॉ. दया भोर-जेठ यांनी पित्रे यांच्या कामाबद्दल म्हटले आहे, ‘अरविंद यांचे कार्य अपंग आणि दिव्यांग पुनर्वसनाच्या क्षेत्रातले आहे. दिव्यांगांमधील रोजगार कौशल्य आणि उद्योजकता विकास हा त्यांच्या कार्याचा आत्मा आहे. भारतातील अपंगांचा स्व-मालकीचा पहिला कारखाना उभारण्याचे श्रेय त्यांच्या अरुण मंगल सेवा विकास योजना या संस्थेला जाते.’

बाबा आमटे यांच्या प्रेरणेतून सुरू झालेले गेल्या चार दशकांचे आपल्या  संस्थेच्या कामांचा प्रवाह श्री पित्रे यांनी अहमदनगर येथील गिरिश कुलकर्णी यांच्या स्नेहालयातील अनामप्रेम संस्थेच्या विशाल प्रवाहाशी अलिकडेच विचारपूर्वक एकरूप करून टाकला आहे. निस्पृहपणे असं ‘नामा’निराळं होत आजवरच्या धावपळीतून ‘निवृत्त’ होण्याची ही कृती कौतुकास्पद आहे.

दीर्घ कालावधीतील या सर्व कामात आणि वेळोवेळीच्या अशा महत्त्वाच्या निर्णयात मंजूचा सहभाग अदृश्य स्वरूपाचा पण महत्त्वाचा होता. अर्थार्जन करून घराची पूर्ण जबाबदारी सांभाळून श्री पित्रे यांना कामासाठी पूर्ण मोकळीक देणं आणि त्यांच्या कामात कशालाही विरोध न करणं अशी तिची भूमिका होती. सासू सासरे यांची वृद्धापकाळी सेवा, मूकबधीर नणंदेची जबाबदारी, दोन मुलांचे पूर्ण संगोपन, सासर-माहेरचे नातेवाईक, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांचा घरातला राबता.. अशा अनेक अघाड्या सांभाळण्याची कसरत मंजूनं केली. ती करताना आर्थिक जबाबदारी, शारिरीक कष्ट यापेक्षा अवघड काम होतं ते म्हणजे आपला वेगळा विचार सगळ्यांना पटवून देणं. यामधे तिची मानसिक शक्ती पणाला लागली असेल. श्री पित्रे कामानिमित्त सतत बाहेर असल्यामुळे वेळोवेळी या सगळ्यांकडून विचारल्या जाणार्‍या अडचणीच्या प्रश्नांना मंजूला तोंड द्यावं लागलं. त्यापेक्षा अवघड होतं वाढत्या वयातील मुलांच्या समस्या सोडवणं. आई-वडलांच्या रूढ चौकटीपेक्षा वेगळ्या जीवन-शैलीविषयी मुलांना त्यांचे मित्र-मैत्रिणी विचारत असतील त्याबद्दल मुलांनी व्यक्त केलेल्या नाराजीला तोंड देणं, त्यांना समजावून सांगणं.. हे तसं किरकोळ वाटणारं पण मानसिक क्लेष वाढवणारं काम होतं. अशा वेळी पती-पत्नी नात्यातले ताणही वाढू शकतात. हे सर्व नेटानं आणि जिद्दीनं निभावणं सोपं नाही. पण आपण काही विशेष केलं असं ती कधीच बोलून दाखवत नाही. उलट नोकरी आणि घर या दोन आघाड्या सांभाळताना पित्रे यांच्या कामांमधे तिला प्रत्यक्ष सहभाग फार देता आला नाही, संसाराच्या चाकोरीतच अडकावं लागलं अशी खंतच कधी कधी तिला वाटते. श्री पित्रे मात्र आपल्या प्रत्येक मनोगतात मंजुश्रीविषयीच्या कृतज्ञतेची भावना ‘मंजुश्रीची साथ नसती तर या अग्नीपथावर मी टिकलो नसतो..’ अशा शब्दात व्यक्त करत असतात.

‘अरुण मंगल सेवा विकास योजना’ या त्यांच्या संस्थेचं काम काय काय वळणं घेत चालू राहिलं, त्यातून काय काय साध्य झालं, संस्थात्मक कार्याचे, भेटलेल्या लहान-थोर माणसांचे बहुविध अनुभव कसे आले, कोणत्या आर्थिक, सामाजिक, नात्यातल्या संघर्षांना तोंड द्यावं लागलं... या संदर्भात श्री पित्रे यांनी सहाशे पानी कादंबरीच्या स्वरूपात ‘अजून चालतोची वाट’ नावानं एक पुस्तक लिहिलं आहे. तो त्यांचा जीवन-प्रवास आहे. या लेखात प्रामुख्यानं मंजुश्रीच्या योगदानाचं स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थार्जन करून घराची जबाबदारी निभावणं ही दोन पूर्ण वेळाची कामं करूनही वेळ मिळेल तेव्हा मंजू प्रत्यक्ष कामही करत राहिली.

दादर अंधशाळेत त्यांच्या अरुण मंगल सेवा विकास संस्थेनं विविध प्रकल्प साकारले. त्यात मंजूचा प्रत्यक्ष सहभाग होता. नोकरी सांभाळून दर शनिवार रविवारी तिथं जाऊन ती काम करत असे. ते प्रकल्प असे-

१- ब्रेल पुस्तकांचे ग्रंथालय:- ‘श्यामची आई’ पूर्ण पुस्तक ब्रेलमधे रूपांतरित.

२- लिसनिंग टु टॉकिंग बुक :- कॅसेट लायब्ररी व साउंडप्रुफ लिसनींग रूम तसेच लँग्वेज लॅबोरेटरी अशा प्रकल्पात सहभाग

३- उद्योग-व्यवसाय प्रशिक्षण (मुलींसाठी):- पॉटरीमेकिंग, डेकोरेटिव्हज आणि केटरिंग व्यवसाय (अन्नप्रक्रिया उद्योग)

४- विद्यर्थिनींना शिष्यवृत्ती, पारितोषिके देऊन प्रोत्साहित करणे.

५- दिवाकर देशपांडे लिखित कारगिलच्या शौर्यकथांचे ब्रेल रूपांतर व त्याचे प्रकाशन

याशिवाय तिथल्या वसतीगृहातील मुलींना पुस्तकं वाचून दाखवणे, गरजेनुसार लिहून देणे, त्यांचा अभ्यास घेणे, समुपदेशन करणे अशी कामंही ती करत असे. गोव्यात स्थलांतरित झाल्यावर २००२-२०१० या कालावधीत तिनं महिला स्वयंसहायता बचतगटांना मार्गदर्शन केलं.

कोणतंही सामाजिक काम, घरातलं काम, पै पाहुण्यांचे स्वागत, बँकेतली नोकरी.. हे सर्व मंजू पूर्ण समरसून करायची. तिची ही समर्पण वृत्ती विरळा आहे. पित्रे यांच्या कामाचं स्वरूपही कोणतंही पद न घेता सहकार्य करणे, काम झालं की बाजूला होणे अशा प्रकारचं असल्यामुळे गेली चाळीस वर्षे सातत्यानं कार्यरत राहूनही त्यांच्या संस्थेचं कार्यही काहीसं पडद्यामागंच राहिलं. त्यांच्या मागे राहून मंजूनं केलेलं काम तर आणखीच अदृश्य राहिलं. जवळची मैत्रीण असूनही तिच्या या वेगळेपणाचा तपशील मला फारसा उमगला नाही. ती घरासाठी किती जिवापाड कष्ट घेत होती ते मला दिसत होतं. स्वतःकडेही लक्ष दे असं तेव्हा मी तिला सांगत असे. पण तिच्या खर्‍या आंतरिक संघर्षाचा थांग मला कधी लागलाच नाही. हा लेख लिहिण्याच्या निमित्तानं विचार करताना दोघांनी मिळून उभ्या केलेल्या कामातील तिचं मूक योगदान लक्षात येतं आहे. तिच्या या निस्पृह समर्पणाला एक मैत्रीण म्हणून माझा सलाम...!

आसावरी काकडे

‘मिळून सार्‍याजणी’ मासिकासाठी

सुखी सहजीवनाचा सुवर्ण महोत्सव...

 

आसावरी काकडे

सेतू, डी-१/३, स्टेटबँकनगर, कर्वेनगर, पुणे ४११०५२

९४२१६७८४८०, ९७६२२०९०२८

asavarikakade@gmail.com

 


माई-दादा यांच्या लग्नाला पन्नास वर्षं पूर्ण झाली...! असा कोणताही ‘प्रवास’ फक्त ‘आपला’ एकट्याचा कधी असत नाही. आपल्या प्रत्येक वाढदिवसाबरोबर आपल्या असण्याला बिलगलेलं सगळंच एक वर्ष चालून पुढं आलेलं असतं. एका अर्थी माई-दादांच्या लग्नाचा सुवर्णमहोत्सवी वाढदिवस आपल्या सगळ्यांचाच ‘वाढदिवस’ आहे. तो कसा साजरा करावा याचा विचार करताना ‘माई-दादांविषयीच्या आठवणी जागवत, त्यांच्याविषयीच्या भावना लिहून व्यक्त कराव्यात...’ अशी कल्पना सुचली.

त्या दृष्टीनं लिहायला सुरुवात करताना मन पन्नास वर्षं मागं गेलं... माईच्या लग्नाच्या दोन छोट्याशा आठवणी मनात ताज्या आहेत. एक माईचा राणीकलरचा सुंदर शालू. माईनं तो शालु नेसलाय, मोजक्याच दागिन्यांनी नटलीय आणि दादा सुटाबुटात.. असा त्यांचा एक फोटो आहे. दोघं राजा-राणीच वाटतायत त्यात..! आणि दुसरी आठवण- प्रेझेंट म्हणून मी माईला साडीपीन आणि दादांना टायपीन दिली होती...

विचार करताना आणखी काही आठवणी डोळ्यांपुढून सरकत राहिल्या.. बँकेतल्या नोकरीमुळं दादांच्या बदल्या व्हायच्या. बार्शी, लोणंद, नंदुरबार, अंमळनेर, तळेगाव ढमढेरे, सातारा रोड... अशा बर्‍याच ठिकाणी त्यांचं बिर्‍हाड फिरलं. प्रत्येक गावच्या त्यांच्या विशेष आठवणी असतील. तशा आमच्याही आहेत. काही काही निमित्तांनी एकत्र जमल्यावर निवांत गप्पा, हास्य-विनोद चालायचे. त्यात त्या आठवणींचे किस्से सांगून माई सगळ्यांना हसवायची आणि स्वतःही पोट धरून हसायची. तळेगाव ढमढेरे इथल्या घराच्या दारात ट्रक उभा करतात म्हणून माई रागवायची आणि दादा शांतपणे तिला समजवायचे. मग ती आणखी चिडायची, म्हणायची मग बाहेर जाताना आम्ही काय ट्रकमधून जायचं?.. हा किस्सा ऐकताना, मुलांना घेऊन माई ट्रकच्या एका दारातून आत शिरून दुसर्‍या दारातून बाहेर पडतीय असं दृश्य डोळ्यासमोर उभं राहायचं आणि आम्ही खो खो हसायचो... प्रत्येक गप्पांमधे या किश्शाची फर्माईश व्हायची आणि प्रत्येक वेळा हशा पिकायचा..! डोळ्यात पाणी येईपर्यंत पोट धरून हसता येणं हा माईच्या व्यक्तीमत्वाचा एक सुंदर आणि निरगस पैलू आहे.

माईच्या लग्नाला एक-दोन वर्षं झाली असतील. दरम्यान माझंही लग्न झालेलं. मी बॅंकेत नोकरी करत होते. तेव्हा दादा आणि माई एकदा पुण्यात आलेले असताना मला भेटायला बँकेत आले होते. बँकेच्या दारातच आम्ही थोडा वेळ बोललो आणि ते गेले. ‘कुणीतरी आलंय असं समजल्यावर उत्सुकतेनं बाहेर आलेली मी आणि समोर माई-दादा...’ असं दृश्य अजून स्पष्ट आहे डोळ्यांसमोर. काही मिनिटांच्या त्या भेटीत फार काही न बोलता एकमेकींची ‘खुशाली’ आम्हाला समजली आणि ती भेट संस्मरणीय झाली.

एकदा आम्ही कुठल्यातरी गावाला जाणार होतो. सामान भरून ठेवेलेलं. पहाटे निघायचं होतं. आणि अचानक लहानग्या योगेशला घेऊन माई घरी आली. त्याला बरं नव्हतं आणि डॉक्टर आमच्या घराजवळ होते म्हणून ती आमच्याकडे आली होती. आम्ही ठरल्याप्रमाणे गावाला गेलो. योगेशला बरं वाटेपर्यंत काही दिवस ती आमच्या घरी राहिली. जानेवारी महिना असावा... तिनं हळदीकुंकु समारंभही केला. आता आठवताना मनात आलं, योगेशला बरं नसताना, आम्ही घरी नसताना तिनं सगळं कसं निभावलं असेल? तेही इतक्या आनंदानं... आता असंही वाटलं की ती आलेली असताना आम्ही गेलोच कसे?... आता अवघड वाटणार्‍या कितीतरी गोष्टी तरूण वयात सहज केल्या जातात..!

वेगवेगळ्या बदल्यांच्या गावी फिरताना परत परत नव्यानं संसाराची मांडणी करावी लागायची. पण माईला ही सुसंधी वाटायची. ‘नवे गाव नवी मांडणी’ यातला आनंद घेतल्यामुळं माई-दादांचा पन्नास वर्षांचा संसारही नवीन वाटतो. माईकडं कधीही गेलं तरी घरातल्या वस्तूंपासून त्यांच्या मांडणीपर्यंत सगळं नवं, फ्रेश दिसण्यातलं रहस्यही तिच्या या मानसिकतेतच आहे अस मला वाटतं. इतकंच नाही, प्रत्येक गावात माई काहीतरी नवीन शिकत राहिली. लेदरच्या पर्सेस, कागदाची फुलं, पठण, भजन.. असं काय काय केलं तिनं. स्वतः शिकून भोवतीच्या बायकांना शिकवलंही. निर्मलाताई पुरंदरे यांनी सुरू केलेला अंगणवाडीचा कोर्सही तिनं मनापासून केला. ती निर्मलाताईंच्या मर्जीतली विद्यार्थिनी होती. तिच्याकडून आत्ता मीही भजनं म्हणायला शिकतेय. श्वासाचा व्यायाम म्हणून गाणी म्हणून आम्ही एकमेकींना पाठवत असतो... कधी कधी दादांचंही गाणं, बासरी ऐकायला मिळते. खूप छान वाटतं. या विरंगुळ्यामुळं आताचा निवृत्तीनंतरचा काळ आम्ही एन्जॉय करू शकतोय.

दादांचा स्वभाव शांत, काहिसा अबोल, तरी मिस्किल आहे. त्यांनी माईच्या नवनवीन गोष्टी शिकण्याला प्रोत्साहन, सहकार्य दिलं असणार. त्यामुळेच ती सर्व करू शकली. तिनं बनवलेल्या वस्तू आम्हाला भेट म्हणून मिळायच्या. माझ्या कवितांचं तिला कौतुक आहे. त्यामुळे मला तिच्याकडून बरीच बक्षिसं मिळालेली आहेत. आमच्या दोघीत दीडच वर्षाचं अंतर आहे. पण तिच्या मोठं असण्याचा मला नेहमी आदर वाटत राहिला. माईनं केलेला आंगणवाडीचा कोर्स ही कौतुकाची गोष्ट होती तर तिनं केलेली नर्मदा परिक्रमा हा एक वंदनीय चमत्कार होता..! तसं पाहिलं तर आपण जगत असलेला प्रत्येक क्षण चमत्कारच असतो. पण त्यातले काही अधोरेखित करावे असे असतात.

माई-दादांच्या लग्नाला पन्नास वर्षे पूर्ण झाली म्हणून त्यांना शुभेच्छा देताना असं काय काय आठवलं... त्यांचा सातारला आमराईत टुमदार बंगला आहे आणि पुण्यात टेरेस फ्लॅट आहे.. मुलं-सुना-नातवंडं यांच्या समवेत आणि नातलगांच्या गोतावळ्यात दोघं जगण्याचा उत्सव रोजच साजरा करत असतात. त्याच्या सुखी सहजीवनाला अभिवादन..!

माईची भारती

१५.२.२०२१