Showing posts with label टिपण. Show all posts
Showing posts with label टिपण. Show all posts

Friday, 14 June 2024

पुन्हा तुकाराम –दिलीप पुरुषोत्तम चित्रे

 दिलीप चित्रे हे बहुआयामी प्रतिभेचे कलाकार आणि विचारवंत होते. कवी ही त्यांची मुख्य ओळख. पण मूलतः जीवनाकडे वेगळ्या, स्व-तंत्र दृष्टिकोनातून पाहणारे विचरवंत होते ते. देश-विदेशातील सजग वास्तव्यातील विविध अनुभवांचे संचित गाठीशी असूनही त्याच्या प्रभावापासून अलिप्त असा स्वतःचा निखळ विचार त्यांच्या प्रत्येक कला-कृतीमागे होता. कविता, कथा, समीक्षा, नाटक, अनुवाद, ललित लेख अशा विविध लेखनातून, गोदामसारख्या फिल्म निर्मितीतून आणि त्यांच्या खास शैलीतील चित्रांतून याचा प्रत्यय येतो. विशेष म्हणजे त्यांनी कविता आणि चित्रकला क्षेत्रात काही करू पाहणारांना प्रोत्साहन दिलं आणि मार्गदर्शनही केलं. चित्रकला क्षेत्रात त्यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या Friends of visual arts या ग्रुपमधील अनेकजण आज नावारूपाला आलेली आहेत.

दिलीप चित्रेंसह आशय चित्रे, अशोक पाटील, दीपक सोनार, मेहबूब शेख, स्फूर्ति पाटील, शरद कापुसकर, संदेश भंडारे, संदीप सोनावणे... अशा दहा बारा चित्रकारांच्या या ग्रुपची १९९० सालापासून दर वर्षी एक दोन प्रदर्शने भरत आहेत. ती दर्जेदार असतात. त्यातील अनेक चित्रे लक्षवेधी ठरली आहेत. दिलीप चित्रे यांच्या वेगळ्या शैलीतील चित्रांनी रसिकांना चित्रकलेविषयी एक वेगळा दृष्टिकोन दिला आहे.

दिलीप चित्रे यांच्या एकूण लेखनातील ‘पुन्हा तुकाराम’ हे पुस्तक मला विशेष महत्त्वाचं वाटतं. व्यक्तीशः माझ्या विचारांवर या ग्रंथाचा प्रभाव पडलेला आहे. काही लोक संतसाहित्य धार्मिक ग्रंथ म्हणून पूजासामग्रीत ठेवून कारणपरत्वे पारायण करतात. तर काही बुद्धिवादी विचारवंत ‘टाळकुटे’ म्हणून संतसाहित्याकडे पाठ फिरवतात. या पार्श्वभूमीवर चित्रे यांनी संतसाहित्य कविता म्हणून अभ्यासलं. त्यातल्या तुकाराम गाथेनं ते विशेष प्रभावित झाले. त्यांनी तुकोबांची अभंग गाथा देव्हार्‍यातून उचलून जगभरातील कवित्वाच्या शिखरावर नेऊन ठेवली... ‘पुन्हा तुकाराम’ हे पुस्तक लिहून त्यांनी साहित्यक्षेत्रात नवीन दृष्टिकोन प्रस्थापित केला. या पुस्तकातील त्यांचे मननीय विचार साहित्याच्या अभ्यासकांना खडबडून जाग आणणारे आहेत.

या पुस्तकातील मला महत्त्वाचे वाटलेले एक दोन मुद्दे इथे मांडते. चित्रे लिहितात, तुकोबांची अभंग गाथा म्हणजे काव्यत्म आत्मचरित्र आहे. ‘आपण’ हाच त्यातील अभंगांचा मुख्य विषय आहे. हा ‘आपण’ ‘मी’इतका सीमित नाही. तुकोबा आणि विठोबा यांच्या संपूर्ण परस्परमहासंबंधाची महाप्रतिमा निर्माण करणे हे या काव्याचे मुख्य सूत्र आहे. ‘विठोबा’ हा या ‘आपण’चा संदर्भ आहे. ‘तुकोबा स्वतःला थेट विठोबाचेच माप लावून स्वतःतल्या लघुमानवामधून सुप्त महामानवाला जाग आणतात’

गाथेतील ‘तुका म्हणे’ ही प्रत्येक अभंगाच्या शेवटी येणारी सही बरंच काही सूचित करणारी आहे. या ‘सही’मुळेच समग्र गाथेला अंतस्थ अनुभव असलेल्या आत्मचरित्राचे स्वरूप येते. ‘तुका म्हणे’चा अर्थ ‘हा तुकारामाचा अनुभव आहे अशी मी ग्वाही किंवा साक्ष देतो’ असाच बहुतेक ठिकाणी घेता येतो. तुकोबांच्या भक्तीचं स्वरूप, ‘सत्य-असत्याशी मन केले ग्वाही’ या पातळीवरून त्यांनी घेतलेला ईश्वराचा शोध आणि समाजस्थिती संदर्भात त्यांचं जागरुक असणं.. हे सर्व त्यांच्या अभंग या काव्यात्म अभिव्यक्तीमधून समजून घेता येतं.

तुकोबांना त्यांच्या काळातही छळणारे लोक होते. त्यांनी त्यांचं सर्वस्व असलेल्या अभंगांच्या वह्या इंद्रायणीत बुडवायला लावल्या. पण तुकोबांच्या भक्ती सामर्थ्याने त्या तरल्या. या आणि ‘ते सदेह वैकुंठाला गेले’ या दैवी चमत्कार मानल्या गेलेल्या गोष्टींकडे पाहण्याचा एक वेगळा अधिक अर्थपूर्ण आणि प्रगल्भ दृष्टिकोन ‘पुन्हा तुकाराम’ या पुस्तकाने वाचकांना दिला आहे. भोळे भाबडे लोक त्याच्याकडे दैवी चमत्कार म्हणून बघतात तर काही बुद्धिवादी लोक त्याला अंधश्रद्धा ठरवतात. ‘पुन्हा तुकाराम’ या पुस्तकातून मिळणारा अशा गोष्टींमधली प्रतिकात्मकता समजून घेणारा काव्यात्म दृष्टिकोन या दोन टोकांमधली शहाणी समजूत हातात ठेवतो. ही समजूत जगणं समजून घेताना सतत माझ्या सोबत राहिली.

या पुस्तकात एके ठिकाणी म्हटलं आहे, ‘आपण तुकोबांची गाथा वाचतो ती तुकोबांना समजून घेण्यासाठी नव्हे तर स्वतःला समजून घेण्यासाठी’. हे अगदी खरं आहे. कारण गाथा म्हणजे एका सामान्य माणसाचा ईश्वरभक्तीच्या आधारे प्राणांतिक खरेपणानं घेतलेला स्वशोध आहे. गाथा वाचताना मला जाणवत राहिलं की तुकोबांचा ईश्वरशोध हा एकप्रकारे स्वशोधच होता. म्हणूनच हा शोध लागला तेव्हा ते म्हणू शकले, ‘अणुरणिया थोकडा तुका आकाशाएवढा..!’

आसावरी काकडे