Friday 6 October 2023

भक्तीच्या स्वरूपाविषयी थोडसं-

श्रद्धा, ईश्वर आणि भक्ती हे प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचे उत्सुकतेचे विषय असतात. कुणी याच्या आधाराने जगण्यासाठी बळ मिळवतं तर कोणी त्याची प्रामाणिक चिकित्सा करत राहतात. बहुसंख्य लोक या संदर्भातले कर्मकांड सवयीनं, उत्साहानं, नाईलाजानं, भीतीपोटी, अंधश्रद्धेनं करत राहतात. यातली भोंगळ निर्बुद्ध  विघातक भक्ती टीकेचा विषय होते. 

आपल्या वृत्ती-प्रवृत्ती प्रमाणे भक्ती संदर्भातली कृती करणे किंवा त्यातल्या फक्त दुष्प्रवृत्तीच लक्षात घेऊन ईश्वर- भक्ती- श्रद्धा हा विषयच नाकारणे अशी दोन चित्रं समाजात दिसतात. भक्ती हे एक सामाजिक वास्तव आहे आणि ते चांगलं की वाईट हा मुद्दा बाजूला ठेवून भक्ती हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय होऊ शकतो हे सहसा कुणाच्या लक्षात येत नाही. पुणे विद्यापीठाच्या वतीने आयोजित केलेल्या भक्ती अभ्यास वर्गामुळे भक्ति या विषयाकडे बघण्याची एक नवी दृष्टी मिळाली.

माणसाचं व्यक्तिगत जीवन आणि सामाजिक जीवन ज्या ज्या गोष्टींमुळे समृद्ध बनतं त्या सर्वांची सुरुवात भक्ती प्रेरणेतून झालेली आहे. संगीत, नृत्य, साहित्य, वास्तु, शिल्प, नाट्य.. इत्यादी सर्व कलांवर भक्तीचा प्रभाव आहे. त्यांची मूळ प्रेरणा भक्ती ही आहे. तिनं माणसाच्या प्रगतीचा इतिहास घडवला. भक्ती हा मानवी जीवनातला इतका महत्त्वाचा घटक असल्यामुळे व्यक्तिगत पातळीवर भक्ती स्वीकारणे किंवा नाकारणे पुरेसं नाही. भक्तीचं मानसशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, सौंदर्यशास्त्र.. अशा विविध अंगांनी भक्तीचा आंतरशाखीय अभ्यास व्हायला हवा.

अशा अभ्यासासाठी भक्ति म्हणजे काय? भक्तीचं स्वरूप काय? हे पाहणे गरजेचे आहे. भारतीय तत्त्वज्ञानाच्या इतिहासात भक्तीचं स्थान काय? या इतिहासाचा आरंभबिंदू असलेल्या वेदांच्या सुरुवातीला कर्मनिष्ठा विस्ताराने येते. वेदांतांमध्ये, उपनिषदांमध्ये प्रामुख्याने ज्ञाननिष्ठा येते. सर्व दर्शने विश्वाच्या निर्मितीचा/ स्वरूपाचा विचार करतात आणि त्याचे ज्ञान कसे होते, ज्ञानाची प्रमाणं कोणती याचा अभ्यास करतात. हे ज्ञान होणे हे मोक्ष साधन मानतात. या सर्व मांडणीत ईश्वर येतो तो केवळ एक तार्किक आवश्यकता म्हणून. (ज्या अर्थी विश्व आहे त्या अर्थी त्याचा कर्ता ईश्वर असला पाहिजे) बऱ्याच दर्शनांनी तर ही आवश्यकताही नाकारली आहे. सारांश भक्तांचा ईश्वर, भक्ती इथै येत नाही.

पूर्वमींमासा (कर्मनिष्ठा) ब्रम्हसूत्रे (ज्ञाननिष्ठा) यांच्या धरतीवर नारदमुनी आणि शांडिल्य यांनी भक्तिसूत्रे लिहिली. त्यासाठी वेदांचा आधार मिळवताना त्यांना कसरत करावी लागली. व्यासकृत भागवत पुराण आणि गीता हे दोन ग्रंथ स्पष्टपणे भक्तीग्रंथ आहेत. भक्तीचे महत्त्व आणि भक्तीचं स्वरूप याचा अभ्यास या ग्रंथांच्या आधारे करता येतो. भक्ती मानणाऱ्या रामानुज, मध्व, वल्लभ, निंबार्क या आचार्यांनी आपल्या मांडणीसाठी या ग्रंथांचा आधार घेतला.

भारतामध्ये सर्वाधिक प्रमाणात कृष्णभक्ती आढळते. राम-भक्तीचं प्रमाण त्यामानानं कमी आहे. भारताच्या उत्तर, पूर्व भागात बालकृष्ण किंवा गोपींचा कृष्ण यांची भक्ती प्रामुख्याने केली जाते. तिथल्या संगीत, नृत्य, नाट्य.. या भक्तीतून निर्माण होत राहिलं. महाराष्ट्रात प्राधान्याने गीता सांगणाऱ्या कृष्णाची भक्ती प्रचलित आहे. वारकरी संप्रदाय हा प्रमुख आणि प्रभावी असा भक्ती-संप्रदाय असून त्यांच्या प्रमुख आधार ग्रंथांपैकी एक ग्रंथ ज्ञानेश्वरी. गीतेवरील मराठी भाषेत केलेलं विस्तृत काव्यमय भाष्य असं त्याचं स्वरूप आहे. पंढरपूरचा विठ्ठल हे वारकरी पंथाचे दैवत आहे.

महाराष्ट्रातील संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम या संतांचे कार्य आणि त्यांचे ग्रंथ भक्तीच्या संदर्भात महत्त्वाचे आहेत. आपल्या ग्रंथांतून त्यांनी जनसामान्यांचे प्रबोधन करत करत खऱ्या भक्तीचे स्वरूप सांगून अर्थपूर्ण जगण्याची प्रेरणा सर्वांना दिली. संतांच्या भक्तीचं स्वरूप अधिक व्यापक आणि समंजस आहे. त्यांनी दैनंदिन कर्मे, संसार नाकारला नाही. फक्त त्यातच अतिरिक्त लडबडणं चुकीचं मानलं. निस्वार्थ, निरपेक्षपणे संसार करणे हे कर्तव्य मानलं. त्यालाच भक्तीचं साधन बनवून त्यात हार्दिकता आणली. त्यासाठी ज्ञान आवश्यक मानलं. कर्म, ज्ञान आणि भक्ती या निष्ठांमधला तात्विक ताण अलगद बाजूला करून त्यात समन्वय साधला. ज्ञानप्राप्तीच्या प्रक्रियेला भक्तीची जोड दिली तर सौंदर्यानुभवाचा आनंद मिळतो आणि संसारादी कर्तव्यांना भक्तीचे साधन मानले तर प्रेमसुख अनुभवता येते हे स्वतःच्या जगण्यातून लक्षात आणून दिले.

ज्ञान प्रक्रियेला भक्तीची जोड देणं किंवा दैनंदिन व्यवहाराला भक्तीचं साधन मानणं/ करणं म्हणजे काय? कसं? हे समजून घेण्यासाठी भक्ती म्हणजे काय? भक्ती-प्रक्रिया काय आहे? हे जाणून घ्यावे लागेल. विविध भक्ती-ग्रंथांत भक्तीच्या व्याख्या केलेल्या आहेत. ‘फिलॉसॉफी ऑफ ज्ञानदेव’ या ग्रंथात डॉक्टर बी पी बहिरट यांनी ज्ञानेश्वरांची भक्ती-कल्पना स्पष्ट करताना या विविध व्याख्या दिलेल्या आहेत. त्यातल्या काही अशा-

1-Bhakti is the worship of God - Vyas

2- Bhakti is meditation on the self- Shandilya

3- Bhakti is the highest love for God- Narad

4- Bhakti is kind of Ulhas of the mind, it is of the nature of Rasa- Bhakti Mimamsa Sutras

5- Bhakti is not some external mode of approach to reality or God, but it forms the very essence of reality which is self experiencing and self-illuminating.- Dr B P Bahirat

या विविध व्याख्या, विशेषतः ज्ञानेश्वरांची भक्ती संकल्पना समजून घेताना प्रामुख्याने दोन गोष्टी लक्षात आल्या. एक- भक्ती हे काही सांसारिक लाभ मिळवण्याचे तर नाहीच पण मुक्तीचेही साधन नाही. भक्ती ही स्वतःच साध्य असलेली गोष्ट आहे. दोन- भक्ती ही दिवसातला काही काळ नाही तर सततच अनुसरण्याची, अनुभवण्याची गोष्ट आहे. भक्ती संकल्पनेचा अधिक खोलात शिरून सतत विचार करताना वेगवेगळ्या तऱ्हेने भक्ती प्रक्रियेचा उलगडा होत गेला. एकदा असं वाटलं की भक्ती प्रक्रिया ही निर्मिती प्रक्रियेसारखी आहे. काय असते कला-निर्मिती प्रक्रिया? एखाद्या अनपेक्षित क्षणी मनाच्या सांदीकोपऱ्यात अवघडून बसलेले आवेग गोळा होऊन येतात मनात, अमूर्त स्तरावर काही प्रकट व्हायच्या संधीची वाट पाहतंय असं जाणवायला लागतं. सजग मन या निराकार आवेगांचा आशय शोधू लागतं. हळूहळू तो भावाशय स्पष्ट होत जातो आणि मग उत्कटतेनं जाणवलेलं व्यक्त होतं एखाद्या कवितेत, कलाकृतीत. ही सर्व निर्मिती-प्रक्रिया म्हणजे एक प्रकारे व स्व-शोधाची, आत्मशोधाचीच प्रक्रिया असते. कवितेत, कलाकृतीत जे जे आकलन, उत्कट वाटणं व्यक्त होतं ते ते सर्व आपलंच स्पष्टीकरण असतं. 'बोलाविता धनी' आपल्या माध्यमातून स्वतःचं स्पष्टीकरण देत असतो काय? डॉ बहिरट यांच्या वर उल्लेख केलेल्या पुस्तकात भक्ती संदर्भात एक वाक्य आहे- "God realisation means understanding how God realise Himself through one's being and this is the secret of natural devotion"

या वाक्याचा आशय समजून घेताना निर्मिती प्रक्रियेतील 'बोलाविता धनी वेगळाची' असं वाटण्याच्या अवस्थेची आठवण झाली. तुकाराम महाराजांच्या अभंगांमधून या तऱ्हेच्या, या पातळीवरच्या भक्ती-प्रक्रियेचा उलगडा होतो. याचं स्पष्टीकरण देणं हा स्वतंत्र आणि मोठी व्याप्ती असलेला विषय आहे तसाच तो प्रत्येकाने स्वतःच अनुभवण्याचाही विषय आहे.

भक्तीचा दृश्य, बाह्य व्यवहार हा कर्ममार्ग किंवा ज्ञानमार्ग याच तऱ्हेचा असणार. याखेरीज भक्ती म्हणून तिचं वेगळेपण, तिचा स्टेटस काय? याचा विचार करताना असं जाणवलं की तिचं वेगळेपण तिच्या प्रक्रियेत आहे. ही प्रक्रिया एक प्रकारे कलेच्या आस्वाद-प्रक्रियेसारखी आहे. कलावस्तूचं अस्तित्व-रूप हे खुद्द कलावस्तूत नसतं तर ते आस्वाद-प्रक्रियेत निर्माण होणाऱ्या सौंदर्यवस्तूत असतं. एखादं चित्र, शिल्प किंवा कविता कोणतीही कलावस्तू आपल्या जागी मूक असते. सौंदर्य निर्मितीच्या शक्यता संभाव्य रूपात तिच्यात पडून असतात. रसिक जेव्हा त्या कला-वस्तूचं रसग्रहण करू लागतो तेव्हा त्या शक्यता जिवंत होऊन रसिकाच्या मनात सौंदर्य-वस्तूची निर्मिती होते. मूर्तित, धर्मग्रंथात, अभंग-ओव्यात ईश्वर असतो काय? भक्ताला उपासना-प्रक्रियेत, त्या संदर्भात झालेल्या चिंतन-मनन प्रक्रियेत तो प्रतीत होतो सौंदर्यानुभूतीप्रमाणे..! उपासनेच्या नानापरी रुढीने सांगितलेल्या आहेत त्या ईश्वरात्वाचा हरप्रकारे अनुभव घेता यावा म्हणून. ज्ञान-प्रक्रिया आनंदाची भावी म्हणून. उदाहरणार्थ मंदिर प्रदक्षिणा अशासाठी की सर्व बाजूने सौंदर्यानुभूती घेता यावी. चारीधाम यात्रा अशासाठी की पाहणाऱ्या दृष्टीची कक्षा व्यापक व्हावी. ग्रंथ पारायण अशासाठी की शब्दातून शब्दापलीकडलं तत्त्व जाणता येण्याची प्रक्रिया चालू राहावी. नामस्मरण अशासाठी की बाकी सगळ्या अनावश्यक गोष्टींचं विस्मरण व्हावं... यासंदर्भातलं हे क्रिएटिव्ह अंडरस्टँडिंग महत्त्वाचं आहे.

कलानिर्मिती आणि कलास्वाद यांच्या आधाराने भक्ती संकल्पना समजून घेताना जाणवलं की जर्मन तत्वज्ञ एडमण्ड हुसेर्ल यांची प्रत्ययवेधकारी पद्धती (फिनॉमिनोलॉजी) हा मुद्दा नेमकेपणाने स्पष्ट करणारी आहे. या पद्धतीत ज्ञानप्राप्तीचे साधन म्हणून अंतःप्रज्ञेवर भर दिलेला आहे. इंद्रियानुभव आणि बुद्धी (reason) हे घटक पुरेसे नाहीत. प्रत्यक्ष वस्तू, अनुभव हा येथे अभ्यासाचा, चिंतनाचा विषय नाही तर त्यांचे प्रत्यय, अनुभवाचा अनुभव हा अभ्यास विषय आहे. यासाठी सर्व पूर्वग्रह, कल्पना इत्यादी अनुभवबाह्य गोष्टी बाजूला सारून निखळ अनुभवाला सामोरं जावं लागतं. 'सद्वस्तूवर (Thing in itself / noumena) लक्ष केंद्रित करा' हे हुसेर्लच्या प्रत्ययवेधकारी पद्धतीचे घोषवाक्य आहे. या पद्धतीत शेवटच्या टप्प्यावर सर्व प्रकारच्या अनुभवांच्या अतीत असलेल्या आत्मरुपाचा (Transcendental Subjectivity) शोध घेणे अपेक्षित आहे.

या पद्धतीने भक्ती-प्रक्रिया अधिक नेमकेपणाने समजून घेता येईल का? हा स्वतंत्र अभ्यासाचा, संशोधनाचा विषय होऊ शकेल.

उपनिषदे, गीता, ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराजांची गाथा... अशा महत्त्वाच्या ग्रंथांचे सखोल वाचन, त्यातील आशय समजून घेण्यासाठी केलेलं मनन-चिंतन (जे क्रिएटिव्ह असू शकेल), भक्तीच्या अनुभवासाठी असलेला आकांताच्या पातळीवरचा ध्यास आणि आंतरिक परिवर्तनासंदर्भातली सजगता हे भक्ती-प्रक्रियेचे टप्पे होऊ शकतील.

कर्ममार्गातील (पूर्वमीमांसा) उपासना स्वर्गादी फळांची अपेक्षा करणारी असल्यामुळे ती खऱ्या भक्तीच्या व्याख्येत बसत नाही, तर ज्ञानमार्गियांना ज्ञानप्राप्तीसाठी श्रद्धेची आणि ज्ञानप्राप्तीनंतर भक्तीची आवश्यकता वाटत नाही. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील संतांची भक्ती संदर्भातील भूमिका सर्वार्थाने महत्त्वाची ठरते. त्यांनी सांगितलेली भक्ती करण्यासाठी कोणत्याही बाह्य पात्रतेची गरज नाही. त्यांच्या भक्तीने प्रचलित व्यवस्थेशी विधायक विद्रोह केला. हा विद्रोह आत्माविष्काराचा हक्क बजावण्यासाठी होता. त्यांच्यासाठी पांडुरंग हा सखा बनतो. जीवीचे आर्त ऐकायला केव्हाही तत्पर असणारा. अशा भक्तीपुढे त्यांना मोक्षाचीही मातब्बरी वाटत नाही. उलट मोक्ष म्हणजे मूळ अद्वैत स्थितीत परतणं, हे विश्व-निर्मितीच्या हेतूविरुद्ध आहे असं त्यांना वाटतं. हे दृश्य विश्व त्यांनी मिथ्या मानलं नाही. उलट त्यांची भक्ती विश्व प्रक्रियेशी समरस होण्याची शक्ती प्रदान करणारी आहे. म्हणूनच त्यांनी 'हे विश्वची माझे घर / ऐसी मती जयाची स्थिर / किंबहुना चराचर / आपणची झाला /..’ असा भक्त होणं हे मोक्षापेक्षा अधिक श्रेयस्कर मानलं. अशी भक्ती हा पाचवा पुरुषार्थ आहे. दैनंदिन जीवनातली सर्व कर्तव्ये ईश्वरार्पण बुद्धीने पार पाडणे म्हणजे एक प्रकारे निर्मिती हेतू लक्षात घेऊन विश्व निर्मितीच्या खेळात सहर्ष सहभागी होण्यासारखं आहे. संतांची भक्ती याहून वेगळी नाही.

सद्यस्थितीत चंगळवादाच्या मानसिकतेची लागण झपाट्याने सर्वत्र होते आहे. ती माणसाला कुठे घेऊन जाणार आहे ते कळेनासे झाले आहे. अशावेळी निस्वार्थ असणं ही पूर्वअट असणाऱ्या, व्यापक दृष्टिकोन देणाऱ्या खऱ्या भक्तीची ओळख सर्वांना व्हायला हवी आहे.

आसावरी काकडे

भक्ती अभ्यासवर्ग, पुणे विद्यापीठ साठी लिहिलेला निबंध

 

No comments:

Post a Comment