Showing posts with label नियतकालिकांसाठी लेख. Show all posts
Showing posts with label नियतकालिकांसाठी लेख. Show all posts

Tuesday, 16 January 2024

भीती सर्वव्यापी नसतेच तर...

अनेक भावभावनांचा गुंता असलेलं मानवी मन हे एक न सुटलेलं कोडं आहे. कोणतीही एक भावना स्व-स्वरूपात एकटी नसते. कारण आणि परिणाम रूपात  प्रत्येक भावना इतर भावनांच्या आगेमागे रेंगाळत असते. भीती या भावनेचा विचार करायचा तर रोजच्या जगण्यात वैयक्तिक आणि सामाजिक स्तरावर प्रत्येक प्रसंगी ती काळजी.. तणाव.. अस्वस्थतेच्या रूपात सोबत असते. मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे भीती. ‘भय इथले संपत नाही..’ हे पटतं बरेचदा..

भीतीची आणि माझी फार जुनी मैत्री आहे. मी तिला दूर करायचा कितीही प्रयत्न केला तरी ती मला सोडत नाही. ‘नेमेची येतो मग पावसाळा’ सारखं वादळ-वारा, वीजा, गडगडाट, धुवांधार पाऊस... हे सर्व नेहमी अनुभवाला येणारं... तरी या वातावरणात भीतीही नेमानं मनाचं दार ठोठावत येते. भीतीला माझ्या मनाचा रस्ता इतका सवयीचा झालाय की अशी कुठली चिन्हं जरी दिसली तरी ही सरळ येते मनात. एकदा अशीच आली पावसाच्या पाठोपाठ आणि मला मिठी मारून बसली. तेव्हा घाबरलेल्या मला माझ्यातल्या निरीक्षक ‘मी’ नं समजावलं, ‘तू ती नाहीस धडधडत आत बसलेली... बाहेर कोसळतेय, गडगडतेय, चमकतेय ती तू आहेस..!’ पण कवितेनं घातलेली अशी उंची समजूत उंच उडीसारखी क्षणार्धात जमिनीवर आणणारी असते. ती कायम सोबतीला राहात नाही.

 

भीतीची एक संस्मरणीय आठवण असंच एक शहाणपण हातात ठेवणारी आहे... एकदा आम्ही तिघी मैत्रिणी वेताळ टेकडीच्या पुढे दगडाच्या खाणी आहेत तो परिसर बघायला गेलो होतो. संध्याकाळचे सहा वाजून गेलेले... आकाशात काळ्या ढगांनी गर्दी करायला सुरुवात केली होती. वादळ.. वावटळ दबा धरून बसल्याच्या खुणा वातावरणात स्पष्ट दिसत होत्या.. आणि आम्ही तिघी निघालो होतो. दुतर्फा पसरलेली झाडी पूर्णतः झडून नग्न झालेली. आमच्या मागे पुढे कोणी दिसत नव्हतं. क्वचित कोणी दिसत होतं ते परत येतानाच. आणि आम्ही आता चाललो होतो. गप्पा तत्त्वज्ञानाच्या, शहाणपणाच्या, उभारी धरण्याच्या युक्त्यांच्या... आणि मनात भीतीनं पंख पसरलेले. त्या पंखांनी अंतराकाश झाकोळून टाकलेल. डोळ्यांनी सौंदर्य टिपण्याचं आणि मेंदूपर्यंत पोचवण्याचं आपलं काम केलेलं. पण भीतीनं आगोदरच संवेदनांच्या दारावर नजर ठेवलेली.

गप्पा मारत आम्ही पुढं पुढं चाललो होतो. परत जाऊया असं वाटणं मी आत दडवून ठेवलं होतं. माझं लक्ष गप्पा, आतली भीती आणि बाहेरचा भिववणारा भव्य निसर्ग या तिघात विभागलं गेलं होतं. चालता चालता अखेर दगडाच्या खाणींचा तो स्पॉट आला. इतक्या दूरवर माणसांची रहदारी बेताची, तरी आधार वाटेल इतपत होती. तिथं जरा निवांत बसलो. छान वाटत होतं. पण तिकडे पुरेसं लक्ष जात नव्हतं. ते भीतीनं वेधून घेतलं होतं... आता उठूया असं मी म्हणायच्या आत मैत्रिण म्हणाली आणि आम्ही परतायला लागलो. हायसं वाटलं. भीती घाबरवून मनासमोर चित्र उभं करत होती तसं काही झालं नाही. वादळ वारा विजा पाऊस... काहीच आलं नाही. अंधारही अजून बाहेर पडला नव्हता. आम्ही सुखरूप घरी पोचलो..!

भीतीचा हा अनुभव डायरीत नोंदवून ठेवावा असा झाला. लिहिताना लक्षात आलं की भीती फक्त सोबत करत होती. तिनं मला रोखून धरलं नव्हतं. डायरीत लिहिताना मला फक्त भीती नाही, सर्व परिसर भव्य सौंदर्यासह आठवत होता. म्हणजे भीती सर्वव्यापी नव्हतीच तर..! तिच्या शिवाय इतर बरंच काही अनुभवता आलेलं होतं. ‘सगळं अंग दुखतंय’ असं आपण म्हणतो तेव्हा दुखून लक्ष वेधणारा अवयव एखाद-दुसराच असतो. बाकी सगळे अवयव मजेत असतात. तसंच काहीसं..

असंही लक्षात आलं की भीती फक्त ‘असं झालं तर..’ अशा कल्पनांचं बोट धरून मनात शिरत असते आणि आपल्याला सावध करत असते. भीती ही एक आवश्यक भावना आहे खरंतर. आपण लहान मुलांना ‘पडशील..’ ‘लागेल..’ ‘भाजेल..’, ‘कापेल..’ असं म्हणतो तेव्हा नकळत भ्यायला शिकवत असतो. मुलांच्या मनात धावण्याची पडण्याशी, सुरी.. कात्रीची कापण्याशी.. अशी सांगड घातली जाते. यातून मुलं त्या त्या संदर्भात काळजी घ्यायला शिकतात. पण कधी कधी एखाद्या गोष्टीची मानात कायमची भीती बसू शकते. मग ‘डर के आगे जीत है..’ असं समजवावं लागतं. साहस करायला प्रोत्साहन द्यावं लागतं. मुलांना घडवण्याच्या या दोन पातळ्यांवरच्या दोन प्रक्रिया आहेत.

घरातील संस्कार, जीन्समधून आलेले पूर्वसंचित आणि जगताना येणार्‍या अनुभवातून आपण घडतो. व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणतात. कुणाला पाण्याची भीती वाटते, कुणाला अंधाराची, कुणाला लोक काय म्हणतील याची.... धीट माणसालाही कसली ना कसली भीती वाटत असते. तो गर्दीत शिरून भांडण सोडवेल, अपघातग्रस्ताला अशक्य वाटणारी मदत करेल.. पण त्याला स्टेजवर उभं राहून बोलायची भीती वाटेल.. मी तशी घाबरट आहे. बर्‍याच गोष्टींची मला भीती वाटते. पण लोक काय म्हणतील याची मला भीती वाटत नाही...

आपल्याला बरेचदा अकारणच भीती वाटते. अस्वस्थ करते. ती रिकामेपणाची भीती असते. माणसाला जाणीव असते आणि जाणीव आहे याचंही भान असतं.. या विश्वातील इतर सर्व घटक विश्वाचा अविभाज्य भाग असतात. पण जाणीव असल्यामुळे माणूस एकूण अस्तित्वाचा अविभाज्य भाग होऊ शकत नाही. तो वेगळेपणानं विश्वाकडे आणि स्वतःकडेही पाहू शकतो. या जाणिवेला सतत काहीतरी विषय लागतो. तो मिळाला नाही की माणूस अस्वस्थ होतो. त्याला त्या रिक्ततेची भीती वाटते. माणसाच्या स्वरूपाचा शोध घेणार्‍या अस्तित्ववादी लेखनात या अवस्थेला anguish म्हटलं आहे. अस्तित्ववादी कादंबर्‍यांमधील नायक अशी अस्वस्थता अनुभवत जगण्याचा अर्थ शोधत असतो. मी इथं का आहे? असा निरुत्तर करणारा मूलभूत प्रश्न त्याला पुन्हा पुन्हा निरर्थकतेच्या गर्तेत ढकलत राहातो..! विचार करणार्‍या सर्जक मनाला अशी भीती व्याकुळ करते. त्यातून कधी कधी श्रेष्ठ कलाकृती जन्माला येते. सर्वसामान्य माणूसही व्याकुळ करणारी अशी भीती अनुभवत असतो. पण बहुतांश माणसं तिला सामोरं न जाता तिच्यापासून पळ काढतात.

जगताना भेडसावणार्‍या अशा सगळ्या निरुत्तर करणार्‍या प्रश्नांना ईश्वर हे तयार उत्तर पळ काढण्यासाठी सहज उपलब्ध असतं. वेगवेगळ्या प्रकारच्या भीतींमधूनच आधार देणार्‍या ईश्वराची निर्मिती झाली. कुणीतरी विश्वनियंता आहे ही भावना दिलासा देणारी असते. भवितव्याबद्दलच्या काळजीतून भीती निर्माण होते. ती अस्वस्थ करते. मानवी प्रयत्न थिटे पडतात. कित्येकदा परिस्थिती हाताबाहेर जाते. अशा कोणत्याही वेळेस शरण जावं, आधार घ्यायला धाव घ्यावी असं समर्थ ठिकाण ईश्वर-रूपात आपल्या हाताशी असतं.

असे आधार गृहीत धरून बहुतांश माणसं स्वतःला सावरत, कुणाच्या वट्याला न जाता जगत असतात. काही दादागिरी करत असतात. त्यांचे वागणे घाबरवणारे असते. पण खरंतर ती स्वतःच आतून घाबरलेली असतात. त्यांचा अहंकार त्यांना ते मान्य करू देत नाही. वरवर दिसणार्‍या त्यांच्या मग्रुरीच्या मुळाशी भीती असते. मोठमोठ्या लढाया.. महायुद्धे, स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी होत असतात. अशी आक्रमणं, अत्याचार करणार्‍या क्रूर वृत्तींच्या मुळाशीही भीतीच असते. आपल्याला कोणी शह देऊ नये, आपल्या स्थानाला धक्का लागू नये म्हणून अशी दहशत पसरवली जाते की कुणी मान वर करून बघू नये, विरोधी बोलू नये, लिहू नये...

आक्रमकता..हिंसा-भीती, प्रेम-व्देष..राग... अशा मानवी भावना एकमेकीत गुंतलेल्या असतात. माणसं, घटना-प्रसंग समजून घेताना ही गुंतागुंत समजून घ्यावी लागते. त्यासाठी इमोशनल इंटेलीजन्सची गरज असते. बरेचदा माणसाची ‘तो भयाने फांदिला बिलगून बसला / पंख होते लाभले नाही कळाले..!’ अशी अवस्था असते. त्याला त्याच्या क्षमतांच्या पंखाची जाणीव करून द्यावी लागते.

कधीकधी काही प्रेरणा भीतीपेक्षा वरचढ ठरतात आणि बेभान होऊन माणसं कृती करून जातात.. महापूर आलेल्या यमूनेतून नवजात बालकाला घेऊन निघालेल्या वसुदेवाची गोष्ट किंवा ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ ही ऐतिहासिक घटना सर्वश्रुत आहे. सामान्य माणसंही अशा कृती करत असतात. गिर्यारोहणासाख्या वेगवेगळ्या साहसी मोहिमा यशस्वी करणारी कितीतरी माणसं असतात.

नैसर्गिक आपत्तींची टांगती तलवार, जुलुमी राजवट, दहशती हल्ले, वेगवेगळ्या साथी... अशा गोष्टींची भीती समाजमनात सतत असते. संपूर्ण जगाने करोनाच्या दहशतीचा अनुभव नुकताच घेतलेला आहे. जगभरातील न परतीच्या वाटेवरच्या विकासाच्या सर्व गोष्टींचे साइड इफेक्ट्स आपल्याला भोगावे लागत आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वेगवेगळ्या कारणांनी होणारी पर्यावरणाची हानी. माणूस संपूर्ण पृथ्वीला कुठल्या गर्तेत घेऊन चालला आहे याची जाणीव जाणकार अभ्यासक सतत करून देत असतात. पण अशा सामूहिक भीतीनं कोणी फारसं अस्वस्थ होत नाही. Everybody’s work is nobody’s work अशी अवस्था झाली आहे.

हल्लीच्या इंटरनेटच्या जगात भीतीने वेगळेच रूप धारण केले आहे. अनेक फायदे असलेली पण ‘अटी लागू’ असलेली Apps आपण डाउनलोड करतो तेव्हा वेळोवेळी केलेल्या ‘allow’ मधून सांगून सवरून, कबूल करून घेत आपला सर्व डाटा गोळा केला जातो. आपण काय करतो, कुठे जातो, काय पाहतो, काय खातो.. या सर्वावर नजर ठेवली जाते. आपण आपली प्रायव्हसी गमावलेली आहे. वेगवेगळ्या धोक्यांवर उपाय म्हणून कडेकोट सुरक्षाव्यवस्था केली जाते. पण सोशल मीडीयामुळे आपण उघडे पडत चाललो आहोत... या विषयीची मीहिती करून घेऊ तेवढी भीती गडद होत जाते. पण आता याला पर्याय राहिलेला नाही. जगताना काळाच्या ओघात वाट्याला येणारी प्रत्येक परिस्थिती म्हणजे सुविधांची किंमत वसूल करणारे एक पॅकेज डील असते. आणि ते आपण जन्मतःच स्वीकारलेले असते.

पण माणसाची जिजीविषा इतकी प्रबळ असते की कुठूनही, केव्हाही हल्ला करणार्‍या भीतीने कितीही घाबरवले तरी तिला मनातळात दाबून ठेवत माणूस आयुष्य उपभोगत असतो. सर्व प्रकारचे सणवार, लग्न-समारंभ, पार्ट्या, मेळावे, शिबीरं, वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम सर्वकाही सुखेनैव चाललेले असते..! जगताना ठायीठायी भेटणारी भीती सर्वसाक्षी असली तरी सर्वव्यापी नसतेच तर..!

आसावरी काकडे

(लोकसत्ता चतुरंग पुरवणीसाठी)

१८.१२.२०२३


Friday, 6 October 2023

‘मुक्तामाय’मय वृषाली..

 ‘मुक्तामाय’ हे वृषाली किन्हाळकर यांनी लिहिलेलं व्यक्तिचित्रात्मक दीर्घकाव्य आहे. एका हृद्य कार्यक्रमात नुकतच त्याचं प्रकाशन झालं. तो अनुभव अगदी ताजा आहे. कार्यक्रमाचं प्रास्ताविक करणारी, ‘मुक्तामाय’मय झालेली वृषाली डोळ्यासमोर आहे. मुक्तामाय ही एका छोट्या गावातली साधी सुईण. हिच्यावर दीर्घकाव्य लिहावं असं का वाटलं हे वृषाली आपल्या प्रास्ताविकात सांगत होती... ‘गेली तीस वर्षे ही माझ्या मनात, हृदयात, विचारात आहे आणि थोडी थोडी कृतीत आणण्याचा प्रयत्न करते आहे... तिनं सगळ्यांना प्रेम करायला शिकवलं. माणसावर, प्राण्यांवर, मातीवर, झाडांवर... वेदनेवरही. कोण होती ती? ‘अडलेल्या’ कुणाच्याही सुटकेसाठी धावून जाणारी एक सुईण होती. बायांना घेऊन माझ्याकडे यायची.. प्रत्येकीबरोबर तिचं अपार मायेनं वागणं पाहून मला कौतुक वाटायचं. हळूहळू ओळख होत गेली..  अवघ्या दहाव्या वर्षी एक मुलगा असलेल्या तीस वर्षांच्या माणसाशी तिचं लग्न झालं. समज येऊन नांदायला जाण्यापूर्वीच नवरा मेला. मादी होण्यापूर्वीच ती सावत्र मुलाची माता झाली... बाईपणाचे कुठलेच सोहळे वाट्याला न आलेली ही मुलगी आपल्या सावत्र मुलाचीच नाही तर गावाचीच माय झाली. ही माय कधी कुणावर वैतागली नाही. दैवावरही नाही. जगता जगताच जगणं समजून घेतलं तिनं...’

‘पदरात चहुकडून दुःखच पडलेलं असून इतरांच्या दुःखनिवारणासाठी ती खपत राहिली...’ वृषाली तिच्या थोरपणाचे एकेक दाखले देत होती.. ‘एकदा तिला गायीनं ढकलून दिलं तर उठून त्या गायीच्या पाठीवर हात फिरवत म्हणाली, ‘मुकं जनावर ते.. तेला बोलता येतंय व्हय? आमचीच चुकी झाली. ती माजावर आलेली. आम्हीच काही सोय केली नाही..’ तिच्याविषयी किती बोलू आणि किती नको असं वृषालीला झालं होतं... तिच्या बोलण्यातला आर्द्र आवेग श्रोत्यांना भारावून टाकणारा होता.

अठरा वर्षे तिच्या सहवासात राहिल्यावर, तिच्या मृत्यूनंतरही बारा वर्षे मनात घर करून राहिलेल्या मुक्तामायवर वृषालीनं दीर्घ काव्य लिहिलं. अशी एक निर्मळ मनाची, त्यागमूर्ती असलेली बाई केवळ आख्यायिका होऊन राहू नये, लोकांपर्यंत तिची थोरवी पोचावी म्हणून..! मराठी कवितेत दीर्घ काव्याची परंपरा मोठी आहे. दीर्घ काव्याचा विषय होण्यासाठी तसं आवाहन असलेलं व्यक्तित्व हवं. वृषालीला मुक्तामायमधे ते दिसलं. आणि विषयाचं पुरेसं मुरवण झाल्यावर तिनं ते लिहिलं. दीर्घ काव्यातील द्रौपदी, सीता, माधवी, जिजाऊ... अशा ऐतिहासिक, पौराणिक व्यक्तिरेखांच्या यादीत मुक्तामाय जाऊन बसली..  

एका साध्या सुईणीमधलं पराकोटीचं माणूसपण जाणवणं, त्याविषयी नितांत आदर वाटणं.. यासाठी तशाच संवेदनशील माणसाचं मन असावं लागतं. कलेचा आस्वाद घेण्यासाठी कालसक्त मन असावं लागतं तसंच काहीसं हे आहे. मुक्तामायच्या सहवासात राहून तिच्यातल्या निर्मळ, निस्वार्थ माणूसपणाचं दर्शन वृषालीला होत राहिलं. ते तिच्या इतकं जिव्हारी लागलं आणि इतक्या दीर्घकाळ टिकलं की त्यातूनच या दीर्घकाव्याची निर्मिती झाली.. या निर्मिती-प्रक्रियेत माणूस म्हणून स्वतःला घडवत राहाण्याची तिची पुण्याई सामिल झालेली आहे. वृषालीचं लेखन आणि तिचं जगणं याची ही सांगड विलोभनीय आहे.

वृषाली माझी जुनी मैत्रिण. जसजशी तिची लौकिक ओळख होत गेली तसतशी तिची अंतरंग ओळखही होत गेली...

वृषाली किन्हाळकर हे नांदेड शहरातलं एक बहुआयामी प्रसन्न व्यक्तिमत्व. अंबेजोगाई मेडिकल कॉलेजमधून डॉक्टर झालेली वृषाली स्‍त्रीरोग तज्ञ म्हणून नांदेड येथे कार्यरत आहे. कवीमनाच्या वृषालीची डॉक्टर ही भूमिका यशस्वी आणि लोकप्रिय आहे. ‘मुक्तामाय’ हे दीर्घ काव्य प्रकाशित होण्याआधी ‘तारी’ आणि ‘वेदन’ हे तिचे दोन कवितासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. ‘सहजरंग’ अणि ‘संवेद्य’ हे दोन ललित लेखसंग्रहही तिच्या नावावर आहेत. तिचं हे अनुभवजन्य लेखन मानाच्या विविध पुरस्कारांनी सन्मानित झालेलं आहे. ही तिची लौकिक ओळख... ‘मुक्तामाय’ हे दीर्घ काव्य लिहिणार्‍या वृषालीची अंतरंग ओळख या बायोडाटात मावणारी नाही.

व्यवसायानं स्त्रीरोगतज्ञ असल्यामुळे वृषालीला अनेक स्त्रियांच्या वेगवेगळ्या समस्या कळतात. त्या स्त्रियांच्या कुटुंबियांचा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कळतो. यातून घडणारं समाजदर्शन तिला अंतर्मुख करतं. अज्ञान, हतबलता, विवेकाचा अभाव, भोवतीच्या माणसाचा दबाव, अंधश्रद्धा.. परंपरांचा पगडा या आणि अशा अनेक गोष्टींनी प्रश्न कसे गुंतागुंतीचे होतात ते तिला उमगतं. यातून येणार्‍या अस्वस्थतेसंदर्भात ती म्हणते सटवाईनं माझ्या कपाळावरच ही चार अक्षरं लिहिली आहेत. लेखनातून ती या अस्वस्थतेला वाट करून देत असते. तिचं संवेदनशील मन टिपकागदासारखं आहे. रोज येणार्‍या अनुभवातून शिकत ती स्वतःला घडवत राहिली. कमावलेलं शहाणपण लेखनाच्या माध्यमातून इतरांपर्यंत पोचवत राहिली.

महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्रात २०११-१२ दरम्यान तिनं सहा-सात महिने ‘माझे अध्यात्म’ हे वैचारिक लेखनाची मागणी करणारं सदर लिहिलं. ते मी नियमित वाचत असे. छोटे छोटे प्रसंग चालू घडामोडींशी जोडून घेत, वेगवेगळे संदर्भ देत लिहिण्याची तिची शैली मला आवडली होती. सदरलेखनासारख्या मर्यादित आवाका असलेल्या लेखनातूनही ती उद्‍धृत करत असलेली संतवचने, अभंग, ओव्या, कवितांच्या ओळी.. यातून तिचा खोल व्यासंग लक्षात यायचा. आपल्याला नाही निदान सवतीला तरी मूल होऊदे म्हणून देवाशी भांडणारी स्त्री, नवरा आणि सासरा यांचा बाहेरख्यालीपणा पचवून सासूला आणि घराला सावरणारी स्त्री, पहिल्या रात्रीच्या संबंधात योनी फाटून होणारा रक्तस्त्राव थांबत नाही म्हणून दवाखान्यात आलेली दुल्हन, नसबंदीसाठी आलेली सोळा सतरा वर्षाची कोवळी तरुणी... अशा अनेकींनी वृषालीला खोलवर दुखवून लिहितं केलं. पण केवळ लेखनातून शमणारी ही अस्वस्थता नव्हती. समाजप्रबोधनाची किती गरज आहे हे तिच्या लक्षात आलं. शिबिरं घेऊन, बोलण्याची संधी मिळेल त्या व्यासपीठावरून ती जनजागृती करू लागली...

उस्मानाबाद येथे झालेल्या सातव्या लेखिका साहित्य संमेलनाची ती अध्यक्ष होती. त्यावेळी तिनं केलेल्या अध्यक्षीय भाषणाची छापिल प्रत तिनं मला पाठवली होती. त्या बत्तीस पानी भाषणात तिनं उस्मानाबाद गावाविषयी, तिथल्या साहित्यिकांविषयी, त्यांच्या साहित्याविषयी, तिच्या शैक्षणिक जडणघडणीविषयी सविस्तर लिहिलेलं आहे. आपल्याला घडवणार्‍या आई-वडील, गुरूजनांविषयीचा आदर नम्रतापूर्वक व्यक्त केला आहे. हे भाषणही तिच्या अभ्यासू वृत्तीचं, तिच्यातील मर्मज्ञ लेखिकेचं, डोळस, विवेकी डॉक्टरचं दर्शन घडवणारं आहे.

स्त्रीरोग तज्ञ म्हणून स्वतःच्या हॉस्पिटलमधे प्रॅक्टीस करताना आलेल्या अनुभवातून आपण कसं शिकत गेलो ते तिनं उदाहरणं देत सांगितलं. तिच्या हॉस्पिटल मधे तिच्या टेबलावर बरीच पुस्तकं असतात. ती पाहून एका पेशंटनं विचारलं, तुमी तर आता डॉक्टर झाल्या मग एवढी पुस्तकं काउन वाचता? वृषालीला गंमत वाटली या प्रश्नाची. म्हणाली शिक्षणानं मला डॉक्टर केलं. या पुस्तकातून मी चांगलं माणूस व्हायला शिकते आहे.. !

एका बाजूला समाजकार्यच म्हणता येईल असा डॉक्टरी व्यवसाय, लेखन, प्रबोधन.. आणि त्याच्या बरोबरीनं स्वतःच्या घडणीवर सतत काम करणं हा वृषालीच्या व्यक्तित्वाचा पैलू दुर्मिळ आहे. ‘संवेद्य’ या लेखसंग्रहाच्या मनोगतात आपल्या सदरलेखनाबद्दल वृषालीनं म्हटलं आहे, ‘आयुष्यानं ज्यांचं दर्शन घडवलं अशी विविध स्वभावाची माणसं, त्यांचं जगण्याचं त्यांच्या परीचं तत्त्वज्ञान अन्‍ त्यांच्या जगण्यातून मी शोधलेले आयुष्याचे वेगवेगळे अर्थ.. या शिदोरीवरच मी हा दोरीवर चालण्याचा प्रयत्न करू शकले. हे लेखन नाही, माझी ध्यासयात्रा आहे. अजून संपलेली नाही, संपण्याची शक्यताही नाही..!’

यातला ध्यासयात्रा हा शब्द बरंच काही सुचवणारा आहे. वृषालीला एक चांगलं माणूस असणं महत्त्वाचं वाटतं. व्यक्तित्वाच्या बाकी कोणत्याही पैलूपेक्षा माणूसण तिला अधिक आकर्षित करतं. म्हणूनच लौकिक दृष्ट्या सामान्य अशा  ‘मुक्तामाय’च्या प्रेमात ती आकंठ बुडाली. ‘मुक्तामाय’ पुस्तकाला लिहिलेल्या ‘एक निष्णात शल्यविशारद असण्याबरोबरच एक उत्तम माणूस असणारे माझे गुरू डॉ. हरिश्चंद्र वंगे यांना..’ या अर्पणपत्रिकेतही हा मुद्दा अधोरेखित झाला आहे. मुक्तामायच्या सहवासात तिनं काय काय अनुभवलं, प्रत्येक अनुभवातून तिला मुक्तामायचं अधिकाधिक मायाळू, निस्वार्थ रूप कसं उमगत गेलं, प्रगल्भ माणुसकीचं दर्शन कसं विस्मित करत गेलं.. ते सगळं एका उत्कट आवेगात शब्दांत उतरत गेलं आणि या दीर्घकाव्याची निर्मिती झाली. या दीर्घकाव्याचं स्वरूप स्वगत संवाद असं आहे. हे पूर्णच वाचायला हवं असं आहे. पण या काव्यातील उत्कटतेची झलक कळावी म्हणून त्यातल्या काही ओळी देते-

‘उशीराच आलीस तशी तू माझ्या आयुष्यात

खरंतर तुला घडताना पाहायचं होतं.

दिवसागणिक निखरत गेलेलं तुझं

शुभ्रस्फटिक माणूसपण न्याहाळायचं होतं.

 

स्वतःला पूर्णपणे विसरून

इतकं कर्माशी तद्रुप होता येतं

परदुःख कातरता इतकी सहज सुंदर असते

हे तुला बघूनच कळत गेलं.

 

बायांच्या वेदनेच्या राज्यातला

तू एक धीराचा पैस होतीस !

तुझ्या हृदयस्थ धवलतेमुळे

मला तू जगातली

सर्वाधिक देखणी भासायचीस

इतकी दुःखवेगळी... की देवरूप वाटायचीस !’

 

हे दीर्घकाव्य वाचताना वृषालीचं ‘मुक्तामाय’मय असणं सतत जाणवत राहातं ! मनोगतातही असंच भारावलेपण आहे. मनोगताच्या सुरुवातीला तिनं लिहिलंय, ‘मुक्तामाय ही माझ्या आयुष्यात आलेली खरीखुरी, हाडामांसाची जिवंत बाई. तिच्याबद्दलचं हे दीर्घकाव्य वाचल्यावर अशी बाई खरोखरच वास्तवात असू शकते यावर आजच्या पिढीचा विश्वास बसणार नाही. ती अक्षरशः दुर्मिळ अशी बाई होती..’

एक व्यक्ती, एक लेखिका, एक डॉक्टर, एक आई, आणि माजी गृहराज्य मंत्री असलेल्या डॉ. माधवराव किन्हाळकर यांच्यासारख्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तीची पत्नी अशा विविध स्तरांवर स्वतः वाढत राहून इतरांना वाढण्यासाठी मदत, मार्गदर्शन करणं ही जबाबदारी कुशलतेनं आणि मनस्वीपणानं पार पाडणारी वृषाली हेही एक दुर्मिळ रसायन आहे. वृषालीच्या लेखनातून, ती करत असलेल्या कामातून तिचा परिचय होतो त्याहून अधिक तिच्या सहवासातून होतो. पण ती नांदेडला आणि मी पुण्यात. त्यामुळे वरचेवर भेटी होत नाहीत. मिळून सार्‍याजणी’च्या विशेष ओळख सदरात तिच्याविषयी लिहायची संधी मला मिळाली याचं समाधान आहे. पण मला होत गेली तेवढीच ही ओळख आहे. या पलिकडेही वृषालीच्या व्यक्तित्वाचे आणखी काही पैलू असतील...

आसावरी काकडे

३०.१२.२०२२

(मिळून सार्‍याजणी’ अंकासाठी- फेब्रु.२०२२)

 

 

 

 

 

 

Wednesday, 6 May 2020

वाचन-मंदिर



‘आपटे वाचन मंदिर..’ या इचलकरंजी येथील सांस्कृतिक चळवळीचे केंद्र असलेल्या ग्रंथालयाशी माझा फार जुना संबंध आहे. या ग्रंथालयाला १५० वर्षे पूर्ण होत आहेत. या दीर्घ कालावधीतल्या ग्रंथालयाच्या कारकीर्दीचा इतिहास समजून घेण्यासारखा असणार. या निमित्ताने प्रकाशित होत असलेल्या स्मरणिकेत तो वाचायला मिळेल. वाचन संस्कार शिबीर, ग्रंथप्रदर्शन, साहित्यिक गप्पा, व्याख्यानमाला... असे अनेक पूरक उपक्रम या ग्रंथालयाद्वारे राबवले जातात. त्यापैकी मी अनुभवलेला एक उपक्रम म्हणजे ग्रंथालयाची साहित्यपुरस्कार योजना. या योजनेअंतर्गत २००० साली माझ्या ‘मी एक दर्शनबिंदू’ या कवितासंग्रहाला पुरस्कार मिळाला होता. तो घेण्यासाठी मी ग्रंथालयाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित होते. तेव्हा ग्रंथालयाचा आणि त्यात कार्यरत असणार्‍यांचा परिचय झाला होता. आता स्मरणिकेसंदर्भात ग्रंथालयाचे पत्र आले ते वाचताना ही आठवण जागी झाली...

या स्मरणिकेसाठी लेख लिहिणाच्या निमित्ताने या ग्रंथालयाविषयी विचार करताना प्रथम लक्ष वेधून घेतलं ते ग्रंथालयाच्या नावानं. एखाद्या ग्रंथालयाला मंदिर म्हणणं यात पुस्तकं आणि वाचन याविषयीची खोल जाण आणि आत्मीयता दिसून येते. ..! हे नावच ग्रंथालयाचा उदात्त हेतू अधोरेखित करणारं आहे. पुस्तकं आणि वाचन हे साहित्य क्षेत्राचे दोन महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. कोणतेही ग्रंथालय या आधारस्तंभांची जोपासना करत असते. पुस्तकं लेखक आणि वाचक यांना मनानं जवळ आणतात. जवळ येण्याची ही प्रक्रिया वाचनातून प्रत्यक्षात उतरते. त्यातून लेखक-वाचक नातं अधिक दृढ होत जातं. त्यांच्यात संवाद सुरू होतो. तो लेखक वाचक दोघांना घडवणारा असतो. लेखक वाचक घडवण्याचं फार महत्त्वाचं कार्य ग्रंथालयं करत असतात. एका अर्थी माणूस घडवण्याचंच कार्य आहे ते.

या लेखात मी पुस्तकं आणि वाचन या दोन आधारस्तंभांविषयी लिहिणार आहे. ‘पुस्तकं’ नावाची एक अतिशय आशयघन कविता आहे. पुस्तकांविषयी लिहायचं तर नीलिमा पालवणकर यांची ही एकच कविता पुरेशी आहे. या कवितेत त्यांनी पुस्तकांचं अंतरंगच उलगडून दाखवलं आहे. पुस्तकं आपल्यासाठी काय काय करतात आणि ते दान आपल्या ओंजळीत घेता येण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागतं ते अगदी सूक्ष्मपणे शब्दांकीत केलेलं आहे. ती कविता अशी-

पुस्तकं

पुस्तकं गच्च भरलेलं आभाळ असतात
तेव्हा आपण जमीन व्हावं लागतं
आणि मुरवावं लागतं त्यांना
आपल्या आत.
कधी ती झाडे होतात धनदाट तेव्हा आपण
पांथस्थ होऊन,
बसायचं असतं, त्यांच्या सावलीला
निवांत.

कधी कधी तर ती पक्षी होतात
तेव्हा पंखात बळ घेऊन उडावं लागतं
आपल्याला त्यांच्या बरोबरीनं.

पुस्तकातून कधी शिशिरही भेटतो,
तेव्हा आपण उजाड माळ होतो,
तेव्हा तीच वसंताची चाहूल होतात
आपल्यासाठी.

पुस्तकांना स्पर्श असतो, वास असतो
पण त्यासाठी मनाला
फुटाव्या लागतात,
संवेदनांच्या लक्ष पाकळ्या.
मग पुस्तके उधळून टाकतात,
वसंतातले सगळे रंग.

पुस्तकांना कळते सगळे सगळे
आपल्याला कळते का?
पुस्तकांचे आभाळमन?
***
नीलिमा पालवणकर

पुस्तकं गच्च भरलेलं आभाळ असतात खरी... पण त्या आभाळाच्या धुवांधार वर्षावात चिंब भिजून सुजलाम सुफलाम व्हायचं असेल तर आपल्याला जमीन व्हावं लागतं आणि मुरवून घ्यावं लागतं त्याचं स्वर्गीय दान आपल्या आत..! कवितेच्या सुरुवातीला कवयित्रीनं जणू पुस्तकवाचनाची प्रक्रियाच सांगितलीय. मग पुस्तकं कशी, काय काय असतात ते सांगितलंय. आणि जाता जाता हेही लक्षात आणून दिलंय की पुस्तकांना स्पर्श असतो, वास असतो पण त्यांच्या आस्वादासाठी मनाला संवेदनांच्या लक्ष लक्ष पाकळ्या फुटाव्या लागतात..!

अशी ‘पुस्तकं’ आपटे वाचन मंदिरासारख्या ग्रंथालयात निगुतीनं सांभाळून ठेवलेली असतात. त्यांच्यातली अक्षरबद्ध ज्ञानसंपदा आत्मसात करायची तर त्यांचं वाचनही तितक्याच आत्मीयतेनं व्हायला हवं. पुस्तकांशी एकरूप होत केलेलं वाचन किमया करू शकतं. ते शब्दात अडकलेलं ज्ञान आपल्या ओंजळीत घालतं आणि आपल्याला शहाणं, प्रगल्भ करतं.. वाचता वाचता नकळत मनात प्रश्न पेरले जातात. त्यांच्या उत्तरांसाठी मन अस्वस्थ होतं. अशा सैरभैर अवस्थेत त्या संदर्भातल्या योग्य अशा दुसर्‍या पुस्तकांची साद ऐकू येते. ती मिळवून वाचली जातात. वाचताना मन अंतर्मुख होतं तेव्हा आतला अपूर्णतेचा आंधार जाणवतो. अस्वस्थता वाढते. पण पुस्तकांनी एकदा धरलेलं बोट सुटत नाही. वाचन-प्रक्रिया चालूच राहते. ही प्रक्रिया मनाची मशागत करणारी असते. ती खोदत राहाते खोल... आतला पैस वाढवते. या विस्तारलेल्या आवारात मग सामावू शकतात दुरस्थ अनुभवांचे काफिले, जे शिकवून जातात स्वतः न जगलेल्या कैक आयुष्यांचे धडे. समजूत विस्तारत जाते. तिला नवनवीन दिशा कळतात...

जगताना समोर आलेल्या समस्या कधी कधी आपल्याला निराशेच्या कड्यावर नेऊन ठेवतात. तेव्हा कोसळत्या क्षणी आत रुजलेलं, वाचनातून कमावलेलं शहाणपण आधार देतं. वाचन सतत आत्मसंवादाला वेगवेगळे विषय पुरवतं आणि आंतरिक परिवर्तनाच्या प्रक्रियेला गती देतं. माणूस म्हणून जिवंत ठेवतं आपल्याला..! पण हे सगळं कायम हाताशी राहात नाही. जगताना पुन्हा नव्या प्रश्नाची ठेच लागते. घायाळ व्हायला होतं. आतील शहाणपणाला साद घालावी तर ते मलूल होऊन पडलेलं असतं.. अशावेळी वाचनच विझू विझू झालेल्या आतल्या शहाणपणात पुन्हा प्राण फुंकतं आणि धीर देतं..! 

‘पुस्तकं’ आणि ‘वाचन’ माणसाला कसं घडवत असतात ते लिहिण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. ७०००० इतकी भव्य ग्रंथसंपदा असलेल्या आणि दीडशे वर्षांची मोठी परंपरा असलेल्या आपटे वाचन मंदिरासारख्या ग्रंथालयाने अशी कितीतरी माणसं घडवली असतील. त्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करून ग्रंथालयाच्या कार्याला हार्दिक शुभेच्छा देते आहे. 

आसावरी काकडे
२७.४.२०२०
asavarikakade@gmail.com

(आपटे वाचन मंदिर स्मरणिकेसाठी)

Monday, 9 March 2020

माझी थोरली मैत्रीण...



काही विशेष घडलं किंवा अडलं तर ते विद्याताईंना कळवायचं ही माझी मानसिक गरज होती. त्यानुसार तीन चार महिन्यांपूर्वी एक विशेष बातमी देण्यासाठी मी विद्याताईंना फोन केला होता. त्यांनी उत्फुल्लपणे माझ्या आनंदाचं स्वागत केलं. वाडेश्वर हॉटेलात जाऊन हा आनंद सेलिब्रेट करण्याचं ठरलं. दुसरे दिवशी त्या नागपूरला जाणार होत्या. आठ दिवसांनी परत येणार होत्या.

त्यानंतर आमचा फोन झाला नाही. मग त्या आजारी असल्याचं.. दवाखान्यात असल्याचं समजलं. मग कुणाला भेटू देत नव्हते, बोलायलाही जमत नव्हतं असं कानावर येत राहिलं. मग त्यांनी उपचार घेणं बंद केल्याचं समजलं. हे अनपेक्षित नव्हतं तरी नकळत एक दीर्घ निःश्वास टाकला गेला. मनात आलं, उपचार बंद करण्याचा कोणता असेल तो निर्णायक क्षण? विद्याताईंनी नेमक्या कोणत्या अवस्थेत घेतला असेल तो निर्णय? नेहमीच्या उत्सुकतेनं आता लगेच फोन करून विचारायची संधी नव्हती. त्यांनी इच्छामरणाचा विचार सातत्यानं लावून धरला होता. या संदर्भातल्या त्यांच्या विचारात स्पष्टता येत गेली होती. ती त्यांच्या लेखनातून, भाषणांमधून आणि वैयक्तिक संवादातून मी समजून घेत होते. वाटलं, विचारांचा पुरेसा रियाज करून झालाय.. आता प्रत्यक्ष ‘रणभूमी’वर उतरायची वेळ आलीय.... आणि अखेर त्यांनी जिंकलं..!

मी कुणाच्या अंत्यदर्शनाला जात नाही. पण विद्याताईंच्या दर्शनाला जावंसं वाटलं. आयुष्यभर विवेकावर विश्वास ठेवणारं, पटलेले विचार जगण्यात आणि असे मरण्यातही उतरवणारं माणूस कसं दिसतं ते पाहावसं वाटलं....

विद्याताई आता आपल्यात नाहीत हे समजल्यापासून त्यांच्याबरोबर झालेल्या असंख्य संवादांच्या आठवणींनी मनातली त्यांची जागा व्यापायला सुरुवात केलीय. आमची पहिली भेट झाली ती स्त्री मासिकाच्या कार्यालयात. साधारण १९८१-८२च्या सुमारास. स्त्री मासिकातला सखी मंडळाचा वृत्तान्त वाचून त्या मंडळाची सभासद होण्यासाठी मी तिथे गेले होते. माझ्यातल्या परिवर्तनाच्या सुरुवातीचा पहिला दिवस होता तो.

विद्याताईंकडून तत्पर आणि मार्गदर्शक प्रतिसाद मिळतोय म्हटल्यावर मी मनातली सगळी अस्वस्थता पत्रातून विद्याताईंना कळवू लागले. अवतीभवती साजरे होणारे सणवार.. रीती रिवाज.. भोंडले.. हळदीकुंकु.. याविषयीचा मला वाटणारा तिटकारा.. राग.. हा त्यावेळचा माझ्या अस्वस्थतेचा मुख्य विषय होता. बाकी सगळे यात आनंद घेत असताना मला कसा याचा इतका राग येतो? माझ्यातच काही दोष, उणीव आहे का? असं वाटून मी अस्वस्थ व्हायची. विद्याताईंच्या पत्रातून ‘वेगळा विचार करणारे वेगळेच पडायला लागतात..’ असं माझ्या वेगळेपणाचं समर्थन करणारा प्रतिसाद मिळाल्यावर माझ्यातला न्यूनगंड गेला. आपण योग्य दिशेनं विचार करतोय हा त्यांच्या पत्रातून मिळालेला दिलासा मला घडवणारा होता...

ही जडणघडण मग चालूच राहिली. विद्याताईंच्या मार्गदर्शनाखाली सखी मंडळातून होणार्‍या विविध विषयांवरील चर्चांमधून सामाजिक प्रश्नांचं भान येत गेलं. स्त्री-विषयक प्रश्नांचं स्वरूप स्पष्ट होत गेलं. त्यासाठी काही करण्याची गरज लक्षात आली. एका लहान ग्रुपमधे आपलं मत मांडण्याची संधी मिळू लागली... हे सगळंच माझ्यासाठी अगदी नवीन होतं. लहानपणापासून माझ्यावर झालेल्या घरबंद संस्कारांमुळे इथं येईपर्यंत ‘मी- माझं घर नाही तर मग एकदम ईश्वर..’ असा केंद्र-परीघ स्वरूपाचा माझ्या विचारांचा पैस होता. या दोन्हीच्या मधल्या आवाक्यात समाज नावाचा असंख्य प्रश्नांनी व्यापलेला जिवंत विषय येतो याचं भान मला नव्हतं. ते आलं. एका बाजूला हे सर्व वैचारिक भरण-पोषण माझ्यातल्या ‘मी’ला नवी जाग आणणारं होतं. आणि दुसर्‍या बाजूला विद्याताईंकडून ‘बोला.. लिहा..’ असं आवाहन सतत होत होतं. त्यामुळे माझ्यातली सर्व आंतरिक स्थित्यंतरं मी शब्दांमधून व्यक्त करू लागले. व्यक्त केलेलं शेअर करायला समविचारी मैत्रीणी मिळाल्या. विद्याताई माझ्या थोरली मैत्रीण झाल्या. लेखन या अत्यंत प्रभावी माध्यमाची खर्‍या अर्थाने ओळख मला त्यांच्यामुळेच प्रथम झाली. एखादा विषय नेमक्या शब्दात मांडायचे, जे वाटतं ते धीटपणे व्यक्त करण्याचे संस्कारही त्यांच्या लेखनातून, बोलण्यातून होत राहिले. त्याचं एक उदाहरण चांगलं लक्षात आहे...

एकदा एका सरकारी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सरस्वती पूजन करण्याच्या विनंतीला विद्याताईंनी नकार दिला. नकार देताना त्यांनी असं कारण दिलं की आपल्या देशाच्या घटनेनुसार आपला देश धर्मनिरपेक्ष आहे. त्यामुळे सरकारी कार्यक्रमात एका धर्माची देवता असलेल्या प्रतिमेची पूजा करणं योग्य नाही. नंतर ‘संवाद’ या त्यांच्या संपादकीयातून त्यांनी या विषयावर वाचकांकडून मतं मागवली. तेव्हा माझं काहीसं विरोधी मत मी पत्रातून कळवलं होतं. आपण लोकशाही मानतो तर बहुसंख्य लोकांची प्रथा असलेली सरस्वतीपूजा का नाकारायची? त्या कार्यक्रमात उपस्थित असलेले एक-दोन अन्य धर्मी लोकसुद्धा याचा सहज स्वीकार करतील. जाहीरपणे पूजा नाकारण्यात त्यांना चिथावणी आणि बहुसंख्यांची नाराजी असं होत नाही का? विद्याताईंनी अशी विरोधी मतं मांडणारी पत्रंही अंकात प्रसिद्ध केली होती. विरोधी मतं समजून घेण्यामागची त्यांची विचार-शैली मला महत्त्वाची वाटली होती. विद्याताईंचं म्हणणं तत्त्वतः बरोबरच होतं. असंख्य कार्यक्रमातून सर्रास असे सरस्वती-पूजन होतच असते. मात्र सरकारी कार्यक्रमात तरी तसे केले जाऊ नये अशी त्यांची भूमिका होती.

आधी ‘स्त्री’ आणि मग ‘मिळून सार्‍याजणी’च्या वाचकांना लिहितं करणारे असे बरेच मुद्दे विद्याताई सातत्यानं विचारार्थ देत असायच्या. एखाद्या खुल्या पुस्तकासारख्या होत्या त्या. स्वतःच्या जगण्यातून, कामातून सतत शिकण्याच्या भूमिकेत असायच्या. वैयक्तिक वैचारिक संघर्षात वाचकांना सामिल करून घेत होत्या. त्यांचं विचारमंथन सार्‍यांना सोबत घेऊन चालायचं. स्त्री, मिळून सार्‍याजणी’चे काही विशेषांक असायचे. लग्न, सहजीवन, वृद्धत्व, इच्छामरण असे जीवनाशी निगडीत विविध विषय देऊन त्यावर लेख मागवले जायचे. त्यातून त्या त्या विषयांवरचे अनेक विचार समोर यायचे. अनुभवाधारित, स्वतःचं लिहिलं जावं असा त्यांचा आग्रह असायचा. माझं विचारमंथनही या सगळ्याशी जोडलं गेलं होतं. पण वाचन, विचार, किरकोळ लेखन या पलिकडे आपण समाजासाठी प्रत्यक्ष काहीच काम करत नाही याविषयी मला सतत खंत वाटायची. विविध चर्चांमधून हळूहळू उमगत गेलं की प्रत्यक्ष कामाखेरीजही आपण बरंच काही करू शकतो, विचार ही पण एक कृती आहे आणि ती कमी महत्त्वाची नाही.

मिळून सार्‍याजणी, साधना अशा अंकातील लेखनातून विचारांना खाद्य मिळत होतं. गौरी देशपांडे, मेघना पेठे अशा लेखिकांच्या कादंबर्‍या अंतर्मुख करत होत्या. तेव्हा पडणार्‍या प्रश्नांसाठी वेळोवेळी विद्याताईंकडे धाव घेतली जायची. आंतरिक निकडीतून वाचन वाढत गेलं. पुढे मराठी, तत्त्वज्ञान हे विषय घेऊन एम. ए. केलं. तेव्हा झालेल्या अभ्यासातून विचारांचा पैस विस्तारत गेला. काही नवीन विषय नव्या तर्‍हेनं विचारांच्या कक्षेत येऊ लागले. नवं वाटणारं सगळं संधी मिळेल तेव्हा मी विद्याताईंबरोबर शेअर करायची. विशेष म्हणजे ते सर्व त्या मनापासून ऐकायच्या. समजून घ्यायच्या. माझ्या वैचारिक प्रवासात एम. ए. चा अभ्यास हा एक महत्त्वाचा टप्पा होता. लोकसाहित्य, मराठी साहित्याची सांस्कृतिक पार्श्वभूमी या विषयांच्या अभ्यासातून परंपरा, संस्कृती याकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन बदलला. लक्षात येत गेलं की वेगवेगळ्या संस्कृती म्हणजे त्या त्या समाजाचं संचित असतं. ते सगळंच टाकावू नाही. संस्कृतीतला नुसता सं.. समोर आला तरी कपाळावर आठ्या पडण्याचं कारण नाही. जगण्यातलं शहाणपण ठासून भरलेलं लोकसाहित्यही या संस्कृतीचाच एक भाग आहे. संतसाहित्याच्या जाणीवपूर्वक केलेल्या डोळस अभ्यासानं तर मला त्या संदर्भातले माझे आधीचे विचार तपासून पाहायला भाग पाडलं. माझ्यातल्या या प्रत्येक वैचारिक बदलाला विद्याताई साक्षी होत्या. कारण हे सर्व त्यांना सांगून मी बरोबर दिशेनं चाललेय ना याची हमी त्यांच्याकडून मी मिळवत होते. विद्याताईंनी बोलतं केल्यावर मी जरा जास्तच बोलायला लागले की काय असं जाणवून एकदा त्यांना तसं विचारलं तर म्हणाल्या, ‘अगं बोल तू.. मला न वाचता आयतं कळतंय ना काय काय.. !’

अभ्यासातून मी ईशावास्य उपनिषदापर्यंत पोचले तेव्हा एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली ती अशी की आपल्या प्राचिन ज्ञानपरंपरेविषयी भक्तीभाव असलेले आणि त्या परंपरेला विरोध करणारे दोन्ही समूह मूलभूत विषय पुरेसा समजून न घेताच भूमिका घेत आहेत. समजून न घेता केवळ पारायण म्हणून धार्मिक ग्रंथ वाचणारे फार काही मिळवत नाहीत तसंच त्याला अंधश्रद्धा ठरवून मुळातून न वाचता ते नाकारणारेही त्यातील काव्यात्म ज्ञानाला मुकत असतात. विद्याताईंशी मी याविषयी बोलले होते. बरीच वर्षे ईशावास्य उपनिषद हा विषय डोक्यात असल्यामुळे तोही सतत बोलला जायचा. हा विषय इतरांनाही कळावा म्हणून गीतालीताईंकडे दर महिन्याला एकेका अभ्यास-विषयावर एक व्यख्यान आणि त्यावर चर्चा असा कार्यक्रम असतो त्या अंतर्गत एका महिन्यात त्यांनी मला ईशावास्य उपनिषदाविषयी बोलायला बोलावलं होतं.

वेगवेगळी संमेलनं, मेळावे, ट्रीप्स या निमित्तानं मी अनेक वेळा विद्याताईंबरोबर लांब-लांबचा प्रवास केला. त्या प्रवासातही विद्याताईंशी दीर्घ संवाद व्हायचा. तेव्हा गप्पांमधे अनेक वैयक्तिक विषय पण निघायचे. बरोबरीच्या मैत्रिणीशी बोलावं तसं त्यांच्याशी बोलता यायचं. कारण त्याही आपलं सगळं मोकळेपणानं सांगायच्या. मतही विचारायच्या. या प्रवासातील सहवासात अनुभवलेल्या त्यांच्या वर्तनातील बारीकसारीक गोष्टींनीही मला घडवलं आहे. आजही हात धुताना बेसीनचा नळ जास्त वेळ सुटा राहिला तर पटकन बंद करताना त्यांची आठवण सोबत असते. त्यांचं साधं तरी छान राहाणं, prevention is better than cure या भूमिकेतून औषधं, व्यायाम, आहार.. सगळं वेळच्या वेळी करून प्रकृतीची वेळीच योग्य काळजी घेणं, साइट सीईंग, खरेदीपेक्षा माणसांना भेटणं, शक्य असेल तिथे हॉटेलपेक्षा मैत्रीणींकडे राहणं.. अशा अनेक गोष्टी त्यांच्याकडून शिकण्यासारख्या होत्या. त्या सतत विचारांना प्राधान्य देत असल्या, सामाजिक प्रश्नांच्या गराड्यात असल्या तरी रुक्ष नव्हत्या. रसिकतेनं अनुभवायच्या पंचेंद्रियांचे सगळे विषय. आम्ही धारवाडला गेलो असताना दोघींनी कर्नाटकी कशिदा केलेली साडी खरेदी केल्याचं आठवतंय.

विद्याताई आपल्यात नाहीत म्हटल्यावर इतकं काय काय अगदी आता घडल्यासारखं आठवलं...! पण अलिकडे आमच्यातला संवाद, भेटी सगळं जरा कमी झालं होतं. माझ्या तब्येतीचं कारण मुख्य होतं. पूर्वी इतक्या हिरीरीनं आता माझा वैचारिक प्रवास होत नाहीए. शिवाय भोवतीच्या बदललेल्या वैचारिक पर्यावरणात दोन्ही टोकांच्या विचारसरणी संभ्रमात पाडू लागल्या आहेत... त्यातल्या काही संभ्रमांबाबत विद्याताईंशी थोडा संवाद झाला होता. त्यातून त्या त्या विषयातले बारकावे समजून घेता आले.

उदा.- शनी शिंगणापूर येथे स्त्रियांना मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी आंदोलन झाले तेव्हा त्याला विद्याताईंचा पाठिंबा होता हे ऐकून विचारात पडायला झालं होतं. विशिष्ठ देवाला अभिषेक वगैरे पुरुषांनीही करणं योग्य नाही असं मत असलेल्या विद्याताईंनी स्त्रियांनाही ते करायला मिळावं अशी मागणी करणार्‍या आंदोलनाला कसा काय पाठिंबा दिला असा प्रश्न मला पडला होता. ते आंदोलन यशस्वी झाल्यावर टीव्हीवर झालेल्या चर्चेतून विद्याताईंची भूमिका समजली. त्यांच्यासाठी स्त्रियांचा मंदिर-प्रवेश महत्त्वाचा नव्हता. तर मंदिर-प्रवेशाला असलेली मनाई बंद होणं त्यांना महत्त्वाचं वाटत होतं.

पुरस्कार वापसीसंदर्भात तेव्हा झालेला वादविवादही अस्वस्थ करणारा होता. मतभेदाचे असे मुद्दे वारंवार समोर येत होते. अजूनही येतायत. त्यात काही वेळा अनावश्यक आग्रही भूमिका दिसते. दोन्ही विचारसरणींचा वाढत चाललेला धारदारपणा सोशल मिडीयामुळे अगदी बोटाशी येऊन ठेपला आहे. अस्वस्थतेत, संभ्रमांत रोज भर पडते आहे. टोकाच्या भूमिकेसंदर्भात विद्याताई नेहमी म्हणायच्या की विचारांच्या लंबकाच्या आंदोलनांची व्याप्ती समजून घ्यायला हवी. इतकं टोकाचं काही सांगावं तेव्हा अनुसरणारे मध्यावर तरी येतात. पण या न्यायानं दुसर्‍यांची टोकाची भूमिकाही समर्थनीय होऊ शकते ना? विद्याताईंनी दिलेलं बोलण्याचं बळ त्यांच्याच मतांसंदर्भात असे प्रश्न विचारताना वापरलं जायचं. पण त्यांनी असे कुठलेही प्रश्न कधी टाळले नाहीत. न कंटाळता त्या आपली भूमिका समजावून सांगायच्या.

विद्याताईंनी सुरू केलेलं मिळून सार्‍याजणी हे मासिक आणि अक्षरस्पर्श, नारीसमता मंच, सखी मंडळ अशा विविध संस्था यांची उभारणी अनेकाच्या सहकार्यानं झाली. हे सर्व चालू ठेवण्यातही अनेकांचा सहभाग आहे. विद्याताई स्वतः लोकशाही मानण्यार्‍या होत्या. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना त्या सर्वांची मतं विचारात घेत असत. त्यात स्वाभाविकपणे काही मध्यममार्गी तर काही अधिक आग्रही, आक्रमक मतं यायची. सगळ्यांना सामावून घेत त्यांनी वैचारिक परिवर्तन घडवत समाजजीवनात स्त्री-पुरुष समता आणण्याचं आपलं काम सातत्यानं चालू ठेवलं होतं. सगळ्यांना सामावून घेण्याच्या विद्याताईंच्या भूमिकेसंदर्भातली वर उल्लेख असलेली माझी एक आठवण बोलकी आहे. गीतालीताईंकडे मला ईशावास्य उपनिषदाविषयी बोलायचं होतं तेव्हा त्याच्या जोडीला लोकाग्रहास्तव अस्तित्ववाद हा विषयही त्यांनी ठेवला होता... आपलं नियोजित काम पुढे नेण्यासाठी साध्य-साधन विवेकानं सर्व स्तरातल्या लोकांना सामावून घेण्याच्या विद्याताईंच्या या स्वभावामुळे त्यांचा लोकसंग्रह फार मोठा झाला होता. त्यांच्या कामांची व्याप्ती वाढली होती. जनसंपर्क वाढत होता...

विद्याताईंना अभिवादन करण्याच्या निमित्तानं हे सर्व आठवताना आता आश्चर्य वाटतं की त्यांच्या असंख्य व्यापांमधेही किती प्रकारे त्या माझ्या वाट्याला आल्या. वेळोवेळी माझं कौतुक केलं. मला प्रोत्साहित केलं. आपल्या परिवारात सामावून घेतलं... विद्याताई आता आपल्यात नाहीत. वाटेल तेव्हा फोन करून त्यांना काही सांगता-विचारता येणार नाही. पण त्यांच्या सहवासात आलेल्या प्रत्येकाला त्यांचे विचार सदैव सोबत करत राहतील..!
   
आसावरी काकडे
१०.०२.२०२० 

(मिळून सार्‍याजणी -मार्च २०२०)