Saturday, 14 June 2025

माझे आनंदनिधान

‘हम जीते हैं

अतीत के मुर्दा क्षण

यादों में खोकर

या फिर जीते हैं

अजन्मा क्षण

सपने सजाकर..!

हाथ में चमकती

वर्तमान के पानी की बूँद

फिसल जाती है

देखते-देखते

जिंदगी निकल जाती है..!’

‘मौन क्षणों का अनुवाद’ या माझ्या हिंदी कवितासंग्रहातली ही छोटीशी कविता. खरंच.. वर्तमान क्षण चिमटीत धरून अनुभवता येत नाही. बघता बघता तो भूतकाळात विलीन होऊन जातो. आनंदाचंही तसंच आहे. वर्तमान क्षणासारखा तो अनुभवेपर्यंत निसटून जातो. कुठं तेही कळत नाही..! ‘माझे आनंदनिधान’ यावर लिहायचं तर माझा आनंद कशात आहे ते बघावं लागेल आणि ते बघताना आनंद म्हणजे काय ते समजून घ्यावं लागेल.

बालकवीना नभात भरलेला, सर्व दिशांत फिरणारा, भूतलावर इकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंद दिसतो. अनुभवता येतो. त्यात रमता येतं. निसर्ग त्यांचे आनंदनिधान असते. तुकाराम महाराजांना अंतरंगात आनंदाचे डोही आनंद तरंग दिसतात. आनंदच आनंदाचे अंग आहे हे ते अनुभवून सांगतात. तत्त्वज्ञानाने सत्‍ स्वरूप आनंदमय आहे असं सांगितलं आहे. सत्‍- निरुपाधिक आहे. त्याला अनुभवता येतील अशा कोणत्याही मिती नाहीत. हे ‘केवळ असणे’ ज्ञानेंद्रियांच्या अनुभवकक्षेत येणारे नाही. म्हणजे ‘सत्‍’चे आनंदमय स्वरूप ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून अनुभवता येणारे नाही. ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून मिळणारा आनंद हा भौतिक स्तरावरचा आहे. तेवढ्यापुरता टिकणारा. आनंदाचे कारण नाहीसे झाले की नाहीसा होणारा...

आनंद संकल्पनेचा विचार अशा वेगवेगळ्या स्तरांवर करता येतो. आपण सामान्य आयुष्य जगताना छोट्या छोट्या गोष्टीत आनंद घेत असतो. भलेही तो तात्कालिक असेल. माझे आनंदनिधान या विषयावर लिहिण्याच्या निमित्ताने माझ्या आनंदांचा मागोवा घेत गेले तेव्हा आठवले ते सगळे आनंदक्षण आता काळाच्या उदरात गडप झाले आहेत. तरी त्या त्या वेळी त्यांनी दिलेलं सूख आताही सुखावणारं वाटतं आहे. या लेखाच्या निमित्तानं त्या आनंदांचे जागरण करण्याची संधी मिळाली.

लौकिक जगण्यातला संस्मरणीय आनंद

मी शाळेत असताना कधी पहिला नंबर येण्याच्या ईर्षेनं अभ्यास केला नाही. गणित, सायन्स माझे आवडीचे विषय होते. त्या विषयांचा अभ्यास आनंद देणारा असायचा. त्या विषयात वर्गात कायम हायेस्ट मार्क्स असायचे. इतर विषयात काठावर पास. त्यामुळे कधी पहिला नंबर यायचा नाही. पण मॅट्रिकच्या वर्षात सर्व विषयांचा जीव तोडून अभ्यास केला. कारण जास्ती मार्क्स मिळवून स्कॉलरशिप मिळवायची होती. त्याशिवाय पुढचं शिक्षण मिळणार नव्हतं. मनापासून अभ्यास केल्यामुळे शाळेत मॅट्रिकला चारी तुकड्यात पहिली आले. आईच्या अपेक्षेनुसार नॅशनल मेरीट स्कॉलरशिप मिळाली. शाळेच्या हॉलमधे वर दिसेल असा एक बोर्ड होता. त्या बोर्डवर मॅट्रिकला पहिल्या आलेल्या मुलींची नावं लिहिली जायची. १९६६ साली त्या यादीत माझं नाव लागलं. कितीतरी वर्षं तो बोर्ड शाळेत लागलेला होता. शाळेच्या गॅदरींगमधे मॅट्रिकला पहिल्या येणार्‍या विद्यार्थिनीस ठेवलेली सर्व बक्षिसं मला मिळाली. तेव्हाचा आनंद फक्त मलाच नाही आमच्या घरादाराला झाला. आयुष्यातल्या मोठ्या आनंदाची ही पहिली संस्मरणीय आठवण..! नंतर बीकॉम झाले आणि स्टेट बँकेत नोकरी मिळाली. लग्न झालं. आयुष्याचा दुसरा टप्पा सुरू झाला...

तेव्हा आम्ही पुण्यात पर्वतीजवळ राहायला होतो. बँक ईस्ट स्ट्रीट, कँम्प इथं. बसनं जाण्यायेण्याचा त्रास व्हायचा. तेव्हा, वयाच्या पस्तीशीत ल्यूना चालवायला शिकले. शिकताना अशक्यच वाटत होतं. असंही वाटायचं की ग्राउंडवर चालवता येऊन काय उपयोग? रस्त्यावर ट्रॅफिकमधून चालवता येणार आहे का? पण मिस्टरांच्या आग्रही तगाद्यामुळं शारीरिक, मानसिक कमकुवतपणावर मात करून ल्यूना चालवायला शिकले आणि चक्क ल्यूनावरून बँकेत जायला लागले. सुरुवातीच्या एक दोन दिवसातच भर रस्त्यावर धडामकन पडले. लोकांनी उचलून बाजूला नेलं. एका बाईनी घरी नेऊन पाणी दिलं. फार काही झालं नव्हतं खरचटण्यावर भागलं होतं. तरी घाबरून घरी परत न जाता त्या बाईंचे आभार मानून बँकेत गेले. पाच वर्षं तरी ल्यूना वापरली. लग्नानंतर लगेचच एका मोठ्या ऑपरेशनला सामोरं जावं लागलं होतं. नॉर्मल आयुष्य सुरू व्हायला बरीच वर्षं लागली. त्या काळात तब्येतीच्या बाबतीत माझ्यात न्यूनगंड निर्माण झाला होता. ‘हँडल विथ केअर’ अशी माझी अवस्था होती. या पार्श्वभूमीवर माझं ल्यूना चालवणं एव्हरेस्ट सर करण्यासारखंच होतं. एक दोन दिवस नाही चांगली पाच वर्षे मी ल्यूना चालवली आणि तब्येतीच्या बाबतीतल्या न्यूनगंडातून बाहेर पडले. हा आनंद फक्त सुखावणारा नव्हता. माणूस म्हणून वरच्या इयत्तेत नेणारा होता.

कवितेने दिलेला आनंद 

एकदा गंमत म्हणून गूगलवर आपण कशा दिसतो ते पाहात होते. तेव्हा तिथे माझ्याविषयीची सविस्तर नोंद दिसली. त्यात पहिलं वाक्य आहे- आसावरी काकडे या त्यांच्या ‘आरसा’ या पहिल्या कवितासंग्रहासाठी ओळखल्या जातात. वाचून गंमत वाटली. हे खरं असो नसो.. पण हे खरं आहे की ‘आरसा’ संग्रहाने त्याची निर्मिती, वाचक-प्रतिसाद आणि पुढच्या प्रत्येक टप्प्यावर मला भरभरून आनंद दिला.

१९९० साली, वयाच्या चाळीशीत ‘आरसा’ संग्रह प्रकाशित झाला. तेव्हा मी या क्षेत्रात नवीन होते. कुणी प्रकाशक मिळण्याची शक्यता नव्हती. म्हणून तो आम्हीच स्वखर्चाने प्रकाशित केला. वितरणाचीही काहीच माहिती नसल्यामुळे तो आम्ही अनेक जाणकारांना भेट पाठवला. विशेष म्हणजे त्यांच्याकडून भरघोस प्रतिसाद मिळाला. रोज दोन-चार पत्रं येत होती. ही पत्र-दाद खूपच सुखावणारी होती. आजच्या काळात यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. पण आलेल्या लहान मोठ्या पत्रांची एक मोठी फाईल तयार झाली होती. ‘आरसा’ची दखल वृत्तपत्रे, मासिके, रेडिओ, दूरदर्शन सर्वत्र घेतली गेली. राज्य पुरस्कारासह चार महत्त्वाचे पुरस्कार या संग्रहाला मिळाले. बघता बघता पहिली आवृत्ती संपली. पाठोपाठ दुसरी आवृत्ती काढली. वितरणाचा प्रश्न उरला नाही. त्या वर्षीच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सर्वाधिक खप झालेल्या पुस्तकांच्या यादीत ‘मृत्युंजय’, ‘विशाखा’ या श्रेष्ठ पुस्तकांबरोबर ‘आरसा’चं नाव वृत्तपत्रात झळकलं. वृत्तपत्राचं ते कात्रण मी पुरस्कारासारखं जपून ठेवलं आहे. ‘आरसा’ संदर्भातील अशी प्रत्येक गोष्ट मला निखळ आनंद देणारी, माझा उत्साह वाढवणारी होती.. पहिल्याच कवितासंग्रहाचे असे सर्व बाजूनी कौतुक झाल्यामुळे माझी पुढली वाटचाल दमदार झाली. आज घडीला माझ्या नावावर मराठी, हिंदी, अनुवादित, बालकविता असे बावीस कवितासंग्रह आणि पाच गद्य लेखन असलेली पुस्तकं आहेत.

या प्रावासातला आणखी एक संस्मरणीय आनंद म्हणजे ‘बोल माधवी’ या अनुवादित कवितासंग्रहाला मिळालेला साहित्य अकादमी पुरस्कार. हा पुरस्कार जाहीर झाल्याची बातमी प्रथम मला फोनवरुन समजली. अनपेक्षितपणे आलेल्या या बातमीमुळे फोन ठेवल्यावरही कितीतरी वेळ मी आतून आनंदानं थरथरत होते. अनुवाद करायला मला आवडायचं. मी स्वांतसुखाय काही अनुवाद केले होते. पण प्रकाशित झालेला हा माझा पहिलाच अनुवाद. हा कवितासंग्रह मी फारसा कुणाला भेट दिलेला नव्हता. कुठल्या पुरस्कारासाठी पाठवायचं तर लक्षातही आलं नव्हतं. त्यामुळे अकादमी पुरस्कार हा माझ्यासाठी सुखद धक्काच होता. पुरस्काराची बातमी टीव्हीवर, पेपरला आल्यावर आमचा आनंद व्दिगुणीत करणारे कितीतरी कौतुक-सोहळे झाले. हैदराबाद येथे झालेला पुरस्कार प्रदान सोहळा तर चांगलाच भारदस्त आणि सुखावणारा होता. सर्व भारतीय भाषांमधल्या पुरस्कारप्राप्त अनुवादकांसोबत स्टेजवर बसून सोहळा अनुभवताना कृतकृत्य वाटत होतं. या पुरस्कार सोहळ्यात मी व्यक्त केलेल्या मनोगताचे छान स्वागत झाले. दोन दिवसांचा शानदार सोहळा अनुभवून परतताना मनातल्या आनंदासोबत एक वेगळा आत्मविश्वास जागवणारं आत्मिक समाधानही होतं.

अंतरंग आनंद

पुस्तक प्रकाशित होणं, त्याला पुरस्कार मिळणं यात आनंद आहेच. पण मुळात लिहायला सुचणं, सुचलेलं नेमकेपणानं शब्दात उतरवता येणं याचा आनंद आतून सुखावणारा असतो. कधी कधी तर लिहिता लिहिता समर्पक शब्द आपणहोऊन पुढं येतात.. लिहिले जातात. तेव्हा होणारा आनंद ‘बोलविता धनी वेगळाची’ या जातकुळीतला असतो. गेली तीस-पस्तीस वर्षे मी लिहिते आहे. या काळात असा आनंद मला भरभरून मिळाला. तो आनंद तपशील देऊन सांगता येण्यासारखा नाही. तरी एक उदाहरण आठवते आहे. मी ईशावास्य उपनिषदाचं पद्यरूपांतर केलं होतं. त्याच्या पहिल्या मंत्राच्या रूपांतराची पहिली ओळ होती- ‘ईश म्हणजे सत्‍-ता । असण्याची रीती । ज्यामुळे निर्मिती । विश्वाची या ॥’ पुस्तकासाठी फायनल स्क्रिप्ट तयार करताना जेव्हा ही ओळ मी लिहिली तेव्हा रीती या शब्दाच्या जागी मिती हा शब्द लिहिला गेला. मी रीती शब्दाबाबत काही पुनर्विचारही करत नव्हते. तरी ‘तुला हे म्हणायचंय असं सांगत इतका समर्पक शब्द आपसुक समोर आला. त्याचा स्तिमित करणारा आनंद चांगलाच लक्षात राहिला आहे. पद्यरूपांतर म्हणजे समजलेल्या आशयाचं केवळ शब्दांकन नसतं तर काय समजलंय ते स्वतःला स्पष्ट होणं असतं. ही आकलन-प्रक्रियाही खूप आनंददायी असते.

असे आनंद इतके आपले असतात की ते सांगता येत नाहीत. पण आपण लिहिलेलं वाचून वाचकाला तसाच आनंद मिळाला आणि त्यानं तो पत्ररूपात लिहून कळवला तर ते वाचून मिळणारा आनंदही खूप सुखावणारा असतो. असे प्रत्येक पत्र म्हणजे एकेक पुरस्कारच असतो. लिहिल्याचे सार्थक झाल्याचे समाधान देणारा असतो. असा आनंदही मला भरभरून मिळाला. व्हॉटसॅप, फेसबुकमुळे आताही तो मिळतो आहे.

रोजचं आयुष्य जगतानाही कितीतरी आनंद आपण अनुभवतो. काही वेळा एखादं गाणं ऐकताना, एखाद्या मंदिरात गेल्यावर, सुंदर निसर्ग दृश्य पाहिल्यावर मनस्वी आनंद होतो. अगदी गहिवरून येण्याइतका. एकदा नेहमी रेडिओवर लागणारं एक गाणं- ‘अवचिता परिमळु झुळुकला आळुमाळु..’ ऐकताना इतकं गहिवरून आलं की अश्रू आले डोळ्यात. वेगळ्या प्रतीच्या आनंदाचे अश्रू होते ते. ते गाणं मी पूर्वी कितीतरी वेळा ऐकलं होतं. नंतरही बरेचदा ऐकलं. पण तेव्हाचा अनुभव परत आला नाही. तेव्हा असं काय झालं असेल? विचार करताना जाणवलं की अंतःकरणाची निर्मल अवस्था असते तेव्हाच आपण गाण्यातल्या आशयाशी एकरूप होऊ शकतो. तेव्हा मिळणारा आनंद गाणं ऐकल्याचा नाही अंतःकरण निर्मल असण्याच्या प्रचितीचा असतो..! ‘अंतःकरणाची अत्यंत निर्मल अवस्था म्हणजे मुक्ती’ असं कुठेतरी वाचलं होतं. ते पटलंही होतं. इतकं की ते माझं मिशन स्टेटमेंट आहे असं मी डायरीत लिहून ठेवलं होतं.

माझ्या साहित्यिक वाटचालीत लेखनाने मला लौकिक आनंद दिला त्याबरोबर स्वतःला घडवणारा, माझ्या मिशन स्टेटमेंटच्या जवळ नेणारा आनंदही दिला. लेखनाकडे मी साध्य नाही स्व-शोधाचं साधन म्हणून पाहात आले आहे. खरंखुरं, दर्जेदार लेखन केवळ व्यासंग, रियाजातून होत नाही. त्यासाठी आपण एक खरंखुरं, प्रगल्भ माणूस असावं लागतं. आपलं लेखन आणि आपण एकमेकांना घडवणारे असतो अशी माझी धारणा आहे. एक चांगलं माणूस म्हणून स्वतःला घडवताना मी माझ्या लेखनातून मला तपासत राहिले. माझ्या प्रकाशित पुस्तकांशिवाय मी केलेलं स्वतःला निरखणारं लेखन डायरी स्वरूपात होतं. त्यात माझ्या आंतरिक यश-अपयशाच्या नोंदी असायच्या. अभ्यास, वाचन-मनन, जाणकारांशी संवाद, अंतर्मुख विचार यामुळे आतून उगवलेलं शहाणपण उत्कट आनंद देणारं वाटायचं. पण जगताना ते शहाणपण हातातून निसटायचं   तेव्हाचा अनुभव अतीव दुःख देणारा वाटायचा. माझ्या डायर्‍यांमधे या दोन्हीच्या नोंदी आहेत. दोन वर्षांपूर्वी मी या डायर्‍यांमधल्या निवडक नोंदींचं संकलन केलं. ‘मी, माझ्या डायरीतून..’ या नावानं ते प्रकाशित झालं आहे.

हे पुस्तक म्हणजे माझ्या आनंद-व्यथांचा ताळेबंद आहे. त्याचं लेखन गेली अनेक वर्षे चालू होतं. माझी प्रकाशित पुस्तकं म्हणजे एखाद्या झाडाचा जमिनीवरचा विस्तार असेल तर डायरी लेखन म्हणजे जमिनीखालची मुळं आहेत. माझ्या एका कवितासंग्रहाचं नाव ‘लाहो’ असं आहे. लाहो म्हणजे ध्यास. संत तुकारामांच्या गाथेतला हा शब्द. आपल्यातील आंतरिक मर्यादांच्या पार होण्याच्या संदर्भात मला तो भावला आणि कवितासंग्रहाचे शीर्षक म्हणून मनात रुजला. आपल्यातील आंतरिक मर्यादांच्या पार होणं हाच माझाही ध्यास होता, आहे. माझं लेखन त्या दिशेनं झालेल्या प्रयत्नांचाच एक महत्त्वाचा भाग आहे. आंतरिक परिवर्तन हीच माझी जगणं आणि लेखन दोन्ही संदर्भातली मुख्य भूमिका असल्यामुळे स्वतःत अपेक्षित असं परिवर्तन होत असल्याचा प्रत्यय येतो तेव्हा मला समाधान देणारा खरा आनंद होतो. हेच माझं आनंदनिधान आहे असं वाटतं.

या लेखाच्या माध्यमातून माझ्या आनंदांचा ठेवा सर्व वाचकांसमोर ठेवता आला. दर वर्षी विचारांना चालना देणारा एखादा विषय देऊन लेखकांकडून लिहून घेणारे आनंदघन दिवाळी अंकाचे साक्षेपी संपादक देविदास पोटे यांचे या बद्दल आभार मानायला हवेत.

आसावरी काकडे

१३.६.२०२५

 

Saturday, 17 August 2024

मार्गदर्शक आणि गुरू : प्रा. नि. ना. रेळेकर सर

आमची आणि प्रा. नि. ना. रेळेकर सरांची ओळख फार जुनी आहे. १९६८ साली आम्ही कोल्हापूरात होतो. त्यावेळी सर गोखले कॉलेजमधे मराठी विभगप्रमुख होते. तेव्हा माझे पती श्रीनिवास काकडे यांचा प्रथम सरांशी परिचय झाला. १९७१ साली आम्ही पुण्यात आलो. त्यानंतर बरेच दिवसांनी, सर पुण्यात राहायला आल्यावर आमच्या वरचेवर भेटी होऊ लागल्य़ा. आम्ही त्यांच्या घरी बरेचदा गेलो आहे. सरांच्या घरी आमचे छान स्वागत होत असे. त्यांच्या पत्नी पण प्रसन्न हसत आमच्याशी बोलत असत. घरातील स्वच्छता आणि नीटनेटकेपणा लगेच लक्षात यावा असा. शिस्त हा सरांच्या स्वभावाचा भाग होता. अभ्यास, लेखन, कार्यक्रमांचे आयोजन अशा सर्व बाबतीत याचा अनुभव यायचा.

पुण्यात आल्यावर ते इथल्या वेगवेगळ्या संस्थांच्या कार्यात सहभागी झाले. तिथे त्यांनी बर्‍याच साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले. अशा सर्व कार्यक्रमात ते आम्हाला आवर्जून बोलावत असत. मला तर त्यांनी स्मरणिकेत लेख लिहिणे, चर्चासत्रात, कवीसंमेलनात सहभागी होणे अशा अनेक प्रकारे संधी उपलब्ध करून दिली. मी ईशावास्य उपनिषदाचा अभ्यास करत होते तेव्हा मला त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे मार्गदर्शन केले. एकदा त्यासंदर्भात पुणे विद्यापीठात पेपर सादर करण्याची संधीही त्यांच्यामुळे मला मिळाली होती. सरांनी राष्ट्रीय पंडित बा. मा. खुपेरकर शास्त्री स्मृतीग्रंथ : व्यक्ती आणि वांग्मय या ग्रंथाचे संपादन प्रा. कृष्णा गुरव यांच्या समवेत केले. त्यात काही लेखांचे संक्षिप्तीकरण करण्याचे काम सरांनी मला दिले होते. त्यानिमित्ताने मला संक्षिप्तीकरण प्रक्रियेचा अनुभव मिळाला. त्यानंतर बरेच वर्षांनी आनंदी गोपाळ या कादंबरीचे संक्षिप्तीकरण करण्याचे काम मला मिळाले. ते करताना या अनुभवाचा उपयोग झाला. संतसाहित्याचे वाचन करताना केव्हाही काहीही शंका आली तर मी त्यांना हक्कानं फोन करत असे. तेही संदर्भासहीत व्यवस्थित माहिती देत असत. रेळेकर सरांमुळे आमचा प्रा. मुकुंद दातार, प्रा. करंदीकर सर, प्रा. डांगरे सर यांचा परिचय झाला. हा परिचय आम्हाला समृद्ध कारणारा होता. माझ्या साहित्यिक वाटचालीत या सगळ्यांचे मला वेळोवेळी हार्दिक मार्गदर्शन झाले.

रेळेकर सरांविषयीच्या आठवणींतील सर्वात संस्मरणीय आठवण म्हणजे पुणे विद्यापिठाच्या नामदेव अध्यासनातर्फे आयोजित केलेली घुमान येथील अभ्यास सहल. या सहलीला जाण्याची संधीही सरांमुळे आम्हाला मिळाली. लांबचा प्रवास आणि घुमान येथील दोन दिवसांचे वास्तव्य या दरम्यान सरांचा जवळून परिचय झाला. एका बोगीतून एकत्र प्रवास करताना सरांचा दबदबा असला तरी दडपण वाटले नाही. बरोबरचे सर्वच प्रवासी संत नामदेवांच्या कार्याची माहिती करून घ्यायला निघालेले जिज्ञासू भक्त असल्यामुळे गप्पांचा विषय आणि वातावरण त्याला अनुरूप होते. प्रवास लांबचा होता. त्यामुळे वेगवेगळ्या अडचणी येणं स्वाभाविक होतं. पण सरांच्या मार्गदर्शनामुळे पूर्ण प्रवास सुखरूप झाला. शिस्त, स्वच्छता, नीटनेटकेपणा, सर्वांना सांभाळून घेण्यातली ऋजूता, आणि सर्व बाबतीतला उत्साह हे त्यांच्या स्वभावातले पैलू या प्रवासात अनुभवायला मिळाले.

अनेक वर्षे अध्यापन-क्षेत्रात काम करून प्राचार्यपदावरून निवृत्त झालेले, अनेक मोठ्या ग्रंथांच्या संपादनात सहभाग असलेले, वेगवेगळ्या साहित्यिक, सांस्कृतिक संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष असलेले प्रा. नि. ना. रेळेकर सर फक्त घुमानच्या लांबच्या प्रवासातच नाही तर जीवनप्रवासातही आमच्या सोबत होते. पण आता आपले एखादे पुस्तक प्रकाशित झाले तर ते दाखवून त्यांच्याकडून प्रशंसा मिळवायला, काही प्रश्न पडले तर मार्गदर्शन घ्यायला ते नाहीत ही पोकळी जाणवत राहील... मात्र त्यांचे लेखन, सांस्कृतिक कार्य आणि त्यांच्या हृद्य आठवणी आमच्या सोबत आहेत याचाही आधार वाटतो आहे.

आसावरी काकडे

asavarikakade@gmail.com

Phone 9762209028

संपादित पुस्तकासाठी

गोष्टीतून कबीर

 ज्ञानेश्वर, तुकाराम या संतांप्रमाणे संत कबीरही मराठी मनाला जवळचे वाटतात. अभंग, ओवी प्रमाणे त्यांचे दोहे लोकप्रिय आहेत. ज्येष्ठ कवयित्री आणि विद्यार्थीप्रिय शिक्षिका संजीवनी बोकील यांनी गोष्टींतून कबीरहे पुस्तक लिहून मुलांना संत कबीरांच्या निवडक दोह्यांची  गोष्टींच्या माध्यमातून ओळख करून दिलेली आहे. हे पुस्तक वाचून मुलांना कबीरांचे इतर दोहे समजून घ्यावेत अशी उत्सुकता नक्कीच वाटेल.

आपल्या मनोगतात त्यांनी संत कबीर यांचा आणि त्यांच्या दोह्यांच्या अंतरंगाचा थोडक्यात परिचय करून दिला आहे. पार्श्वभूमी म्हणून हा परिचय मला महत्त्वाचा वाटला. ज्येष्ठ लेखक लक्ष्मीकांत देशमुख यांनी आपल्या प्रस्तावनेतून या पुस्तकरूपी मौल्यवान खजिन्याची सविस्तर ओळख करून दिली आहे.

या पुस्तकात एकूण दहा कथा आहेत. प्रत्येक कथेच्या शेवटी त्या कथेचं तात्पर्य सांगणारा एक दोहा दिलेला आहे. कथेतून अधोरेखित झालेला अर्थ दोह्यातील शब्दांच्या अनुषंगाने थोडक्यात परत सांगितला आहे. शिवाय अपरिचित शब्दांचे अर्थही दिलेले आहेत. त्यांच्या आधारे दोहा वाचल्यावर त्याचा आशय पुन्हा मनावर बिंबवला जातो. दोहा समजावण्यासाठी कथा आणि त्याचे सार सांगण्यासाठी दोहा अशी छान गुंफण लेखिकेने केलेली आहे. एक उदाहरण-

‘बडा हुआ तो क्या हुआ, जैसे पेड खजूर ।

पंछी को छाया नहीं, फल लागे अति दूर ॥’

हा दोहा समजावण्यासाठी ‘बिन सावलीचे झाड’ ही कथा सांगितली आहे. कामगारांच्या कष्टांची कदर करून अडीनडीला त्यांच्या पाठीशी उभे राहणारे नानाशेठ गेल्यावर त्यांचा मुलगा विजय ‘शेठ’ झाला. तो पक्का व्यवहारी होता. फायद्यावर नजर असलेला विजय कोणाला कसलीही मदत करत नव्हता.. भरपूर संपत्ती असून कुणाला त्याचा उपयोग करून दिला जात नसेल तर त्या संपत्तीचा काय उपयोग? हे उंच वाढलेल्या खजुराच्या झाडासारखंच झालं..!

अशा रंजक पद्धतीने संजीवनी बोकील यांनी संत कबीरांच्या दोह्यांची मुलांना छान ओळख करून दिलेली आहे.

आसावरी काकडे

मिळून सार्‍याजणी - ऑगस्ट २०२४

  

Sunday, 11 August 2024

संवाद मौनवाटांशी

ललितलेख हा असा साहित्यप्रकार आहे ज्यात कथात्मकता, काव्यात्मता, आत्मसंवाद, चिंतन, अनुभवकथन, निसर्गाशी हितगुज.. हे सगळं सामावलेलं असतं. हे लेखन म्हणजे आतल्या मौनवाटांशी चाललेला आत्मीय संवाद..! प्रकट चिंतन. आठवणींना उजाळा. त्यातून मिळालेल्या शहाणपणाच्या नोंदी...! या लेखन-प्रकाराला मुक्त पैस लाभलेला असतो. याला कवितेसारखे आकृतीबंधाचे बंधन नसते. गरजेनुसार, आशयाच्या मागणीनुसार लेख लहान-मोठा होऊ शकतो. मुक्त चिंतनाला येथे भरपूर वाव असतो. कवितेखालोखाल हा साहित्यप्रकार लेखकप्रिय आहे. बहुतेक नियतकालिकांमधून होणारे सदर-लेखन या प्रकारचे असते.

गोवा येथे अनेक वर्षे वास्तव्य असलेल्या ज्येष्ठ लेखिका गिरिजा मुरगोडी यांचा ‘मौनवाटा’ हा तिसरा ललितलेख-संग्रह नुकताच वाचनात आला. त्यातले लेख वाचताना ललितलेखनाचे हे आयाम लक्षात आले. तीन कवितासंग्रह, एक कथासंग्रह आणि तीन ललितलेख-संग्रह त्यांच्या नावावर आहेत. ‘मौनवाटा’ या संग्रहाच्या मनोगतात त्या म्हणतात, ‘मन, आयुष्य, माणूस, भवताल, जन्म-मृत्यू, अस्तित्व, आणि या सर्वापलिकडच्या अज्ञात वाटा समजून घेणं पूर्ण आवाक्यातलं नाही. प्रयत्न होत राहतात. व्यक्त-अव्यक्ताच्या किनार्‍यावर उमटत, रेंगाळत राहिलेलं काही काही ‘मौनवाटा’मधून अभिव्यक्त झालं आहे.’

‘मौनवाटा’ या ललितलेख-संग्रहाला सर्वार्थाने ज्येष्ठ लेखक श्री माधव श्रीनिवास कामत यांची मनोज्ञ प्रस्तावना लाभली आहे. ‘गुण गाईन आवडी’ या भूमिकेतून लिहिलेल्या प्रस्तावनेत सुरुवातीलाच त्यांनी म्हटलं आहे, ‘मौनवाटा’ हा एकवीस ललित लेखांचा संग्रह मानवी जीवनावरचे परिणतप्रज्ञ भाष्य आहे... यात विषयांचे वैविध्य, आशयाची घनता आणि प्रतिपादनाची रंजकता आहे.’

डॉ राजेंद्र चव्हाण यांचे सुंदर मुखपृष्ठ लक्षवेधी आहे. काही मोजक्या, प्रसन्न रंगांतून त्यांनी आकाश, जलाशय, डोंगर, क्षितिज, झाडं आणि त्यातून साद घालणार्‍या वाटा.. हे सारं अमूर्त चित्रशैलीत चितारलं आहे. त्यातून संग्रहाच्या शीर्षकातील मौन आणि वाटा मुखपृष्ठावर साकारलेल्या दिसतात.

या संग्रहातील लेखांमधे एखादी आठवण किंवा प्रसंग सांगायला सुरुवात करून गिरिजाताई वाचकाना स्वतःच्या चिंतनात सामावून घेतात. बघता बघता हे चिंतन त्या आठवणीचे बोट सोडून एखाद्या सार्वत्रिक निष्कर्षाशी, गवसलेल्या शहाणपणाशी येऊन पोचते. ‘वर्तुळ’ या पहिल्या लेखात एका जुन्या घराची आठवण आणि तिच्या मागोमाग आलेल्या कितीतरी तपशिलांच्या आठवणींबरोबर हिंडताना नकळत ते घर एक प्रतिमा बनून जातं. आठवणीतल्या घरातली भली मोठी पेटी मनाच्या घरातली पेटी होते. ‘तिथल्या नक्षीदार पेटीत असतात जपलेली अप्रुपं... वेळोवेळी आप्तांनी, स्वकियांनी उलगडून दाखवलेली... कधीतरी स्वतःलाही उमजलेली.. अस्तित्वाला अर्थाचं अस्तर देणारी ही अप्रुपं.. ती जपायची... त्यांची रेशमी पिसं मंद झुळकीवर अलगद सोडून द्यायची... ती जिथं जिथं विसावतील, एकेका पाखराला स्वप्न देतील... स्वप्नांना पंख देतील.. पखांना बळ देतील.. ती पाखरं मग असंच एखादं घर उभारतील.. अशीच अप्रुपं जपतील..’ वर्तुळ पूर्ण होण्याचा हा मनातला प्रवास आपल्याला ओळखीचा वाटतो. कारण वेगवेगळ्या संदर्भात आपण कधी ना कधी असा प्रवास केलेला असतो...

‘चिंतनवाटेवर...’ या लेखात शीर्षकाप्रमाणे लेखिका चिंतनवाटेवरून चालली आहे. सोबत आहे मन आणि असंख्य मूलभूत प्रश्न... ‘कोण आहोत आपण? आपल्या अस्तित्वाचे प्रयोजन काय? या सृष्टीचक्रात कोणतंही अस्तित्व अनाठायी नसतं असं म्हणतात पण या प्रत्येक अस्तित्वाचा अर्थ काय? प्रयोजन काय? या विराट सृष्टीचे नियम कोण सांभाळतं? प्रत्येकाला जी विशिष्ट परिस्थिती लाभते ती कशामुळे? अस्तित्वाचा अर्थ आणि प्रयोजन यांचा शोध घेता घेता किती दार्शनिकांनी किती सत्यदर्शनं घडवली. पण तेच अंतिम सत्य, असं सांगणं कोणाला जमलं का? .... आणि या सगळ्याचा शेवट कुठं? मृत्यू? तो शेवट असतो? श्वास थांबला की सगळं संपतं, की ते विश्वाच्या पसार्‍यात पुढच्या प्रवासाला निघणं असतं? मृत्यू हा पूर्णविराम असतो का?’... असे प्रश्न विचारत उत्तरांचा धांडोळा घेत चाललेल्या प्रवासाचे वर्णन म्हणजे हा लेख. हे चिंतन वाचल्यावर यातले प्रश्न आपल्यालाही पडतात.. उत्तरांचा मागोवा घ्यायला लावतात..

या संग्रहातल्या लेखांची शीर्षकं लक्ष वेधून घेणारी आहेत. उत्सुकतेनं हे लेख वाचता वाचता उद्‍धृत करता येतील अशी बरीच वाक्यं लेखांमधे विखुरलेली सापडतात. उदा. १) ‘आपुलाची संवाद आपणाशी’ या लेखात- ‘प्रत्येकाचा बाहेरचा प्रवास असतो, तसा आतलाही एक प्रवास असतो.’, ‘स्वतःसारखं असण्यासाठी आधी स्वतःला जाणणं आवश्यक असतं’, ‘खरंतर आपलं मन कल्पतरूसारखं. त्याच्या तळी बसून जे मागू ते मिळतं.’, ‘आपला जन्म आणि मृत्यू हेच आपल्यासाठी आदि-अंत त्याच्या मधल्या काळाला आपण कोणते आयाम देतो त्यावर हे सुफल संपूर्ण की असफल, ते ठरतं.’ २) ‘जगणं चांदणं होत जातं’ या लेखात- असंच तर असतं आपलं जीवनही. कधी शुक्लपक्ष कधी कृष्णपक्ष..!, ३) ‘भय इथले’ या लेखात- ‘वास्तुच काय सारं भवताल आणि आयुष्यही तथास्तु म्हणत असतं... या यादीत आणखीही भर घालता येण्यासारखी आहे.

अधोरेखित करावीत अशा या वाक्यांसारखे काही शब्दही नोंद घेण्यासारखे आहेत. ते त्यांचे स्वतःचे आहेत. उदा. आषाढक्षण, उव्देगऋतू, मळभवाट, आषाढझड, अवकाशपुष्प, गंधक्षणांचे इंद्रधनू... इत्यादि.

हे सर्वच लेख अंतर्मुख विचार मांडणारे, जीवनविषयक मूलभूत विचार करणारे आहेत. ते चिंतन मनात रेंगाळत राहातेच पण काही लेख वाचकांनाही विचार करायला लावणारे आहेत. उदा ‘अहंकार अलंकार’ या लेखात सुरुवातीला लेखिकेनं एका प्रवचनात की भाषणात ऐकलेलं एक वाक्य दिलेलं आहे- ‘आपल्या अहंकाराला अलंकार बनवा...’ मनात घोळत राहिलेल्या या वाक्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न लेखिकेनं या लेखात केलेला आहे. त्या म्हणतात, ‘आत्मभान, ‘स्व’त्वाची जाणीव, स्वतःच्या क्षमतांची उचित ओळख, त्याबद्दलचा आत्मविश्वास आणि या सर्वाला मिळालेली योग्य दिशा हे ‘मी’पणाच्या भावनेला अलंकार बनवणं असतं का?’ असे वेगवेगळे अन्वयार्थ जोखत लेखात शेवटी म्हटलं आहे, ‘मन तरी किती विचित्र... प्रवचनापासून निघून वार्‍यावरच्या पिसासारखं कुठे कुठे फिरत रहिलं.. तरीही अजून शोध संपलेला नाहीच. तो चालूच राहणार..! लेखिकेच्या मनात चालू राहिलेला हा शोध जिज्ञासू वाचकाच्या मनात सुरू होतो.. खरंच काय असेल अहंकाराला अलंकार बनवण्याची प्रक्रिया? लौकिक आयुष्य जगताना अहंकार काही प्रमाणात गरजेचा असतो ना.. पण तो प्रमाणापेक्षा वाढायला लागला तर त्याला ‘अलम्'.. म्हणजे आता पुरे.. असं म्हणता आलं पाहिजे. या विषयी चर्चा करताना ‘अहंकाराला अलंकार बनवा म्हणजे अलम् म्हणा..!’ असा एक अन्वयार्थ हाती आला...

‘जरा थांब’, ‘भय इथले’, ‘ज्योतसे ज्योत’... हे लेखही ‘हे सगळे असते म्हणून जगणे, जगणे असते’ असं शहाणपण ओंजळीत देणारे आहेत.

सध्याच्या गतिमान काळात जगण्यासाठी धावणारी माणसं असा अंतर्मुख विचार करणं विसरत चालली आहेत. त्यांना व्यवहारापुरतंही एकमेकांशी बोलायला फुरसत मिळेनाशी झालीय. ज्यांच्याकडे वेळ आहे ती संवादासाठी आसुसलेली आहेत. फेसबुक, व्हॉट्सअपसारख्या माध्यमातून आपली तहान भागवून घेत आहेत. या पार्श्वभूमीवर स्वसंवाद कसा होऊ शकतो, त्याची गरज काय आणि त्यातून जगण्याला आतूनच कसा आधार मिळू शकतो हे समजणं आवश्यक आहे. आयुष्य रोज काहीतरी शिकवत असतं. अंतर्मुख होऊन आपापल्या मौनवाटांवरून चालताना ते शहाणपण कसं वेचून घेता येतं ते ‘मौनवाटा’ हा लेखसंग्रह वाचताना लक्षात येतं.

आसावरी काकडे

asavarikakade@gmail.com

 

मौनवाटा- ललितलेखसंग्रह

प्रकाशक- कैलाश पब्लिकेशन्स

पृष्ठसंख्या- १२५

किंमत- २००/- रुपये

 

 


Friday, 14 June 2024

न तळ न काठ...

 एखाद्या लेखाच्या दृष्टिने ‘मन हा अतीव्याप्त विषय आहे. श्वासासारखं सतत आत-बाहेर करणारं मन सर्वपरिचितही आहे. सर्व भाषांमधल्या म्हणी-वाक्‍प्रचारांपासून कवितादि सर्व साहित्यप्रकार, संत-साहित्य, तत्त्वज्ञान, मानसशास्त्र.. अशा सर्व स्तरांवर मनाचा परोपरीनं विचार झालेला आहे. तरी मनाविषयी काही म्हणताना आपली ‘मन मनास उमगत नाही..’ अशी एक प्रकारे ‘नेती नेती’ अवस्था होते. मग मनाविषयी काही म्हणायचंच तर नकाराच्या भाषेतच बोलावं लागतं. एका कवितेत मी लिहिलंय, मन कसं? तर- ‘न तळ न काठ फक्त रहाट... न क्षितिज न किनारा फक्त गाज.... न पंख न पाय फक्त प्रवास.... न अवकाश न काळ फक्त श्वास.... न आर न पार फक्त भान...!’ मनाविषयी लिहिताना प्रथम ही कविता आठवली. मग मन हा विषय असलेल्या कितीतरी कविता आठवत गेल्या.

त्यात सर्वात प्रथम आठवली बहिणाबाईंची सर्वश्रुत कविता..! वेगवेगळ्या प्रतिमांच्या आधारानं त्यांनी मनाचं स्वरूप विषद केलंय. त्या म्हणतात- आत्ता भुईवर दाणे टिपताना बघावं तोवर आकाशात भरारी घेणार्‍या पाखरासारखं आहे मन. खसखशीच्या दाण्याहून सूक्ष्म मन. पण त्याला आभाळ पुरत नाही.. मन इतकं विषारी की त्याहून विंचू साप तरी बरे कारण त्यांचं विष उतरवता येतं... मन असं मोकाट की वार्‍यानं पाण्याच्या लाटा उसळाव्यात तसं याला सगळीकडे धावता येतं... कवितेत शेवटी म्हटलंय मन म्हणजे देवाला जागेपणी पडलेलं स्वप्न आहे..! ज्याच्याविषयी ठोसपणानं काही बोलता येत नाही त्याच्या वर्णनाचा समारोप स्वप्नासारख्या अमूर्त प्रतिमेच्या आधारे कलात्मक विधान करून बहिणाबाईंनी केलेला आहे. या विधानाचे तत्त्विक स्वरूपही लक्षात घेण्यासारखे आहे. जागेपणी स्वप्न बघणे म्हणजे जागृतावस्था ओलांडून स्वप्नावस्थेत जाणे. शरीरामधे मनासारखं महत्‍ तत्त्व निर्माण करण्यासाठी ईश्वराला स्वप्नावस्थेत, जाणिवेच्या पलिकडे जावं लागलं..

सुधीर मोघे यांचीही अशीच एक सुंदर कविता आहे. त्यांनी म्हटलंय- ‘मन मनास उमगत नाही / आधार कसा शोधावा / स्वप्नातिल पदर धुक्याचा / हातास कसा लागावा /’.... ‘मन गरगरते आवर्त / मन रानभूल, मन चकवा / मन काळोखाची गुंफा / मन तेजाचे राऊळ / मन सैतानाचा हात / मन देवाचे पाऊल”... कवितेत शेवटी म्हटलंय, ‘चेहरा मोहरा याचा कुणि कधी पाहिला नाही / धनि अस्तित्वाचा तरिही ह्याच्याविण दुसरा नाही..!’ सुधीर मोघे यांनी मनाला अस्तित्वाचा धनी म्हणून शरीरातील मनाचे स्थान किती मोठे आहे ते अधोरेखित केले आहे.. आपलं खरं जिवंत असणं म्हणजे विचार करणारं, कल्पना करणारं मन शाबूत असणं. पाश्चात्य तत्त्वज्ञ देकार्त यांचं एक विधान प्रसिद्ध आहे. आपल्या अस्तित्वाचा पुरावा देताना त्यांनी म्हटलं आहे- ‘I think therefore I am..!’ मी विचार करू शकतो त्या अर्थी मी आहे..! इथंही विचाराची अस्तित्वाशी सांगड घातलेली दिसते.

कल्पना, विचार हे कविता किंवा कोणत्याही कलेचं मूलद्रव्य असतं. कलाकृतीची निर्मिती-प्रक्रिया काय हे प्रत्यक्ष कलाकारालाही नेमकेपणानं उमगत नाही. अनेकांनी अनेक प्रकारे त्याचे विश्लेषण केले आहे. पण या अमूर्त प्रक्रियेविषयी काही म्हणताना काही ठोस विधान करता येत नाही. मग संत तुकाराम महाराजांच्या ‘बोलविता धनी वेगळाची’ या ओळीचा आधार घ्यावा लागतो. या ओळीचा गर्भितार्थ समजून घेताना लक्षात येतं की ‘बोलविता धनी वेगळा’ म्हणजे लिहिणार्‍या ‘मी’च्या सजग जाणीवेपलिकडे काही आहे जिथे लिहिण्याचा उगम आहे. मानसशास्त्रात जाणिवेपलिकडल्या अर्धजाणीव आणि नेणीव या स्तरांचा विचार मांडलेला आहे. माणसाच्या हातून कळत न कळत घडणार्‍या प्रत्येक कृतीची प्रेरणा या स्तारांमधे शोधता येते.

या संदर्भात सुनील पारेख यांची दोन मननीय कोटेशन्स अलिकडे वाचनात आली. ती अशी- १- ‘Your subconscious mind is the silent partner in your life’s journey’, म्हणजे आपण जे काही करत असू त्या प्रत्येक कृतीला सतत सोबत असलेल्या subconscious मनाचं दिग्‍दर्शन मिळत असतं.  

आणि साधारण याच अर्थाचं दुसरं विधान- ‘The subconscious is the canvas where the soul’s deepest desires are painted. सजग जाणिवेला नीटसं उमगलेलं नसतं असं आत्म्याच्या जवळचं काही निर्मिती प्रक्रियेत बुडालेल्या कलाकाराच्या कलाकृतीत उमटतं. आपली कलाकृती समोर ठेवून पाहताना कलाकारालाही उमगत नाही की हे आलं कुठून? ते subconscious mind मधून आलेलं असतं. (Sunil Parekh हे Subconscious Mind Strategist and Thought Transformation Expert आहेत असं या वाक्यांच्या खाली लिहिलेलं आहे.)

मानसशास्त्र हा अभ्यासाचा एक मोठा, स्वतंत्र विषय आहे. मनाचं स्वरूप, मतिमंदता, मानसिक आजार, त्याचं निदान, त्यावर उपचार, समुपदेशन हे सर्व यामधे येतं. मानसोपचारतज्ञ नंदू मुलमुले यांनी मनाविषयी म्हटलं आहे, ‘Mind is a product of Brain. मन म्हणजे मेंदूची विद्युत रासायनिक अभिव्यक्ती. त्यामुळेच जे जे मनाचे कार्य ते अप्रत्यक्षपणे मेंदूचे कार्य.’

डॉ. आनंद नाडकर्णी यांनी म्हटलं आहे, Mind itself is an abstract function of brain. So everything about mind is related to brain as well.

मानसोपचार, समुपदेशन यामधे वेगवेगळ्या अभ्यासानुसार NLP (Neuro-linguistic programming), REBT (Rational emotive behavioral therapy by Dr. Albert Ellis) अशा वेगवेगळ्या पद्धतींचा वापर केला जात आहे. यामधे विचार करण्याची पद्धत बदलण्यावर भर असतो. हे समजून घेताना जाणवलं की या पद्धती म्हणजे काही प्रमाणात संतांनी उपदेश केलेल्या आध्यात्मिक साधनेचा आधुनिक आविष्कार आहे.

पण भारतीय तत्त्वज्ञानात मनाचा विचार मेंदूच्या संदर्भात नाही, एक स्वतंत्र तत्त्व म्हणून केलेला आहे. सांख्य दर्शनातील मांडणीनुसार ज्या पंचवीस  (प्रकृती, पुरुष, मन, बुद्धी, अहंकार, पाच महाभूते, पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये आणि पाच तन्मात्रे- सूक्ष्म भूते) तत्त्वांच्या  एकत्रीकरणातून हे दृश्य विश्व साकारतं त्यात मन हे एक तत्त्व आहे. वेगवेगळ्या दर्शनांत आणि उपनिषदांमधे वेगवेगळ्या प्रकारे या तत्त्वाचा विचार केलेला आहे. ही सृष्टी निर्माण झालेली नव्हती तेव्हा जे एकच तत्त्व होते, ज्याला ब्रह्म म्हटले जाते, त्याला वाटले, ‘एकोहं बहुस्याम्‍’. त्याच्या या वाटण्यातून सृष्टीची निर्मिती झाली असं छांदोग्य उपनिषदात म्हटलेलं आहे. म्हणजे काही अस्तित्वात नव्हतं तेव्हा फक्त असं ‘वाटणारं मन’ होतं...

मानवी जीवनातही माणसाचं मनच बरंच काही निर्माण करत असतं. स्वप्नात दिसणार्‍या सर्व गोष्टी, सर्व दृश्ये, सर्व घटना, सर्वकाही मनाची निर्मिती असते. जागेपणी देखील जगातील सर्व गोष्टींकडे आपण आपल्या नजरेतून बघतो. आपले अर्थ लावतो. स्वतःविषयीही आपली स्वतःची काही समजूत असते... एका अर्थी आपलं अनुभवविश्व ही आपली, आपल्या मनाची निर्मिती असते. विशेष म्हणजे आपण निर्माण केलेलं हे विश्व मनाच्या बदलत्या अवस्थेनुसार सतत बदलत असतं. आपली सुख-दुःख, राग-लोभ, आजार- वेदना, काळजी, भीती... सगळे मनाचे खेळ असतात. माणसं, वस्तू, घटना, दृश्ये... स्वतःच्या जागी स्व-रूपात असतात. पण प्रत्येकाच्या नजरेला ती वेगळी दिसतात. परीक्षेत यश मिळालं नाही, नोकरी मिळाली नाही, भूकंपात सर्व उद्‍ध्वस्त झालं... अशा कुठल्याही छोट्या-मोठ्या संकटाच्या वेळी खचून जायचं की त्याला नव्या प्रयत्नांची संधी समजायचं हे आपल्या हातात असतं. आपण जे समजतो त्यानुसार आपली पुढली कृती होते आणि त्या कृतीनुसार पुढल्या आयुष्याला वळण लागतं. आणि परिस्थितीचं पुनर्वाचन नेहमीच शक्य असतं. सारांश मन हेच आपल्या जीवनाचा शिल्पकार असतं. REBT, NLP सारख्या आधुनिक समुपदेशन पद्धतीत हेच सांगतात. दृष्टिकोन, विचार बदला. कृती बदलेल. आयुष्य बदलेल.  

मनाचं हे स्वरूप जाणून आध्यात्मिक साधनेतही मनाला योग्य वळण लावण्याचा उपदेश संत-महात्म्यांनी केलेला आहे. संतसाहित्यात काव्य, तत्त्वज्ञान आणि प्रत्यक्ष जगणं सारं काही सामावलेलं आहे. तत्त्वज्ञान जगण्यात कसं आणि का उतरवायचं त्याविषयीचा उपदेश संतांनी आपल्या काव्यातून केलेला आहे. जगणं अधिक उन्नत करणार्‍या या आध्यात्मिक साधनेत मानवी मनाचं स्थान महत्त्वाचं आहे. कारण मानवी दुःखाचं मूळ मनाच्या विकाराधीन होण्यात आहे. या दुःखातून मुक्त व्हायचे तर ते शुद्ध, सात्विक कसे करावे याविषयीचा उपदेश संत साहित्यात आढळतो. मनाचे तात्त्विक स्वरूप संतांनी जाणलेले असते. विकारांच्या आधीन होऊन माणसाला उद्‍ध्वस्थ करणारे मन विकारांपासून अलिप्त होऊन सत्‍प्रवृत्तही होऊ शकते. संतांनी आपल्या कवितेतून परोपरीनं माणसाला सन्‍मार्गावरून चालण्याचा उपदेश केलेला आहे.

संत ज्ञानेश्वर यांनी एका ओवीत म्हटलंय, ‘देह तरी वरिचिलीकडे । आपुलिया परी हिंडे । परि बैसका न मोडे । मानसींची ॥ १३/४८

देह आपल्या कर्मानुसार वावरत असतो. हे वावरणं वरवरचं, बाह्य असतं. पण जो ज्ञानी असतो तो देहाच्या बाह्य व्यवहाराने विचलित होत नाही. म्हणून माणसाने प्रयत्नपूर्वक स्व-रूपाविषयीचे ज्ञान संपादन करावे. पण माणसाचं मन या प्रयत्नांच्या आड येत राहातं. त्यावर काय कसा उपाय करावा या संदर्भात एक ओवी आहे. ती अशी-

‘का जे यया मनाचे एक निके । जे देखिले गोडीचिया ठाया सोके । म्हणौनि अनुभवसुखचि कवतिके । दावीत जाइजे ॥ ६/४२०’ मनाचं एक बरं असतं की जे समोर येतं त्यात त्याला गोडी वाटते. म्हणून त्याला चांगल्या, योग्य गोष्टीची गोडी लावावी. एकदा मनाला त्यातला आनंद उमगला की मन त्याच्याच मागे लागतं. मनाला वाईटाचं व्यसन लागतं तसं चांगल्याचंही व्यसन लागतं. स्वरूप-ज्ञानाच्या अभ्यासात मन रमलं की हळूहळू अज्ञान लोप पावत जाईल... रोजच्या जगण्यात मनाला कसं वळण लावावं याचं तंत्रच या ओवीत सांगितलं आहे.

समर्थ रामदासांनी तर ‘मनाचे श्लोक’ लिहून मनाशी संवादच साधलाय. यातील २०५ श्लोकांमधे मना सज्जना.. म्हणून ‘अचपळ मन माझे नावरे आवरिता’ अशा मनाला केलेला सविस्तर उपदेश आहे. यातला शेवटचा श्लोक असा आहे- ‘मनाची शते ऐकता दोष जाती । मतीमंद ते साधना योग्य होती । चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी । म्हणे दास विश्वासता मुक्ति भोगी ॥’

मनाच्या श्लोकांचं वैशिष्ट्य हे की या उपदेशात अध्यात्मिक साधना हा रोख असला तरी रोजच्या जगण्यातील वर्तनातही त्याचा उपयोग करून घेता येतो.

संत तुकाराम यांची अभंगगाथा म्हणजे प्रकटचिंतन आहे. आपल्या अभंगांमधून त्यांनी आपलं प्रांजळ मनच उघडून ठेवलं आहे. स्वतःला धारेवर धरत त्यांनी ‘अणुरणिया थोकडा तुका आकाशाएवढा’ एवढा दीर्घ प्रवास केला. या प्रवासात कुणा गुरूचे मार्गदर्शन न घेता ‘सत्य असत्यासी मन केले ग्वाही’ अशी भूमिका घेत त्यांनी स्वशोधातून ईश्वर-शोध चालू ठेवला. ‘तुका म्हणे होय मनासी संवाद आपुलाची वाद आपणासी’ हा स्वसंघर्ष म्हणजे त्यांच्यासाठी ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ या पातळीवरचा होता. अशा तीव्र संघर्षातून त्यांना ईश्वराच्या निर्गुण निराकार असण्याचा बोध झाला तेव्हा एका अभंगात ते म्हणतात, ‘आहे ऐसा देव वदवावी वाणी । नाही ऐसा मनी अनुभवावा ।’ सगुण निर्गुणाची ही सांगड एकमेवाव्दितीय आहे. यात सत्याशी प्रतारणा न करता देव आहे या समजुतीचा आधार घेता यावा ही सामान्य माणूस असण्याच्या दुबळेपणाची ‘सोय’ पाहिली आहे..!

संत तुलसीदसांनी एका रचनेत नामस्मरणाचं महत्त्व सांगितलंय. ते म्हणतात,

‘रामनाम मनी दीप धरू दीह देहरी द्वार

तुलसी भीतर बाहेरहू जौ चहती उजियार ॥’

मन म्हणजे देहाच्या दाराचा उंबरठा. त्यावर जर रामनामाचा दीप तेवत असेल तर अंतर्जगत आणि बाह्यजगत दोन्ही उजळून निघतील. तुलसीदासांनी मनाचं स्थान अचूक ओळखलंय. आणि त्याचा उपयोग कसा करून घेता येतो ते काव्यात्म रीतीनं समजावलं आहे. नामस्मरण प्रक्रियेत स्मरणापेक्षा नामाखेरीज बाकी सगळ्याच्या विस्मरणाला अधिक महत्त्व आहे. काल्पनिक काळजीभोवती फिरणार्‍या अनावश्यक विचारांपासून बाजूला होऊन त्या रिक्ततेत रामनामाचा दिवा लावणं म्हणजे नामस्मरण. सजगपणे ही प्रक्रिया अनुभवणं हा एकप्रकारे मनाचा व्यायाम आहे. यामुळे मन स्वस्थ, शुद्ध झाले की जीवन अंतर्बाह्य उजळून निघतं.

संत कबीर यांनीही आपल्या काही दोह्यांमधून मनाचं स्वरूप सांगितलंय. त्यातले तीन दोहे समजून घेण्यासारखे आहेत.

१- ‘मनुवा तो पंछी भया, उडिके चला अकास ।

ऊपर ही ते गिरि पडा मन माया के पास ॥’

मनाचं स्वरूप व्दंव्दात्मक आहे. ते भव्यतेच्या ओढीनं आकाशात झेप घेतं खरं पण सामान्य, लौकिक गोष्टींच्या मोहानं परत खाली येतं. मोहमायेच्या पाशात अडकून राहातं. सत्य सोडून भासमान सुखाला भुलतं.

२- ‘धरती फाटै मेघ मिले कपडा फाटै डौर ।

तन फाटै को औषधि मन फाटै नहीं ठौर ॥’

उन्हाच्या झळांनी धरतीला भेगा पडतात. पण पाऊस पडल्यावर भेगा बुजून जातात. कपडे फाटले तर दोर्‍यानं शिवता येतात. शरीर आजारानं जर्जर झालं तर औषधोपचारानं पूर्ववत करता येतं. पण मन फाटलं, विदीर्ण झालं तर त्यावर काही उपाय नसतो. म्हणून त्याला सत्य आणि आभास या व्दंव्दामधे व्दिधा होऊ देऊ नये.

३- ‘मन मनसा जब जायगी तब आवैगी और ।

जबही निहचल होयगा तब पावैगा ठौर ॥’

मन म्हणजे विकार-विचारांचा साठा. राग-लोभासारखे विकार तशाच विचारांना जन्म देतात. आणि मन त्यामागं धावत राहातं. स्वरूप ज्ञान झालेलं, विकार-विचारांपासून अलिप्त झालेलं मन स्थिर, निश्चल होतं. शांत, स्वस्थित होतं.

काव्यात्म, शास्त्रीय, तात्त्विक, संतांच्या नजरेतून झालेले मनाचे विश्लेषण कितीही समजून घेतले तरी आपल्या पातळीवर मनाचा विचार करताना बरेच प्रश्न पडतात. आपलंच मन तरी कळत नाही की संतांच्या उपदेशानं किंवा समुपदेशनाच्या आधुनिक मार्गदर्शनानं प्रभावित होऊन तसं वागायचा निश्चय करतं आणि दुसर्‍याच क्षणी कसं पालटतं? आपल्याला निश्चय करणारं एक आणि विचलित होणारं एक अशी दोन मनं असतात काय? की वर्तमानाचा ठाव सोडून सतत भूत-भविष्यात भरकटणारं मन बहुरूपी असतं? आणि मुख्य प्रश्न हा की या चंचल मनाला आवरणारं कोण? मनच की आणखी कुणी?... प्रत्येकाचा व्यक्तिगत अनुभव आणि आपापल्या मनाशी असलेलं नातं वेगवेगळं असतं. ज्याची जशी जिज्ञासा, जेवढी क्षमता त्यानुसार त्याला मन हा विषय उमगणार. कुणी कसेही, कितीही मनाचे वर्णन केले तरी ते निसटून त्या वर्णनाच्या परीघाबाहेरच राहणार..!

***

आसावरी काकडे

आनंदघन दिवाळीअंक २०२४